Home Blog Page 662

शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव

नवी दिल्ली- अखेरीस शरद पवार यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदेशाही पगडी घालून स्वहस्ते महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मंगळवारी प्रदान करत सन्मान केला आहे.

या संदर्भात पवार यांनी असे म्हटले आहे कि,’राजधानी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात आज सर्व मान्यवर मंडळींसह उपस्थिती लावली. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे), केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, राम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सहकाऱ्यांसह सर्वांशी संवादही साधला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की, यंदाच्या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय. अनेक वर्षांनंतर हा योग आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. इतका काळ लोटल्यानंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते. त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, साहित्य परिषदेने पुढाकार घेतला व कष्ट केले त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन केले. या अधिवेशनाला इतिहास आहे. मला आठवतंय की, देशाचे जाट समाजाचे एक प्रधानमंत्री होते. चंद्रशेखर यांच्यानंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीकाटिप्पणी करायचे. ते नेहमी सांगायचे तुम्ही लोकांनी आणखी इतिहास घडवायला पाऊलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं तुमची तक्रार काय आहे? त्यांनी सांगितलं सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले. त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकटोरामध्ये गेले व तिथे राहिले. सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचं आहे, आता इथे थांबायची आवश्यकता नाही. त्यावेळी सुरजमल जाट हा दिल्लीचा राज्यकर्ता होता. त्यांनी सांगितलं की, मराठ्यांनी आयुष्यात केलेली ही चूक आहे. गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असतं. पण दिल्ली हातात असताना ती दिल्ली सोडून भलतीकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता. असं सुरजमल जाटने सांगितलं, मी काही इतिहास तज्ज्ञ नाही.आज या ठिकाणी एकनाथरावांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळे सातारकर आहोत. माझी गंमतीची गोष्ट आहे, दोन ठिकाणी मला अडचणी होतात. एक ठाणे महानगर पालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते, अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू होती. माझा आणि त्या संस्थेचा कधी संबंध आला नाही. एकदा वेगळ्या अशा प्रकारचं व्यासपीठ होतं, अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय, हेगडे यांचं नेतृत्व होतं व प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू त्याठिकाणी होते. मराठीतले एक महत्वाचे कवी जे सातारकर होते त्यांचं नाव पी. सावळाराम. त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला- मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्डवर एक गाणं यायचं ‘जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा’ वगैरे.. त्याचे कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष आणि सातारकर होते. मला याची आठवण झाली त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ग. दि. माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी नाईक साहेबांना सांगितलं की, आमच्या सावळाराम पाटलाला अध्यक्ष करा. पक्षाचा सचिव म्हणून मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, दोन- तीन दिवस बसायचं आणि काहीही झालं तरी सावळाराम पाटील अध्यक्ष होतील हे बघायचं. आता मी काँग्रेसवालाच होतो, काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्याठिकाणी अध्यक्ष केलं. मी नाईक साहेबांना फोन केला की तुमचं काम झालंय. ते म्हटले त्यांना घेऊन या. कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवाने माडगूळकर आज माझ्या घरी आहेत. मी सावळाराम पाटलांना बरोबर घेतलं आणि नाईक साहेबांच्या घरी ‘वर्षा’वर गेलो. माडगूळकर यांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. ‘गड्या, मोठं काम केलं तु’.. ‘येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला’..! सावळाराम पाटील यांच्या गावाचे नाव येडं मच्छिंद्र. त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं, म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगर पालिकेमध्ये हे सावळाराम होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही.मला आनंद आहे की, त्यांचा सत्कार याठिकाणी आहे. सांगताना त्यांनी सांगितलं की, सातारचं आहे. एकनाथराव, साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहित नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कूपर. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक जे आता नाहीत ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण झाले व त्यानंतर एकनाथराव झाले. मला त्यांना आठवण करून द्यायचीये, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं. त्या गावाचे नाव नांदवळ आणि त्या गावच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे शरद पवार! त्यामुळे मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली.ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे.सरहदने हा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की, ज्या अगत्याने आज आपण याठिकाणी उपस्थित राहिलो त्याचं महत्वाचं कारण मी गेले काही दिवस दिल्लीमध्ये बघतोय, इथलं वातावरण बदललंय. दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असत. अलीकडे जो येतो तो प्रत्येकजण साहित्य संमेलनासंबंधी काही ना काहीतरी सांगायला येतोय. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाट बघतायत की २१, २२, २३ कधी येते? प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतंय? अन्य कार्यक्रम कधी होतील? गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो व अन्य संस्था असो त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम याठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरु केलं. माझी खात्री आहे की, हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल व लोकांच्या लक्षात राहिल. दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद सबंध देशातील मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करून माझ्या संवादाला पूर्णविराम दिला.

पवारांनी शिंदेंचा सन्मान केल्याने संजय राऊत संतप्त;​​​​​​​गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का:साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राऊत यांनी यावेळी थेट शरद पवारांवर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल.

ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटले नाही.

