Home Blog Page 90

भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज-प्रा. डॉ. मंगेश कराड

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

पुणे : सध्या भारत ९४ टक्के सेमिकंडक्टर चिप्स इतर देशांतून आयात करतो. त्यामुळे आपला देश अद्यापही सेमिकंडक्टर तंत्रज्ञानासाठी परावलंबी आहे. सेमिकंडक्टरमध्ये मक्तेदारी असलेल्या देशांनी आपल्याला सेमिकंडक्टर चिप्सचा पुरवठा बंद केल्यास भविष्यात भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्याचमुळे भारत सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेमिकंडक्टर मिशनची घोषणा केली आहे. त्याद्वारे भारतात सेमिकंडक्टर कंपन्या स्थापन करण्यासाठी तब्बल ७६,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सेमिकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात १,६०,००० कोटींपर्यंत वाढणार असून विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेसतर्फे “सेमिकंडक्टर तंत्रज्ञान” या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवाद आणि सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई)’ तसेच विद्यार्थ्यांच्या ‘सेमिकंडक्टर क्लब (सेमी सी)’ यांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. स्व. उर्मिला ताई कराड सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)चे कार्यकारी संचालक सूर्यनारायण मूर्ती, नेट्रा अ‍ॅक्सिलरेटर फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक पवार, व्हीएसएलआय सोसायटी, बंगळुरूचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, डॉ. विरेंद्र शेटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश माळी यांच्यासह देशभरातील उद्योगक्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सूर्यनारायण मूर्ती म्हणाले, सध्या भारतात सेमिकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे, प्रक्रियात्मक क्षमता आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता इतर अग्रगण्य देशांइतकी प्रबळ नाही. यामुळे भारत अजूनही जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका व चीन यांसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हे देश जागतिक सेमिकंडक्टर पुरवठा साखळीत अग्रेसर असून प्रामुख्याने तेच उच्च दर्जाच्या सेमिकंडक्टर चिप्सचे उत्पादन करतात. सध्या तैवानकडे तब्बल ६५ टक्के उत्पादन असून या क्षेत्रावर त्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्सही सरकारच्या सहकार्याने देशाचे याबाबतीतील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रास्ताविक करताना डॉ. पुजेरी यांनी विद्यापीठाच्या संशोधनाभिमुख शिक्षण धोरणाबद्दल माहिती दिली. कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी प्रगत तंत्रज्ञान शिक्षण व उद्योगसहकार्याच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयधोरणावर भाष्य केले. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. डॉ. सुदर्शन सानप यांनी आभार मानले, तर प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले.


पुणे सेमिकंडक्टर हब बनेल – विवेक पवार

विवेक पवार यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांचा सध्या केवळ सॉफ्टवेअर अभियांत्रिकीकडे मोठा कल आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता आता विद्यार्थ्यांनी मूळ कोअर शाखांकडे वळायला हवे. कारण सध्याची गुंतवणूक पाहिल्यास सेमिकंडक्टर तंत्रज्ञान हेच भारताचे भविष्य आहे. त्यासाठी आवश्यक असणारी परिसंस्था तयार करण्याची गरज आहे. भविष्यात अशी परिसंस्था तयार केल्यास बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे सेमिकंडक्टर हब बनेल. त्यातून या क्षेत्रात युवकांना नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

0

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४) २०२६ च्या बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली आहे.

बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डसाठी रस्ते, बंदरे, वीज, शहरी वाहतूक, पाणी आदी ८ क्षेत्रांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात येते. यंदा देशातील सुमारे १४५ प्रकल्पांचे मूल्यमापन करून निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखालील २५ सदस्यांच्या निवड समितीने पुरस्कारांसाठी प्रकल्पांची निवड जाहीर केली. यात वीज क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणची देशपातळीवर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जगातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मध्ये आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल १० लाख २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

0

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुंबईतील ‘एबोड’ हा बंगला जप्त केला आहे. पीटीआय (PTI) नुसार, त्याची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे.ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) करण्यात आली आहे. हे प्रकरण त्यांच्या ग्रुप कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) द्वारे केलेल्या कथित बँक फसवणुकीशी संबंधित आहे. अनिल अंबानी यांच्यावर 40 हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात तपास सुरू आहे.

अनिल अंबानी यांचा हा बंगला मुंबईतील सर्वात पॉश परिसर असलेल्या पाली हिलमध्ये आहे. 66 मीटर उंच असलेल्या या बंगल्यात एकूण 17 मजले आहेत. हा देशातील सर्वात महागड्या निवासी घरांपैकी एक मानला जातो. ईडीने (ED) ही मालमत्ता जप्त करण्यासाठी तात्पुरता आदेश जारी केला आहे. बँक फसवणूक प्रकरणात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तपासानंतर केंद्रीय एजन्सीने हे मोठे पाऊल उचलले आहे.
ही संपूर्ण कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा भाग आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर करण्यात आला आणि ती इतर कामांसाठी वळवण्यात आली, असा आरोप आहे. ईडी गेल्या बऱ्याच काळापासून अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत होती. यापूर्वीही अंबानींची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

RCOM गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. मोठ्या कर्जाच्या बोजाखाली दबलेली ही कंपनी सध्या इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

ईडीने मालमत्ता जप्त केल्याचा अर्थ असा आहे की आता ही मालमत्ता विकली किंवा हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. जर न्यायालयात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप सिद्ध झाले, तर भविष्यात बँकांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी या बंगल्याचा लिलावही केला जाऊ शकतो. मात्र, अनिल अंबानी या आदेशाविरोधात ट्रिब्युनल किंवा उच्च न्यायालयात अपील करू शकतात.

यापूर्वीही अनिल अंबानींच्या बँक फसवणूक प्रकरणात त्यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्ता दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि ईस्ट गोदावरी यांसारख्या शहरांमध्ये आहेत.

यात निवासी युनिट्स, ऑफिस स्पेस आणि जमिनीचे भूखंड यांचा समावेश आहे. विशेषतः अनिल अंबानींचे पाली हिल येथील निवासस्थान सर्वात हाय-प्रोफाइल आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

0

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघड
मुंबई : गेल्या पाच वर्षांत पोलीस प्रशासनाने १३ हजार ७८३ गुन्हे दाखल करत तब्बल १८ हजार ५०१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एकट्या २०२५ या वर्षात तब्बल २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगरमधील कोट्यवधींच्या गुटखा तस्करीचे धागेदोरे समोर आले आहेत. दरम्यान नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर कडक कायदेशीर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री आणि उत्पादन जोरात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे समोर आले.

राज्यात २० जुलै २०१२ पासून दरवर्षी गुटखाबंदीचे आदेश नूतनीकरण केले जातात. सध्याच्या अधिसूचनेनुसार, राज्यात गुटखा उत्पादन, साठा, वितरण आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी आहे. मात्र तरीही मुंबई ,ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात अवैधरीत्या गुटख्याचे उत्पादन व विक्री सुरु असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान याचे लोन अनेक शहरांमध्ये देखील पसरत आहे. याचा धागा जोडत यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून गुटखाबंदीचा ढिसाळपणा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. गुटखाबंदी संदर्भात राज्य शासनाकडून कोणती उपाययोजना केली जात आहे.याची विचारणा देखील त्यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांतील पोलीस कारवाईची सांख्यिकी सादर केली. अन्न सुरक्षा व मानके कायद्या’नुसार दोषींवर कारवाई सुरू आहे यात सातत्य राखले जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पाच वर्षांतील कारवाईचा ‘ग्राफ’
वर्ष, दाखल गुन्हे, उघड गुन्हे, अटक आरोपी
२०२१, “२,६९७”, “२,६९४”, “३,९३४”
२०२२,” २,३८७”, “२,३७८”, “३,३३२”
२०२३, “३,४७७”, “३,४६९”, “४,३९४”
२०२४,” २,७८४” , “२,७७७”, “३,६६८”
२०२५ ,”२,४३८”, “२,४१४”, “३,१७३”
एकूण, “१३,७८०”, “१३,७३२”, “१८,५०१”

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बांधकामांच्या साईटवरील धुळीमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी सेन्सर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सेन्सर्सद्वारे मोजण्यात येणारे प्रदूषण कार्यालयात बसून पाहता यावे यासाठी ‘क्लिन एअर पोर्टल’ या डॅशबोर्डचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ५ हजार चौरस फुटांवरील बांधकाम साईट्सना सेन्सर्स बसवणे बंधनकारक आहे.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, लवकरच सर्वच बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर्स बंधनकारक करण्यात येतील. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे उपस्थित होत्या. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सेन्सर्स बसवले जात आहेत.

शहरात सध्या ५ हजार चौरस फुटांवरील सुमारे ३५० बांधकामे सुरू आहेत. यापैकी १६० बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात आले आहेत, तर उर्वरित ठिकाणीही ते लवकरच बसवण्यात येतील. शहरात एकूण १८ हजार ठिकाणी बांधकामे सुरू असून, या सर्व बांधकामांना लवकरच सेन्सर्स बंधनकारक करण्यात येणार आहेत.

सेन्सर्सच्या माध्यमातून बांधकाम साईटवरील धुळीच्या प्रदूषणाची माहिती मिळाल्याने, प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, हे विकसक, साईट इंजिनिअर आणि महापालिकेला समजण्यास मदत होईल. उपाययोजना न केल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. डॅशबोर्डमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक नोंदी उपलब्ध राहतील, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. प्रशासनाने मागील वर्षीही प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या दोनशेहून अधिक बांधकामांवर स्थगितीची कारवाई केली होती.

प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी सार्वजनिक ठिकाणचा राडारोडा उचलणे, आरएमसी प्लँटसाठी नियमावली तयार करणे, तसेच रस्ते तयार करताना वारंवार खोदाई टाळण्यासाठी पदपथ, पावसाळी लाईन्स आणि केबल डक्टसह रस्ते विकसित करणे अशा कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील वाहतूक गतीमान करण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

0

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर, डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांना मोका लावा- जितेंद्र आव्हाड

स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी शासनाबरोबरच समाजाचे जनजागृतीसाठी योगदान आवश्यक – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 25 : राज्यातील स्त्री-पुरूष गुणोत्तर प्रमाण वाढावे यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शासनपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी शासनाच्या यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.स्त्री भ्रूण हत्या, गर्भ लिंग चाचणी करणरे डॉक्टर, डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांना मोका लावा तसेच महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी सुट्टी दिलीच पाहिजे अशा सूचना करत स्त्री जन्माचा दर आपल्या राज्यात कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला त्यास अनेक भाजपा सदस्यांनी देखील सहमती दर्शविणारे वक्तव्य केले आमदार हेमंत ओगले, बाबासाहेब देशमुख, नितीन राऊत, प्रशांत बंब, डॉ. तुषार राठोड, श्रीमती नमिता मुंदडा, डॉ.ज्योती गायकवाड आदींनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, समाजातील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढावे याबाबतच्या उपाययोजनांमध्ये गतिमानता आणली जाईल. पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत समित्या तयार करण्यात आल्या आहेत. २०२३-२४ मध्ये ७५ स्टिंग ऑपरेशन्स करण्यात आली. २०२४-२५ मध्ये ९४ तर २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ९० स्टिंग ऑपरेशन्स करण्यात आली आहेत. यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जानेवारी २०२६ पर्यंत ६२७ न्यायालयीन प्रकरणे होती ज्यामध्ये १२९ जणांना शिक्षा झाली आहे. ज्यांनी यामध्ये चूक केली अशा सगळ्या डॉक्टरांची सनद रद्द करण्यासंदर्भात मेडिकल कौन्सिलला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांमधील मासिक पाळीबाबत विचारलेल्या उपप्रश्नाबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी याबाबत जागृती आणि मार्गदर्शनाबाबत शासन कार्य करीत असून, याबाबत असणारी भीती, अज्ञान याबाबत जागृतीसाठी ६०० ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान कामाच्या ठिकाणी सवलत देण्याबाबत शासन निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.

राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाणाचा सध्याचा दर ९१३ असून लातूर जिल्ह्यात हे प्रमाण १२६५, वर्धा जिल्ह्यात ११७३, गडचिरोली मध्ये १०९३, गोंदियामध्ये १०५० तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात हे प्रमाण १०५० असे आहे, असे सांगून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत कौतुक केले. ज्या जिल्ह्यांमध्ये हा दर कमी आहे तेथे जागृतीसाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्त्री भ्रूण तपासणी होत असलेल्या प्रकरणांची माहिती देणाऱ्यास प्रोत्साहनपर बक्षिस दिले जात असल्याची माहिती देऊन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. या कायद्याचा वचक बसावा यादृष्टीने कायद्यामधील ज्या कलमांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्याबाबत विधि व न्याय विभागाचे मत घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना याचे उल्लंघन होत असल्यास वेबसाईटवर अथवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. याबाबत आरोग्य विभागाच्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल, असेही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

ब्रिस्टॉल विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

0

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा.एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडेमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण

 या करारानुसार ‘मुख्यमंत्री व ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना’ संयुक्तपणे विकसित व राबविण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी 100 टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पसकडून उचलण्यात येणार आहे.

उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे, दि. २५ : उद्योगांशी निगडित समस्यांचे संबंधित विभागांनी विहीत वेळेत निराकरण करावे. फलॅटेड गाळे भाडे अनुदान योजनेची सविस्तर माहिती अधिकाधिक सूक्ष्म व लघू उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व सभासदांनी जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक लोकांना रोजगार समिती व जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कदम यांनी सांगितले की, जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र राज्य निर्यात धोरण २०२३ याची व्यापक प्रसिद्धी करून जिल्ह्यातील निर्यात वाढीस चालना द्यावी. संबंधित धोरणातील विविध प्रोत्साहनांचा जास्तीत जास्त उद्योग घटकांनी लाभ घ्यावा, यासाठी औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी पीएमपीएमएलमार्फत बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच औद्योगिक घटकांना अखंडित व पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्रात स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याबाबतच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेवटी महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी प्रसिद्ध

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, माध्यम, प्रश्नपत्रिका संचकोड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ५ मार्च २०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : सिद्धार्थनगर, नगर रोड (रामवाडी परिसर) येथील अनधिकृत झोपडपट्टी क्षेत्रावर दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (एसआरए) व्यापक निष्कासन कारवाई करण्यात आली. महानगरपालिका, पोलीस विभाग तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून पार पडलेल्या या कारवाईत एकूण २१६ अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या असून संबंधित भूखंड पूर्णतः रिकामा करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी दिली.

सदर कारवाई सर्व्हे क्रमांक २०४, २०५, २१४५ पैकी व २१४६ पैकी, येरवडा, पुणे येथील झोपडपट्टी क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत शांततेत आणि नियोजनपूर्वक पार पडली. कारवाईपूर्वी संबंधित झोपडीधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी अर्चना यादव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गीता दळवी, रमेश पाटील, सुषमा पैकेकरी , सहाय्यक निबंधक अधिकारी पंढरीनाथ घुगे, नायब तहसीलदार गणेश देसाई, पोलीस निरीक्षक बागवान, पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ चनकर, प्रकाश बालगुडे तसेच महावितरण, अग्निशमन दल व स्थानिक पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध विभागांमध्ये समन्वय साधत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कारवाईदरम्यान नागरिकांशी संवाद साधून कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. पात्र ठरलेल्या रहिवाशांना पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या झोपडीधारकांना पुणे महानगरपालिकेमार्फत ज्ञाती व इलेसिया, खराडी येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच लाभार्थ्यांच्या मागणीनुसार सिद्धार्थनगर येथेच उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन प्रकल्पात पुढील दोन वर्षांत पक्की घरे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहितीही श्री. खडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या कारवाईमुळे संबंधित भूखंडावरील अतिक्रमण पूर्णतः दूर झाले असून नियोजित विकासकामांना गती मिळणार आहे. भविष्यातही अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर

पुणे, दि.25: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी, २०२६, रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पंचायत प्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सन २०२४-२५ वर्षाकरिता पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध केली; या मध्ये पाचव्या अनुसूचीअंतर्गत येणाऱ्या व पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू असणाऱ्या राज्यांमध्ये पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मध्य प्रदेश द्वितीय तर हिमाचल प्रदेश तृतीय क्रमांकावर राहिले आहेत.

या प्रसंगी पंचायती राज मंत्रालयाचे सचिव श्री विवेक भारद्वाज व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माननीय केंद्रीय राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सर्व आघाडीच्या राज्यांचे अभिनंदन करून इतर राज्यांनीही पेसा कायद्याच्या मूळ उद्देश्य हेतूनुसार ग्रामसभा व पंचायत सक्षमीकरणासाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहन केले. या क्रमवारीचा उद्देश ग्रामसभा केंद्रित स्वशासन अधिक मजबूत करणे, पुराव्यावर आधारित धोरणात्मक हस्तक्षेपांना चालना देणे व लक्ष्य केंद्रीत राहाण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांची ओळख पटविणे हा आहे.

पेसा संकेतक क्रमवारी (२०२४-२५) : महाराष्ट्र (प्रथम), मध्य प्रदेश (द्वितीय), हिमाचल प्रदेश (तृतीय), चांगली कामगिरी करणारी राज्येः राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि आकांक्षी राज्येः आंध्र प्रदेश, गुजरात तसेच प्रारंभिक राज्येः ओडिशा आणि झारखंड यांचा समावेश आहे.

पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध करणे हे कायद्याच्या परिणामकारक मोजमापयोग्य अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्यांच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्याने पेसा संकेतक क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा सक्षमीकरण व पंचायतीचे स्वशासन बळकट करण्याच्या हेतूने राज्य करीत असलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्य पेसा कक्षाचे संचालक शेखर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अजितदादांचा घात डिजिसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का?:अमोल मिटकरी आक्रमक

मुंबई-झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा प्रयत्न असेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. अपघातानंतर एक महिन्याने अहवाल देण्यात आला, तर ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनंतर सापडला. सुमित कपूर संदर्भात डिजिसीएने एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका त्यांनी केली. या कारवाईवर आम्ही समाधानी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. व्हीएसआर व्हेंचअर्सला मोठा धक्का बसला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी कंपनीच्या चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अपघातानंतर या विमानांचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये काही गंभीर उणिवा आढळल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही कारवाई उशिरा झाल्याचा आरोप करत मिटकरी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मिटकरी यांनी या प्रकरणात केवळ कंपनीवर कारवाई करून थांबू नये, तर डिजिसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी केली. परवानगीशिवाय विमान उड्डाण करू शकत नाही, मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान उड्डाणासाठी कसे देण्यात आले? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नियुक्त पायलट साहिल मदन आणि सहपायलट यश हे सध्या कुठे आहेत, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीची विमाने दुरुस्त नव्हती, हे आता मान्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, व्हीएसआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. सुमित कपूर यांच्याबाबत गंभीर शंका उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात कंपनी आणि डिजिसीएने स्पष्ट उत्तर द्यावे, असे म्हटले. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेचा संताप वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. गावपातळीवर वातावरण तापत असल्याचा दावा करत, डिजिसीए फक्त भुलथापा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

याचबरोबर, डिजिसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला का, असा थेट आरोपही मिटकरी यांनी केला. बाह्य गुप्तचर यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. अपघातासंदर्भात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. व्हीएसआर आणि डिजिसीए दोघांनीही जनतेसमोर संपूर्ण सत्य मांडले पाहिजे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रोहित पवारांची DGCA, VSR विरोधात फिर्याद नोंदविताना बडे पोलिस अधिकारी आले, त्यांनी FIR नोंदवणे थांबविले …

रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची , उद्या अजितदादांनी उभारलेल्या बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार , अन्यथा अजितदादांनी उभारलेल्या न्यायालयात खटला दाखल करणार -रोहित पवार आक्रमक

मुंबई – अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.रोहित पवार, अमोट मिटकरी यांच्यासह अजित दादां आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, हा एफआयआर पोलिसांनी दाखल करून घेतला नाही.

रोहित पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. मात्र, त्यांनी लॅपटॉप आणला. माझं स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात आली. मात्र, एक बडे पोलिस अधिकारी आले. त्यांनी त्यांनी एफआयआर करण्यापासून थांबवलं. त्यांनी आम्हाला का थांबवलं? या पोलिस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला?, असा प्रश्न असून आमचा संशय बळावत चालला आहे. आम्हाला राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार एफआयर दाखल करण्याचा अधिकार आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आता उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये ‘एफआयआर’ दाखल करायचा प्रयत्न करणार आहोत. ती बिल्डिंग दादांनी बांधली आहे. तिथं नाही झालं, तर न्यायालयात जाऊ. ती बिल्डींगही दादांनी बांधलीय.
रोहित पवार म्हणाले की, ‘विखे-पाटील, आशिष शेलार, साताऱ्याचे मंत्री, त्यांचे ट्रोलर ट्रोल करतात. आज पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांना अशी मग्रुरी येत नाही. लाखो लोकांच्या आमदारांची अशी अवस्था असेल, तर इतरांचे काय? कोण अडथळे आणत आहेत, कोण नेते आहेत, बघणार,’ असे रोहित पवार म्हणाले. मात्र, मुंबई पोलिसांनी आपण रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून, त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि आमच्याकडे या प्रकरणात घातपात झाल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही पोलिस अद्याप एफआयआर (FIR) दाखल का करत नाहीत? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा संशय बळावणारे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. वारंवार मागणी करूनही आणि पुरावे देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर पोलिस इतकी दिरंगाई करत असतील, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार? व्हीएसआर’ (VSR) या विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे. तपासाची दिशा भरकटवून कंपनीला क्लीन चिट देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस नक्की कोणाच्या दबावाखाली आहेत आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे.

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

0

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेत बोलताना आक्रमक झाले. जवळपास १९ शेतकऱ्यांना किडनी विकावी लागली असून, किडनी विकायला लावणाऱ्या सावकारांवर मकोका लावण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. या रॅकेटचा सूत्रधार दिल्लीतील पद्मश्री मिळालेल्या डॉक्टरला महाराष्ट्र पोलिस अटक करणार का? असा सवालही वडेट्टीवार यांनी सभागृहात केला.

यावर राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती पूर्णपणे सत्य नाहीये. या प्रकरणात ९ लोकांच्या किडणी विकली. त्यामध्ये एकच शेतकरी आहे. एकूण ९ लोकांपैकी दोन लोक महाराष्ट्रातील आहेत, तर उर्वरित इतर राज्यातील आहेत. तसेच वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला डॉक्टर हा संपूर्ण देशभरात किडनीची सर्जरी करतो. तो प्रसिद्ध डॉक्टर आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग आढळल्यास त्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सरकार गंभीर आहे. सरकारने तातडीने सर्वांन अटक केलेली आहे. एसआयटी देखील लावली आहे. या प्रकरणातील सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल.

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, आता याप्रकरणी आपण FIR दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवारांच्या दाव्यानुसार, 28 जानेवारी रोजी DGCA ने दुपारी 1:36 वाजता एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाद्वारे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) कंपनीला आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवल्यामुळे यंत्रणांवर दबाव निर्माण झाला. त्यामुळेच आता तपास योग्य दिशेने सुरू झाला आहे, असे पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, टीडीपीचे खासदार आणि मंत्री यांच्या नेत्याचे आणि व्हीएसआरचे आर्थिक संबंध असल्याने कुठेतरी व्हीएसआरला वाचवण्यात येत आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे की हे केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना तिथे बसण्याच अधिकार नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करणार आहे.
रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआरच्या 5 विमानांना उड्डान करण्यास बंदी घातली आहे, पण जबाबदारी डीजीसीएची असते त्यांनी सर्व बाबी चेक करणे गरजेचे असते. व्हीएसआरने जर चूक केली असेल तर डीजीसीएसुद्धा चुकी केली असे आमचे मत आहे. व्हीएसआरच्या मालकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले पाहिजे. त्याच्यासोबतच डीजीसीएचे जे अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जे कंपनीने विमान उड्डानासाठी योग्य सांगितले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

काल आलेल्या DGCA च्या नवीन अहवालाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही उपस्थित केलेले मुद्देच अहवालात घेण्यात आले आहेत, मात्र तरीही काही पळवाटा शोधून केवळ मोजक्या विमानांवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भाष्य करण्यासाठी आणि पुरावे मांडण्यासाठी रोहित पवार येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार आहेत.

रोहित पवार म्हणाले की, आमचा नेता गेला आहे, आता अहवाल देऊन काय फायदा? अहवालात त्रुटी काढल्या असल्या तरी त्यातून पळवाटा शोधल्या जात आहेत. याप्रकरणी आता आम्ही गप्प बसणार नाही आणि एफआयआर दाखल करणार आहोत.

रोहित पवारांची पोस्ट काय?


रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय की, VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून बरेच काही समोर यायच बाकी आहे. या विषयावर सविस्तर बोलेल…गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार VSR कंपनीवर गंभीर आरोप करताना दिसले. त्यामध्येच आता हा ऑडिट रिपोर्ट पुढे आला असून विमानात त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट म्हणण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर संशय व्यक्त केली जात असतानाच हा अहवाल आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आलीत.