आरोपी सामान्य व्यक्ती असती तरीही पोलिसांनी एवढी मुभा दिली असती? मंत्री पुत्रास अटक न झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने खडसावले
नवी दिल्ली-उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीतील हिंसाचाराबाबत राज्य पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल दाखल केला. यावर सर्वाेच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या पीठाने सांगितले की, आम्ही तुमच्या तपास पद्धतीवर समाधानी नाहीत. तुम्ही आरोपीला एवढी सूट का देत आहात? आरोपी सामान्य व्यक्ती असती तर पोलिसांनी तिला एवढी मुभा दिली असती का? तपासासाठी स्थापन एसआयटीत केवळ स्थानिक अधिकारी आहेत. आपल्याला आणखी वेगळी पद्धत पाहिली पाहिजे. डीजीपींनी प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवावेत. पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होईल.
दोन वकिलांनी न्या. रमणांना पत्र लिहून नि:पक्ष चौकशीसाठी प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. न्या. रमणा यांनी दखल घेत गुरुवारी सुनावणी करून यूपी सरकारला स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हिंसाचारात ४ शेतकऱ्यांची हत्या झाली होती. या घटनेत एका पत्रकाराचाही मृत्यू झाला.
कोर्ट रूम :
हे हत्या प्रकरण, हजर राहण्यास विनंती का ?
यूपी सरकारकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे हजर झाले. या वेळी झालेला युक्तिवाद…
साळवे : स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे. यूपी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी आशिष मिश्राविरुद्ध स्पष्ट पुरावा नव्हता त्यामुळे त्याला हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. आरोपीने पोलिसाकडे वेळ मागितला त्यामुळे आरोपीला शनिवारी सकाळी ११.०० वाजेपर्यंत वेळ दिला आहे.
सरन्यायाधीश : हे हत्येचे प्रकरण आहे. यात हजर होण्यासाठी विनंतीची काय गरज आहे? हत्येच्या प्रत्येक प्रकरणात यूपी पोलिस आरोपीला हजर राहण्यासाठी विनंती करते का? त्वरित अटक का केली नाही?
साळवे : गोळी झाडल्याचा आरोप आहे, मात्र पुरावा नाही. पुरावा स्पष्ट असेल तर थेट हत्येचे प्रकरण होईल. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचा दुजोरा नाही.
सरन्यायाधीश : आरोपी सामान्य व्यक्ती असती तर पोलिसांची अशीच भूमिका असती का? न्या. सूर्यकांत: हे निर्घृण हत्येचे प्रकरण आहे. साळवे : शनिवारपर्यंत त्रूटी दूर करूत. सरन्यायाधीश : कारवाई कागदोपत्री दिसते. साळवे : कारवाई व्हायला पाहिजे होती. न्यायाधीश : गोळीची जखम न दिसणे एखाद्या आरोपीला अटक न करण्याचे योग्य कारण होऊ शकते का? हत्येत पोलिस त्वरित अटक करते. साळवे : सर्व योग्य पावले उचलली जातील. सरन्यायाधीश : तुमच्या एसआयटीत सर्व स्थानिक अधिकारी आहेत. त्यांच्या वागणुकीतून असे वाटत नाही की, ते तपास करत आहेत. हीच खरी अडचण आहे. साळवे : दसऱ्याच्या सुट्यापर्यंत वाट पाहा. त्यानंतरही तुम्ही समाधानी न झाल्यास तपास सीबीआयकडे सोपवा. सरन्यायाधीश : सीबीआय तपास योग्य उपाय नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे समजता की का? आपल्याला वेगळी पद्धती पाहिली पाहिजे.
पोलिसांनी घरावर दुसरे समन्स डकवले; मंत्री म्हणाले, मुलगा घरी आराम करतोय
लखीमपूर खिरी | पोलिसांनी दुसऱ्या दिवशी आशिष मिश्राला हजर होण्याचे समन्स केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या घराच्या गेटवर डकवले. दुसरीकडे, अजय मिश्रा म्हणाले- आशिष सध्या आजारी आहे. तो घरीच आराम करत असून शनिवारी पोलिसांसमोर हजर होईल.
पुराव्याअभावी दबावात अटक होणार नाही : योगी आरोपी आशिषला हजर राहण्याचे समन्स पाठवले : यूपी सरकार यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले, आरोपीविरुद्ध पुरावे मिळाल्यास अवश्य कारवाई होईल. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, कुणाच्या दबावात अटक होणार नाही. केवळ आरोपांच्या आधारावर कुणाला तुरुंगात पाठवणे योग्य नाही.