Home Blog Page 705

शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड:10 फुटांवर 10 ते 15 मिनिटे अडकले

तिसऱ्या प्रयत्नात उड्डाण यशस्वी
चिपळूण-
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बीघाड झाल्याची घटना समोर आली आहे. शरद पवार हे चिपळूण दौऱ्याला गेले असता तेथून परत येत असताना ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा उड्डाण करण्याचा प्रयत्न करावा लागला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण झाले.

चिपळूण येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार परतीच्या प्रवासाला निघाले असता हेलिकॉप्टरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर दहा फुटांवर तब्बल दहा ते पंधरा मिनिटे अडकून पडले होते. उड्डाण घेण्यासाठी शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा प्रयत्न करावे लागले. अखेर तिसऱ्या प्रयत्नामध्ये या हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

शरद पवार हेलिकॉप्टर मध्ये बसल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ संपली होती. मात्र हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र काही वेळाने हेलिकॉप्टरने यशस्वी उड्डाण केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला. यापूर्वी सुनील तटकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाची बैठक


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी जागतिक आरोग्य संघटनेला केली विनंती

कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि  आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी भारत सज्ज, आत्तापर्यंतच्या देखरेख आणि तपासण्यांमध्ये असामान्य वाढ दिसून आली नाही

मुंबई –

गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS – Directorate General of Health Services) अध्यक्षतेखाली आज संयुक्त देखरेख गटाची (JMG) बैठक पार पडली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), आपत्ती व्यवस्थापन विभाग, एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम (Integrated Disease Surveillance Programme – IDSP), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग आणि  दिल्लीतील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधले तज्ञ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.

या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे उपस्थित प्रतिनिधींमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली, हे मुद्दे खालीलप्रमाणे :

  • ताप सर्दी सदृश्य विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नाही. या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असेच सूचित गेले आहे की या ऋतुमध्ये सामान्यतः आढळून येणार्‍या आरएसव्ही आणि एचएमपीव्ही या रोगजन्य विषाणूंच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.
  • सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक आरोग्य संघटनेला केली गेली आहे.
  • सद्यस्थितीत भारतासह जगभरात वर नमूद केलेल्या विषाणूंचा या आधीच प्रसार झालेला आहे.
  • सद्यस्थितीत भारतात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम या दोन्ही संस्थांच्या विस्तारलेल्या व्यवस्थांच्या माध्यमातून इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या बाबतीत एक मजबूत देखरेख प्रणाली या आधीपासूनच अस्तित्वात आहे. यासंदर्भात दोन्ही संस्थांनी उपलब्ध केलेल्या आकडेवारीवरून देशात  इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये असामान्य वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.
  • गेल्या काही आठवड्यांमध्ये ऋतुंप्रमाणे अपेक्षित असलेले बदल वगळता देशभरात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली  नसल्याची बाबही विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे.
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या देशभरात विस्तारलेल्या व्यवस्थेने देखील श्वसन विषयक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या एडेनोव्हायरस, आरएसव्ही, एचएमपीव्ही अशा विविध प्रकाराच्या विषाणुंच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्या सर्व नमुना चाचण्यांमध्ये देखील या रोगजन्य विषाणुंच्या प्रकरणांमध्ये असामान्य स्वरुपाची वाढ दिसून आली नाही. त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीत खबरदारीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशभरात एचएमपीव्हीची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाणार आहे, आणि या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधन परिषद येत्या वर्षभरात एचएमपीव्हीचा कल कसा राहतो, याची कठोर देखरेख करणार आहे.
  • देशभरात अलिकडेच पूर्वतयारीशी संबंधीत प्रात्यक्षिके झाली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर देशात श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.

देशाची आरोग्य यंत्रणा आणि देखरेखीशी संबंधित देशभरात विस्तारलेली व्यवस्था पूर्णतः सतर्क आहेत, आणि या माध्यमातून देश  अचानकपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि  आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असल्याची सुनिश्चिती केली  जात आहे.

भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन

मुंबई- आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल.

कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होईल. यामध्ये सेनेगलचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी यांच्याशी संवाद, तसेच अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची शस्त्रे, संवेदक (सेन्सर्स) आणि जहाजावरील साधनसामुग्रीचे प्रदर्शन यांचा समावेश असेल. या युद्धनौकेवर, दोन्ही नौदलातील संबंधित तज्ञांमध्ये परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या समस्या निवारणाच्या उपायांबाबत संवाद घडेल आणि प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही पार पाडेल. सेनेगलच्या हौशी नागरिकांसाठी योगाभ्यासाचे एक उत्साहवर्धक सत्र देखील, इथे नियोजित आहे.  भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी, इथे  सामाजिक संवादाचे आयोजन देखील होणार आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर, ही युद्धनौका संवाद आणि सहकार्य वाढवणाऱ्या संयुक्त सरावा (पॅसेज एक्सरसाइज -PASSEX) मध्ये भाग घेईल आणि पश्चिम आफ्रिकी  किनाऱ्यावळील समुद्रात सेनेगलच्या नौदलासह संयुक्त गस्त घालणारे संचलन करेल.  प्रादेशिक सुरक्षा वाढवून, आंतरपरिचालनाला चालना देत दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे.

भारताने सेनेगलसोबतच्या संबंधांना दिलेले महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रांमधील वाढणारे संरक्षण सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नाचे हे आणखी एक प्रखर द्योतक आहे. यामुळे दोन्ही नौदलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी देखील मिळेल.

हशा आणि टाळ्या हीच माझी बिदागी : शि. द. फडणीस

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान

पुणे : ‌‘मराठी‌’चे होणार काय असा प्रश्न विचारला जात असतानाच रोटरी आयोजित मराठी साहित्य संमेलनामुळे अनेक लेखक, प्रकाशक समाजासमोर येतील, पुस्तके वाचली जातील, मराठी भाषाही टिकेल असा विश्वास व्यक्त करून असे साहित्यविषयक उपक्रम सातत्याने होत रहावेत, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. व्यंगचित्र, हास्यचित्रे काढणे हा माझा छंद होता. या छंदामुळे रसिकांनी मला हशा आणि टाळ्यांची बिदागी दिली, असेही कृतज्ञतापूर्वक उद्गार फडणीस यांनी काढले.
व्यावसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 5) फडणीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना फडणीस बोलत होते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, प्रांतपाल शितल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे, रोटरी व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डीजीई संतोष मराठे मंचावर होते. उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि वेलदोड्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
व्यावसायिक गुणवत्ता परीक्षा मी 40 वर्षांपूर्वीच दिली आणि या व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डच्या निमित्ताने त्याचे प्रमाणपत्र मला आज मिळत आहे, अशा भावना व्यक्त करून फडणीस पुढे म्हणाले, व्यंगचित्र, हास्यचित्र काढणे हा माझा छंद होता. हा छंदच पुढे माझे करिअर बनला. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे माझ्याकडे हशा, टाळ्या आणि प्रेमाचीच गणती जास्त होती. परंतु याचा मला कधीही खेद वाटला नाही. शंभरीत पदार्पण केलेल्या शि. द. फडणीस यांनी उभे राहून केलेल्या भाषणाला रोटेरियन्सनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
अशोक नायगावकर म्हणाले, रोटेरियन्सचे काम साहित्य क्षेत्राकडे वळते आहे हे मराठी भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. शि. द. फडणीस यांच्या सारख्या महान कलाकाराच्या कार्यकर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी. त्यांचा माझ्या हस्ते झालेला सन्मान हा मी माझाच सन्मान समजतो.
विश्वास पाटील म्हणाले, शि. द. फडणीस हे व्यंगचित्र, हास्यचित्र या कलाप्रकारात ‌‘या सम हा‌’ अशा अत्युच्य पदावर आहेत. सत्तर वर्षांहून अधिक काळ मोहिनी मासिकामध्ये चित्रे रेखाटून मोहिनीला शिदंनी चिरतरूण ठेवले आहे.
रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने शि. द. फडणीस यांना सन्मानित केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आहे, असे मत शितल शहा यांनी व्यक्त केले. रोटरी साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याचा अभिमान आहे, असे सांगून संतोष मराठे म्हणाले, हा स्तुत्य उपक्रम सातत्याने सुरू रहावा.
पीएनजीचे प्रतिनिधी मिहिर केमकर यांचा सन्मान शितल शहा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पदन्यास कथक डान्स अकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकाऱ्यांनी शिववंदनेद्वारे केली. मानपत्राचे लिखाण सुप्रिया जोगदेव यांनी केले होते तर वाचन प्रज्ञा डांगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

व्हय मी सावित्रीबाई! नाटकाने प्रेक्षक भारावले 

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला जागर समिती (पुणे) आयोजित व्हय मी सावित्रीबाई! नाटक शनिवार, 4 जानेवारी रोजी संध्या 5.30 वा. महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे झाले. नाटकाचे लेखन अभिनेत्री सुषमा देशपांडे यांचे असून शिल्पा साने आणि शुभांगी भुजबळ यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. शुभांगी भुजबळ म्हणाल्या की महिला जागर समितीमुळे अगदी फुले वाड्यात हा प्रयोग करायला मिळणं हे आमचं आम्हाला भाग्य वाटतं. नाटकाच्या निमित्ताने फुले वाडा पाहता आल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्या. 