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अमित शहांच्या सहकार्याने फोडली व महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे व अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचे कुटुंब फोडले म्हणून याचे भान राखून आम्ही आमचे पाऊले टाकत असतो.

ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे मोठे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कौतुक शरद पवारांनी केले आहे. पत्रकारांनी ही बाब संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, हे खोटे आहे. शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे काम मागील 30 वर्षांत ठाकरेंच्या शिवसेनेने केले आहे. त्यांना माहिती नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. आज ठाण्यात जे काही दिसत आहे ते सर्वकाही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतीश प्रधान यांना विकासाची एक दृष्टी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. शरद पवारांना हे माहिती हवी असेल तर आम्ही आमचे ठाण्यातील प्रमुख कार्यकर्ते राजन विचारे त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी पाठवू. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले. विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागण्यास सुरुवात झाली.

मुंबईतील व्यावसायिक तथा शस्त्रास्त्र डीलर अभिषेक वर्मा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावरूनही शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी काल शिंदेंचा सत्कार केला. त्यामुळे त्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. तो ही महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनीही त्याचे उत्तर दिले पाहिजे. त्यांना देशद्रोहाचा आरोप असणारे चालत आहेत. काल पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. आणि हे जे काही तुम्ही नावे घेत आहात, दलाल, भ्रष्टाचाऱ्यांचे, देशद्रोही आदींचे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. त्यांच्या मुखियाचा सत्कार शरद पवार करत आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी काल दलालांना धडा शिकवण्याचे विधान केले होते. पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल त्यांच्या पक्षात गेलेत. त्यामुळे त्यांनी याविषयी बोलू नये.

संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलनावरही टीका केली. ते म्हणाले, हा मुद्दा नाराजी व्यक्त करण्याचा नाही. या आमच्या पक्षाच्या भावना आहेत. दिल्ली सुरू असणारे साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. तिथे दलालीच सुरू आहे. कुणालाही कसेही पुरस्कार देत आहेत, कुणाचाही कसाही सत्कार करत आहेत. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आला आहात का? तुम्ही साहित्याची कोणती सेवा करत आहात? कोण करत आहे हे साहित्य संमेलन आयोजित? हा भाजपचा एक उपद्व्याप आहे. काय चालू आहे मराठीची सेवा? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा इथे सत्कार केला जात आहे? कोण करत आहे हे सगळे? यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून, दिल्लीतील दलाली आहे. आम्ही या संमेलनाला जाणार नाही, असेही संजय राऊत यावेळी संतप्त सूरात म्हणाले.

ठाकरेंनी अजित पवारांचा सन्मान केला, पण आम्ही बोललो नाही – अमोल कोल्हे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतोय, याचा आनंद आहे. मात्र त्याला गालबोट लावण्यापेक्षा काही सूचना असतील तर सुचवाव्यात, अशा शब्दात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही, अशी आठवणही त्यांनी या प्रकरणी ठाकरे गटाला करवून दिली आहे. महादजी शिंदे यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. मात्र पुरस्काराचे निकष काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मला त्या निकषांची कल्पना नाही. त्यामुळे त्यावर टीका करणे योग्य ठरणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पवारांवर टीका करण्याएवढे संजय राऊत मोठे झाले का? -शंभूराज देसाई

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांवर टीका करण्याएवढे राऊत मोठे झालेत का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्याएवढे मोठे संजय राऊत झाले का? हेच राऊत आतापर्यंत म्हणायचे की शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला भेटला हे राज्याचे भाग्य आहे. पण काल पवारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि राऊत पवारांनाच त्यांनी काय करावे व काय करू नये हे सांगायला लागलेत.

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ त्याचमुळे एकनाथ शिंदेंना पुरस्कार:सरहद संस्थेच्या प्रमुखांनी थेटच सांगितले सत्कारामागचे कारण

पुणे/ नवी दिल्ली- महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती अभिमानाने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळी गात असतो. त्याच ओळी सार्थ करण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि पंजाब मध्ये उभारलेल्या महाराष्ट्र भवनसाठी पुढाकार घेतला. याव्यतिरिक्त देशाच्या पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा तयार केली. त्यामुळे महादेव शिंदे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची निवड केली असल्याचे सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सत्कारामुळे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर न देता त्यांनी संस्थेची भूमिका आणि सत्कार करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

या संदर्भात माध्यमांशी बोलताना संजय नहार म्हणाले की, साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. साहित्य महामंडळ ज्यांना संमेलन घेण्यासाठी देते, ती प्रत्येक वेळी एक वेगळी संस्था असते. यंदाचे संमेलन हे सरहद संस्थेने घेतले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलन पूर्व सत्कार करणे ही परंपरा आहे. यामध्ये महादजी शिंदे यांचे नाव घेणे, या मागचे कारण देखील त्यांनी सांगितले. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये म्हणत असतो. हे दिल्लीचेही तख्त राखतो, ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली तेच महादजी शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने आम्ही पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

वास्तविक हा पुरस्कार लष्करी सेवेतील व्यक्तीला द्यायचा, असा निर्णय झाला होता. मात्र, महादजी शिंदे यांच्या विषयी आम्ही अभ्यास केला, त्या वेळी ते कवी मनाचे असल्याचे लक्ष्यात आले. ते ओव्या आणि अभंग लिहित होते. महाराष्ट्राची एक प्रतिमा त्यांनी दिल्लीत येऊन तयार केली. देशभर महाराष्ट्राची प्रतिमा तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदन हे काश्मीरमध्ये आणि पंजाब मध्ये बांधण्यासाठी काम केले. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा दिल्लीत आणि देशपातळीवर तयार करण्याचे काम केले आहे. त्यानुसार आम्हाला एकनाथ शिंदे यांना पुरस्कार द्यावा असे वाटले असल्याचे नहार यांनी स्पष्ट केले.

