अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर… विक्रमी कारभार
पुणे- काल महापालिकेच्या सभागृहात झालेल्या मुख्यसभेत ९५ प्रस्ताव फटाफट मंजूर झाल्यावर याकडे आता अनेकांनी वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे .या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर यांनीही ” झिरो पेंडेंसी ” च्या नावाखाली महापालिकेची सभा एक दिवसात संपवणे, किंवा घाईने एकाच सभेत ९५ विषय संपविणे हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले,’ यामुळे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांवर काही चर्चा होत नाही. अधिकाऱ्यांना हेच पाहिजे असते कारण प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये अनेक गोष्टी उघडकीस येतात, वेगवेगळ्या खात्यामध्ये झालेल्या चुका निदर्शनामध्ये येतात आणि जनरल बॉडी मध्ये अधिकाऱ्यांवर माननीय सभासदांचा वचक राहतो. २००२ पर्यंत महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ५ ते ६ होत होत्या आता मात्र एक-दोन सभेत सर्व विषय पत्रिका संपवली जाते. विषय पत्रिका संपवली जाणे हे चांगली प्रथा आहे पण त्याचबरोबर याही गोष्टीचा विचार पक्ष नेत्यांनी करायला हवा. सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या विषयावर महापालिका आयुक्त किंवा इतर वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत असतात आणि काही महत्त्वाचे निर्णय देखील होत असतात. त्यामुळे सर्व साधारण सभा महिन्यात किमान चार ते पाच दिवस चालली पाहिजे असे माझे मत आहे.
अर्थात कोणत्या विषयावर किती वेळ चर्चा करायची, कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे याबाबत पक्षनेते व माननीय महापौर यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा अर्धा तासापेक्षा जास्त असू नये असे नियम सांगतो पण सध्या तीन, साडेतीन तास पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर चर्चा होते हे योग्य नाही, त्यामुळे नियमित प्रश्नांवर चर्चा होत नाही आणि प्रशासनाला नेमके हेच हवे असते.
दरम्यान एक-दोन सभेत सर्व विषय पत्रिका संपवली , भानगड काय ? नवीन नगरसेवकांना विषय समजले काय ?असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