अमेय बिच्चू आणि केदार केळकर यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

सूर संगत संस्थेच्या वतीने आयोजित सांगीतिक मैफल

पुणे : सूर संगत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक मैफिलीने श्रोत्यांना शास्त्रीय संगीताचा एक अद्वितीय अनुभव दिला.  विविध रागांचे सादरीकरण आणि वाद्य संगीताच्या सुंदर साथीने रसिक मंत्रमुग्ध झाले.  बागेश्री अंगाचा चंद्रकंस आणि शहाणा कानडा या रागांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळा आयाम दिला.

सूर संगत संस्थेच्या वतीने धायरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेय बिच्चू,  केदार केळकर यांनी सादरीकरण केले. 

मैफिलीची सुरुवात अमेय बिच्चू यांच्या एकल संवादिनी वादनाने झाली. त्यांनी तिलक कामोद, श्याम कल्याण, आणि नंद या तीन रागांच्या मिश्रणातून साकारलेल्या रागाने रसिकांची मने जिंकली. अमेय बिच्चू हे तन्मय देवचके, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, आणि विदुषी पद्मा तळवलकर यांचे शिष्य आहेत. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केदार केळकर यांनी शास्त्रीय गायनाचे सादरीकरण केले. बागेश्री अंगाचा चंद्रकंस आणि शहाणा कानडा या रागांनी केदार यांनी मैफिलीला उंची दिली. पंडित सुहास व्यास यांचे शिष्य असलेल्या केदार यांना संवादिनीवर अमेय बिच्चू यांनी साथ केली.

या मैफिलीला तबल्याची साथ तन्मय बिच्चू यांनी केली.  मनोहर पिंपळस्कर, पंडित रामदास पळसुले, पंडित स्वपन चौधरी, आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य असलेल्या तन्मय यांनी वाद्य संगीताची आणि गायन साथ या दोन्हींचा सुंदर मेळ साधला. 

