पुणे- पुण्याचे भाजपचे माजी खासदार लक्ष्मण सोनोपंत ऊर्फ अण्णा जोशी (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी पुण्यात निधन झाले. मागील काही दिवसांपासून जोशी आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानचा आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
अण्णा जोशी हे १९९१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले होते. त्याआधी ते आमदार म्हणूनही निवडून गेले होते. या दरम्यान, त्यांनी विधानसभेचे उपसभापतिपद भूषविले होते. मात्र, भाजपने १९९९ नंतर लोकसभा व विधानसभेतही वारंवार तिकीट मागूनही नाकारल्याने त्यांनी पक्षापासून फारकत घेतली होती. २००९ साली अण्णा जोशींनी कोथरूडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर अण्णा जोशी सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते.
इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात जी आणीबाणी लावली होती. त्याविरोधात त्यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे अण्णा जोशींची तुरुंगातही रवानगी झाली होती. विज्ञान विषयात पदवीधर असलेल्या जोशींचे पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात विशेष योगदान दिले आहे.