अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : तुमच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाला आणि तुम्ही समाधानी असाल, तर प्रॉब्लेम आहे. असे करू नका, तुमच्या लिखाणात विविधता आणा, विविध प्रयोग करा. सिंदबादच्या सात सफरी आल्या पण पुढच्या कोणी का लिहिल्या नाहीत याचा विचार करणे आवश्यक आहे. आज बालसाहित्यिकांनी तीन पातळीवर काम करायला हवे. मराठीत काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय आहे, हे सर्व अभ्यासून लिखाण करणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी दिला.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.१०) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे मंचावर होते. क्षिप्रा शहाणे यांना लोखंडे-जोशी पुरस्कार, प्रिया फुलंब्रीकर यांना कवी ग. ह. पाटील पुरस्कार, डॉ. प्रतिमा जगताप यांना वा. गो. आपटे पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांना आनंद मासिक पुरस्कार, संध्या देवरूखकर यांना रा. वा. शेवडे गुरूजी पुरस्कार, पुंडलिक वझे यांना सर्जेराव जगताप पुरस्कार, संजय काकडे यांना बा. रा. मोडक पुरस्कार, बाबूराव शिरसाट यांना दयार्णव कोपर्डीकर पुरस्कार, डॉ. प्रसन्न दाभोळकर यांना सुधाकर प्रभू पुरस्कार आणि बबन शिंदे यांना अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजीव तांबे म्हणाले, मुलांना भविष्यात काय पहायचे आहे त्यावर लिहा. नाविन्यपूर्ण काम करा. आपल्या दृष्टीकोनाचा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाला, एआयला विरोध करून चालणार नाही. त्याच्या मदतीने पुढे जायला हवे. आपण अपडेट व्हायला हवे. आपण लिखाणात कमी पडतो; मुलांत मिसळायला कमी पडतो. मूल्ये जुनीच आहेत, पण ती नव्या पद्धतीने लिहायला हवीत. लेखक म्हणून जेवढे असमाधानी असू तेवढे अधिक चांगले काम होईल.
पंडित विद्यासागर म्हणाले, बालसाहित्य म्हणजे जादू, चेटकीण अशा गोष्टी. पण आता नवीन पिढीला काही तरी वेगळे हवे आहे. वेगळेपण दिले तर ते मुलांना आवडते. इंग्रजी भाषेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना मराठी वाचायला आवडत नाही. त्यामुळे नवीन प्रयोग करायला हवेत. सरकारचे धोरण निराशाजनक आहे. त्यामुळे लेखकांना त्यांचा मार्ग शोधावा लागेल.
प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी म्हणाले, बालकुमार साहित्याला पुरस्कार देणारी बालकुमार ही एकमेव संस्था आहे. याची दखल सरकारने देखील घेतली आणि पुरस्कार देणे सुरू केले. संस्थेचे १९ पुरस्कार आहेत; पण सर्व प्रकारात लेखक लिहित नाहीत ही आमची खंत आहे. मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल याचा विचार व्हायला हवा.
प्रसाद भडसावळे म्हणाले, परीक्षणासाठी बरीच पुस्तके आली. पण त्यात कवितेची अधिक होती. बालसाहित्यात वास्तववाद अधिक होता. मुलांसाठी एवढा वास्तववाद योग्य आहे का याचा विचार लेखकांनी करावा.
माधव राजगुरू म्हणाले, आज मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य लिहिले जाते. पण ही संख्यात्मक वाढ आहे. दर्जा राहिलेला नाही. बालसाहित्याचा मूळ झरा आटत चालला आहे का अशी स्थिती आहे. बालसाहित्यात संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ व्हायला हवी.
वर्षा तोडमल म्हणाल्या, मराठी भाषेत ९४ हजार मुले नापास होतात, ही बातमी वाचली आणि हळहळ वाटली. इंग्रजीचा प्रभाव हे एक कारण आहे. भाषेच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रम आखले गेले नसावेत. मुलांच्या हातात पुस्तके हवीत; पण त्यांच्या हातात मोबाईल आहे. यावर जाणिवपूर्वक काम केले पाहिजे. भाषिक संस्कार हरवलाय.
सूत्रसंचालन प्रज्ञा देशपांडे यांनी केले, आभार संदीप तापकीर यांनी मानले.

