लोणी काळभोर च्या भटक्या विमुक्तांना हक्काचा निवारा देण्याची लोक जनशक्ती पक्षाची मागणी
पुणे :
लोणी काळभोर येथील टाकी माळ व कोळपे वस्ती या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रामध्ये तीन पिढ्यांपासून वास्तव्य असणाऱ्या अनुसूचित जमाती (भटके विमुक्त) समाजातील रहिवाशाना त्यांच्या राहात असलेल्या वस्तीस वनवासी निवारा हक्क कायदयान्वये निवारा द्यावा आणि अतिक्रमण कारवाई स्थगित करावी,अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाने केली असून या आशयाचे निवेदन लोक जनशक्ती पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट ,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी वनमंत्री दत्ता भरणे आणि आमदार अशोक पवार यांना उरुळी कांचन येथे दिले.
लोणी काळभोर टाकी माळ व कोळपे वस्ती या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या भटक्या विमुक्त समुदायाच्या रहिवाशांना अद्याप कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. वन हक्क कायद्यान्वये अनुसूचित जाती व वनवासी आणि इतर पारंपारिक वनवासी यांचा निवासी हक्क मान्य करण्यात आलेला आहे. लोणी काळभोर ग्राम पंचायतीमध्ये वन क्षेत्राच्या हद्दीत २ वस्त्या शंभर वर्षांपासून राहत असून ग्रामसभेत त्यांच्या निवासासंबंधी ठराव करून वन खात्याला दिलेला नाही. त्यामुळे वारंवार अतिक्रमणविरोधी कारवाया होवून नुकसान सोसावे लागत आहे. वन खात्याच्या अखत्यारीतील हा प्रश्न वन मंत्री आणि आमदार यांनी एकत्रितपणे सोडवावा,अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर लोक जनशक्ती चे जिल्हा उपाध्यक्ष दामू चौधरी,सचिव दीपक भडके ,संघटक गोपी गायकवाड,राहुल उभे,उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू,उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू,उपाध्यक्ष रझिया खान,सविता रणदिवे यांच्या सह्या आहेत