भावस्पर्शी कवितांमधून व्यक्त झाले रोटेरियन कवी

पुणे : ‌‘ती भेटते मला वेगवेगळ्या रुपात‌’, ‌‘असा एकटेपणा हवासा‌’, ‌‘आनंद लेणं‌’, ‌‘मनातला काळोख‌’, ‌‘निर्जिवास फुटते वाचा‌’, ‌‘खरंच का हो माणूस झाला स्वस्त‌’ अशा एकापेक्षा एक भावस्पर्शी आणि मनाला भिडणाऱ्या कवितांद्वारे रोटेरियन कवींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी देखील टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
निमित्त होते पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे. यात पंधरा कवींनी आपले साहित्य विश्व काव्याच्या माध्यमातून उलगडले. ज्येष्ठ वात्रटीकाकार, साहित्यिक रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विविध रचनांवर भाष्य करीत वातावरण रंजक केले. संमेलनाचे सूत्रसंचालन कवयत्री डॉ. अंजली कुलकर्णी यांनी तर निनाद जोग यांनी संयोजन केले.
नीता केळकर यांनी ‌‘ती भेटते मला‌’ या रचनेतून आई, बहीण, मावशी, पत्नी, अशी विविध स्त्री रूपे उलगडली. जयश्री कुबेर यांनी मनातील सकारात्मक दृष्टिकोन ‌‘जिद्द‌’ या रचनेतून मांडला. स्नेहल भट यांनी ‌‘असा एकटेपणा हवासा‌’ ही वेगळ्या विषयावरची रचना सादर करून मनाचे वास्तव शब्दबद्ध केले. डॉ अश्विनी गणपुले यांनी मनाच्या नकारात्मक भावनांचा वेध घेणारी ‌‘मनातला काळोख‌’ ही कविता, तर प्रदीप खेडकर यांनी ‌‘सत्यम शिवम सुंदरम्‌‍‌’, तसेच राहुल लाळे यांनी ‌‘मन वाटा‌’, मुरलीधर रेमणे यांनी ‌‘वारी‌’ या काव्यरचना सादर केल्या. अंदमान येथील सेल्यूलर जेलमधील ज्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आले होते त्या खोलीचे मनोगत मांडताना सुप्रिया जोगदेव यांनी ‌‘निर्जिवास फुटता वाचा‌’ ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.
याखेरीज अंकाजी पाटील यांनी ‌‘खरचं माणूस स्वस्त झाला आहे का‌’ ही वास्तववादी कविता तर भारद्वाज पक्ष्यावर तनुजा खेर तसेच हर्षदा बावनकर यांनी ‌‘आनंद लेणं‌’ ही कविता सादर केली. डॉ आनंद कंक यांनी ‌‘ईश उवाच‌’ तर ममता कोल्हटकर यांनी श्रीकृष्णावरील काव्यरचना सादर केल्या. विजय पुराणिक आणि शशिकांत शिंदे यांनीही कविता सादर केल्या. डॉ. अंजली कुलकर्णी यांनी ‌‘बदलत गेलेली सही‌’ ही काव्यरचना सादर करून रसिकांची मने जिंकली.
रोटरी आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाचे कौतुक करून फुटाणे म्हणाले, रोटरीच्या या अभिनव उपक्रमातून मराठी भाषेचा जागर होत आहे. अभिजात मराठी भाषा टिकविण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. कविसंमेलन हे रसिकांमुळे रंगत असते हे येथील रसिकांच्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. असे फुटाणे म्हणाले. यावेळी त्यांनी कविंनी सादर केलेल्या काव्यरचनांवर काव्यात्मक पद्धतीने भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.
योगेश सोमण लिखित ‌‘ट्रेनिंग‌’ हे प्रहसन अविनाश ओगळे, लीना गोगटे यांनी तर रोटेरियन संजय डोळे लिखित ‌‘मन:शांती‌’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर आणि सुनिता ओगले यांनी प्रभावीपणे सादर केले. पहिल्या दिवसाची सांगता भरत नाट्य मंदिर निर्मित संगीत कट्यार काळजात घुसली या नाट्यप्रयोगाने करण्यात आली. यात अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली.

“आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत देण्याबाबत उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे मोठे योगदान”; शेतकऱ्यांनी मानले आभार

पुणे दि. ४ : शेतसारा अथवा महसुली देणे देऊ शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी, ज्याला ‘आकारी पड’ जमिनी म्हणतात. त्या पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासंदर्भात दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी मा. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. त्यानंतर २०१९ पासून सातत्याने शेतकऱ्यांच्या या विषयांचा पाठपुरावा त्यांनी केला होता. त्यानंतर, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आकारी पड जमीनींसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून व निर्देश देऊन सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. यापार्श्वभूमीवर, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक २ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालयात पार पडली. यासाठी शुक्रवारी दि. ३ जानेवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शासकीय थकबाकी पोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाकडे सदर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार व्यक्त करताना मु.पो. कनेरसर, ता. खेड, जिल्हा-पुणे येथील रहिवाशी शेतकरी बाबासाहेब हजारे म्हणाले की, “आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत देण्याबाबत नीलम ताईंनी खूप मोठे योगदान दिले आहे. वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचा प्रलंबित असणारा प्रश्न आता ताईंच्या पाठपुराव्याने मार्गी लागला आहे.”

फर्गयुसन रस्त्यावरील धडक कारवाई हे सामान्य पुणेकरांचे यश, प्रशासनाचे अभिनंदन – संदीप खर्डेकर.

माझं पुणं खड्ड्यात जाऊ देणार नाही -संदीप खर्डेकर

पुणे:आज गोपाळकृष्ण गोखले रस्त्याने (फर्गयुसन रस्त्याने) मोकळा श्वास घेतला असून पुणे मनपा प्रशासनाने धडक मोहीम आखून आज पदपथ, पार्किंग स्पेस तसेच साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन अशी सर्वत्र कारवाई केली. ही कारवाई सामान्य पुणेकरांनी सातत्याने उभारलेल्या लढ्याला मिळालेले यश असून याबद्दल प्रशासनाचे ही खुल्या मनाने अभिनंदन. करतो असे संदीप खर्डेकर म्हणाले. गेल्या सोमवारी मी मा. आयुक्तांना याबाबत सप्रमाण पत्र लिहिले होते व आज त्यांनी कारवाई केली हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही खर्डेकर म्हणाले. मात्र ह्या मागणीनंतर कल्याणीनगर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल डी पी रस्ता, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता इ ठिकाणा वरून नागरिकांनी संपर्क केला असून अश्या सर्व ठिकाणी प्रशासनाने कोणाला ही न जुमानता कारवाई करावी अशी मागणी देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.तसेच हे सगळे अनधिकृत पुन्हा उभारले जाणार नाही याची दक्षता ही प्रशासनाने घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
प्रशासनाने पथ विभागाच्या माध्यमातून एक जाहिरात प्रसिद्ध केली असून प्रत्येक प्रभागात रस्ते, पदपथ, चेंबर यांच्या तक्रारीसाठी एका उप अभियंता चा मोबाईल क्रमांक दिला आहे. याचे प्रभागश: फलक लावून जनजागृती करावी व आलेल्या तक्रारीचे त्वरित निराकरण करावे अशी विनंती देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
माझं पुणे मी खड्ड्यात जाऊ देणार नाही, भाजपा चे सर्व मंत्री,खासदार, आमदार यांच्या माध्यमातून पुणे शहर हे पुन्हा देशातील सर्वोत्तम राहण्याजोगं शहर करण्यासाठी आपण सर्वस्व देऊ असेही खर्डेकर म्हणाले.
जोपर्यंत मनपा निवडणुका होतं नाहीत व सभागृह अस्तित्वात येत नाही तोवर प्रशासनावर दबाव आणून शहराच्या समस्या सोडविण्यासाठी 1990 व 2000 च्या दशकाप्रमाणे स्वयंसेवी संस्था आणि समविचारी राजकारण्यांना एकत्र घेऊन लढा उभारणार असल्याचेही ते म्हणाले .

टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वन विभागाला निर्देश

पुणे

कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.  कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करुन, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत. तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे.

मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.

नामदार पाटील म्हणाले की, टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूड मधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचं नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन; कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले.

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून नामदार चंद्रकांतदादा पाटील सोमवारी सकाळी ७ वा. म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. तसेच, वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधणार आहेत.

