मुंबई दि.२७ मे : शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट तिन्ही पक्षातील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर झाली असून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. परंतु, बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संजय राऊत म्हणत असले तरी सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरेंनी पवारांना सांगितल्याची चर्चाही माध्यमात होत आहे. पवार-ठाकरे भेटीला
तशीच राजकीय पार्श्वभूमी आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत खडाजंगी झाली, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरूनही टीका केली, राष्ट्रवादीचेच मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मुख्य सचिवांचा पाणउतारा केला, यामुळे शिवसेना व मुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्याही माध्यमात आल्या.
प्रविण दरेकर पुढे म्हणाले, शरद पवार आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे त्यांनाच माहीत आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या संबंधात नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. पवार साहेबांनी सुद्धा आज राष्ट्रवादी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. हे सर्व असलं तरी मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षात विसंवाद आहे, कोणताही समन्वय नाही, हे अनेकवेळा दिसून आले आहे. काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारमधून बाहेर पडण्याची टोकाची भाषा केली आहे. याच मुद्द्यावरून “चर्चेला आलो पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही”, असा खुद्द मुख्यमंत्र्यांविरुद्ध नितीन राऊत यांनी नाराजीचा सूर लावला आहे. जयंत पाटील जलसंपदा विभागाच्या फाईल वित्त विभागाकडे पाठवल्याबद्दल मुख्य सचिवांवर आणि मुख्यमंत्र्यांवर प्रक्षुब्ध आहेत. अशाप्रकारे या तिन्ही पक्षात अनेक मुद्द्यांवर प्रचंड विसंवाद आहे. आपल्या विचारांना कॉंग्रेसला तिलांजली द्यावी लागत आहे, परंतु, कॉंग्रेसने कितीही वलग्ना केल्या तरी मविआला आव्हान देण्याची धमक आणि ताकद काँगेसमध्ये नाही. काही काळातच ते आपल्या तलवारी मॅन करतील, अशी दाट संभावना आहे. परंतु, हे किती काळ चालणार ? त्यामुळे येणाऱ्या काळात या विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
कोकणवासीयांना योग्य नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसेन
कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम महाविकास आघाडी सरकार दीड वर्षांपासून करीत आहे. निसर्ग वादळाने कोकण उध्वस्त झाला, योग्य नुकसान भरपाई सरकारने दिली नाही, जी दिली तीही लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यानंतर कोरोना संकट आलं, आता चक्रीवादळामुळे घरं, गुरं, शेती, फळबागा यांचं नुकसान झालं. सरकार मदत जाहीर करीत नाही. कोकणवासीयांचा आत्मविश्वासच हरवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मदत जाहीर होईल, असं वाटलं होतं. परंतु तीन तासाचा दौरा त्यांनी केला. विमानाने गेले की, हेलिकॉप्टरने गेले, याचं काही देणंघेणं नाही. कोकणवासीयांना मदत लवकर मिळाली पाहिजे, हा मुद्दा आहे.
आज कॅबिनेटची बैठक आहे, या बैठकीत कोकणवासीयांबद्दल निर्णय झाला नाही, पुरेशी मदत जाहीर झाली नाही तर कोकणचा सुपुत्र म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसेन आणि या सरकारला मदत जाहीर करण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.
संभाजीराजे आणि शरद पवार भेट ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग
भेटीतून काय साध्य होते, ते दिसेलच
प्रविण दरेकर
मराठा आरक्षणासाठी जे प्रयत्न करीत आहेत, त्या सर्वांच स्वागतच आहे. छत्रपती संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या 10 मिनिटांच्या ‘प्रदीर्घ’ चर्चेतुन काय साध्य होईल, हे दिसेलच, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. ते म्हणाले, भेटीनंतर शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की, विविध पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटणं, हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता. पवार साहेब महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालते आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या आणि शरद पवारांच्या भेटीतून काय साध्य होईल, हे आपण पाहू.
विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडचा मोर्चा ताकदीनं निघणारचं
सरकारपूरस्कृत दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर पाण्यात लाकूड टाकलं तर ते जेव्हढं उसळी मारून बाहेर येतं, तसा मराठा समाज उसळी मारून उभा राहील
प्रविण दरेकरांचा पोलीस प्रशासन आणि सरकारला इशारा
विनायक मेटे यांनी 5 जूनला बीडला मोर्चाची घोषणा केल्यापासून समाजात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचे आढळून आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, मराठा समाज कोणाच्या दबावाला भीक घालणारा समाज नाही. हा लढवय्या आणि शूर समाज आहे. त्यामुळे सरकारपूरस्कृत दबाव आणि मुस्कटदाबी मराठा समाज कदापिही सहन करणार नाही. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली होणारा बीडचा मोर्चा ताकदीनं काढणारचं, याचा मी पुनरुच्चार करतो आणि अशा प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर पाण्यात लाकूड टाकलं तर ते जेव्हढं उसळी मारून बाहेर येतं, तशा पद्धतीने कितीही दाबलं तरी त्यातूनही तो उसळी मारून उभा राहील, त्यामुळे मराठा समाजाला चेतवण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असा इशारा देऊन दरेकर म्हणाले, विनायक मेटे यांनी गृह मंत्र्यांना भेटून या विषयाचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचं काम केलं आहे. आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा शांततेत निघण्याचा इतिहास लक्षात घेऊन हा नियोजित मोर्चा शांततेत काढण्यासाठी पोलीस प्रशासन व शासनाने सहकार्य करण्याची मागणीही त्यांनी निवेदन देऊन गृहमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे आता काय निर्णय घ्यायचा ही सरकारची जबाबदारी आहे.