एचसीएमटीआर : ३३ वर्षे प्रलंबित ;२०० हून अधिक पत्रांचा पाठपुरावा
पुणे- १९८७ पासून केवळ कागदावरच राहिलेला रिंग रोड एच.सी.एम.टी.आर व्हावा या साठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि महापालिकेतील माजी उपमहापौर,माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान गटनेते आबा बागुल यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
या संदर्भात ते म्हणाले कि,’सन १९८७ च्या विकास आराखडयामध्ये एच.सी.एम.टी.आर रस्त्याची आखणी करण्यात आली होती. सदर रस्ता करणेबाबत आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून आजपर्यंत २०० हून अधिक लेखी पत्रे दिलेली आहेत. एच.सी.एम.टी.आर रस्त्याची जे.एम. झाली असून कन्सलटंट नेमण्यात आला आहे. सदर रस्ता करणेसाठी बहुतांशी जागेचे भूसंपादन देखील झालेले आहे.
सदर रस्ता ३३ वर्षे उलटूनही कागदावरच ठेवला असून याच्या आधारे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. तदनंतर बिल्डरांच्या हितासाठी हा रस्ता वेळोवेळी स्थलांतरित करण्यात आला. या रस्त्याच्या बाजूने कोणकोणत्या बांधकामांना परवानगी दिली, हे बघितल्यास याविषयी झालेली उलाढाल समोर येत असल्याने आमच्या पत्राची उत्तरे दिली नाहीत व याची निविदा प्रक्रिया राबविली जात नाही. एका बाजूला वाहतुकीची समस्या नसलेल्या ठिकाणी पीपीपी रस्ते विकसित करणेस प्रशासन तत्परतेने काम करीत असून महापालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च करते, परंतु शहराच्या जुन्या हद्दीतील वाहतुकीची जटील समस्या सोडविणारा प्रकल्प करणेसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या याप्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागून निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. ही निविदा जादा दराने आल्याने रदद करण्यात आली. सदर महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेणेसाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी प्रशासनाने राबविलेल्या निविदेची फेरनिविदा तातडीने मागवावी.
सदर प्रकल्प मार्गी लावनेकामी पुढील कार्यवाही चालू न केल्यास आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. सातत्याने पाठपुरावा व अंदाजपत्रकात तरतूद असूनही हा प्रकल्प मार्गी लागत नसल्यामुळे संशय निर्माण होत आहे. याविषयी आम्ही राज्य शासन व उच्च न्यायालय यांचेकडे दाद मागणार आहोत.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे “जग बदलायचे असेल तर आधी स्वतः बदला” यानुसार शहर बदलवायचे असेल तर प्रशासनास स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल.असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.