अनुभवातून रुजली कथाबिजे : विश्वास पाटील

पहिल्या रोटरी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांचा उलगडला साहित्य प्रवास
पुणे : कोल्हापूरमधील छोट्याशा खेड्यात माझे बालपण गेले. भाषा शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. वडिलांच्या सल्ल्यामुळे लेखानाच्या क्षेत्रात प्रगती केली. शासकीय नोकरीत व्यस्त दिनचर्या असूनही लिखाणाची आवड असल्याने नेटाने लेखन केले. अनेक अनुभवातून मनात कथाबिजे रुजली गेली. त्या कथांमधून कैवल्याचा आनंद मिळाला, अशा भावना पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लबतर्फे आयोजित पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी रोटेरियन वैशाली वेर्णेकर आणि रोटेरियन अभय जबडे यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर मधील छोट्याशा खेड्यात आपले बालपण गेले असल्याचे सांगून विश्वास पाटील म्हणाले, लेखनाला पूरक असे वातावरण गावात नव्हते; परंतु गावात निसर्गसौंदर्य मोठ्याप्रमाणात होते. गावाच्या एका बाजूला विशाळगड तर दुसऱ्या बाजूला पन्हाळगड होता. गुरे राखायला जाताना त्यांचे निरिक्षण करत असे. इतिहासाची आवड असल्याने गावातील लवलवत्या गवताच्या पात्यात मला शिवाजी महाराजांचे शूर सैनिक दिसत असत. शालेय वयातच वीर धवल कादंबरी वाचनात आली. यातून वाचनाची आवड निर्माण झाली. नववीत असताना एका वर्षात अडीचशेहून अधिक पुस्तके वाचली. शाळेतील मराठीचे शिक्षक उत्तम शिकवित असत; त्यामुळे अभ्यासाची गोडी वाढली. आई निरक्षर तर वडिल फक्त पाचवीपर्यंत शिकलेले होते; परंतु त्यांचा बाणा लढवय्या होता. त्यांच्या प्रेरणेनेच लघुकथा लिखाण सोडून कादंबरी लेखनाकडे वळलो.
खूप लहान वयातच भावलेल्या विषयांवर लिखाण सुरू केले. पुढे स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्याने सरकारी अधिकारी झालो. अतिशय व्यस्त दिनचर्या असतानाही घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ लेखनात घालवत असे. शनिवारी-रविवारच्या सुट्टीत जणू भूमिगत होऊन लिखाण करत असे. लिखाण करताना मी सरकारी अधिकारी असल्याचे दडपण न घेता विविध विषयांवर मोकळेपणाने लिखाण केले. त्यावेळी हात आखडता घेतला नाही. नाहीतर शब्द माझ्यावर प्रसन्नच झाले नसते, अशा भावनाही पाटील यांनी या वेळेला व्यक्त केल्या.
ऐतिहासिक लिखाण करण्यासाठी भरपूर वाचन केले, अभ्यास केला, घटनास्थळांना भेटी दिल्या. त्यामुळे मी केलेल्या ऐतिहासिक लिखाणात वास्तवता आली. तर काही प्रसंगांना प्रतिभेतून कल्पनेची जोड दिली.
सामाजिक लेखन करताना प्रत्यक्ष अनुभवांचा मोठा आधार लाभला. अधिकारी म्हणून कार्यरत असताना जनसंपर्क अफाट असल्याने अनेक अनुभव आले. त्यातूनच सामाजिक स्वरूपाचे लेखन झाले.
सरकारी नोकरीत असताना लेखक म्हणून सहकाऱ्यांनी कौतुक केले; परंतु अनेकदा मत्सरालाही सामोरे जावे लागले. परंतु वयाच्या अवघ्या 32व्या वष साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने त्यांची तोंडे बंद झाली. अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वाङ्मय चौर्य, जीवनातून उठविण्याचा प्रयत्नही झाला; परंतु त्यातूनही सहीसलामत बाहेर पडलो.
आजच्या वाचन संस्कृतीवर भाष्य करताना विश्वास पाटील म्हणाले, मराठी साहित्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्यातून मराठी भाषा तावून-सुलाखून बाहेर पडली आहे. आजचा जमाना रिल्सचा असला तरी सुजाण वाचक आत्म्याचा आवाज ऐकून पुन्हा एकदा साहित्य-संस्कृतीकडे वळतील असा आशावादही त्यांनी दर्शविला.

‘मराठीत बोलणार नाही’ म्हणत अरेरावी करणाऱ्मया एअरटेल टीम लीडरला मनसेने चोपले

पुणे- मराठीत बोलणार नाही म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अरेरावी करणाऱ्या एअरटेल कंपनीच्या एका टीम लीडरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने चोप दिला आहे. या घटनेमुळे मुंब्रा येथे घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.मुंब्रा येथे एका मराठी तरुणावर मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असताना पुण्यात एअरटेलच्या कार्यालयात असाच एक प्रकार घडला आहे. या प्रकरणात कंपनीच्या एका टीम लीडरने मराठी बोलणार नाही असे म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केला होता. वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. ही खबर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी तत्काळ एअरटेलच्या कार्यालयात जाऊन सदर टीम लीडरला जाब विचारला. तसेच त्याला आपल्या पद्धतीने चोपही दिला.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, सदर टीम लीडर मराठी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. फ्लोअरवर हिंदीचे बोलायचे, मराठी बोलल्यास कामावरून कमी करणे, सनावारांना सुट्टी नाकारण, 2-2 महिने पराग न देणे असे प्रकार हा व्यक्ती करत होता. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. त्याची माहिती मिळताच शाहबाज अहमद नामक सदर व्यक्तीने पुन्हा त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली.

त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी एअरटेलच्या वाकडेवाडी परिसरातील कार्यालयात आपला मोर्चा वळवला. त्यांनी शाहबाज अहमदकडे या प्रकरणी जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच येत्या सोमवारपर्यंत मराठी कर्मचाऱ्यांचे पगार जाले नाही, तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील कंपनीचे कार्यालय फोडले जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी संबंधितांना दिला.

मुंब्रा प्रकरणात विशाल गवळी नामक एका मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे आणण्यासाठी गेला होता. त्याने फळविक्रेत्याकडे मराठीत फळांचा भाव विचारला. त्यावर फळविक्रेत्याने संतापून मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल असे त्याला सांगितले. त्यावर विशाल गवळीने महाराष्ट्रात राहून तुला मराठी येत नाही का? प्रतिप्रश्न केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान भांडणात होत असताना तिथे मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने त्याला कान पकडत हिंदीत माफी मागण्यास भाग पाडले.

