वेळेआधीच जरा विमानतळावर पोहोचावे कारण चेक-इनमध्ये वेळ जाईल या विचाराने आम्ही सर्वच दुपारी १ वाजता टर्मिनल १ वर पोहोचलो. कोचीसाठी एअर एशियाचे आमचे फ्लाईट दुपारी ३ चे होते. करोना काळात नियमांमध्ये बदल झाल्यामुळे चेक-इनसाठी काही अडचणी आल्या पण सर्व सोपस्कार पार पाडून एकदाचे चेक-इन निभावले. बाकी विमानतळावर टेम्परेचर फक्त चेक केले, सोबत नेलेल्या कागदपत्रांची काही गरजच पडली नाही.
दुपारी 3 वाजता मुंबईच्या टी 1 टर्मिनलवरून एअर एशियाच्या विमानाने उड्डाण केले. आणि बरोबर दुपारी 5 वाजता कोची आतंरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही उतरलो. विमानातूनच केरळची हिरवाई दृष्टीस पडत होती. विमानतळावर केरळच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन चित्राच्या स्वरूपात, कथकलिच्या मुखवट्यात आणि समईच्या प्रकाशात अधिक उजळून निघाले होते. प्रसन्नतेने भारलेले असे विमानतळावरील वातावरण अनुभवतच आम्ही बाहेर आलो. आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर, राकेश आमची पार्कींगजवळ वाट पाहतच होता. आमची टेम्पो ट्रॅव्हलर एकदम भारी होती. गाडीचे नाव सौपारनिका होते. आम्ही तर गाडीच्या प्रेमातच पडलो. आम्हा ७ जणांसाठी गाडी होती १४ सिटरची. त्यामुळे सगळेच जाम खूष होतो, कारण प्रत्येकला विंडो सीट मिळणार होती. (असे भाग्य मुंबईतील प्रवासात मिळत नाही ना!). गाडीचा प्रवास सुरू झाला. गुरुवायूरला आम्ही प्रथम जाणार होतो. कारण २२ वर्षांपूर्वी गर्दीच्या कारणामुळे आम्हाला गुरुवायूरचे दर्शन झाले नव्हते. संध्याकाळ होत आली होती. सगळ्यांना प्रचंड भूकही लागली होती. वाटेतच एका ढाबा वजा हॉटेलवर थांबलो. त्यानंतर त्रिशूरला वडकुनाथन मंदिर बघायचे ठरवले. वडकुनाथन मंदिर हे त्रिशूरमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे. वडकुनाथन म्हणजे ‘उत्तरेकडील देव’ म्हणजेच केदारनाथ. वडकुनाथन मंदिरात आदि शंकराचार्य यांची समाधी तसेच एक छोटे मंदिर देखील आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आदि शंकराचार्य यांची एक समाधी केदारनाथ मंदिराच्या मागेही आहे. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ७.३० वाजले होते. आम्ही मंदिराच्या ज्या गेटजवळ होतो ते गेट तर बंद होते पण चौकशी केली असता कळलं की आता कोव्हिडच्या काळात फक्त मुख्य प्रवेशद्वारच उघडे आहे. मुख्य प्रवेशद्वाराची केरळ स्थापत्यशैलीतील रचना आणि कोरीवकाम पाहून आम्ही थक्कच झालो. आतमध्ये प्रवेश केला तर मोठे प्रांगण होते आणि पुढे जाऊन एका छोट्या दरवाजासमोर सर्वजण दर्शनासाठी रांग लावून उभे होते. थोड्या वेळाने दार उघडण्यात आले आणि आम्ही आत प्रवेश केला. अचंबित होऊन आम्ही सर्वत्र पाहत होतो. शिवमंदिराचे दर्शन घेऊन आतील अनेक मंदिरांचे दर्शनही घेतले. मंदिराच्या बाहेर जमिनीत छोटे गोल घुमट आणि साष्टांग नमस्कार घालतानाच्या दगडी प्रतिमा होत्या. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळले की तिथे पवित्र लहरी एकवटलेल्या असतात तर त्या तिथेही नमस्कार करावा. मनासारखे दर्शन झाले आता बाहेर पडू, या विचारात असताना कोणीतरी आजूबाजूला कुजबुजले – आता आरती आहे. मग काय पुन्हा शिवमंदिरापाशी गेलो. आरती नव्हती मात्र ओम नमः शिवायचा १०८ वेळा मंत्रजागर होता. सर्वजण त्या पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात मंत्रजागर करत तल्लीन झाले होते. त्या वेळचा अनुभव आणि मनस्थिती शब्दांत वर्णू शकणार नाही. त्याच तल्लीनतेत आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो.
कोची ते गुरुवायूरपर्यंतच्या प्रवासात कधी हायवे वरून तर कधी छोट्या छोट्या गावातून आमची गाडी जात होती. हायवेवर प्रवास करताना एक लक्षात आले की इकडे बऱ्याच गाड्यांना झगमगाटी लाइटिंग केलेली आहे. अन् रंगीत दिव्यांच्या रोषणाईने सजवलेली होती गावातील छोटी तर काही टुमदार केरळी स्थापत्यशैलीतील घरे. घरापुढे रांगोळी, त्यापुढे पणती किंवा छोटी समई आणि लामणदिवा. केरळी परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडत होते, सोबत रसिकताही होती.