वास्तविक महाराष्ट्रात कितीही काही झाले तरी दिल्लीमध्ये आपण एक असतो. दिवसभर भांडलो तरी दिल्लीतील व्यासपीठ मोठे आहे. या व्यासपीठ एवढे मोठे दुसरे व्यासपीठ नाही. आम्ही महाराष्ट्रातील सर्व एक आहोत, हे दिल्लीत दाखवत असतो. त्यामुळेच आम्ही कालचा कार्यक्रम दिल्लीत घेतला असल्याचे संजय नहार यांनी म्हटले आहे.

महादेव शिंदे हे पानिपतच्या काळात होते. मात्र एखाद्या माणसाचे कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढीतील एखाद्या माणसाने काय केले? यावरून काही ठरत नाही. राजस्थान, मध्य प्रदेश पासून दिल्ली पर्यंत महादजी शिंदे यांचा तळ होता. त्यामुळे त्यांचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या. आताची लढाई राज्य मिळवणे म्हणजे तलवारीने नाही तर प्रेमाने जिंकावी अशी आहे. त्यासाठीच दिल्लीत पुन्हा एकदा संमेलन होत असल्याचे संजय नहार यांनी सांगितले

मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास नीट वाचला तर यापेक्षाही गंभीर टीका साहित्य संमेलनावर झाली आहे. गोविंद तळवळकर यांनी भिक्षुकांचे संमेलन म्हटले होते. ती दुर्गाबाईंनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील त्यांना संमेलना येऊ दिले नव्हते. वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत. 1878 साली महादेव गोविंद रानडे यांचीही अशीच कल्पना होती. आजही महाराष्ट्रात सर्वात गाजलेली वाद विवाद स्पर्धा ही महादेव रानडे यांच्या काळात झालेलीच आहे. त्यामुळे वाद विवादाने काही फरक पडत नाही. अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे असल्याचे सिद्ध होते, असे देखील नहार यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे आमचे चांगले मित्र आहेत. नुसतेच मित्र नाही तर त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना मी दिली आहे. त्यात ‘भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक’ असा उल्लेख मी केला आहे. बंडखोरी ही दिल्लीला आणि महाराष्ट्राला नेहमी आवडते. व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात टोकाचा आदर आहे. त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे देखील नहार यांनी म्हटले आहे.

राजन साळवींचा आज शिवसेना प्रवेश:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार सोहळा

मुंबई-शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब झाले होते. तसेच राजन साळवी हे आज दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राजन साळवी हे शिवसेनेचे विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवी यांचे मन दुखावले होते. यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

राजन साळवी यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही. हे रिजल्ट देणारे सरकार आहे फील्डमध्ये उतरून 24X7 काम करणारे सरकार आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे गटात गेले होते. यावेळी मोजके आमदारच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनिष्ठेने उभे होते, यात राजन साळवी यांचा समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले होते. तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती.

राजन साळवी मातोश्रीचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांनी ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झालेला विनायक राऊत यांच्याशी वाद. तसेच या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची बाजू उचलून धरली. या कारणामुळे राजन साळवी यांचे मन प्रचंड दुखावले होते. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांना मदत केली नाही आणि अखेर त्यांचा पराभव झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांनाच सुनावले होते. दुखावलेल्या मनाने अखेर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता शिंदे गटाची कोकणात आणखी ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

विमान परत बोलाविण्यासाठी अपहरण झाल्याची खोटी तक्रारीचा केला बहाणा

शिंदेसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याच्या अपूर्ण बँकॉक हवाई टूरची राज्यभर चर्चा आहे. खरे तर कुटुंबीयांना न सांगता, दोन मित्रांसह तो चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाला होता. ही बाब खटकल्याने सावंत यांनी राजकीय प्रभावाचा उपयोग करून त्याला अर्ध्या वाटेतून परत आणले. त्यासाठी मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली. या आधारे पोलिस यंत्रणा आमदार पुत्राला परत आणण्यासाठी राबली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही पदाचा वापर करत फोनाफोनी केल्याने ऋषिराजला घेऊन जाणारे विमान अंदमानपासूनच परतले.