सैफी बिझनेस एक्स्पोचे पुण्यात शानदार उद्घाटन संपन्न

फत्तेचंद रांका, उमेश शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्स्पोचा शुभारंभ

पुणे :-  दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे पुण्यातील डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर शनिवार ४ जानेवारीला  शानदार उद्घाटन संपन्न झाले। दाऊदी बोहरा समाजाचे परमपुज्य सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहब यांचे चिरंजीव  हुसैन बुऱ्हानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या उद्घाटन समारोहाला किर्लोस्कर न्यूमेटिक्सचे चेअरमन राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डाॅ. नितिन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे  अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने दाऊदी बोहरा समाजाचे उद्योगपती-व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना एक-दुसऱ्यांसोबत कनेक्ट करण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उद्घाटन सत्रापूर्वी पुण्याच्या दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने फत्तेचंद रांका आणि उमेश शाह यांना सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी एक्स्पोची पाहणी केली आणि विविध स्टाॅल्सना भेटी देऊन त्यांच्या व्यवसायांची माहिती घेतली.

सोमवार ६ पर्यंत चालणाऱ्या या बिझनेस एक्स्पोमध्ये पुणे आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील तसेच विदेशातून आलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांचे स्टाॅल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये एमएसएमईज, स्टार्टअप्स, वुमेन आंत्रप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स यांचे १७० स्टाॅल्स आहेत।

पहिल्याच दिवशी बोहरा समाजाच्या नागरिकांसह सर्वसामान्य पुणेकरांनी भेट देणे सुरू केले. येथे आल्यानंतर नागरिकांनी विविध स्टाॅल्सवर जाऊन विविध वस्तूंची माहिती घेतली यामध्ये फर्निचर, हार्डवेअर, गृह सजावटीच्या वस्तूंची खरेदीदेखील केली. एक्स्पोसंदर्भात दाऊदी बोहरा समाजाच्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

हरित आणि प्रदूषणमुक्त पुणे करण्याच्या उद्देशाने एक्स्पोच्या आयोजकांकडून या एक्स्पोला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वृक्ष भेट देण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

बिझनेस एक्स्पो संदर्भात बोलताना फत्तेचंद रांका म्हणाले की, दाऊदी बोहरा समाज हा नेहमीच उद्योग-व्यापारात अग्रगण्य राहिला आहे. या बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून या समाजाची उद्यमशीलता आणखीनच चांगल्याप्रकारे समोर आली आहे. हा एक्स्पो विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणारा आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध मॅन्यूफॅक्चरर्सचे आणि वस्तूंचे स्टाॅल्स लागलेले आहेत. याचा फायदा रिटेलर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने या एक्स्पोला पूर्ण सहकार्य देण्यात आलेले आहे.

उमेश शहा म्हणाले की, सैफी बुरहानी एक्स्पो हा दाऊदी बोहरा समाजाचा एक अनोखा व्यावसायिक उपक्रम आहे. दाऊदी बोहरा समाजाने या माध्यमातून आपल्या व्यावसायिक कार्याला एका उंचीवर नेण्याचे कार्य केले आहे. या एक्स्पोमधून पुण्याच्या व्यापार-उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी या एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

शेतकऱ्यांच्या धरतीवर कर्जबाजारी रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा

आत्महत्याग्रस्त रिक्षा चालकाच्या कुटुंबास वीस लाखाची आर्थिक मदत देण्याची मागणी

पिंपरी-

सावकाराच्‍या त्रासाला कंटाळून साईबाबा नगर चिंचवड स्टेशन येथील रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना घडली. त्‍या बाबत संबंधीत सावकारावर कठोर कारवाई हवी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. त्‍याबरोबरच शासकीय पातळीवरच रिक्षा चालकांना आधार मिळावा, यासाठी धोरण हवे, असे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले.

