पुणे, दि. १० जानेवारी- तरुणाईमधील ऊर्जा, नवकल्पना, संधींचे सोने करण्याची मानसिकता आणि या कौशल्यांना लाभणारी आधुनिक तंत्रविज्ञानाची जोड, यातून राजकीय क्षेत्रातील कारकीर्द घडवण्यासाठी, उत्तम पृष्ठभूमी तयार झाली आहे. आता तरुणाईने स्वप्नांचे पंख पसरून झेप घ्यावी, असा सल्ला देशाच्या विविध भागांतील विद्यमान आमदार, खासदार, प्रवक्ते यांनी एकत्रितरीत्या दिला.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात ’राजकारणातील तरुण नेतृत्व – वक्तृत्व किंवा वास्तव’ या विषयावर युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रितिनिधींनी विचार मांडले.
याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनाज पूनावाला, बिहारच्या लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श युवा विधायक सन्मान तसेच उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मान प्रदान करण्यात आले. यामध्ये आमदार सत्यजीत तांबे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सरपंच यशोधराराजे शिंदे (सांगली जिल्हा, महाराष्ट्र), राजबलविंदरसिंग (पंजाब), प्रियांका तिवारी (उत्तर प्रदेश) आणि नीरू यादव (राजस्थान) या उच्चशिक्षित सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
खासदार चिराग पासवान म्हणाले, ’उच्चशिक्षित उमेदवार वेगळा विचार देऊ शकतात. पण राजकारण या विषयाबद्दल गैरसमज अधिक आहेत. ते युवा मंडळींनी राजकारणात येऊन दूर केले पाहिजेत. जे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत, ते तुम्हीच पुढाकार घेत घडवू शकता. तुमच्यापाशी नवे विचार, ऊर्जा, उत्साह, नव्या कल्पना आहेत. या सगळ्याची राजकीय क्षेत्रात आवश्यकता आहे. फक्त आपला विचार, कल्पना कुठल्या एका जात-धर्म-पंथापुरत्या सीमित नसाव्यात. त्यात सर्वसमावेशकता असावी. युवा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले पाहिजे, तर देशाचा अपेक्षित विकास लवकर करणे शक्य होईल,’.
शहनाज पूनावाला म्हणाले, ’मी स्वतः एमआयटीमधून प्रशिक्षण घेतले आहे. तरुणाईमधील ऊर्जा सर्व घडवून आणू शकते. ही उर्जा देशाच्या विकास प्रक्रियेसाठी उपयोगात आणली पाहिजे. देशात निवडणुकांचे वातावरण असल्याने राजनीती क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अनुकूल काळ आहे. परिवर्तन युवाच घडवतील, असा विश्वास वाटतो.’
पृथ्वीराज चव्हाण यांनी युवा वर्गाने धोरणनिश्चिती आणि प्रशासन या मुद्यांचा अवश्य विचार करावा, असा सल्ला दिला. मंदिराचा विचार करत राहिलो, तर धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचे काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. देशातील विविध समस्यांवर कोणत्या उपाययोजना सुचवता येतील, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा आणि असे उपाय मांडावेत, असेही ते म्हणाले.
सत्यजीत तांबे म्हणाले, राजकीय साक्षरता देशभरात आली पाहिजे तेव्हाच लोकशाही मजबूत होईल. राजकारणात एक भूमिका प्रत्येक युवकांची असली पाहिजे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. ती आपल्या घरापर्यंतच असायला हवी. त्यामुळे आम्ही विचारानेच विचारांची लढायची आहे.
डॉ. सुनील जॉर्ज यांनी आभार मानले. डॉ. अंजली साने यांनी स्वागत केले. यश, शुभंकर पंडित, आयेशा मेहबूब, प्राजक्ता भांगे या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.