Home Blog Page 78

फडणवीस गुंडाच्या टोळ्यांना पाठीशी घालत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप: महिला अत्याचारावरून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची केली मागणी

पुणे-भाजपाच्या राजवटीत महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारांची तीव्रता वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने सत्तेत असणाऱ्या भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांतील नेत्यांकडून वारंवार महिलांवर अत्याचार झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडाच्या टोळीला पाठीशी घालत डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या पिडीतेला न्याय मिळू नये यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर दंड देण्यात यावा असे सांगत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल व महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून लाल महल येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘बंगालमध्ये एका डॉक्टरची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशातील भाजप नेते रस्त्यावर उतरले होते, परंतु महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणामध्ये एकही भाजपा नेता साधा निषेध करताना दिसत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे गुंडाचा मोहरक्या म्हणून कार्य करतात का? भाजपचे माजी आमदार रणजीत निंबाळकर व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना कोणतीही चौकशी न करता क्लिन चिट देण्याचे पाप फडवणीसांनी केले आहे. या घटनेचा आम्ही या आंदोलनाद्वारे निषेध करतो व स्व. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहू.’’

यानंतर डॉक्टर सेलचे डॉ. राहुल सावंत म्हणाले की, ‘‘डॉ. संपदा मुंडे या आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांच्यावरती शासकीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दबाव आणून वारंवार त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले. या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्‍हावी असे न झाल्यास कोणत्याही डॉक्टरी पेशातील व्‍यक्तीला या देशामध्ये आपले कार्य मुक्तपणे  करता येणार नाही.’’

महिला आघाडीच्या प्राची दुधाणे यावेळी म्हणाल्या की, ‘‘महाराष्ट्रातील सरकार आपल्या नेत्यांना पाठिशी घालण्याचे कार्य खुबीने करीत आहे. रणजीत निंबाळकरांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संगनमताने विषय भरकटविण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यानी गुन्हेगारांना कोणत्याही तपासाविना क्लिन चिटच देऊन टाकली आहे. रूपाली चाकणकर या स्वत: महिला असून डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे चारित्र्य हनन करून तिच गुन्हेगार असल्याचे निर्लज्जपणे जाहिर केले. या गंभीर प्रकरणात महिलांच्या प्रती असंवेदनशिल व निष्क्रीय असणाऱ्या रूपाली चाकणकर यांना त्वरीत पदमुक्त करावे.

तसेच SIT व CBI  यंत्रणेच्या हातात तपास देवून फास्टट्रॅक कोर्टामध्ये डॉ. संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.’’

यावेळी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाच पाही, ‘‘रूपाली चाकणकर आहे कोण? तिला पायताण हाणा दोन’’, ‘‘भाजप सरकारचा धिक्कार असो’’, ‘‘सत्तेच्या खुर्च्या खाली करा खाली करा’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो फडणवीषचा धिक्कार असो’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो रक्तरंजीत धिक्कार असो’’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवतेत महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, महिला आघाडीच्या प्राची दुधाने, मेहबुब नदाफ,  डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. राहुल सावंत, डॉ. स्नेहल पाडळे, डॉ. नीरज जाधव, डॉ. ऐश्वर्या वाघ कुलकर्णी, अर्चना शहा, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, अनुसया गायकवाड, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, सुविधा त्रिभुवन, रेखा जैन, ॲड. राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, रोहिणी मल्लाव, सोशल मिडिया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, अनिल पवार, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, अविनाश अडसूळ, फिरोज शेख, सचिन भोसले, श्री. काकडे, राज जाधव, सुरेश नांगरे, देवीदास लोणकर, भगवान कडू, संजय अगरवाल आदि उपस्थित होते. 

वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दौड

पुणे-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने आंबेगाव पोलीस स्टेशन तर्फे राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक ते गायमुख चौक अशी मॅरेथॉनचे आयोजन केले होते.या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उपस्थित स्पर्धक, विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस स्टेशन कडे अधिकारी अंमलदार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . हि मॅरेथॉन अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक ते फिरंगाई देवी ते भेंडी चौक ते राम मंदिर ते गायमुख चौक ते परत अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक पुणे अशा मार्गावर संपन्न झाली

पोलीसठाण्यातील 08 अधिकारी व 50 अंमलदार तसेच 200 ते 250 विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शांतता समिती, पोलीस मित्र, पत्रकार, मॉलला कमिटी अल्पसंख्याक कमिटीचे सदस्य असे अनेक मान्यवर आणि नागरिक या मॅरेथॉन म्ध्त्ये सहभागी झाले होते तसेच भारती विद्यापीठ वाहतूक शाखेकडे योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.

..हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही… अजित पवारांचा मुरलीधर मोहोळांना टोला

निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवीमहाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनची कामगिरी देशात अव्वलखेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई दि.३१ : – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते.पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. प्रदीप गंधे,संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले आधी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं.

अस असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत,असे अजित पवार स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,१३ कोटीच्या भ्रष्टाचाराचा राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे, तो पदाधिकारी खजिनदारही नाही.संघटनेकडे जो निधी येतो तो कोणा एका पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये नसतो. संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते. तिच्या मान्यतेने तो खर्च होतो.या खर्चाचा हिशेब खजिनदार ठेवतात.संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांसाठी महाराष्ट्राचे साधारणतः ८०० ते १००० खेळाडू सहभागी होतात. या सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळांच्या ३० संघटनांकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा निधी वापरला जातो आणि त्याचा हिशोब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर करण्यात येतो. त्या संघटनांनी हिशेब दिल्याशिवाय ऑलिंपिक असोसिएशनला शासनाला एकत्रित हिशेब देणे शक्य होत नाही. तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात. अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५/६ संघटना आहेत. त्यांनी त्वरित हिशेब द्यावेत. त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनला हिशेब देणे शक्य झाले नाही,हे विचारात घेऊनच शासनाने हिशेब सादर करण्यास दोन महिने मुदतवाढ दिली आहे.

प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शासन चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान देते.हे अनुदान महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन त्यांच्या संलग्न ३० संघटनांच्या माध्यमातून खर्च करत असते.या सर्व हौशी,विश्वस्त संस्था असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेप्रमाणे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हिशोब येण्यास उशीर होतो. ही एक फार महत्त्वाची बाब आहे,याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशोब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशोब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशोब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशेब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे. तेव्हा या संस्थेविरुद्धच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे होणे आवश्यक होते.असे न करता,केवळ हिशेब सादर केले नाही म्हणून राजकीय दबावापोटी पहाटे तीन वाजता ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो.यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशींनी सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

ही निवडणुक पुढे ढकलण्याचेही प्रयत्न. झाले. ती पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात एकूण सहा प्रकरणे दाखल झाली होती .पण न्यायालयाने ती सर्व फेटाळून लावली. जी प्रकरणे न्यायालयात फेटाळून लावली,त्यात ज्या गोष्टी,कारणे नमूद होती,ती सर्व कारणे न्यायालयाने फेटाळली असताना,त्याच गोष्टींसाठी पुन्हा तक्रारी,गुन्हे दाखल झाले. पोलीसांना तक्रारी घेण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांमध्ये तक्रारी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक अधिकारी ,जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,त्यांना पोलिसांनी राजकीय तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावले.हे सर्व कोणाच्या दबावाने झाले, हे संदीप जोशींनी सांगावे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केल नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे,म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दबाव टाकण्याची भाषा करतात,असे ते म्हणतात. त्यांच्यासाठीही अनेक मंत्र्यांपासून केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे फोन मतदारांना येत आहेत. याला काय दबाव म्हणायचं ?मुख्यमंत्र्यांनीही बऱ्याच क्रीडा संघटनांना वर्षा बंगल्यावर अलीकडेच बोलावले होते. म्हणजे त्यांनी दबाव आणला असे आम्ही म्हणणार नाही. केवळ ऑलिंपिक असोसिएशन नाही,तर अनेक संघटनांनी अद्याप निधीच्या खर्चाचे हिशेब दिलेले नाहीत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्थेला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी शासनाने अनुदान म्हणून सन २०२३- २०२४ साठी दिलेल्या १ कोटी एवढ्या रकमेचा हिशेब अद्याप शासनास सादर केलेला नाही.अजूनही बऱ्याच संघटनांना हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही.म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असे होत नाही.हिशेब सादर केले नाही, म्हणून या सर्वांवर पोलीस केस दाखल करावी का ? वा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करावेत का ? … असे करणे मला योग्य वाटत नाही. खेळात खिलाडूपणा पाहिजे.सुडाची भावना नको,या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशोब वेळेत द्यावेत,म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे राजकीय आरोप क्रीडा संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेत होणं हे काहीस अस्वस्थ करणार आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. आमचे काम संघटनांना आवडत असेल तर संघटना आम्हाला निवडून देतील. आतापर्यंत माझ्यासह, माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य पाहून पुन्हा आमच्या हातात पुन्हा ही सूत्र दिली जातील,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
00000

