पुणे-
‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण आपण ऐकली आहे. शरद पवार यांचा उरलेला पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भुजबळ यांनी ही टीका केली आहे.
उरला सुरलेला गट पक्ष संपवण्यासाठी पुरेसा
छगन भुजबळ म्हणाले की, ”‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण मी ऐकली आहे. शरद पवार यांचा उरलेला पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही. त्यांचा जो काही उरला सुरलेला गट आहे तोच त्याचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसा आहे”, असे भुजबळ म्हणाले.
शिंदे गटाला जेवढ्या जागा, तेवढ्याच आम्हाला मिळाव्यात
यावेळी भुजबळ यांनी जागावाटपाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, ”शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. यावर सविस्तर चर्चा होईल. त्यांचेही 40च्या आसपास आमदार आहेत. आमचेही 40च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे त्यांना जे काही मिळेल, जेवढी मंत्रीपदे मिळतील तेवढीच आम्हालाही मिळावीत. त्यांना जेवढ्या खासदारकीच्या जागा मिळतील, तेवढ्या आम्हालाही मिळाव्यात. यात काही चूक आहे असं मला वाटत नाही”, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे.
मनोज जरांगे यांनाही टोला
तसेच भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ”सातत्याने कुणबी प्रमाणपत्र-दाखले चुकीची पद्धतीने सापडत आहेत. लिंगायत आणि इतर समाजाचे पण पाठवत आहेत. कुणाकुणाला दाखले देणार? हळू हळू मागण्या वाढत चालल्या आहेत. संपूर्ण मराठा यांना ओबीसी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत”, असा टोला भुजबळांनी मनोज जरांगे यांना लगावला.
महाराष्ट्रात जातीय जनगणना करा
तसेच ”15 दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा. कायमचा प्रश्न संपवा. 54 टक्के ओबीसी आहेत त्यात 27 टक्के आम्हाला मिळाले आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.