एकदा विमान उड्डाण झाल्यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करणे सोपे नसते. त्यासाठी काही तरी ठोस, सबळ कारण असावे लागते. त्यामुळे तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार दिली. पोलिसांनीही त्यांच्या या तक्रारीवर तातडीने हालचाली करून विमानतळ प्राधिकरणापर्यंत हा मेसेज पोहोचवला. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही पुण्याचेच असल्याने सावंत यांनी त्यांची मदत घेतली. अपहरणाच्या तक्रारीचे कारण पुढे करून मोहोळ यांनीही आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने विमानाला परत बोलावले. जर फक्त बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असती तर नियमानुसार इतक्या लवकर हालचाली करून विमान अर्ध्या प्रवासात परत बोलावता आले नसते. त्यामुळे सावंतांनी खोट्या तक्रारीचा बहाणा केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विमानतळावर उतरल्यानंतर गुन्हे शाखेने ऋषिराज सावंत व त्याच्यासोबतचे दोन मित्र प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वासेकर यांचे जबाब नोंदवून घेतले. यात व्यावसायिक कामानिमित्त बँकॉकला तातडीने जात असल्याची माहिती ऋषिराज यांनी पोलिसांना दिली. मात्र, यामागे दुसरेच कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशीदेखील चर्चा आहे. पण सावंत कुटुंबीयांनी त्याचे खंडन केले. ऋषिराजने ९ फेब्रुवारी रोजी पैसे भरल्यानंतर कंपनीने डीजीसीएशी संपर्क साधून एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्याकडून हवाई वाहतुकीची परवानगी घेतली. एअर ट्राफिक कंट्रोलने दिलेल्या वेळेत व उंचीवर खासगी विमान बँकॉकच्या दिशेने सोमवारी दुपारी ४.३० वाजता रवाना झाले. मात्र, त्यानंतर तानाजी सावंत यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली व विमान परत बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पोलिसांनी विमानतळाशी संपर्क साधून पायलटशी तातडीने संपर्क करत हवेतूनच विमान पुन्हा पुण्याकडे वळण्याचे आदेश दिले. इमर्जन्सी परवानगीदेखील दिली.

ऋषिराज व त्याचे २ मित्र परतल्यानंतर पुणे विमानतळावर त्यांचे अर्धा तास जबाब नोंदवून घेतला. ऋषिराजने सांगितले, एक आठवड्यापूर्वीच तो चार्टर्ड विमानाने दुबईला गेला होता. त्यानंतर पुन्हा बँकॉकला जात असल्याचे कुटुंबीयांना समजल्यावर ते आपल्याला परवानगी देणार नाहीत, ओरडतील. त्यामुळे कुणालाही माहिती न देता परस्पर चार्टर्ड विमानाचे बुकिंग करून मित्रांसोबत गेल्याचे सांगितले. वडिलांचा लाडका मुलगा अचानक कुठेतरी निघून गेल्याने कुटुंबीयांचा गोंधळ उडाला व त्यांनी शोधाशोध सुरू केली. कारचालकाकडून त्यांना समजले की, मुलगा पुणे विमानतळावर गेला. त्यामुळे बँकॉकला जाणाऱ्या वेगवेगळ्या विमानांची माहिती घेतली. तेव्हा तो चार्टर्ड विमानाने गेल्याचे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी आता संबंधित एव्हिएशन कंपनी यांच्याकडून या प्रवासाबाबत व इतर अधिकृत माहिती मागितली आहे.

ऋषिराज यांचा मोठा भाऊ गिरिराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ऋषिराजचा मोबाइल न लागल्याने सगळा गोंधळ उडाला. आम्ही पोलिसात तक्रार दिली व पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले. घरात कुठलाही वाद झालेला नाही. आमच्या कुटुंबाच्या विषयात कुणीही राजकारण करू नये. पोलिसांकडून या घटनेचा पूर्ण तपास सुरू आहे.

तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा:ठाकरे गटाची सिंहगड पोलिसांत तक्रार, मुलासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप

पुणे-शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दिली असून तानाजी सावंत यांच्यावर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून गायब झाल्यानंतर तयार झालेल्या अपहरण नाट्यावर पडदा पडला होता. तो बँकॉकसाठी चार्टर विमानाने निघाला असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तानाजी सावंत यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली. पोलिसांनी तपासची चक्रे फिरवल्यानंतर हे विमान 8 तासांत पुणे विमानतळावर परतले. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी जवळपास 68 लाख रुपये खर्च केल्याचे समजते. यावरुन विरोधकांकडून तानाजी सावंतांसह सरकारवर टीकेची झोड उठली होती. आता ठाकरे गटाच्या वतीने तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करण्यातची मागणी करत सिंहगड पोलिसांना निवेदन दिले आहे.

तानाजी सावंत यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे. त्यांनी प्रशासनाचा जो वेळ वाया घातला त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी तसेच ज्यांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली त्यांच्यावर देखील कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंहगड पोलिस ठाण्यात देण्यात आले. कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकॉकला जात असलेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी पोलिस यंत्रणा व सरकारी यंत्रणा कामाला लावली, यासाठी झालेला सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांचा हत्येली आरोपी अजून सापडत नाही. मात्र आठ तासात तानाजी सावंत यांचा मुलगा कसा सापडतो? असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी उपस्थित केला. निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना नेते वसंत मोरे, रेखा कोंडे आदी उपस्थित होते.

तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुलगा घरातून भांडण करून निघून गेला अशा वेळी केवळ त्या मुलाला अडवायचे असल्याने सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणे गरजेचे होते का? असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, पैसा असल्याचा, या सर्व गोष्टीचा गैरवापर करत अपहरणाची खोटी केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले. गोरगरीब नागरिकांचा साधा तक्रार अर्ज देखील पोलिस ऐकून घ्यायला तयार होत नाहीत. अशावेळी धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलिस स्टेशन आणि धन्य ते सरकार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

अवघ्या आठ तासांत तानाजी सावंत यांच्या मुलाचा शोध लावणाऱ्या पोलिस यंत्रणेसह, महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. व्हीआयपीच्या मुलाबाबत पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का दाखवली नाही, असा सवालही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम ऍक्टिव्हेट झाली आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाली आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या देशाने चालले आहे याबाबत कन्फर्मेशन मिळवणे सुरू आहे. तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा लागली आहे. या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

अभिजात मराठी: अहिराणी बोलीचा इतिहास (भाग १)

अ. भा. साहित्य संमेलन, नवी दिल्ली:

नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृती, साहित्यिक योगदानास यानिमित्ताने उजाळा देण्यात येत आहे. खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले प्रगल्भ संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण वाचकांसाठी दोन भागात देत आहोत…

अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख

खानदेश प्रस्ताविक

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगांव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खान्देश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरीपर्यंत होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जात असे. मोगलांच्या कारकीर्दीत हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खान्‍देश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खान्‍देशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आलीत.

खानदेश इतिहास :

रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खान्‍देशाचा भू-भाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेव, कान्हेरदेव, कान्हाचा देश, कानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भू-प्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खान्‍देशातील अनेक उत्सवांपैकी कानबाई, कानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भू-प्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्य, वन, गवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाण, खदान, थाळा, मध्ये खोल असणारा भाग, खनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगा, सह्याद्रीच्या रांगा, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखा, खाणीसारखा आहेच. गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचा, गुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होती, चौफेरुन नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धता, व शुद्ध वंश (खान, खानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देश, चांगल्या वंशाचा-खानदानीचा देश, गवताचा-कानन देश या वरुन खानदेश हे नामाभिदान झाले असावे, असल्या व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वस्थाम्याचे स्थान होते. तर पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणी, घटोत्कच्छ लेण्या, नागद, मूंदखेडे, मेहुनबारे, बहुलवाड येथे सापडलेले ताम्रपट, सारजादेवी मंदिरावरील शिलालेख, अंजिठा लेण्या, इ. पुराव्या आधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेव, स्वामीदास, मुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्ती, नृपती जयशक्ती, नृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्या नंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट, सोमवंशी, आणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजी, अकबर, यांच्या सत्ते नंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निझामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

अहिर – अहिराणी :

रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, ब्रहतसांहिता, नासिक लेणे, महाराष्ट्र ज्ञानकोश, डब्ल्यू क्रूक यांचा कास्ट अॅण्ड ट्राइब्ज इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया, आ. इ. इन्थोव्हेन यांचे ट्राईब्ज अॅण्ड कास्ट ऑफ बॉम्बे इ. ग्रंथावरुन अहिरांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्या नुसार खानदेश हा मूळचा अहिरांचा देश. अहिर ही शेतकऱ्यांची, गवळ्यांची एक जात. प्रमुख उद्योग गुरे राखणे. मत्स्यपुराणात सात तर वायू पुराणात दहा अशी अहिर राज्यांची संख्या दिसते. इ.स. १५० मध्ये आध्रांचा ऱ्हास होऊन अभीरांचे राज्य आले. वायव्येकडून ते दक्षिणेकडे सरकत आले. चौथ्या शतकात खानदेशावर अहिरांचे राज्य होते. आठव्या शतकात काठी लोक जेव्हा गुजराथेत आले तेव्हा बराच मुलुख हा अहिरांच्या ताब्यात होता.

या अहिरांची वाणी-बोली ती अहिरवाणी किंवा अहिराणी. खानदेशात अहिराणी ही कृषि जीवन जगणाऱ्याची बोली आहे. खानदेश या जिल्ह्याच्या भूप्रदेशात ती बोलली जाते. म्हणून ती खानदेशी. आता खानदेश जिल्हा हा जळगांव व धूळे या दोन जिल्ह्यात विभागला आहे. मात्र या बोलीचे क्षेत्र या जिल्ह्याच्या क्षेत्राहून हे मोठे आहे. चांदवडचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, वाघुर नदी आणि संह्यपर्वत, अजिंठ्यांचे डोंगर या निसर्गाने तोडून वेगळ्या ठेवलेल्या खोलगट भूभागात, खदाणीत, खाणीत ही खानदेशी, अहिराणी बोलली जाते. या भूभागात मग नासिक, नंदूरबार, औरंगाबाद, जळगांव, धूळे या जिल्ह्याच्या गावांचाही समावेश होतो.

