पुणे- कुंभ मेळ्यात नाही , जत्रेत हरवलेला नाही , चक्क शिक्षणासाठी २०१२ साली घर सोडून पुण्यात आलेला तरुण मुलगा जेव्हा तब्बल २०२४ मध्ये म्हणजे सुमारे १२ वर्षानंतर ६५ वर्षाचा पिता आणि ५८ वर्षाच्या माते समोर ..पुणे पोलिसांनी त्याला सुखरूप अवस्थेत उभा केला तेव्हा त्या माता पित्यांच्या अश्रूंचा बाध फुटला .. ज्याची आशा त्यांनी सोडून दिली होती …त्याला पाहून गावकऱ्यांनी देखील पुण्याकडे धाव घेतली . चक्क २५ /२६ वर्षाचा तरुण स्पर्धा परीक्षेसाठी घर सोडून पुण्यात आलेला , वारंवार परीक्षा देत असफलतेमुळे नैराश्यात गेलेला, आणि घरी परत न जाता भटक्या वृत्तीने कमकुवत मानसिकतेत पुण्यात आत्महत्येच्या निर्णया प्रत पोहोचलेल्या या तरुणाला चक्क पोलिसांचा आधार मिळाला ..आणि समुपदेशना नंतर तो पुन्हा जीवनात नवी पालवी , उर्मी घेऊन आई वडिलांच्या समवेत गावी परतला .
सहसा पोलिसांच्या खात्यात दुर्मिळ अशी आढळणारी हि एक सत्य कथा ,मनाला भावून जाणारी ….नेमके काय घडले ते वाचा …
बुलढाणा येथे आपले राहते गावी तो लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनामध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची इच्छा होती , परंतू आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची व बिकट, अशिक्षित आई-वडील, मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करीत असल्याने कुटूंबाने अभ्यासा करीता पुणे येथे जाणे करीता विरोध करत होते . काही दिवस उलटून गेली तरी देखील त्याचे डोक्यात पुण्यात जावून अभ्यास करण्याचे खुळ कायमच होते.अखेरीस शिक्षणाच्या , स्पर्धा परीक्षेच्या ओढीने सन २०१२ मध्ये कोणास काही एक न सांगता तो घरातून निघून पुणे येथे आला, पुणे येथे अर्धवेळ (पार्ट टाईम) काम करुन अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यादरम्यान त्याने महाराष्ट्र लोकसेवा तसेच राज्यसेवा अंतर्गत वेगवेगळ्या पदाकरीता वेळोवेळी परिक्षा देखील दिल्या. परंतू स्पर्धा परिक्षामध्ये कोणतीही पोस्ट निघत नसल्याने व वारंवार अपयश येत असल्याने त्यास नैराश्य आले. तिकडे आई वडिलांनी मुलगा कुठे गेला ? या चिंतेने तो हरविल्याची अखेरीस नोंद करविली, आज ,उद्या तो परत येईल मिळून येईल या आशेने ते वात पाहत होते पण पाहता पाहता वर्षावर वर्षे निघून जात होती . नैराश्यात सापडलेला हा तरुण मुंढवा पुणे येथे सन २०१७ पासून भाड्याने राहण्यास आला होता.५ महिने त्याने भाडे दिले तर नाहीच पण दिनांक १५/१०/२०२३ रोजी सकाळी १०/०० वा.चे सुमारास तो राहते भाड्याचे रुममधून काही एक न सांगता निघून गेल्याने ज्यांचे घर होते त्यांनी मुंढवा पोलीस ठाणेस मिसिंग तक्रार नोंद केली होती. या मिसिंगच्या तपासामध्ये तांत्रीक विश्लेषन करुन या तरुणाचा शोध घेणेस पोलीसांना यश आले.तेव्हा मानसिक कमकुवत असलेला आणि नैराश्यात सापडलेल्या तरुणाची त्यांना ओळख पटली त्यांनी अधिक चौकशी केली असता सन २०१२ मध्ये मुळगाव काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा येथून कोणास काहीएक न सांगता स्पर्धा परिक्षेकरीता पुणे येथे आल्याचे कळले परंतू स्पर्धा परिक्षेत यश संपादन न झाल्याने नैराश्य आले होते. त्याचे नैराश्य व कुटुंबापासूनचा दुरावा याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी या तरुणाच्या राहतेगावी सरपंच व आई वडील यांना संपर्क करुन माहिती दिली तेव्हा प्रथम त्यांचा या माहितीवर विश्वास बसला नाही, त्यांनी वारंवार विचारणा करुन शहानिशा केली. तेव्हा त्यांना मुंढवा पोलीस ठाणेस बोलावून घेतले आणि मुलाची आशा सोडून दिलेल्या मुलाचे वडील वय ६५ वर्षे, आई वय ५८ वर्षे यांनी त्यांचे मुलास भेटल्यानंतर ऐकमेकांना पाहून डोळ्यातून आनंद अश्रूंची बरसात सुरु झाली . काटोडा गावचे सरपंच प्रदीप ढिगळे, वडील, आई व इतर नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे वारंवार आभार मानत होते. पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्ल कौतुक होते आहे. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर, श्री.आर राजा, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, राजू महानोर, पोलीस अंमलदार महेश पाठक, दत्ता जाधव, दिनेश भांदुर्गे, योगेश गायकवाड यांनी केलेली हि कामगिरी पोलिसी मानवतेच्या पुस्तकात निश्चित एक मार्गदर्शक अध्याय म्हणून कायम कोरली जाईल.