पुणे- ब्राम्हण महासंघाने आता पुण्याचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ? यावरून भाजप नेतृत्वाला कोंडीत पकडायचा प्रयत्न सुरु झाल्याने पुण्याच्या भाजपच्याच नाही तर एकूणच राजकारणात धुरळा उडाला आहे. ब्राम्हण महासंघाने हा प्रश्न हाथी घेत पुण्याच्या राजकारणात किंगमेकर व्हायचे ठरवलेले दिसतेय असाही सूर भाजपच्याच वर्तुळातून उमटू लागला आहे.गेली ४० वर्षाहून अधिक काळ पुण्यातील भाजपची वाटचाल खंबीर ठेवण्यासाठी सातत्याने खंबीर आणि ठाम उभे राहिलेले खासदार गिरीश बापट यांच्या राजकीय निष्ठेला पुण्याच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून गेली ८ वर्षे सातत्याने आव्हान दिल्याचे दिसून आले आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आतापासून लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. . पण जिथे फडणवीसांना संधी देण्याची चर्चा आहे त्या मतदार संघातील गिरीश बापट यांना काय वाटतंय? त्यांना डावललं जातंय का आणि चंद्रकांत पाटलांसाठी जे मेधा कुलकर्णींसोबत झालं तेच आता गिरीश बापट यांच्यासोबत होणार का ?असे प्रश्न उपस्थित होता असल्याच्या या पार्श्वभूमीवर आज बापट यांनी आपली भूमिका कुठलीही हिचकीच न करता स्पष्ट केली आहे. ते म्हणाले ,आमच्यासाठी पक्ष मोठा असतो , देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवल्यास मला आनंदच होईल. राजकीय पक्षात निवडणुकीसाठी उमेदवारी देणे, हे नेत्यांचे काम असते. पक्षांमध्ये उमेदवार ठरवण्याची यंत्रणा असते. त्यासाठी अध्यक्ष, निवडणूक मंडळ असते. फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यास मला काहीच अडचण नाही. उलट या निर्णयाचा मला आनंदच होईल.त्यामुळे येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्राह्मण महासंघाची नड्डांकडे मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात महासंघाने म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. फडणवीस भाजपचे भविष्य आहे. भाजपला सक्षम नेतृत्व देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास आहे. भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्रात व्यक्त केली आहे.
फडणवीस दिल्लीला जाणार?
संसदीय मंडळ या आपल्या सर्वोच्च धोरण निर्धारक समितीत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलून देवेंद्र फडणवीसांना स्थान दिले आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशा स्थितीतच ब्राह्मण महासंघाने फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारीची मागणी करत या शक्यतेला आणखी बळ दिले. तर, आता पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीदेखील फडणवीसांना उमेदवारी देण्यास आपली काहीच अडचण नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बापटांना आताच केंद्रीय मंत्रीपद ?
पुण्यातील भाजपची वाटचाल आयुष्यभर सांभाळलेले बापट यांच्या सुनबाई कसबा विधानसभा मतदार संघातून राज्यात प्रतिनिधित्व करतील अशी आशा बापटांच्या चाहत्यांना आहे. कसब्याची उमेदवारी आणि बापटांचा आताच केंद्रीय मंत्रीपदाने सन्मान करून ब्राम्हण महासंघाची मागणी पूर्ण करता येईल असे अनेकांचे म्हणणे आहे.पण कोल्हापुरातून कोथरुड वर लादलेले आमदार आणि आता यापुढे पुण्यावर नागपूरचे नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न काही मंडळींना योग्य वाटत नाही. महासंघाची मागणी मान्य केल्यास पुण्यात दोन गट प्रभावाने एकमेकांविरोधात ठाम उभे राहतील असे हि म्हणणे मांडले जाते आहे.