ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान म्हणाले, ‘वाहतूकदारांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नाही. मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या वाहनचालकच वाहने सोडून खाली उतरत आहेत. इतरांनाही वाहन चालवू देत नाहीयेत.
हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरातील ट्रकचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे. येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे.