सोलापूर – पवार साहेब, प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती, तर त्यांना कोणी रोखले होते? त्यावेळी मंदिर का बांधले गेले नाही?, असा प्रश्न करीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांच्या विधानाला उत्तर दिले. ‘ऐ पब्लिक है, सब जानती है’ अशीही उपरोधिक टीका त्यांनी केली.
• पवार काय म्हणाले होते?
राजीव गांधी यांनी राम मंदिर उभारण्याचा विचार मांडला होता असे शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून म्हणाले.
• तुम्हीही केंद्रीय मंत्री होते
यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या मताचा चांगलाचा समाचार घेतला आहे. एक्सवर (ट्विटर) त्यांनी आपले मत मांडले. ते पुढे म्हणाले की, राजीव गांधी यांच्या निधनानंतर २० वर्षांहून अधिक काळ केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून सत्ता उपभोगत होते. तरीही राजीव गांधींचे स्वप्ने का पूर्ण करू शकले नाही?
• मग, उद्घाटनाला येणे का टाळता?
बावनकुळे म्हणाले, राजीव गांधींच्या या स्वप्नाचा त्यांना विसर पडला असला, तरी तुम्हीही आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी म्हणून सरकारचा महत्त्वाचा भाग होतात, मग तुम्ही त्यांची आठवण का करून दिली नाही? आणि हो, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कोर्टात भगवान श्रीराम यांना काल्पनिक म्हटले होते, राम सेतूचे पुरावे मागितले होते. नाही नाही ती दुषणे रामभक्तांवर लावली, तेव्हा तुम्ही राजीव गांधींचे हे विधान त्या नेत्यांपर्यंत का पोहोचवले नाही?
• इंडी आघाडीकडून उत्सवाचे राजकारण
आता जेव्हा हे राजीव गांधींचे स्वप्न होते असे म्हणता, तर मग सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष तसेच इंडी आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तुम्ही स्वतःही या कार्यक्रमाला येण्यास का टाळता? असाही प्रश्न त्यांनी केला. जनता पाहत आहे आणि देवही पाहतो आहे की त्यांचा वनवास संपत असताना या उत्सवात तुम्ही लोक कसे राजकारण करत आहात. हे सर्वांना ठाऊक आहे, तुम्ही कितीही ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही लोकांना सर्वच माहिती आहे असेही ते म्हणाले.