वासुदेव काळे (प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा) यांची घोषणा
पुणे-ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे,त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत साखर आयुक्त महाराष्ट्र यांच्या कार्यालयासमोर ५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी घोषणा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे .
ते म्हणाले ,’ महाराष्ट्रातील गाळपाविना शिल्लक उभ्या असलेल्या उसाचे तातडीने नियोजन करावे यासाठी किसान मोर्चा मागील एक महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे. परंतु एफ आर पी दोन टप्प्यात देण्याचा डाव रचण्यासाठी जाणीव पूर्वक अतिरिक्त उसाच्या समस्या आणखी तीव्र करण्याचा राज्य सरकार व साखर सम्राट प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपा किसान मोर्चा आक्रमक झाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी उसाचे लागण क्षेत्र व चालू कारखाने यांची गाळप क्षमता याचा विचार करता या वर्षी योग्य नियोजन न झाल्याने आज रोजी ५०लाख टन इतका ऊस गाळपाविना शिल्लक असून ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. फेब्रुवारी महिन्यात जाणारा ऊस मे महिना आला तरी तोडला गेला नाही. यामुळे वजनात कमालीची घट झाली आहे. आता तीव्र उन्हामुळे एक एक दिवस ऊस जगवणे मुश्कील होत चालले आहे. व यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा असे बजावले जात आहे. जखमेवर मीठ चोळण्यासाठी कारखानदार सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.
या जाचाला आता ऊस उत्पादक शेतकरी कंटाळला आहे. सरकारच्या या आडमुठेपणामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी देखील आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे.
या प्रकरणी दिनांक ०५ मे पासून खालील मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत साखर आयुक्त महाराष्ट्र यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
- राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची हमी द्यावी.
- अतिरिक्त ऊसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याच्या बिलातून कपात करू नये. अतिरिक्त लागणारा खर्च राज्यशासनाने साखर कारखान्यांना द्यावा.
- गाळप झालेल्या जळीत उसाला व तोडणी कार्यक्रम पेक्षा उशिरा तोडलेल्या उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे.
- गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास शिल्लक ऊसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रूपये अनुदान द्यावे.