खानदेशात अहिर होते. कालानुरुप त्यांच्या नावांत बदल झाला. मात्र त्यांची अहिराणी, अभिरोक्ती किंवा अभिरी आजही टिकून आहे. अभीर म्हणजे यदुवंशीय; अभीर किंवा अहिर ही गवळ्यांची, गरेचारणाऱ्यांची, कृषि-उद्योग करणाऱ्यांचीएक जात. इत्यादी

इतर भाषिकांनी अहिरांच्या बोलीला अहिरवाणी किंवा अहिराणी म्हणून ओळखले किंवा संबोधले. अहिर हे खानदेशात सर्वत्र पसरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या बोलीवर सुद्धा अहिराणीची छाप पडणे साहजिकच होते. या खानदेशातील अहिराणीला खानदेशी या प्रादेशिक नावाने देखील ओळखले जाऊ लागले.

अहिराणी आणि खानदेशी :

खानदेशात अहिरांचे वास्तव्य होते. अहिरांनी सुपीक जमिनीवर गुरे चारण्या सोबतच शेती व्यवसाय सुरु केला. शेती व्यवसायाला पुरक असे विविध व्यवसाय करणारे इतर लोक अहिरांशी सततच्या संपर्कात येवू लागले. सत्ता, व्यापार, व्यवसाय यातील अहिरांच्या भाषेचे वर्चस्व हे खानदेशभर वाढल्याने अहिराणी ही प्रदेशाच्या नावाने म्हणजे खानदेशी बोली या नावाने ओळखली जाऊ लागली. ती एका जातीची भाषा न राहता ती त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची, प्रदेशाची भाषा झाली. अहिरांशी सततचा इतर भाषिकांचा संपर्क आला. तो इतर भाषिक समाजही त्यांच्या स्वतःच्या बोलींची छाप असणारी अहिराणी, मिश्र अहिराणी बोलू लागला. बोलीचा उल्लेख करतांना ती त्या प्रदेशाची बोली, खानदेशाची बोली म्हणून खानदेशी या नावाने गणली गेली. खानदेशी बोली ही संकल्पना अहिराणी बोली ह्या संकल्पनेपेक्षा विशाल आहे. त्या त्या परिसरातील खानदेशी ही त्या त्या परिसराच्या नावाने संबोधली जाऊ लागली. ज्या ज्या जमातींनी ती भाषा स्विकारली त्या त्या जमातींच्या नावाने ती बोली ओळखली जाऊ लागली. या नुसार खानदेशी बोलीचे सामाजिक आणि प्रादेशिक असे प्रभेद निर्माण झालेत. खानदेशीच्या प्रादेशिक प्रभेदांचा विचार करता, खानदेशाच्या नैऋत्ये कडील बागलाण भागातील ती बागलाणी, उत्तरे कडील तापीच्या परिसरातील ती तप्तांगी, दक्षिणेकडील ती दखनी किंवा डोंगरांगी, पश्चिमेकडील ती वरल्ह्यांगी, पूर्वेकडील ती खाल्ल्यांगी, नेमाड कडील ती नेमाडी, डांगान परिसरातील ती डांगी, तसेच तावडी असे प्रादेशिक प्रभेद आढळतात. तर सामाजिक प्रभेदात, खानदेशात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक जातीच्या स्वतःच्या बोलीची छाप असलेली अहिराणी बोली ही त्या जातीची स्वतंत्र नामधारण करुन सामाजिक प्रभेदाचे रुप बनली. त्यात महारांची ती महाराऊ, लाडशाखीय वाण्यांची ती लाडसिक्की, भिल्लाची ती भिलाऊ, अहिरांची ती अहिराणी, लेवा पाटीदारांची ती लेवा पाटीदार बोली, पावरांची ती पावरी, काटोनी भिल्लांची ती काटोनी, घाटावरुन आलेल्यांची स्वतःच्या बोलींची छाप असलेली ती घाटोयी, गुजरांची ती गुजरी, भावसारांची ती भावसारी, परदेशांची ती परदेशी अशा जाती निहाय अहिराणीच्या सामाजिक प्रभेदांची यादी वाढतच गेली. या सर्व सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना एकाच नावाने सामावून घेणारी विशाल संकल्पना ही “खानदेशी बोली” जी संपूर्ण खानदेशात बोलली जाते.

०००

  • डॉ. रमेश सुर्यवंशी, ‘अभ्यासिका’, वाणी मंगल कार्यालयासमोर कन्नड, जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) पिन ४३११०३, भ्रमणध्वनी ०९४२१४३२२१८/८४४६४३२२१८

वीजपुरवठा खंडित केल्यामुळे थकबाकीदाराकडून लोखंडी पाइपने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १२ फेब्रवारी २०२५: वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केली. तुपेवस्ती (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. यात जखमी जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका आरोपीविरुद्ध उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या उरुळी कांचन उपविभाग अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे व विद्युत सहायक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होती. यात वीजग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीजपुरवठा थकबाकीमुळे २३ जानेवारीला खंडित केला होता. मात्र त्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा घेण्यात आल्याचे तपासणीत दिसून आले. याबाबत पुढील कारवाई करण्यात येत असताना भाडेकरू कमलेश उत्तम लोंढे याने अंगावर धावून येत ‘खंडित वीजपुरवठा सुरु केला तर तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हणत दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली व नंतर लोखंडी पाइपने वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात जखमी झालेल्या चाकणे यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.

