पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे टर्मिनल लवकर सुरु व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या लढ्याला यश आले असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पुण्यात येऊन उदघाटनाची घोषणा करणे भाग पडले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे .
विमानतळ टर्मिनलचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोयीची तारीख मिळत नसल्याने थांबले होते. या संतापजनक प्रकाराचा निषेध दि. २० डिसेंबर २०२३ रोजी नोंदविला.केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि विमानतळ संचालक यांना निवेदने दिली. दि. १ जानेवारीपूर्वी विमानतळ टर्मिनल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, तसेच प्रवासी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर दि. ३ जानेवारी २०२४ रोजी लोहगांव विमानतळ येथे जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केले आणि दि .१६ जानेवारी २०२४ पूर्वी टर्मिनल उदघाटन न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा अंतिम इशारा दिला होता,अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
काँग्रेस पक्षाने पुणेकरांच्या आर्थिक, औद्योगिक घटकांशी संबंधित टर्मिनल कार्यान्वित होण्याची गरज मांडली. पुणेकरांचा दबाव निर्माण केला, त्यामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्यजी शिंदे यांना पुण्यात यावे लागले आणि विमानतळ टर्मिनलचे उदघाटन लवकरच होईल अशी घोषणा करावी लागली. कॉंग्रेस पक्षाच्या लढ्याला यश आले मात्र यापुढेही पाठपुरावा करून पुणेकरांना हवाई वाहतूक सुविधा मिळवून देवू, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.