‘CA टाॅपर’टाईप..पुण्यात ‘प्रेग्नेंट जॉब’ जाहिरातीने गंडविले 11 लाखाला

असा पुरूष हवाय जो मला आई बनवेल…!सोशल मीडियावरील जाहिरात करून लाखोंची फसवणूक, वाचा नेमकं प्रकरण…

नेट फ्लिक्स वर आर्थिक अडचणीत सापडलेला एक प्रामाणिक सरकारी नौकर कसा पुरुष वेश्या बनतो याची कहाणी दाखविणारी ‘CA टाॅपर’ हि मालिका ज्यांनी पाहिली असेल त्यांना या प्रकारचा तातडीने उलगडा होईल बहुधा याच पद्धतीचा पण वेगळ्या स्वरूपाची गुन्हेगारी पुण्यात सुरु झालीय कि काय असे वाटावे अशी हि बातमी आहे. असा पुरूष हवाय जो मला आई बनवेल…! अशा आशयाची जाहिरात करून तब्बल २५ लाख रुपयांचे त्यासाठी आमिष दाखवून एका कंत्राटदाराला ११ लाखाला कसा गंडा घालण्यात आला याबाबतची माहिती आता बाणेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याने चव्हाट्यावर आणली आहे.

एका सायबर सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या विविध भागात “गर्भधारणेच्या नोकरी सेवा” च्या बनावट जाहिराती येत आहेत. २०२२ च्या अखेरीपासून अशा फसवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे. व्हिडिओंमध्ये महिला गर्भवती होण्यासाठी पुरुषाला मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचा दावा करताना दिसतात. या जाहिरातींमुळे प्रभावित होऊन, पुरुषांकडून प्रथम नोंदणी शुल्क आकारले जाते आणि नंतर वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर औपचारिकता किंवा सुरक्षा ठेवींसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात. पैसे मिळाल्यावर, फसवणूक करणारे गायब होतात.”बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांमध्ये अटक केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की, हे सायबर गुन्हेगार देशभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडिया आणि बनावट व्हिडिओ जाहिरातींचा वापर करत आहेत. पुणे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिरातींना बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंक्स, कॉल्स किंवा ऑफरची तक्रार सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा www.cybercrime.gov.in वर त्वरित करावी

पुणे-सोशल मीडियाच्या या झगमगाटीच्या जगात आजकाल विविध नोकऱ्यांचे घोटाळे फोफावत आहेत. पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराची कहाणी खरोखरच भयावह आहे. बनावट जाहिरातीला बळी पडून त्याने लाखोंचे नुकसान केले.सोशल मीडियावरील जाहिरातीत एका महिलेने लिहिले होते, “मला असा पुरूष हवा आहे जो मला आई बनवू शकेल.” महिलेने गर्भधारणा केल्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आश्वासन होते. पण प्रत्यक्षात तो एक सापळा होता. ज्यामुळे कंत्राटदाराचे ११ लाख रुपये गमवावे लागले. ही घटना वाचून तुम्हालाही हादरा बसेल.

तक्रारदाराला जेव्हा कळले की, तो सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा बळी पडला आहे तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक कटाचे उदाहरण नाही तर सायबर गुन्हेगारांच्या नवीन धूर्ततेवरही प्रकाश टाकते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या या कंत्राटदाराला फेसबुकवर एक जाहिरात दिसली.जाहिरातीत एका आकर्षक महिलेचा फोटो होता जी गर्भवती राहू शकत नसल्याचा आरोप होता. जाहिरातीत ती म्हणाली, “मला मूल हवे आहे, पण नवरा नको. जो पुरुष मला तीन महिन्यांत गर्भवती करेल त्याला २५ लाख रुपये, गाडी आणि घरात वाटा मिळेल. मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल. मला मातृत्वाचा आनंद देऊ शकेल. तो शिक्षित आहे की नाही, तो कोणत्या जातीचा आहे, तो गोरा आहे की काळा आहे याची मला पर्वा नाही, असं लिहिलं होतं.

