मुंबई–
उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यांना अयोध्येतील सोहळ्याला बोलावण्याचे कारण काय? असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. तसेच केंद्राला वाटेल त्यांचा व्हीव्हीआयपीच्या यादीत समावेश असेल. केंद्र सरकारच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील पण राज ठाकरे असतील. त्यामुळेच राज ठाकरे यांना निमंत्रण दिले असेल, असेही महाजन यांनी म्हंटले आहे.
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना भाजपकडून निमंत्रण दिले जाणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करत आहेत. याच टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचे योगदान काय?
महाजन पुढे म्हणाले, ” श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत”, असे महाजन म्हणाले. तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा असेही महाजन यांनी म्हंटले आहे.