मुंबई-INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सोमय्या यांच्या वकील पावनी चड्डा यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
INSविक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्राम्बे पोलिसांनी त्यांना समन्स बजावला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर निल सोमय्यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे.
याबाबत सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, आज सकाळी युक्तिवाद झाला. आता जामीन फेटाळल्याचे मला समजले आहे. युक्तिवादादरम्यान सोमय्यांमार्फत कागदपत्रे दाखविण्यात आली. पण या कागदपत्रानुसार, सोमय्यांनी जवळ-जवळ गुन्हाच कबूल केला हे स्पष्ट झाले आहे.
मी गुन्हा केलेला नाही, मी या प्रकरणात विक्रांत वाचविण्यासाठी राज्यपालाकडे पैसे जमा करणार असे कागदपत्रांत नमुद आहे पण या प्रकरणातील तपासात त्यांची कोठडी महत्वाची आहे असे न्यायालयाने सांगितल्याचेही वकील प्रदीप घरत म्हणाले.
किरीट सोमय्यांवर गुन्हा
INS विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेकडून 56 कोटी गोळा केले. मात्र नंतर त्या पैशांचा स्वत:च्या निवडणुकीसाठी वापर केला आणि बरीच मोठी रक्कम मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीत टाकली, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी गुृरूवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ट्राम्बे पोलिसांनी समन्स बजावण्यात आले आहे. उद्या सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर ठेवण्यात आला आहे. निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी सोमय्या पित्रा-पुत्रांना अटक होणारच असा इशारा दिला होता त्यानंतर आता सोमय्या पिता-पुत्रांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेतही सोमय्याविरुद्ध तक्रार
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विराट जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या 58 कोटींचा निधी हडप केला, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील शिवसेना सोमय्यांविरूद्ध आक्रमक झाली. औरंगाबादेतील शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत यांच्या नैतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली आहे.
रक्कम गेली कुठे? खैरेंचा सवाल
किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्था आणि देशभावनेची शुद्ध फसवणूक केली आहे. भाजपचा झेंडा घेऊन किरीट सोमय्यांनी 58 कोटी रूपये गोळा केले आहेत. हा आकडा 100 कोटींचा असेल ही रक्कम राजभवनात जमा झाली नसेल तर गेली कुठे, भाजपने ही रक्कम निवडणूकीत वापरली की, सोमय्यांच्या इन्फ्रामध्ये वळविली असा प्रश्नचिन्ह शिवसेनेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.