या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपी कमलेश लोंढे विरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियमच्या कलम १३२, १२१ (१), ११८ (१), ३५१ (१), ३५१ (३) व ३५२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून चोरी करून नेलेला १८ लाखाचा ऐवज गुजरात मध्येजाऊन चोरट्यासह पुणे पोलिसांनी पकडला

पुणे- इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोराच्या गुजरात राज्यात जाऊन पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून १८,६९,४१७/-रु. चा महाराष्ट्रातून चोरी करून नेलेला माल केला हस्तगत.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २३/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पो. हवा भोसले, संजय बादरे, व पो. अमंलदार अक्षय चपटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे प्रशांत दिगंबर पाटील रा.औरंगाबाद याने केला असून तो गुन्हयात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी भरुच गुजरात या ठिकाणी गेला आहे. मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे पोउनि नितीन राठोड, व स्टाफ हे भरुच गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रीक साहित्यासह पकडून त्याचेकडून २,५०,०००/-रु. किंमतीचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले १६,१९,४१७/- रु. किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण १८,६९,४१७/-रु.चा माल केला हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री गंगेश हांडे, यांचे सुचनेप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

राहुल सोलापूरकरांच्या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे-अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून चांगलाच गदारोळ उठला असून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केले होते. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच त्यांच्या घरासमोर शिवभक्त तसेच आंबेडकरी अनुयायांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत. या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलिस बंदोबस्त दिला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. गरज पडली तर राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ. तसेच अजून तरी राहुल सोलापूरकर यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, राज्यभरतून संताप व्यक्त होत असल्याचे पाहून अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, त्यांनी माफी मागीतल्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे म्हंटले होते. यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावरून पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले राहुल सोलापूरकर?

राहुल सोलापूरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि शिवभक्तांची मी जाहीर माफी मागितली. लाच शब्द बोललो, मी अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मी बोललेला असा एक व्हिडिओ समोर आला. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो, तरी हे का केलं जात आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. महान व्यक्तीला कलुशीत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही.

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट

0

नवी दिल्ली, दि. १२:  ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी खासदार नरेश मस्के साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी  बोलताना मंत्री सामंत म्हणाले की,  राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी आज दिवसभर राजधानीत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटक आहे. या सर्व नियोजनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले.

‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

0

मुंबई, दि. १२ : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, असा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “या मागणीचा जरुर विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राजधानीतून कवितासंग्रह प्रकाशित होणे स्तुत्य उपक्रम- उदय सामंत

0

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे- मुरलीधर मोहोळ

‘उजेडाचे प्रवासी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि दिल्लीतील मराठीजणांचा सन्मान सोहळा

नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. तर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘उजेडाचे प्रवासी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मुरलीधर मोहोळ बोलत होते.

राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनापूर्वी विविध उपक्रमांची रेलचेल राजधानीत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून दिल्लीतील मराठी नागरिकांनी लिहिलेल्या ‘उजेडाचे प्रवासी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. जीवन तळेगावकर यांनी या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीतील मराठी बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महेंद्र कुमार लड्डा, सरहदचे संजय नहार, जीवन तळेगावकर यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, साहित्य संमेलन दिल्लीत होत असून अधिकाधिक मराठी लोकांनी या साहित्य संमेलनाचा भाग व्हावा, दिल्लीतील मराठी लोक या साहित्य संमेलनाचे राजदूत असून साहित्य संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण सर्वदूर पसरत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे साहित्य संमेलन विशेष असल्याचाही उल्लेखही सामंत यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा भाग होता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे, त्यामुळे हे संमेलन विशेष आहे. दिल्लीत मराठी बांधवांचा सत्कार करताना दिल्लीतही महाराष्ट्र किती विस्तारला आहे, याची प्रचिती येते, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनीही याप्रसंगी समायोजित भाषणे केली.

एका वर्षात वडगावशेरी मतदारसंघ टँकरमुक्त करणार; आमदार बापुसाहेब पठारे यांचा निर्धार

पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संपूर्ण भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे केले मान्य