पिंपरीत नुकतेच रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना माध्यमांद्वारे समोर आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्‍यक्‍त केला. प्रसिद्धीपत्रकात कांबळे यांनी नमूद केले की, रिक्षा चालकांच्‍या अन्‍यायाला अनेक जण कारणीभूत आहेत. ओला उबेर सारख्या कंपन्‍या एकूण भाड्याच्या ४० टक्‍के कमिशन घेते. त्‍यामुळे दिवसभर रिक्षा चालवूनही रिक्षा चालकांच्‍या हाती तुटपुंजी रक्‍कम येते. त्‍यामुळे अशा भांडवलदार कंपन्यांवर कंपन्‍यांवर कारवाई करा. शासनाने मुक्त रिक्षा परवाना धोरण सुरू केले आहे. त्‍यामुळे शहरात पुर्वी पाच हजार रिक्षांची असणारी संख्या सध्या ४० हजारांवर पोचली आहे. त्‍यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि नफाही होत नाही. त्‍यामुळे मुक्‍त रिक्षा परवाना हे धोरण बंद करा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. इलेक्ट्रिक रिक्षाला देखील परमिटच्या कक्षेत आणा. इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नसल्यामुळे नव्याने इलेक्ट्रिक रिक्षांची देखील संख्या वाढत आहे. त्‍यांना आळा घालण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली.

यावर आळा न घातल्‍याने रिक्षा चालक-मालकांच्‍या हाती काहीच नफा उरत नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते सावकाराचे अथवा खासगी बँकांकडून जादा व्‍याज दराने कर्ज घेतात. त्‍याची परतफेड करणे शक्‍य न झाल्‍याने रिक्षा चालकांवर आत्‍महत्‍या करण्याची वेळ येत आहे. हे होऊ नये, यासाठी शासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.

रिक्षा चालकांचे कर्ज सरसकट माफ करा –
रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा, अशी भूमिका बाबा कांबळे यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले. त्याच धर्तीवर कर्ज बाजारीपणाला कंटाळून रिक्षा चालक आत्महत्या करत आहेत. त्यांच्‍याही डोक्‍यावरचे सरसकट कर्ज माफ करा. रिक्षा चालकांच्या कुटुंबाला वीस लाख रुपये आर्थिक मदत द्या, असे आवाहन कांबळे यांनी शासनाला केले.


रिक्षा चालकांच्‍या आत्‍महत्‍या होऊ नयेत, यासाठी शासनाने पाऊले उचलावीत. सरकारी बँकांमध्ये कमी व्‍याजदारात कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच मुक्‍त रिक्षा परवाना बंद करावा. इलेक्‍ट्रिक रिक्षांना परमिट सक्‍तीचे करावे. ओला उबेर कंपन्‍यांवर कारवाईचा बडगा उगारावा. यासह रिक्षा चालकांच्‍या मृत्‍युला कारणीभूत असलेल्‍या सर्वांवर कडक कारवाई करावी.

  • बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंयाचत.

विचार भिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही आपली समस्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव

पुणे : देशात विचार भिन्नता ही समस्या नाहीये. तर विचार शून्यता ही समस्या आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणुस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात, जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला तरी सर्वस्व नाही. त्याच प्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मराठा सेवा संघ व युगनायक मा. पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोगरे (अध्यक्ष मराठा सेवा संघ,महाराष्ट्र,अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव समिती) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर,माधवराव पाटील शेळगावकर, ज्येष्ठ कवि इंद्रजित भालेराव, कर्नाटक मधील आमदार डॉ. मारोतराव मुळे, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड (निवृत्त सचिव जलसंपदा विभाग), हेमंतकुमार देशमुख (मुख्य अभियंता), विठ्ठलराव गायकवाड, गिरीश जोशी (मुख्य अभियंता, अमरावती), आमादार शंकर जगताप, राजेंद्र पवार, रवींद्र माळवदकर, माजी आमदार विलास लांडे,राजेंद्र डूबल आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मदन पाटील लिखित ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. ज्यामुळे जातपात, भाषा, राज्य आणि पंथाच्या पलीकडे जावून तुम्हाला ओळख मिळते. ही गुणवत्ता ज्ञानातून मिळते. आज जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर ज्ञान महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मी माझ्या आई – वडिलानंतर शिवाजी महाराजांना मानतो. कारण प्रत्येक पायंड्यांवर त्यांच्या सारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. कारण सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार करताना दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडली नाहीत, कोणत्याही महिलांवर अन्याय, अत्याचार केले नाहीत असेही गडकरी यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले व नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिल्या याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे यांनी केले. ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे विवेचन इंद्रजीत भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना – अनुश्री पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने झाली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ खेडेकर,संतोष शिंदे,उत्तम कामठे,अविनाश मोहिते,चंद्रशेखर घाडगे,मनोज गायकवाड,अविनाश घोडके,प्रशांत धुमाळ यांनी केले.