मुंबई. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी जहरी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.’
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ‘शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखे आहे. फक्त प्रसिद्धीसाठी केलेला हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, तो आज त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलंय.’
‘असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात आले आणि गेले. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा त्यांनी वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे. पवारांबद्दल बोललं की महान नेता असा भाजपात गोड समज आहे. त्यामुळे हा त्या प्रयत्नाचा भाग आहे. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचे बोलतात. यांना करंगळीही धरायला मिळणार नाही,’ असे आव्डा म्हणाले. दरम्यान, गोपीचंद पडळकर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत येण्यासाठी विनंती करत होते, असा गौप्यस्फोटही आव्हाडांनी केला.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर
‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे माझे मत आहे. अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची कायमची भूमिका आहे. ते पुढेही अशीच भूमिका चालू ठेवतील. त्यांच्याकडे कुठली विचारधाराही नाही आणि ना कुठला अजेंडा नाही, ना व्हिजन आहे. केवळ छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणे, त्यांच्यावरच अन्याय करण्याची शरद पवारांची भूमिका आहे.’
‘धनगर आरक्षणाबाबत शरद पवार हे पॉझिटिव्ह नाहीत. त्यांना केवळ धनगर समजाच्या विषयावरुन आरक्षणाचे राजकारण करायचे आहे. गेल्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावे लागणार’, असल्याचेही ते म्हणाले.