पुणे-: वडगावशेरी मतदारसंघाला ३१ मार्च २०२६ पर्यंत टँकरमुक्त करून सर्व भागाला नळाद्वारे सुनियोजित व सुरळीत पाणी पुरवठा करणार, असा निर्धार आमदार बापुसाहेब पठारे यांनी केला आहे.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे बुधवारी (ता. १२) घेतलेल्या पाणी पुरवठा विभागासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. सकाळी ७ च्या सुमारास पठारे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान, वडगावशेरी मतदारसंघातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. गेल्या काही वर्षांपासून, नागरिकांना विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी ठोस पाऊले उचलल्याचे दिसून येते. बैठकीत त्यांनी अधिकारी वर्गाला तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी एका वर्षात संपूर्ण वडगावशेरी मतदारसंघाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. तसेच, पोरवाल रस्ता परिसर, निंबाळकर नगर, साठे वस्ती, स्वामी समर्थ नगर या भागांना येत्या २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत, तर येत्या १५ मार्चपर्यंत डीवाय पाटील रस्ता परिसर, चिरके कॉलनी, पठारे वस्ती, आदर्श नगर, गणेश नगर, कर्मभूमी नगर, लेक व्ह्यू, खांदवे नगर यासह लोहगाव पूर्व भागाला पूर्ण क्षमतेने पाणी दिले जाईल. तसेच, २५ मे २०२५ पर्यंत धानोरी डोंगर परिसर, सहारा परिसर, न्याती बिल्डिंग परिसरात जलवाहिन्या टाकून नियमित पाणी देणार, असल्याचे शाखा अभियंता सुधीर आलुरकर यांनी स्पष्ट केले.

आमदार बापूसाहेब पठारे यांनी येरवडा, वडगावशेरीतील गलांडे नगर, विमाननगर यांसह पाणी टंचाई असणाऱ्या भागात देखील नियमित पाणी पुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या यांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्व भागात नियमित पाणी पुरवठा करा, अशा सूचना देखील केल्या.

येरवड्यात ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या असल्याने अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येरवड्यातील जलवाहिन्या बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील आमदारांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे फोनद्वारे केली. आयुक्तांनी देखील यावर सकरात्मक प्रतिसाद देत मागणी मान्य केली आहे.

बैठकीच्या निमित्ताने, यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, झोन १ चे उपायुक्त राजीव नंदकर, अधीक्षक प्रकल्प अभियंता श्रीकांत वायदंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, उप-अभियंता रविंद्र पाडळे, उप अभियंता चंद्रसेन टिळक, प्र. उप- अभियंता अन्वर मुल्ला, येरवडा क्षेत्रीय कार्यालय सहायक महापालिका आयुक्त वंदना साळवे, कार्यकारी अभियंता तुळशीराम नागटिळक, महेंद्र बहिरम, राजेंद्र खांदवे, संतोष आरडे, किशोर विटकर, संजय गलांडे, डॅनियल लांडगे, विशाल मलके, शैलेश राजगुरू, गणेश ढोकले आदि उपस्थित होते.


चौकट
“पाणी सोडणारे वॉलमॅन जर पैशाची मागणी करत असतील, तर नागरिकांनी मला अथवा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी”, असेही आवाहन आमदार पठारे यांनी केले.

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाचे भूमिपूजन मे मध्ये होणार

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

पुणे ता. 12 फेब्रुवारी
शिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानक उभारण्यासाठी येत्या मे महिन्यात भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी सांगितले. शिवाजीनगरला पूर्वीच्या जागेवर बसस्थानक बांधण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यामध्ये येत्या आठवड्यात एम ओ यु करार होणार आहे . या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षात बस स्थानक बांधण्यात येईल.

शिरोळे यांनी शिवाजीनगर बस स्थानक पूर्वीच्या जागी उभारण्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत त्यांनी गेल्या महिन्यात पुण्यात बैठक घेतली. तेथे झालेल्या निर्णयाचा पाठपुरावा करीत शिरोळे यांनी सोमवारी पवार यांना निवेदन दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मंत्रालयातील दालनात संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी सकाळी झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे बैठकीला उपस्थित होते. त्यात याबाबतचे निर्णय घेण्यात आले.
शिरोळे बैठकीतील निर्णयाची माहिती देताना म्हणाले, ” वित्त, नियोजन, परिवहन, एसटी महामंडळ आणि महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नागरिक व प्रवाशांच्या अपेक्षा मी बैठकीत मांडल्या. शिवाजीनगर एसटी बस स्थानकाच्या पूर्वीच्या जागी मेट्रोचे भुयारी स्थानक बांधण्यात आले आहे. तेथे वरील बाजूला अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एम ओ यु करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. महा मेट्रो मार्फत पीपीपी तत्त्वावर हे बांधकाम करण्यात येईल. येत्या तीन आठवड्यात याबाबतच्या निविदा काढण्यात येतील. निविदा मंजूर करून मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मे महिन्यात एसटी बसस्थानक उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येईल.
शिवाजीनगर एसटी बस स्थानक 2019 मध्ये पुणे मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे डेअरीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ते पुन्हा मूळच्या जागेवर येईल. या ठिकाणी दिवसभरात सुमारे दोन हजार गाड्यांची ये-जा होते. मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई या भागात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या शिवाजीनगर बसस्थानकावरून जातात. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. बस स्थानकाच्या सोबतच एसटी गाड्यांसाठी मोठे वर्कशॉप, गाड्या पार्किंग साठी जागा, पहिल्या मजल्यावरही गाड्या उभ्या करण्याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प तीन वर्षात उभारण्यात येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.