पायाभूत सुविधांच्या विकासात ‘बिल्डर्स’चे योगदान मोलाचे
पुणे : “देशातील पायाभूत सुविधांची उभारणी, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, नदी जोड प्रकल्प, भारतमाला प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना यांसारख्या शासकीय योजनांची, प्रकल्पांची पूर्तता, तसेच रोजगार निमिर्ती करण्यात ‘बिल्डर्स’ महत्वाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय जल अकॅडमीचे संचालक मिलिंद पानपाटील यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने आयोजित ‘बिल्डर्स डे’च्या कार्यक्रमात पानपाटील बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रुप कॅप्टन (निवृत्त) प्रवीर अशोक पुरोहित, ‘बीएआय’चे चेअरमन डी. एस. चौधरी, व्हाईस चेअरमन सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, सहसचिव महेश मायदेव, खजिनदार राजाराम हजारे, कार्यक्रमाचे समन्वयक शशिकांत किल्लेदारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘नव्या भारताचा शाश्वत विकास’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. बांधकाम क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रा. एस. बी. भोंडे, एस. एम. मेहता, अशोक अटकेकर, सी. एच. रतलानी, संजय आपटे यांना सन्मानित करण्यात आले.
प्रवीर अशोक पुरोहित म्हणाले, “भारत गेल्या काही वर्षांत जोमाने प्रगती करत आहे. विकासाचा दर, जीडीपी वाढण्याची गरज आहे. शासनाने चांगली धोरणे केली असून, अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, प्रत्येक भारतीयाने माणुसकी, प्रामाणिकपणा व स्वयंप्रेरणेने योगदान द्यायला हवे. यातूनच आपण संपूर्ण जगाला मार्गदर्शक असा भारत देश घडू शकेल.”
डी. एस. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शशिकांत किल्लेदारपाटील यांनी ‘बिल्डर्स डे’च्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संजय आपटे व आर. एस. वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. अजय गुजर यांनी आभार मानले.