पुणे, ता. ३ : ‘निरामय’ संस्थेच्या वतीने किशोरी शक्ती प्रकल्पाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग भावनांचे’ या तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिरात सातशेहून अधिक युवतींनी सहभाग घेतला.
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, शैक्षणिक, समुपदेशन, स्वसंरक्षण आणि आरोग्य विषयक शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आमदार माधुरी मिसाळ, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ए. जी. डायग्नोस्टिकच्या डॉ. विनंती पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष अड एस. के. जैन, प्रकल्प प्रमुख साधना पवार, उद्योजक गजेंद्र पवार, ज्योतिकुमार कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
मिसाळ म्हणाल्या, ‘उच्च ध्येय, मनाची क्षमता, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, सकारात्मकता, सहनशीलता आणि संघर्ष करण्याची तयारी हे गुण मुलींना यशस्वी करतात. यश मिळविल्यानंतरही जे जमिनीवर राहातात तेच उंच भरारी घेऊ शकतात. त्यासाठी संकटातील संधी ओळखून यश मिळविले पाहिजे.’