शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. राज ठाकरे आमच्यासोबत आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होऊन महायुतीला लोकसभेच्या 45 हून अधिक जागा मिळतील, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
लोकसभेच्या 45 जागा जिंकायच्या असतील तर राज ठाकरे महायुतीत आले पाहीजे असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही सहावी भेट आहे. राजकीय चर्चा झाली नाही, अशा बातम्या समोर आल्या. पण माझे मत आहे की, राजकीय चर्चा झाली पाहीजे असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की,आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत 45 हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे.
निकालाची आम्हाला चिंता नाही
संजय शिरसाट म्हणाले की, 10 जानेवारीच्या निकालाची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.एकनाथ शिंदेंचा दौरा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार. या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरुप देण्यात येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. आगामी काळातील युतीची नांदी अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

