नवी दिल्ली : करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता केंद्र सरकारनं दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर (३ मे) आणखीन दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केलीय. म्हणजेच आता १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यावेळी, ग्रीन झोनमधील भागांना काही सूटही देण्यात आलीय. त्यानंतर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या गोष्टींना बंदी असेल, हे जाणून घेणं नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. केंद्रानुसार, १३० जिल्हे रेड झोनमध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ३१९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत.
गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान हवाई उड्डाण, रेल्वे सेवा आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची परवानगी नाही. इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना केवळ सरकारकडून व्यवस्था करण्यात आलेल्या बसची आणि विशेष रेल्वेचीच मदत घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या मजुरांना घेऊन जाण्यासाठी होणारा खर्च रेल्वे राज्य सरकारकडून वसूल करणार आहे.
सोबतच या दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांचं संचालनही बंद असेल. याशिवाय रेस्टॉरंट, हॉटेल, पूजा स्थळ आणि लोकांनी एकत्र जमण्याला बंदी सुरूच राहील.
रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधली औषधांची दुकानं मात्र सुरूच राहणार आहेत. कंटेन्मेंट भागात मात्र औषधांची दुकानंही बंद राहतील. परंतु, औषधं घेतानाही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे.
रेड झोन
काय बंद : सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब बंद राहतील. रेड झोनमध्ये न्हावी आणि सलूनही बंद राहतील.
काय सुरू : ग्रामीण भागात सर्व प्रकारचं औद्योगिक आणि उत्पादन कार्य, मनरेगाची कामं, फूड प्रोसेसिंग युनिट, विट भट्ट्या सुरू राहतील. याशिवाय शेती काम, पशुपालन, मत्स्य पालन यांनाही परवानगी देण्यात आलीय. शहरी भागात शॉपिंग मॉलसोडून इतर दुकानं सुरू राहतील.
ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.
तसंच गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार पान आणि दारुच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आलीय. परंतु, एका वेळी पाच जणांहून अधिकांना गर्दी करण्याची परवानगी नाही.