‘भीमा कोरेगाव’चा रिपब्लिकन पार्टीकडून आढावा
पुणे : गेल्यावर्षी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे. येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला देशभरातून नागरिक येतात. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबची तयारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचा आढावा पक्षाच्या वतीने घेण्यात आला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, युवक शहराध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी शुक्रवारी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन परिसराची पाहणी केली. येथे नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या सुविधा, तसेच विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमासाठीचे नियोजन याचा आढावा घेतला.
तत्पूर्वी, पक्षाच्या वतीने विजयस्तंभ दिनादिवशी आयोजिलेल्या अभिवादन सभेच्या नियोजनाची बैठक झाली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा या तीनही विभागातून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख, रफिक दफेदार, नगरसेविका हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, संगीता आठवले, संजय सोनावणे, वसंत बनसोडे, किरण भालेराव, संतोष खरात, तात्या जगताप, विक्रम आल्हाट यांच्यासह २५० ते ३०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदा प्रथमच अभिवादन सभा विजयस्तंभापासून दूर होत आहे. गेली ३० वर्षे अभिवादन सभा विजयस्तंभाजवळ होत असे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही अभिवादन सभा पेरणे फाटा येथील टोलनाक्याजवळ होणार आहे. त्यासाठी २० हजार फुटांचा मंडप घालण्यात येणार आहे. ५००० पेक्षा अधिक लोकांच्या बसण्याची व्यवस्था येथे केली जाणार आहे. आठवले साहेबांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे एक हजार कार्यकर्ते सुरक्षाकवच देणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातून ३००, पिंपरी-चिंचवडमधून २००, तर पुणे शहरातून ५०० कार्यकर्ते पक्षाचे टी-शर्ट घालून सुरक्षा व्यवस्था पुरविणार आहेत.”