पुणे: भारतातील सर्वात सुप्रसिद्ध इंडिया सुपरबाईक फेस्टिव्हलचे (आयएसएफ) यंदा सहावे वर्ष असून १० व ११ डिसेंबर रोजी होणार आहे. हा फेस्टिव्हल अॅमनोरा पार्क टाऊन येथे होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक अमोल तळपदे यांनी दिली. यंदाचा महोत्सव अॅमनोरा पार्क टाऊनच्या सहकार्यातून होणार आहे.
यावेळी तळपदे म्हणाले, संपूर्ण भारतातील सुपरबाईकच्या मालकांना एकाच ठिकाणी त्यांची उत्कटता, आवड दाखवता यावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा भारतातील पहिला महोत्सव आहे ज्यामध्ये ६०० सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या सुपरबाईकस् असतील.
सुरक्षेबाबत बोलताना तळपदे म्हणाले, एका सुपरबाईकरसाठी सुरक्षा खूप महत्वाची असते. जेव्हा तुम्ही बाईक चालवता तेव्हा त्यातील सर्व धोके लक्षात घेऊन संपूर्ण लक्ष केंदींत करून चालवणे अत्यंत गरजेचे असते.
ते पुढे म्हणाले, बॅंकेच्या ईएमआय सुविधेच्या साहाय्याने सुपरबाईक्स खरेदी करणे फार सोपे झाले आहे. त्यामुळे अशा थरारक महोत्सवामध्ये सहभागी होणे आता सोपे झाले आहे. यातील सुरक्षेच्या बाबी ध्यानात घेतल्यास सुपरबाईक चालविणे अत्यंत सोपे आहे. गतीमध्ये थरार असला तरी प्राणघातक असू शकतो असे ते म्हणाले.
सहाव्या आवृत्तीत भारतातील सुपरबाईकस, बाईक ग्रुप आणि क्लबज् सहभागी होणार आहेत. यामध्ये ६०० सीसी ते ८०० सीसी, ८०० सीसी ते १ हजार सीसी आणि १ हजार सीसीच्या पुढे अशा गटात स्पर्धा होणार आहे. २०१६ चा विजेता होण्यासाठी अत्यंत जीकरीची लढाई होण्याची शक्यता तळपदे यांनी व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील नवनवीन सुपरबाईकस् पहायला मिळतील आणि प्रेक्षक त्याचा मनमुराद आनंद घेतील अशी आशा व्यक्त केली. महोत्सवात सहभागी होणारी प्रत्येक सुपरबाईक ६०० सीसी पेक्षा अधीक क्षमतेच्या असतील.
तळपदे पुढे म्हणाले, महोत्सवाची संध्याकाळ मनोरंजक संगीत मैफीलीने रंगतदार होईल. चार चाकी आणि दुचाकी स्वरांना एकाच छताखाली त्यांचे कौशल्य दाखिण्याची संधी मिळत आहे. प्रेक्षकांना हा रोमांच नक्कीच आवडेल याची खात्री आहे.