मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं, रश्मी ठाकरे यांच्याविषयी रश्मी ठाकरेंबद्दल बोललो ते शब्द मागे घेतो. असे शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.मी जो बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. जे वास्तव आहे ते मी बोलतो, पश्चात्तापाचा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरेंचा अपमान होईल अशी कोणती गोष्ट मी बोललो नाही.अशी प्रतिक्रियादेखील शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनावर दिली. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांची भुमिका घ्यावी, या अर्थाने माझे बोलणे होते, असेही ते म्हणाले.
ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रश्मी ठाकरेंविरोधातील विधान आपण अनावधानाने केल्याचं सांगितलं. तसेच आपण हे विधान मागे घेत असल्याचंही ते म्हणाले. अंधारेंच्या टीकेवर तुम्ही काय म्हणाला? असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रामदास कदम यांनी, “एक गोष्ट मी बोलायला नको होती, ती म्हणजे रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी. हे माझ्याकडून बोलून गेलं हे मान्य. हे बोलण्याची आवश्यकता नव्हती. त्या उद्धवजींच्या पत्नी आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर येतात. त्याबाबतचं वाक्य मी मागे घेतो. मला काही अडचण नाही त्याची. ते अनावधानाने माझ्याकडून बोलून गेलं आहे,” असं उत्तर दिलं.
शिवसेनेच्या आंदोलनाला मी भीक घालत नाही. महाराष्ट्र मला ओळखतो. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. स्वत:ला बाळासाहेबांचा मुलगा म्हणता मग बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा का घेऊन जात नाही? पवारांशी युती का करता? असं मला म्हणायचं होतं.
पण काही लोकांनी विपर्यास केला. शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट झाले. मलाही दुख झालं. नुकसान आमचं झालं. मी त्यांना हातजोडून सांगत होतो, राष्ट्रवादी सोडा सर्व आमदार घेऊन येतो, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मला कुणाच्याही समर्थनाची गरज नाही. मी खेडला होतो. आताच मुंबईला आलोय. मी काय बोललो हे बाकींच्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे कोणी माझ्या बाजूने बोलले नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझी कोंडी किंवा शिंदे गटाची कोंडी होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन चाललो आहोत आणि उद्धव साहेब या भूमिकेसोबत नाहीत, त्यामुळे मी ते विधान केलं, असंही ते म्हणाले.