आर्थिक अडचणीत असलेल्या कंत्राटदाराला वाटले की, पैसे कमविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्याने जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या नंबरवर कॉल केला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख “प्रेग्नंट जॉब्स” नावाच्या कंपनीत सहाय्यक म्हणून करून दिली. त्याने सांगितले की, तो त्या महिलेसोबत राहून काम सुरू करण्यापूर्वी तिला कंपनीत नोंदणी करावी लागेल आणि ओळखपत्र द्यावे लागेल. त्यानंतर कंत्राटदाराकडून नोंदणी शुल्क, ओळखपत्र शुल्क, पडताळणी शुल्क, जीएसटी, टीडीएस, प्रक्रिया शुल्क इत्यादी विविध सबबीखाली पैसे मागितले गेले.

याबाबत तपास अधिकाऱ्याने सांगितले की, “तक्रारदाराची इतकी फसवणूक झाली की त्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक छोटे व्यवहार केले. एकूण रक्कम ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. ही सर्व देयके यूपीआय आणि आयएमपीएस ट्रान्सफरद्वारे करण्यात आली.” तक्रारदाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतरच त्याला समजले की तो सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. तक्रारीनंतर, बाणेर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा: हर्षवर्धन सपकाळ

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे.

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २०२५

मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबईत आज १ नोव्हेंबरच्या मोर्चाचा अनुषंगाने बैठक आयोजित केलेली होती पण काही वैयक्तीक व घरगुती कामामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही पण काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. १ तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार आहे. या बैठकीला वा मोर्चात कोण सहभागी होणार हे गौण असून मुद्दा महत्वाचा आहे असेही सपकाळ म्हणाले.

बच्चु कडू यांच्या आंदोलनावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार कधी पोलिसांना तर कधी कोर्टाला पुढे करून मुख्य मुद्द्यापासून पळ काढत आहे. कोर्टाला पुढे करून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये हिम्मत असेल तर पुढे येऊन चर्चा केली पाहिजे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले व आता कर्जमाफी करण्यास वेळकाढूपणा का केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल तर हा त्यांचा नाकर्तेपणा आहे, त्यांची पत असेल तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जावून महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करावी – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. 30 : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून 15 दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाणे, मुंबईत ॲलन क्लासेसच्या अनेक शाखा कार्यरत असणे, यासंदर्भात पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांच्या लक्षवेधीबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात नुकतीच बैठक झाली.या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, आमदार श्री. राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खासगी कोचिंग क्लास सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारुन कमी रक्कम दाखविणे आणि यात कर चोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास सुरु करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही संबधित विभागाने तपासणी करावी, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

राज्यातील खासगी कोचिंग क्लास संदर्भात विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या बैठकीत सांगितले. हे विधेयक व संबंधित कायदा परिपूर्ण व्हावा या दृष्टीने जनतेकडूनही सूचना मागविण्यात याव्यात, असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. खासगी क्लास संदर्भात सर्व समावेश असे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत रासे (ता. खेड) येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी ५२ घरकुल गृहसंकुलाचे भूमिपूजन

पुणे, दि. २९:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामपंचायत रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी उभारण्यात येणाऱ्या ५२ घरकुलांच्या गृहसंकुलाचे भूमिपूजन गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते Habitat for Humanity India Trust (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आज मोठ्या उत्साहात पार पडले.

जिल्हा परिषद पुणे मार्फत या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांची मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थ्यांना गायरान शासकीय जागेचे विनामूल्य वाटप करून जून २०१९ मध्ये ऑनलाइन मंजुरी देण्यात आली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदानही वितरित करण्यात आले होते. तथापि, स्थानिक पातळीवरील काही अडचणींमुळे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. ग्रामपंचायत रासे, पंचायत समिती खेड आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे यांच्या पाठपुराव्यामुळे Habitat for Humanity India Trust संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या गृहसंकुलामध्ये प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, वीज (सौरऊर्जा संच), स्वच्छता सुविधा, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संस्था शासनाच्या निकषांनुसार आधुनिक व टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून घरे उभारणार आहे. या उपक्रमामुळे ठाकर समाजासह वंचित व गरजू कुटुंबांना पक्क्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.

या कार्यक्रमास श्रीमती शालिनी कडू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा; भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत); विशाल शिदे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड; तसेच Habitat for Humanity India Trust संस्थेचे वरिष्ठ अधिकारी राजीव रमण, बुरहानुद्दीन बोहरा, सतीश जाधव आणि ग्रामपंचायत रासेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामीण भागात टिकाऊ व सशक्त विकासाचा पाया रचला जात असून, जिल्हा परिषदेच्यावतीने हे पुणे जिल्ह्यातील पहिलेच सामूहिक घरकुल गृहसंकुल ठरणार आहे.

ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२५

राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात उसतोड कामगारांच्या कल्याणार्थ प्रस्तावित चर्चा व पुढील दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ, उपसचिव अंकुश शिंगाडे, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरणे, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुण्याचे उपसंचालक डॉ. आशिष भारती आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य व बीड, धाराशिव, जालना जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांच्या नुकसान होत असून, त्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे गमबुट, इलेक्ट्रिक कोयता, सॅनिटरी नॅपकिन, ग्ल्वोहज या आवश्यक गोष्टी वेळेत मिळण्यासाठी डीबीटी द्वारे मदत देणे सुलभ होईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.त्याचसोबत फिरती स्वच्छता गृहांची व्यवस्था ग्रामिण विकास विभागामार्फत व संबंधित विभागामार्फत करण्याची न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी गरजेची आहे याबाबत नीलम गोर्हेंनी लक्ष वेधले.

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून फिरता दवाखाना व महिला कामगारांसाठी स्त्री रोग तज्ञाची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला महिला ऊसतोड कामगारांसाठी प्रसूती रजा मातृत्व योजनेचा लाभ देण्याबाबतही विचार करण्यात यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

पुढील बैठकीत ऊसतोड कामगारांच्या कल्याणार्थ चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर,सोलापूर , पुणे ,कोल्हापूर, धाराशिव,अमरावती, अहिल्यानगर,नाशिक, सातारा, बुलढाणा नांदेड ,लातूर, जळगाव, सातारा, सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठकीचे नियोजन करण्यात येईल , असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

ताम्हिणी घाटात डोंगरावरून घरंगळत आलेला दगड सनरूफद्वारे थेट कारमध्ये पडला; पुण्याची महिला ठार

पुणे-
ताम्हिणी घाट परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे डोंगरकड्यावरून छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. याच दरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून माणगावकडे जाणाऱ्या कारवर डोंगरावरून कोसळलेला दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून, त्यांचे पती आणि मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.
आज सकाळी स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासह पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करत होत्या. घाटात सतत जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगरावरून सतत दगड कोसळत होते. अचानक एक मोठा दगड त्यांच्या कारच्या टपावर आदळला आणि सनरूफची काच फोडून आतमध्ये घुसला. दगड थेट स्नेहल गुजराती यांच्या डोक्यात लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पती आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. स्नेहल यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अवकाळी पावसामुळे ताम्हिणी घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने रस्त्यांची पाहणी आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे आदेश दिले आहेत

या घटनेनंतर पुन्हा एकदा सनरूफच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात कार विक्रीसाठी सनरूफ हे एक आकर्षक फीचर म्हणून दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्षात सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. परदेशात थंड वातावरणामुळे सूर्यकिरणे अंगावर घेण्यासाठी सनरूफचा वापर केला जातो, परंतु भारतात तो बहुतेकदा बाहेर डोकावण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे अपघाताच्या वेळी काच फुटून जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडतात.

रोहित आर्यचे तर PM मोदींनी केले होते कौतुक?:माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर केले होते उपोषण

सरकारने थकविले होते २ कोटी रुपये -मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य पुण्याचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. पण त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्यने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते, अशीही माहिती समोर येत आहे.

मुंबई- माझी शाळा सुंदर शाळा योजनेत रोहित आर्य सहभागी होते. तसेच रोहित आर्यला मी शिक्षणमंत्री असताना स्वतः चेकने पैसे दिले असल्याची माहिती शिवसेना नेते व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे. इतकेच नव्हे तर पीएलएस प्रकल्पासाठी रोहित आर्यचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्यने काही मुलांना बंधक बनवून ठेवले होते. त्यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर रोहित आर्यच्या बद्दल दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.

रोहित आर्यने दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण देखील केले होते. तसेच सरकारने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता. दीपक केसरकर या संदर्भात बोलताना ते म्हणाले, रोहित आर्य माझी शाळा सुंदर शाळा योजना चालवत होते. त्यांनी काही मुलांकडून वसुली देखील केली असल्याची माहिती डिपार्टमेंटकडून समजले होते. त्यांचे म्हणणे होते की आपण असे काही फी वसूल केलेली नाही. पण अशा पद्धतीने मुलांना ओलिस ठेवणे चुकीचे आहे.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी स्वतः त्यांना चेकने पैसे दिले होते. सरकारचे जे पेमेंट असते त्यासाठी सगळ्या प्रोसेस पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांचा जो आरोप आहे की 2 कोटी रुपये मला मिळाले नाही हे योग्य वाटत नाही. यासाठी त्यांनी विभागाशी संपर्क साधावा आणि यासाठीचे डॉक्युमेंट सादर करावे. तसेच रोहित आर्य विक्षिप्त वाटत होता का? असा प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले, ते कोणाचे ऐकत नव्हते, असे मी म्हणेल. बाकी कोणावर पर्सनल कमेन्ट करणे योग्य नाही.

पीएलसी प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रोहित आर्यचे कौतुक केल्याची माहिती आहे. त्यानंतरच हा प्रकल्प राज्यात चालू झाला अशी माहिती देखील समोर आली आहे. पण या प्रकल्पाच्या फक्त कन्सेप्ट साठी सरकार पैसे देत नसते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच रोहित आर्यचा असा देखील आरोप होता की चुकीच्या शाळांना चांगले गुण देण्यात आले होते. याविषयी बोलताना केसरकर म्हणाले, त्यांनी उपोषण केले होते आणि मी यापूर्वी देखील सांगितले होते की व्यक्तिगत सहानुभूती म्हणून मी त्यांना पैसे दिले होते. पण नियमाचे पालन करावेच लागते. अशा पद्धतीने मुलांना डांबून ठेऊन असे काही करणे योग्य नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्यलढ्यात आणि देश उभारणीत नेहरु-गांधी घराण्याचे मोठे योगदान

नेहरु-गांधींचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज — विश्‍वंभर चौधरी

पुणे : देशातील साडेपाच हजार धरणांपैकी निम्मी धरणे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या कार्यकाळात उभारली गेली आहेत. स्वातंत्र्यलढ्यात नेहरु-गांधी घराण्याचे मोठे योगदान असून, सध्याचे सत्ताधारी त्यांचा इतिहास पुसण्याचे काम करीत आहेत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत विश्‍वंभर चौधरी यांनी व्यक्त केली. देशासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची मोडतोड होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विश्‍वंभर चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार,, पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  खजिनदार व ज्येष्ठ नेते  अ‍ॅड. अभय छाजेड, अजित दरेकर, यासीन शेख, सचिन आडेकर, आबा जगताप, विठ्ठल गायकवाड, भारत सुराणा, सीमा महाडिक, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ सुनिल शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

विश्‍वंभर चौधरी म्हणाले, “नेहरुंनी बांधलेली धरणे आज जीर्णावस्थेत असून, त्यांची देखभाल सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत नाही, ही खंतजनक बाब आहे. २०१४ पासून ‘नवीन देशभक्तांची’ एक तुकडी निर्माण झाली असून, त्यांचे काम फक्त देशासाठी कार्य करणाऱ्या नेत्यांची बदनामी करणे आहे. अशा विकृतींना विचारांच्या बळाने प्रत्युत्तर द्यावे लागेल. पं. नेहरु, इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.”

उल्हासदादा पवार म्हणाले, “इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने ‘आयरन लेडी’ होत्या. पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. सिक्किमला भारतात विलीन करून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व दृढ केले. त्यांचे नेतृत्व आणि धैर्य जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देणारे ठरले.”

प्रास्ताविक अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, “आज इतिहासाची मोडतोड करून राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा अवमान केला जात आहे. इंदिरा गांधी यांनी देशाचे प्रभावी नेतृत्व करत जगाच्या राजकारणात भारताला बळकट स्थान मिळवून दिले. मुंबई महाराष्ट्रात आणण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाद्वारे त्यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”  अक्षय जैन यांनी आभार मानले.

डॉ. शर्वरी इनामदार यांची जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

साऊथ आफ्रिका केप टाऊन  येथे  क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 

४  सुवर्णपदक आणि मानाचा बेस्ट लिफ्टर वर्ल्ड चा तिसऱ्या क्रमांकाचा किताब पटकावला

पुणे: साऊथ आफ्रिका केप टाऊन  येथे  क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. जगभरातील सुमारे 480 खेळाडूंनी त्यात आपले शक्ती प्रदर्शन केले. पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७  किलो वजनी गटात क्लासिक प्रकारात ३७२.५  किलो तर इक्विप्ड प्रकारात ४०७.५  किलो वजन उचलत स्क्वॉट, बेंचप्रेस, डेडलिफ्ट व टोटल यामध्ये ३ कांस्यपदके, ४  सुवर्णपदके याबरोबरच मानाचा बेस्ट लिफ्टर वर्ल्ड चा तिसऱ्या क्रमांकाचा किताबही पटकावला. 

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, स्पेन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, साऊथ आफ्रिका, जपान या देशाच्या खेळाडूंशी अत्यंत चुरशीची लढत देत त्यांनी भारतासाठी ही विजयश्री खेचून आणली. मंगोलिया येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत तीन एशियन चॅम्पियनशिप्स, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकत ओपन, क्लासिक, इक्विप्ड, मास्टर्स, बेंचप्रेस या सर्व प्रकारात मिळून तब्बल 17 वेळा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र,  8 वेळा बेस्ट लिफ्टर इंडिया , ३ वेळा बेस्ट लिफ्टर एशिया, बेस्ट लिफ्टर कॉमनवेल्थ किताबही पटकावले आहेत.

कोझिकोड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतून त्यांची या जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. डॉ .शर्वरी पुण्याच्या ‘कोडब्रेकर’ जिम मध्ये डॉ .वैभव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सदाशिव पेठेत ‘आहार आयुर्वेद’ क्लिनिकमध्ये त्या खेळाडूंसाठी व विविध मेटाबोलिक डिसऑर्डर साठी जीवनशैली मार्गदर्शनाचे प्रशिक्षण देतात.
आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार, पुणे -महाराष्ट्र व पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या पाठिंबामुळेच सर्व अडचणींवर मात करत सातत्याने उच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य होते असे त्यांनी सांगितले. जागतिक स्पर्धेत भारतासाठी अत्यंत चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर

मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी १:४५ वाजता युट्यूबर रोहित आर्यने १७ मुले, एका ज्येष्ठ नागरिक आणि एका नागरिकाला ओलीस ठेवले होते. पोलिस आणि विशेष कमांडोंनी त्याला गोळ्या घालून सर्व ओलीसांना सुरक्षितपणे वाचवले. या गोळीबारात आरोपी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलिसांची ही कारवाई एक तास चालली. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली. तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने १०० हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते.


मुंबई: पवईतील एआर स्टुडिओमध्ये रोहित आर्यनं १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं.या ओलीसनाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले. त्यावेळी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार केला. त्यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. त्यामुळे रोहित जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल झालं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रोहितनं एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यानं आग लावण्याची धमकी दिली होती. मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीनं हालचाली सुरु केल्या. इमारतीच्या मागील बाजूनं पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्यनं मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरु केला. या गोळीबारात रोहित जखमी झाला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा मृत्यू झाला. पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले.

रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.

मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं रोहित आर्यने म्हटलं. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, त्याचे पैसे सरकारकडे आहेत. शिक्षण विभागासाठी त्याने स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता, त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.

पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला, ज्यामध्ये माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे तिथे लहान मुलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देऊन इथे स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स बोलवली. ज्या व्यक्तीने बंधक बनवलं होतं, त्याच्याशी संवाद आणि वाटाघाटी पोलिसांनी केल्या. त्यानंतर आमच्या पवई पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून एन्ट्री करुन आतील एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. एकूण 17 मुलं, एक वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते. रोहित आर्य असं आरोपीचं नाव आहे. रोहितकडे एक बंदूक होती, पण अधिक तपास सुरु आहे. आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या याचा तपास सुरु आहे. एका वेब सीरिज ऑडिशन घ्यायचं म्हणून या मुलांना बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी या सोसायटीचा हॉल घेतला होता. जी मुलं ऑडिशनसाठी आली होती, त्यांनाच त्याने बंधक बनवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पवई पोलीस आणि डीसीपींनी तात्काळ ऑपरेशन राबवत सर्वांना रेस्क्यू केला आहे. सकाळी शूटिंग करण्यासाठी 25 ते 30 मुलं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आले होते. शूटिंग झाली यानंतर दुपारी या सर्व मुलांना बंदूकचा धाक दाखवून किडनॅप केला गेला. किडनॅपर मुलांना किडनॅप करून मागणी करत होता. पोलिसांनी वेळेत सर्व मुलांना रेस्क्यू केला आहे. किडनॅपर बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. बंदूक घेऊन कसा आतमध्ये पोहोचला, यामध्ये सुरक्षा मोठी चूक झाली आहे. त्यामुळे कठोर कारवाई करावी असे मागणी प्रत्यक्षदर्शी यांनी केली आहे.
दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सूरू आहे. मात्र, या घटनेनं मुंबईत चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्व मुले सुखरुप आहेत, पण ते घाबरलेले आहेत असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. रोहितने ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केल्यानंतर मुलांना आणि त्यांच्या पालकांना स्कूल बसमधून पवई पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये मुलांसह पालकांचे स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांना सोडतील, अशी माहिती आहे.पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली.

पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याने छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ २८ नोव्हेंबरला सिनेमागृहात!

गेल्या काही काळापासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत ‘ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट आहे. हा सिनेमा संपूर्ण भारतात  मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून हा सिनेमा एक्शन पॅक्ड असल्याचं दिसतय. आणि हेच पोस्टर चित्रपटाची उंची, भव्यता दर्शवत आहे.

हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. एक्शन पॅक्ड अशा या चित्रपटाला रोमँटिक झालर आहे ती कशी ते मात्र तुम्हाला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे कन्नड कलाकारांनी या चित्रपटासाठी मराठी भाषा शिकली आणि मराठी कलाकारांनी चित्रपटातील भूमिकांसाठी कन्नड भाषा शिकली. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने अर्थात सिनेमाप्रती उत्सुकता वाढविली आहे. पोस्टरवरील कलाकार तर पॉवर पॅक्ड अभिनय देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. कवीश शेट्टी आणि मेघा शेट्टी यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथ सिनेसृष्टी गाजवली आहे तर शिवानी सुर्वेच्या अभिनयाचा आणि ग्लॅमरसचा केवळ महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेरही मोठा चाहतावर्ग आहे. तर विराट मडकेच्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाची भर पडणार आहे. अश्विनी चवरे हिच्याही अभिनयाची जादू या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्मस’ बॅनर आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण आर.डी. नागार्जुन यांनी केले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे

पुणे शहरात पुन्हा खोदकामाने नागरिक त्रस्त:भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची तातडीच्या कार्यवाहीची मागणी

पुणे : शहरात सध्या महाप्रीत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांमुळे नागरिकांना खड्डे, धूळ, आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून समन्वय, सुरक्षितता आणि योग्य पुनर्डांबरीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

५०० किमी खोदकाम, १२५ किमी भागात दुप्पट कामे

शहरातील विविध भागांमध्ये महाप्रीत आणि सीसीटीव्ही या दोन स्वतंत्र योजनांसाठी सुमारे ५०० किलोमीटर खोदकाम सुरू आहे. यातील सुमारे १२५ किलोमीटरचा भाग समान क्षेत्रात असून, दोन्ही कामे एकत्रितपणे करण्याबाबत पालिकेत बैठक होऊन निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सीसीटीव्ही कामाचा ठेकेदार आधी खोदकाम करून नंतर महाप्रीत कंपनीकडून त्याच भागात पुन्हा खोदकाम होत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास होत आहे, असे घाटे यांनी नमूद केले आहे.

पुनर्डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

पालिकेने “रस्त्यांना कमीत कमी छेद घेऊन खोदकाम करावे” अशा सूचना दिल्या होत्या, तरी मोठ्या आकाराचे खड्डे घेतले जात आहेत. त्यानंतर फक्त खडी टाकून काम अपूर्ण ठेवले जाते, त्यामुळे रस्त्यावर खडी पसरून वाहनघसर अपघात वाढत आहेत, असे घाटे यांनी निदर्शनास आणले.
शिवदर्शन चौक, ई-लर्निंग स्कूलसमोर आणि इतर ठिकाणची कामे पाहिल्यास या समस्येचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

ठेकेदारांवर कारवाईची मागणी

घाटे यांनी ठेकेदारांकडून रस्त्यावर खडी न पसरण्याची, पुनर्डांबरीकरण नीट करण्याची आणि योग्य बॅरिकेडिंग व सूचना फलक लावण्याची हमी घेण्याची मागणी केली आहे. नियमभंग झाल्यास संबंधित ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांनी आयुक्तांना विनंती केली आहे.

जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता

जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांवर मिलिंगचे काम सुरू आहे. मात्र, त्यानंतर तातडीने डांबरीकरण होत नसल्याने वाहने घसरत आहेत. त्यामुळे मिलिंगनंतर २४ ते ४८ तासांच्या आत पुनर्डांबरीकरण करणे बंधनकारक करावे, अशी मागणी घाटे यांनी केली आहे.
तसेच या कामांदरम्यान सुरक्षा निकषांचे पालन, दिशादर्शक फलक व चेतावणी चिन्हे लावणे अनिवार्य करावे, असेही त्यांनी सुचवले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश अपेक्षित

शहराच्या सौंदर्याचे जतन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधून कामे व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशी विनंती घाटे यांनी आपल्या पत्रात केली आहे.