गुरुवायूरला पोहोचेपर्यंत रात्रीचे ८.४५ वाजले होते. हॉटेल सोपानामचे मॅनेजर मणिकांथा आमची वाटच पाहत होते. फ्रेश होऊन जेवण उरकले आणि गुरुवायूरचे मंदिर हॉटेलपासून किती अंतरावर आहे ते पाहण्यासाठी बाहेर पडलो. दर्शनाची चौकशी केली असता कळले की उद्या रविवार असल्यामुळे गर्दी असण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे सकाळी लवकर ६ च्या आत दर्शन घ्यावे. मंदिर नजीकच्या एका दुकानात खरेदी केली. ते दुकान दोघे नवरा-बायको मिळून चालवत होते सकाळी ७ ते रात्री ११. केरळी माणूस हाडाचाच कष्टकरी आहे याचे हे एक उत्तम उदाहरण.
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी पहाटे ४ ला उठून ५ वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी नसल्याने अर्धा तासात दर्शन झाले सुद्धा. बाहेरच सभामंडपात एक लग्नविधी सुरू होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे २२ वर्षांपूर्वी ही याच देवळातील एका लग्नविधीचा सोहळा आम्ही पाहिला होता. तसाच सोहळा पाहण्याचा पुन्हा योग आला होता. अगदी मोजक्याच म्हणजे ८-१० नातेवाईकांच्या साक्षीने लग्नसोहळा पार पडत होता. गुरुवायूर म्हणजेच श्रीकृष्णाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने होणारा हा लग्नसोहळा…याची अनुभूती काही वेगळीच असणार. त्या मांगल्यपूर्ण आणि प्रसन्न वातावरणात काही वेळ थांबून आम्ही निघालो.
पुढील प्रवासाचा टप्पा म्हणजे मुन्नारला जात जात थोड्या आडवाटेने जाऊन अथिरापल्ली धबधब्याला भेट देणे. सकाळी ९ वाजता गुरुवायूरहून निघालेलो आम्ही ११ वाजता अथिरापल्ली वॉटरफॉलला पोहोचलो. पायऱ्या उतरून खाली पाहतो तर शुभ्र धारा आवेशात खाली कोसळत होत्या. त्यातून उडणारे उंचच उंच तुषार! डोळ्यांचे पारणे फेडणारे हे विहंगम दृश्य पाहतच राहावे असे वाटले. बाहुबली या सिनेमाचे शूटिंगही इकडेच झाले होते. गच्च डोळे मिळून हे दृश्य डोळ्यांत साठवून घेतले आणि ११.३०च्या सुमारास मुन्नारच्या दिशेने कूच केले. दुपारी १ च्या सुमारास कुठे तरी पोटपूजा करण्यासाठी थांबावे म्हणून आजूबाजूला आणि गूगलवर रेस्टोरंट शोधणे चालू होते. गावागावातून आतून आमची गाडी जात होती. ओमकार राकेशच्या बाजूच्या सीटवर बसला होता. बाकी आम्ही मागे बसलेले सगळे झोपेच्या मूडमध्ये होतो. आणि एकदम मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळेना. जोरदार ब्रेक लागून गाडी थांबली तेव्हा लक्षात आले की आपल्या गाडीला अपघात झाला आहे. समोरून चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत येणारी कार आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळली होती. आमच्या गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. समोरची गाडी तर पुढून चक्काचूरच झाली. पण आतील दोघांना काही जास्त लागले नाही. घाबरलेल्या मनस्थितीत आम्ही सांगेल तसे पटापट गाडीबाहेर पडलो. समोर फार गर्दी जमा झाली होती. पोलिसांची गाडी आली होती. जवळजवळ संपूर्ण गावच लोटले होते. पण इकडे बघ्यांची नव्हे तर मदत करणाऱ्यांची गर्दी होती. येणारे जाणारे आपुलकीने चौकशी करत होते व काही मदत हवी आहे का म्हणून विचारात होते. आम्हाला एका दुकानासमोर नेऊन बसवले. पोलीस आमच्या आणि कारच्या ड्रायव्हरला घेऊन गेले. भाषेची खूप मोठी अडचण येत होती. हिंदी-इंग्रजी भाषेचा मेळ घालून संवाद साधत होतो. त्यातील एका व्यक्तीला हिंदी बोलता येत होते कारण तो काही काळ मुंबईत राहिला होता. त्याने ट्रॅव्हल कंपनीचा नंबर आमच्या ड्रायव्हरकडून घेतला आणि गाडीला अपघात झाल्याचे कळवले. त्या व्यक्तीकडून कळले की हे वळण धोक्याचे आहे, इकडे नेहमीच अपघात होतात. अपघात झालेले गाव कोट्टमंगलमधील थनकलम होते. आम्हाला मदत करणारा भला माणूस होता म्हणून त्याने संवाद साधून एका नवीन गाडीची सोय केली. आम्ही सगळे एका दुकानाच्या आडोशाला बसून समोर आमच्या आवडत्या गाडीची, सौपारनिकाची दशा पाहात होतो. नजरच लागली होती तिला. दीड तासाने ३ च्या सुमारास दुसरी टेम्पो ट्रॅव्हलर आली. राकेशही पोलीस स्टेशनमधून थोड्या काळासाठी आला. नवीन ड्रायव्हरशी, मुस्तफाशी आमची ओळख करून दिली, आमचा टूरचा प्लॅन त्याला समजावून सांगितला. आम्हाला मदत करणाऱ्या गावातील त्या भल्या माणसाने सामान गाडीत ठेवायला मदत केली. आम्हा सगळ्यांना धीर दिला. राकेशलाही खूप वाईट वाटत होतं. सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस असं सांगून आम्ही पुढील प्रवासाला निघालो…
– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर