Home Blog Page 87

एक माणूस पुण्याच्या राजकीय संस्कृतीची वाट लावतोय, मिडीयाने सावध राहावं- केंद्रीय मंत्री मोहोळांची सूचना

पुणे-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग भूखंड विक्री प्रकरणात आपल्यावर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. तसेच रवींद्र धंगेकर वगळता इतर कोणताही व्यक्ती माझ्यावर आरोप करत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात माझ्यावर आरोप करणारा एकच माणूस आहे. कदाचित त्यांना चावी देणारा माणूस दुसरा कुणीतरी असेल, असे ते म्हणाले. पुण्यातील जैन बोर्डिंग वसतिगृहाची जागा शिवाजीनगर येथे आहे. ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समुदायाने केला आहे. या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हा विषय लावून धरत मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी केलेली एक व्हिडिओ जाहिरातही पोस्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येत या प्रकरणाचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

मुरलीधर मोहोळ गुरूवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी यापूर्वीच माझी बाजू स्पष्ट केली आहे. सध्या माझ्यावर आरोप करणारा माणूस एकच आहे. मी त्याच्यावर बोलणे सोडून दिले आहे. हा व्यक्ती उठसूठ माझ्यावर आरोप करतो. या लोकांमुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी प्रथम त्यांचे कागद तपासावेत. त्यानंतर त्यांच्या मुलाखती चालवाव्यात. मी वैफल्यग्रस्त माणसांकडून काहीही अपेक्षा करत नाही. मी पुन्हा त्यावर बोलणार नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र धंगेकरांना भाजपचेच काही लोक रसद पुरवत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांनी याविषयी मोहोळ यांना विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. त्यांना किती सीरियस घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. मला पुन्हा – पुन्हा या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. विशाल गोखले (गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा) हा माझा मित्र होता, आहे व पुढेही राहील. त्यात बदल होणार नाही. पण त्यांनी (रवींद्र धंगेकर) 5 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ काढून मी त्यांची जाहिरात करत असल्याचा आरोप केला. तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणातील सत्यता तपासा. पडताळून पाहा. तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. पण आत्ता त्यांचाही एक व्हिडिओ समोर आला आीहे. मग त्यांच्यावरही ते त्या व्यवसायात पार्टनर असल्याचा आरोप करावा का? मला असे वाटते की, आपण त्यात पडू नये. या शहराचे नाव खराब होऊ नये. कारण, या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. कुठेतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीची वाट लावत आहे. या प्रकरणी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. मोहोळ पुढे म्हणाले, बाणेर, बालेवाडीतील काही शेतकरी 5 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्याकडे या बिल्डरने खोटी मोजणी करून प्लॅन मंजूर केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मी त्याची माहिती काढली. तेव्हा प्रशासनाने त्यापूर्वीच त्याला स्टे दिल्याचे निष्पन्न झाले. हे काम महापालिकेचे आहे. आज मी महापालिकेत नाही. मी महापालिका सोडून 5 वर्षे झाली. त्यानंतर 3 वर्षे मी लोकप्रतिनिधीही नव्हतो. त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो. या प्रकरणाचे उत्तर महापालिका प्रशासन देईल. पण कुणीही उठायचे आणि काहीही आरोप करायचे हे बरोबर नाही. कदाचित यामागे चावी देणारे दुसरे कुणीतरी असेल. मी त्याकडे लक्ष देत नाही, असे ते म्हणाले. स्थानिकच्या निवडणुकीत वरिष्ठ जे सांगतील तेच होईल मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन होणार असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची राज्यपातळीवर महायुती आहे. आम्ही अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वजण एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे नेते जो आदेश देतील त्याचे पालन आम्ही करू. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुण्यातही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा विचार आला तर आमच्या कोर्टात बॉल येईल. पण आता तरी राज्याचे नेते सांगतील तेच त्यामध्ये होईल.

बिहारमधील तीन गुन्हेगारांचे दिल्लीत एन्काउंटर: सिग्मा अँड कंपनी गँगचा म्होरक्या रंजन पाठकही ठार

दिल्ली-येथे झालेल्या चकमकीत चार गुन्हेगार ठार झाले. त्यापैकी तीन जण बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी होते. ही कारवाई दिल्ली गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.ठार झालेले कुख्यात गुन्हेगार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचत होते, असे पोलीस सांगत आहे.बुधवारी रात्री २:२० च्या सुमारास ही चकमक झाली. डॉ. आंबेडकर चौक ते पानसाळी चौक या बहादूर शाह रोडवर ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये जोरदार गोळीबार झाला.

या चकमकीत रंजन पाठक (२५), बिमलेश महतो उर्फ ​​बिमलेश साहनी (२५), मनीष पाठक (३३) आणि अमन ठाकूर (२१) यांना गोळ्या लागल्या. सर्वांना रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रंजन पाठक (25), बिमलेश महतो उर्फ ​​बिमलेश साहनी (25), मनीष पाठक हे बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी आहेत, तर अमन ठाकूर (21) हे दिल्लीचे रहिवासी होते.असे म्हटले जाते की पोलिस बऱ्याच काळापासून या चार गुन्हेगारांचा शोध घेत होते. ही टोळी “सिग्मा अँड कंपनी” या नावाने गुन्हे करत असे. रंजन पाठक हा या टोळीचा प्रमुख होता.त्यांचे नेटवर्क बिहारपासून नेपाळपर्यंत पसरले होते. रंजन पाठकने सीतामढीमध्ये अनेक गुन्हे केले होते.सीतामढीतील व्यावसायिकाच्या हत्येनंतर रंजन पाठक यांनी त्यांचा बायोडेटा माध्यमांना पाठवला होता.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार सुरू केला, त्यानंतर पोलिसांना प्रत्युत्तर द्यावे लागले.

दिल्ली -मुंबईत दिवाळीत प्रदूषणाचा कहर -: दिल्ली AQI 353, आनंद विहारमध्ये AQI 500च्या पुढे; लोकांना घरातच राहण्याचा सल्ला

नवी दिल्ली-

दिवाळीपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली आहे. गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता “खूपच खराब” राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वेबसाइटनुसार, सकाळी ६ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५३ नोंदवण्यात आला, ज्यामध्ये अनेक भाग “रेड झोन” मध्ये आहेत.अक्षरधाम मंदिराजवळील रस्त्यांवर दृश्यमानता कमी होती. सकाळी येथील बहुतेक भाग धुराने झाकलेले होते. दिल्लीतील बहुतेक भागात AQI 300 ते 400 पर्यंत होता, म्हणजेच हवेची गुणवत्ता “खूपच खराब” ते “गंभीर” होती.दिवाळीच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. सध्या मुंबई शहरभर धूरकट वातावरण असून, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 133 वर, म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत असला तरी, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तो नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘घातक’ पातळीवर पोहोचला आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, मुंबईकरांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत.मुंबईत सध्या हवामान धूसर, दृश्यमानता कमी आणि हवा प्रदूषित असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा, मास्क वापरण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्लीत आनंद विहारमध्ये सर्वात वाईट परिस्थिती होती, जिथे सकाळी ५:३० वाजता AQI ५११ वर पोहोचला. आरोग्य तज्ञांनी दिल्ली-एनसीआरमध्ये AQI मध्यम पातळीवर परत येईपर्यंत बाह्य क्रियाकलाप मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठ महानगरांमध्ये दिल्लीमध्ये सर्वात वाईट AQI होता.

बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये सकाळी AQI ७० पेक्षा कमी नोंदवले गेले, तर अहमदाबाद आणि मुंबईमध्ये सकाळी ११० AQI नोंदवले गेले. दरम्यान, दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची चाचणी पुन्हा एकदा थांबली आहे. जुलैमध्ये सुरू होणारा हा प्रयोग अद्याप झालेला नाही कारण हवामान खात्याने (IMD) आवश्यक ढगाळ वातावरण नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की ढग दिसू लागताच चाचणी ताबडतोब सुरू होईल. सर्व मंजुरी, निधी आणि विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती भायखळा येथे असून, तेथे AQI 213 नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवतो. याव्यतिरिक्त, सिद्धार्थ नगर-वरळी (204), वांद्रे हिल रोड (191), चेंबूर (187) आणि देवनार (187) यांसारख्या ठिकाणीही उच्च पातळीचे प्रदूषण नोंदवले गेले आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश नागरिक दूषित हवेत श्वास घेत आहेत.
प्रदूषणामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना अधिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी AQI 200 च्या पुढे गेल्याने लोकांना घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यात अडचण अशा समस्या जाणवत आहेत. निरोगी व्यक्तींनाही हवेतील धूर आणि धूळकणांमुळे अस्वस्थता निर्माण होत आहे.

या वाढत्या प्रदूषणामागे अनेक घटक जबाबदार आहेत. शहरात हिवाळ्याची सुरुवात झाल्यामुळे वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक कण हवेत स्थिर राहतात. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरु असलेली बांधकाम आणि वाहतुकीमुळे धूळ व धूर वाढतो. याशिवाय दिवाळी उत्सवाच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे.

१५ ऑक्टोबर रोजी, दिवाळीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांची विक्री आणि फोडणी करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने सांगितले की या चार दिवसांत, लोकांना सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत एकूण तीन तासांसाठीच हिरवे फटाके फोडण्याची परवानगी असेल.

तथापि, दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवशी लोकांनी फटाके फोडले. यामुळे गुरुवारी सकाळी दिल्लीत दाट धुराचे साम्राज्य निर्माण झाले. रात्रभर जोरदार फटाके फोडल्यानंतर हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये घसरली.
GRAP चे टप्पे जाणून घ्या

पहिला टप्पा ‘खराब’ (AQI २०१-३००)
दुसरा टप्पा ‘खूपच खराब’ (AQI 301-400)
तिसरा टप्पा ‘गंभीर’ (AQI ४०१-४५०)
चौथा टप्पा ‘गंभीर प्लस’ (AQI >४५०)
GRAP-I लागू, N95 किंवा डबल सर्जिकल मास्कची शिफारस

जेव्हा AQI २०० ते ३०० च्या दरम्यान असतो तेव्हा GRAP-I सक्रिय होतो. या अंतर्गत, NCR मधील सर्व संबंधित एजन्सींना २७ प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.

यामध्ये अँटी-स्मॉग गनचा वापर, पाणी शिंपडणे, रस्ते बांधकामात धूळ नियंत्रण, दुरुस्ती प्रकल्प आणि देखभाल उपक्रमांचा समावेश आहे.

गाझियाबाद येथील फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. शरद जोशी यांनी सर्वांना संरक्षणासाठी बाहेरच्या क्रियाकलापांमध्ये N95 किंवा डबल सर्जिकल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यातला संघर्ष मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून भाजपमधील एक गट विरुद्ध मोहोळ असा- संजय राऊत

धंगेकरांच्यामागे भाजप सरकारमधील बडा नेता:

लक्षात ठेवा, आमच्या शिवसेनेचा पराभव म्हणजे मराठी माणसाचा पराभव-

मुंबई-मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी महायुतीचे तिघे एकत्र आले आहेत. या सर्वांचे लक्ष मुंबई आहे. बाकी इतरत्र ते एकत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे त्याविषयी त्यांचे एकमत आहे. बाळासाहेबांचा मुंबई मनपा वरील भगवा काढण्यासाठी हे तिघे एकत्र आहेत, इतर ठिकाणी ते एकत्र नाहीत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत म्हणाले की,पुण्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आला आहे.मोहोळ विरुद्ध धंगेकर असे नसून भाजपमधील एक गट मोहोळाविरोधात आहे. धंगेकर हा मोहरा आहे, त्यांच्या मागे असणारे त्यांच्याच सरकारमध्ये बसलेले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, अमित शहा आणि त्यांच्या बेनामी कंपन्या हे मुंबई अदानींना देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2029 पर्यत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहतील का? 2029 पर्यत मोदी प्रधानमंत्री पदी राहु शकले तरच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहू शकतील. केंद्रात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकारणात बहुमत हे चंचल असते. महाराष्ट्रातील बहुमत हे खूप चंचल आहे. देवेंद्र फडणवीसांना अजित पवार, एकनाथ शिंदेंचा गट फोडायचा आहे. त्यांना स्वयंभू राजकारण करायचे आहे. येणाऱ्या काळात दिल्ली अस्थिर होणार आहे. फडणवीस शिंदेंचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे.

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा इंडिया आणि महा विकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही. काँग्रेससोबत आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महा विकास आघाडी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर कुणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना आणि सहकाऱ्यांना अडचणीत आणणारे कोणतेही विधान करणार नाही. राज ठाकरे हे मनसेप्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे जर कुणी ही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदानींच्या धशात जाऊ द्यायची नाही ती वाचवायची आहे. या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते. हा इतिहास काँग्रेसच्या नेत्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. मुंबईसाठी सर्व मतभेद विसरत सर्व पक्ष एकत्र आले होते, त्या प्रमाणे पुन्हा एकदा तसे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारमध्ये राज ठाकरे आहे का? तिथे राजद आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. हे ही नको ते ही नको असे वाक्य एक दिवसाच्या प्रसिद्धीसाठी असतात असे म्हणत राऊतांनी भाई जगताप यांना टोला लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे त्यासाठी काँग्रेसमधील मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला बोलायचे असेल तर आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, आम्हाला काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता. पण नाही होऊ शकला ना? आम्ही इंडिया आघाडी केली कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते. आम्ही कधी असे म्हंटलो नाही की शिवसेनेचा किंवा इतर पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. काँग्रेस दिल्लीतील सर्वात मोठा पक्ष आहेच, त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे, आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. तुम्ही मुंबई महापौरांचे काय घेऊन बसलात.27 मनपामध्ये तुम्ही काँग्रेसचे महापौर करा. भाजपला रोखणे आणि मराठी महापौर होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यापूर्वी 30 वर्षे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे त्यांचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल यात एकदा काँग्रेसने आम्हाला मदत केली हे देखील विसरता येणार नाही. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसचे नेते काय बोलतात हे महत्त्वाचे नाही. आतापर्यंत काँग्रेस आमच्यासोबत पूर्णपणे सामील झालेला आहे. वेगळा होण्याचा काही मुद्दा चर्चेला गेलेला नाही. समाजवादी पार्टीला त्यांची फार ताकद आहे असे वाटत असेल किंवा भाजपला मदत करण्याची त्यांची इच्छा असेल पण जनता आमच्यासोबत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड,ठाणे भाजपा स्वबळावर तर मुंबईत मात्र महायुती एकत्र लढेल- फडणवीस

पुण्यात फुटणार होते सुमारे २५ नगरसेवक,ते फुटू नये म्हणून स्वबळावर …

मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच पुण्यासारख्या शहरात नेत्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे सुमारे २५ नगरसेवक कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी मोजक्या पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे आम्ही वेगळे लढू. मात्र, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. “मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजप स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत एकत्र, पण राज्यात म्हणजेच इतर महापालिकांमध्ये वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ.दरम्यान ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे तिथे भाजपा नेमकी काय भूमिका कशा पद्धतीने राबविणार याकडे लक्ष लागून राहणार आहे .

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, मुंबई महापालिकेत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा भाजपचा विचार आहे. फडणवीस यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर युतीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त केला.मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कसा फायदा झाला, याचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यावरही त्यांनी यावेळी स्पष्ट भाष्य केले. “सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत 2029 नंतर बघू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दुसरीकडे, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे मोठे वर्चस्व असल्याने युती झाल्यास संभाव्य राजकीय नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतरही एका नगरसेवकाचा अपवाद वगळता सर्व नगरसेवक शिंदे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर महायुतीअंतर्गत निवडणूक लढवली गेली, तर काही जागा भाजपसाठी सोडाव्या लागतील. याचा थेट फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे यांच्यासोबतच्या आजी-माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. जागावाटपात त्यांची जागा भाजपकडे गेल्यास, या इच्छुकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.

या नाराजीतून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही राजकीय जोखीम टाळण्यासाठी आणि ठाण्यातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, युती आणि जागावाटपाचा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीत झाल्याची माहिती आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत आता श्रीनाथ भिमाले यांच्यावरही आता जैन विरोधी असल्याचा आरोप

व्हिडीओ प्रसारित होताच मोहोळ समर्थक चाहते अभिनेते खवळले आणि सुरु झाले कमेंट वॉर

पुणे- जैन होस्टेल आणि जैन मंदिर जमीन खरेदीचा वाद जैन मुनी आणि समाजाच्या मोर्चाने सामाजिक विषय बनविलेला असताना आता त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव घेत,ज्यांनी भाजपाला भरभरून मते दिली त्या जैन समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, यांनी जैन समाजाला त्रास दिला असा स्पष्ट आरोप करणारा व्हिडीओ जैन समाजातील ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक निलेश नवलाखा यांनी काल सोशल मिडीयात प्रसारित केला आहे. यामुळे भाजपच्या वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.एकामागे एक आता ‘व्हिक्टिम’ पुढे येतात कि काय ? असे वातावरण निर्माण होऊ पाहते आहे. कृतघ्न नेते म्हणत याचा धडा त्यांना शिकवावाच असेही या व्हिडीओत नवलाखा यांनी म्हटले आहे. तथापि मराठी चित्रपट सृष्टीतील कोथरूडच्या एका अभिनेता असलेल्या त्यांच्या चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट बॉक्स मधून जोरदार प्रहार करत मोहोळ हे आपले मित्र असल्याचे सांगत त्यांची बाजू मांडायला काल सुरुवात केली.नवलाखा यांच्यावर बेकायदा बांधकामे आणि शेतकऱ्यांना फसविल्याचे आरोप काहींनी केले आहेत तसेच काहींनी नवलाखा यांना ट्रोल करण्याचे काम ही कमेंट पाहता दिसून आले.दरम्यान यावरही नवलाखा यांनी संबधित अभिनेत्याला मोहोळ यांचे लाळघोटे म्हणत धमक्या देणे बंद करा,ढोस देऊ नका,जैन आहोत म्हणून घाबरणार नाही असेही सुनावले आहे. तर नंतर पुन्हा याच व्हिडीओ रीपोस्ट करत यावरून थेट नवलाखा यांनी मुरलीधर मोहोळ यांनाच उद्देशून असे म्हटले आहे कि,’ माझ्या ह्या पोस्टवर खासदार मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते मला जेल मधे टाकण्याची धमकी देत आहेत,माझ्यावर defamation चा गुन्हा नोंदवण्याची भाषा करत आहेत. जर Murlidhar Mohol यांना अशी भाषा आणि जैन समाजाच्या एका व्यक्तीला आणि मराठी चित्रपट निर्मात्याला ज्यांनी एक नाही मराठी सिनेमा चे तीन राष्ट्रीय पारितोषिक मराठी सिनेमा साठी घेतले आहे अशा माणसाला जर तुमचे लोकं धमकावत असतील तर तुम्हीच हे कृत्य करायला लावले आहे असे समजण्यात येईल नाहीतर त्वरित तुमच्या लोकांना समज द्या आणि ढोस धमक्या बंद करा.

काय म्हटले आहे नवलाखा यांनी या व्हिडीओत ते वाचा जसेच्या तसे….
नमस्कार जय नरेंद्र मी निलेश नवलाखा आपल्याला माहीतच आहे की मी चित्रपट निर्माता आहे, अॅक्टीव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे. मी आज आपल्या बरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्या मुळे मी तुमच्या बरोबर हा संवाद साधतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कुत्याचा एक व्हिक्टिम आहे.२०२० साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला. आज दोन हजार पंचवीस आहे. तरीसुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे. पण मला अस वाटलं की हा एक अपवाद असेल. निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते. पण जेव्हा हे जैन हॉस्टेल चा विषय रवींद्र धंगेकर यांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित Habitual offender आहेत की काय? कारण जैन हॉस्टेल मध्ये जमिनीचा व्यवहार केला. तो एक भाग आहे. परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा गहाण ठेवलं व्यवसायासाठी. असा निर्लज्जपणाचा कळस याआधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता.कुठल्याही खासदारांनी केला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर व बरोबर आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे. आपल्याला माहीतच आहे, जे श्रीनाथ भिमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे. किती जैनांना त्रास तिथे दिला आहे? किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात. मिळत नाही. परंतु ते भाजपचे नेते आहेत. मुरलीधर मोहोळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत. आज कुणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात. त्यांच्यावर आरोप लावले जातात. त्यांना त्रास दिला जातो. लोक बोलत नाही. पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे. जे काही मुद्दे आहेत. रवींद्र धंगेकरांनी मांडलेल्या आहेत. माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी हितं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरुन मतदान केलं आहे. ते मला जिथे राहतात सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वती मध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते यांना देतात.मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतघ्न झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि याचा धडा त्यांना शिकवावा लागेल. माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो. भिमाले असो. यांचा निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

१३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड कारागृहात बराक सज्ज

मुंबई
१३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योगपती मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचे अधिकृत फोटो बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत. याद्वारे, चोक्सीला त्याच्या प्रत्यार्पणानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवल्यावर कोणत्या सुविधा मिळतील हे सांगण्यात आले.

बुधवारी झालेल्या सुनावणीत बेल्जियमच्या न्यायालयाने चोक्सीविरुद्ध दाखल केलेले गुन्हे भारत आणि बेल्जियम या दोन्ही देशांच्या कायद्यांनुसार प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर, मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

खरं तर, बेल्जियममधील अँटवर्प येथील न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. भारतीय एजन्सींच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीची केलेली अटक कायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले.

मेहुलच्या सेलमध्ये ६ ट्यूबलाईट्स आणि ३ पंखे .
चोक्सीच्या सेलमध्ये एक टीव्ही आणि नैसर्गिक प्रकाशासाठी तीन खिडक्या.या कक्षात एक संलग्न शौचालय .संलग्न शौचालयात सर्व सुविधा पुरविल्या आहेत
.बाथरूमसह दोन खोल्या आहेत.चोक्सीला वैद्यकीय तपासणी आणि हजेरीसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी असेल.
त्याची कोठडी कोणत्याही तपास संस्थेकडे नाही, तर न्यायालयीन देखरेखीखाली असेल.

फोटोंमध्ये ४६ चौरस मीटरचा बराकदाखवण्यात आला आहे ज्यामध्ये दोन सेल (खोल्या) आहेत, प्रत्येकी एक खाजगी शौचालय आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज आहेत. हे फोटो चोक्सीच्या भारतीय तुरुंगांमध्ये गर्दी आणि असुरक्षितता असल्याच्या दाव्याला भारताच्या अधिकृत प्रतिसाद म्हणून पाठवण्यात आले आहेत.कागदपत्रांनुसार, चोक्सीला मुंबईच्या उच्च-सुरक्षा असलेल्या आर्थर रोड तुरुंगाच्या बराकक्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल, त्याच तुरुंग संकुलात २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब यालाही ठेवण्यात आले होते.

भारतीय तपास संस्थांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला या वर्षी १२ एप्रिल रोजी अटक केली. तो सध्या तुरुंगात आहे.चोक्सीवर १३ हजार ८५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मेहुल त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता, ज्यांच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी चोक्सीच्या उपस्थितीची माहिती दिली होती.अटकेच्या वेळी मेहुल चोक्सी बेल्जियममार्गे स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. चोक्सीला अटक करताना पोलिसांनी २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा उल्लेख केला.

दिवाळीच्या रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग

मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या उच्चभ्रू इमारतीच्या 22व्या मजल्यावर दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली. दिवाळीच्या रात्री अचानक लागलेली ही आग पाहताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, इमारतीच्या फायर सिस्टिममध्येच पाणी नव्हते, हे समोर आल्यानंतर वायकर यांचा संताप अनावर झाला. या घटनेनंतर त्यांनी थेट इमारतीच्या व्यवस्थापनावर तसेच महानगरपालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आग लागल्याचे समजताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच त्यांनी रहिवाशांसोबत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी इमारतीतील फायर सिस्टिममधून पाणीच येत नव्हते. त्यामुळे ते संतापले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर मुंबईतील नव्या इमारतींमध्येच फायर सिस्टिम कोरडी असेल, तर इतर इमारतींचं काय? त्यांनी महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाला आदेश देत म्हटले की, मुंबईतील प्रत्येक इमारतीची फायर सिस्टिम योग्य स्थितीत आहे का, याची तपासणी तात्काळ करण्यात यावी. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि हौसिंग सोसायट्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत मुंबईत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. वायकर यांनी सांगितले की, यंदा रॉकेटमुळे अनेक ठिकाणी इमारतींना आग लागल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घातक फटाक्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभेत या विषयावर मी प्रश्न उपस्थित करणार आहे. रॉकेट फटाके इमारतींच्या परिसरात सोडणे धोकादायक आहे. नागरिकांनी जबाबदारीने दिवाळी साजरी करावी. मुंबईत अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक जणांचा जीव गेला असून, आता कायद्यात सुधारणा आणि नियंत्रण आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

महेश कोठारेंची मोदी स्तुती सुनेला वाचवण्यासाठी:किशोरी पेडणेकर

मुंबई-अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे महेश कोठारे यांच्या भाजप प्रेमाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.महेश कोठारे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा भक्त असल्याचे स्पष्ट् केले आहे. तेव्हापासून ते ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालच या प्रकरणी त्यांना तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल असा टोला हाणला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत स्वतःच्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांना भाजप प्रेमाचे भरते आल्याचा दावा केला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अभिनेते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे ही एका अपघात प्रकरणात अडकली आहे. तिला त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठीच महेश कोठारे यांनी भाजपची स्तुती केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, महेश कोठारे एक कलाकार आहेत. ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई एका अपघात प्रकरणात अडकल्यात. तिला कसे वाचवायचे? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. भाजपवर अशी मुक्ताफळे उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही हे त्यांना ठावूक आहे. महाराष्ट्रात एक वेगळीच संस्कृती तयार होत आहे. मी या प्रकरणी नाव घेऊन कोणत्याही जातीचा अपमान करणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवले, त्यासोबतच क्रौर्यही दाखवले, असे त्या म्हणाल्या.

उर्मिला कोठारे यांच्या कारचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. त्यात एक मजूर ठार झाला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे ते घोडबंदर रस्त्यावर गत डिसेंबर महिन्यात मध्यरात्री 12.54 च्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवाली पोईसर मेट्रो स्थानकालगत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. तत्पूर्वी, तिने मेट्रो स्थानकालगत काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले होते. त्यापैकी सम्राटदास जितेंद्र नामक मजूर ठार झाला होता.

या अपघातात उर्मिला कोठारेही जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कार चालकाच्या रक्ताचे नमुणे घेतले होते. पण त्याने कार चालवताना मद्यपान केले होते का? हे अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरू आहे.

महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे.विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली असताना त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चारही केला आहे.

रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंचे दरवाजे होणार बंद ?

पुणे- महायुतीत असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीत एकमेकांना नेहमी समजून घेत आलेत आणि युती धर्म पाळत आलेत ते भाजपची बदनामी करणाऱ्या रविंद्र धंगेकर यांची लवकरच हकालपट्टी करतील असा दावा भाजपचे पदाधिकारी येथे करत आहेत .या साठी आज खुद्द्द धंगेकर यांनी केलेल्या ट्वीट चा हवाला देखील हे पदाधिकारी देऊ लागलेत

पुणे शहरातील भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचविण्यासाठी रविंद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. लवकरच कारवाई होईल. महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्या बद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धंगेकरांसाठी भाजपाशी दुरावा निर्माण करू नये, असा दबाव आणला आहे. धंगेकरांना संभाव्य कारवाईची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम आपण, मग नंतर पक्ष, युती असे ट्वीट केले आहे.असे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केले आहे. पाडव्याचा दिवस हा नवसंकल्पाचा दिवस असतो, याकडे लक्ष वेधत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘पुणेकरधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला आहे. धंगेकर म्हणाले की, समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली, तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा. खरा कार्यकर्ता तोच असतो जो समाजातले चांगले-वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि आपल्या शहराला वाईट घटना घडण्यापासून वाचवतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज आपण सर्वजण जे काही आहोत ते ह्या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आहोत. त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या ऑफरच्या किस्सावर बोलताना म्हटलंय की, बरं झालं हे महाराज त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले नाही… नाहीतर आज जैन मंदिराची जागा चोरून 3 हजार कोटींचा घोटाळा म्हणून अजितदादांनी तर पहिल्याच दिवशी राजीनामा घेतला असता.

जैन ट्रस्ट–मॉडेल कॉलनी,खरेदीखतापूर्वीच १८ मजली इमारतीचा समावेश असलेल्या ८ लाख चौ. फुटाच्या बांधकामाला महापालिकेने दिला परवाना

‘PMC ने एवढा मोठा प्रकल्प एक महिना आधीच कसा मंजूर केला? कोणी या प्रकरणाचा पाठपुरावा केला ? आणि का?

पुणे-जैन ट्रस्ट – मॉडेल कॉलनी येथील साडेतीन एकराच्या भूखंड खरेदी प्रकाराचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटत असताना आता याच भूखंडावर एका आर्किटेक्टला भूखंड खरेदी व्यवहार होण्या अगोदरच महापालिकेने ८ लाख चौ. फुटाच्या इमारतीला बांधकाम परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जैन ट्रस्ट – मॉडेल कॉलनीला खरेदीखतापूर्वीच इमारत बांधकाम परवानगी दिली गेल्याचे या व्हायरल नकाशावरून दिसते आहे. ट्रस्टीने इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज खरेदीखताआधीच का आणि कसा केला ? या प्रश्नासमवेत म्हणजेच सर्व प्रक्रिया, मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता खरेदी डील फायनल होण्याआधीच झाली होती असे दिसते आहे मग 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली नोंदणी आणि मॉर्गेज हा फक्त दिखावा (eyewash) होता का? PMC ने एवढा मोठा प्रकल्प एक महिना आधीच कसा मंजूर केला? कोणी या प्रकरणाचा पाठपुरावा केला ? आणि का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत .

हा बांधकाम परवाना देताना नकाशावर .. प्रकल्पाचे नाव: सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, मॉडेल कॉलनी मालक:SETH HIRACHAND NEMCHAND SMARAK TRUST (Through Mr. Jayant Narayan Nandurkar – Trustee) आर्किटेक्ट: मनोज सुरेश ताटूस्कर मंजुरीची तारीख:8 सप्टेंबर 2025 नोंदणी व मॉर्गेज तारीख:8 ऑक्टोबर 2025 एकूण बांधकाम:2 इमारती, 77,458.17 चौ.मी. (सुमारे 8 लाख चौ.फुट) FSI:3.53

असेही नोंदविले गेलेले आहे.

विजय कुंभार (आम आदमी पार्टी )

मोहोळ यांच्यानंतर आता धंगेकर देखील मॉडेलिंग करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल

पुणे- गोखले बिल्डर च्या प्रकल्पातील फ्लॅटच्या विक्रीसाठी ग्राहक वर्गाला प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती राजकारणी करू लागलेत असे वाटावे अशी स्थिती सध्या पुण्यात दिसून येऊ लागली आहे अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागलेत . आपले मित्र गोखले बिल्डर्स असे द्संग्त मोहोळ यांनी केलेला जाहिरातीचा व्हिडीओ गेल्या २ दिवसात व्हायरल होताच आज त्यांच्यावर घनघाती आरोपांच्या फैरी झाडणारे रवींद्र धंगेकर यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात त्यांनी एका कापडाच्या दुकानाची जाहिरात केल्याचे दिसते आहे. आता या दुकानात त्यांची मोहोळ यांच्या प्रमाणे कधी काळी किंवा सध्या भागीदारी होती किंवा नाही याबाबत मात्र काही माहिती बाहेर आलेली नाही .

गेल्या २० ऑक्टोबरला मोहोळ यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ..

ज्याबाबत खुद्द रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट केले होते .

कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का…? काय वाटतं…? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय

असे या ट्वीट मध्ये धंगेकर यांनी म्हटले होते .

वर्तमानपत्रात “वर पाहिजे” अशी जाहिरात करून साडेअकरा लाखाला एकाला घातला गंडा, महिलेला जामीन

पुणे- वर्तमान पत्रातील ‘छोट्या जाहिराती’ या सदराचा वापर करून हातोहात फसविणाऱ्या टोळ्या वर्षानुवर्षे कार्यरत असून आज अशाच एका “वर पाहिजे” अशा जाहिराती द्वारे एकाला साडेअकरा लाखाला गंडा घालणारी महिला पोलिसांनी पकडली आहे. आणि यात लुबाडल्या गेलेल्या फिर्यादी ला त्याची सुमारे साडेअकरा लाखाची रक्कमही परत मिळवून दिली आहे.आरोपपत्र हि पोलिसांनी दाखल केले आहे .आणि आता या महिलेला न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १८/०४/२०२५ रोजी फिर्यादी त्यांचे राहते घरी असताना सकाळ टुडे पेपरमध्ये “वर पाहिजे” अशी अॅड पाहुन तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी संपर्क केल्यानंतर समोरुन आकांशा पाटील बोलत असल्याचे सांगुन, फिर्यादी यांना दुस-या मोबाईलवर सपंर्क करायला सांगुन, ममता जोशी या वधु असतील असे सांगून, त्यांना सपंर्क करण्यास सांगितलेने फिर्यादी यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता, त्यांनी ममता जोशी बोलत असल्याचे सांगून फिर्यादीशी फोनवर बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने ती कोल्हापुर येथे तिची मावस बहिण आजारी असल्याने तिकडे गेले असल्याचे सांगुन, तिची मावस बहिण आजारी आहे, तसेच काही दिवसानंतर तिचा स्वतः चा अपघात झाला असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचाराकरीता पैश्यांची आवश्यकता आहे, ती पुण्याला परत आल्यानंतर पैसे परत देईल असे खोटे सांगुन, युपीआय आयडी वरती वारंवार पैसे पाठविण्यास भाग पाडून दिनांक १८/०४/२०२५ ते दिनांक ०१/०६/२०२५ रोजीच्या दरम्यान फिर्यादीस ११,४५,३५०/-रु.ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगुन, फोनपे मर्चेंट यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करुन फिर्यादी यांची ११,४५,३५०/-रु. किं.ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. सदरबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५५/२०२५ भा. न्या. सं क. ३१८ (४), ३१९ (२), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्हयातील आरोपी महिलेचा वरिष्ठ अधिकारी यांचे सुचनेनुसार शोध चालू असताना बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाव्दारे महिला आरोपी हर्षला राकेश डेंगळे, वय २८ वर्षे, रा. प्लॉट नं.२०, हुडकेश्वर रोड, पुण्यधाम मंदिर जवळ, न्यु ओमनगर हुडकेश्वर नागपूर असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेस नोटीस पाठवुन गुन्हयाच्या तपासकामी हजर राहणेबाबत कळविले असता ती पोलीस स्टेशन येथे हजर झाली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांनी तिच्याकडे या गुन्हयाबाबत तपास करता तिने संबधित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने गुन्हा करण्यासाठी वापरलेले तीन मोबाईल जप्त केलेले आहेत. तसेच फिर्यादी यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ११,४५,३५०/-रूपये ही पुन्हा फिर्यादी यांना परत मिळवून दिलेली आहे. या महिलेला दि.१५/१०/२०२५ रोजी चार्जशीटसह न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या महिलेला जामीन मंजुर केलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर राजकुमार शिदे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेद्रे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार संतोष जाधव, विशाल जाधव, मेघा गायकवाड व प्रतिक करंजे यांनी केलेली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात अनेक बोगस वधू वर सूचक मंडळे निर्माण झाली असून ती अशा जाहिराती करून तरुण आणि इच्छुक वरांना आकर्षित करून त्यांना प्रथम ऑनलाईन शुल्क नावाखाली फीज भरायला लावून नंतर फसवे नंबर देऊन तर कधी न देता तर कधी त्यांच्याच खेळीत अडकवून लाखो रुपयांची कमाई करत वृत्त आहे नागपूर संगमनेर अशा भागातील असे भामटे पुण्या मुंबईत जाहिराती करून मलिदा खेचण्याचा धंदा करत आहेत.

मुंबईत मोठ्या घातपाताचा कट ?बनावट शास्त्रज्ञाच्या ताब्यातून अणुबॉम्बचे संवेदनशील नकाशे जप्त; राष्ट्रीय सुरक्षेला धोका

मुंबई-भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे.प्राथमिक तपासात या व्यक्तीने स्वतःला BARC मधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तपास यंत्रणांना त्याच्या निवासस्थानातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर प्रचंड खळबळ माजली असून, अख्तर हुसेनचा उद्देश नेमका काय होता, हे उलगडण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणा उच्चस्तरीय तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळत होती, जो स्वतःला BARC मधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेनला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीने तपास यंत्रणेला धक्काच बसला. घरातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या आराखड्याशी साधर्म्य असलेले नकाशे, तांत्रिक टिपा आणि इतर दस्तऐवज होते.

प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा परदेशी गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या माध्यमातून घातपाताचा कट तर रचला नव्हता ना, याची चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे.

या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA आणि गुप्तचर विभाग म्हणजेच IB यांनी आपल्या हाती घेतला असून, अनेक दिशांनी चौकशी सुरू आहे. अख्तर हुसेनने मागील काही वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्कांचा तपास घेतला असता काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर पैलू दडलेले असावेत, अशी शंका वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांनी अख्तर हुसेनकडून मिळालेल्या संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली असून, या उपकरणांतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात येईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. देशातील सर्व अणु संशोधन केंद्रे आणि संवेदनशील प्रयोगशाळांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. भारताच्या अणु कार्यक्रमाच्या सुरक्षिततेबाबत देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच सजगता बाळगली जाते. भाभा अणु संशोधन केंद्र हे भारताच्या अणु ऊर्जा आणि संशोधन क्षेत्राचे केंद्रबिंदू मानले जाते. मुंबईतील ट्रॉम्बे येथे असलेले हे केंद्र अणुशक्ती निर्मिती, अणु भौतिकशास्त्र, रेडिओआयसोटोप्स उत्पादन, वैद्यकीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामात अग्रस्थानी आहे. त्यामुळे या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बनावट ओळख निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देशद्रोहाच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा होऊ शकते.

भाभा अणु संशोधन केंद्राचा इतिहासही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी 1954 मध्ये अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे या नावाने या संस्थेची स्थापना केली. भारताच्या अणु संशोधनाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या निधनानंतर 1967 मध्ये या संस्थेचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र करण्यात आले. आज या संस्थेमुळे भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनला आहे. अशा संस्थेच्या नावाशी जोडलेला हा बनावटपणा केवळ गुन्हा नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणारा गंभीर कट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत देश हादरवणारी नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधूंशी युती करणार नाही

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की, त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढूया, हीच आमची भूमिका आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका स्पष्ट मांडली आहे. राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करून काँग्रेसच्या रणनीतीवर नवीन चित्र निर्माण केले आहे.

दरम्यान, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले की, महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा त्यांची शिवसेना होती, पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी आणखी स्पष्ट केले की, काँग्रेसने आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत देखील स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे. भाई जगताप यांच्या या विधानाने काँग्रेसच्या भविष्यातील धोरणाबाबत नवी दिशा सुचवली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्याबाबत कोणतीही शंका नाही. आमची बैठक चेन्निथला यांच्यासोबत झाली, त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड सर्व नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे सावंत यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेस सध्या कोणत्याही युतीच्या दबावाखाली न येता, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुढे जाण्याच्या तयारीत आहे.