Home Blog Page 628

चित्रपटांप्रमाणे मराठी मुक्त संगीतालाही अनुदान मिळावे; कलाकारांची मागणी

पहिला मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळा पुण्यात संपन्न

चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे, दि. ९ मार्च, २०२५: स्वतंत्र संगीताला चित्रपटांचा आधार नसतो, येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचे हे स्वत: ठरवतो. त्यामुळे मराठी मुक्त संगीताला स्टार्ट अप असल्यासारखे समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसे अनुदान मिळते तसे अनुदान मराठी मुक्त संगीताला मिळावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली. संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने आयोजित पहिल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्यात त्या बोलत होत्या.

एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यात चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुक्त संगीतातील प्रयत्नांना सरकारी अनुदान मिळाले तर त्यांचा प्रसार जगभर होईल असा विश्वास व्यक्त करीत वैशाली सामंत म्हणाल्या, “आम्ही संगीतातील वेडे मुशाफिर आहोत. या पुरस्काराने आम्हा सर्वांनाच आज एक छोटासा किनारा मिळाला याचे समाधान आहे. आम्ही केलेल्या श्रमाला व्यासपीठ मिळतंय ही आश्वासक गोष्ट आहे.”

पुढचा मिमाचा सोहळा आपण मुंबईत करू आणि त्याला मुख्यमंत्र्यांना घेऊन यायची जबाबदारी माझी असे आश्वासन यावेळी प्रसाद लाड यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वदूर मराठीचे वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे येत्या २० तारखेआधी आम्ही निवेदन देऊ.”

‘राधा ही बावरी’ या गाण्याच्या आठवणी सांगताना अशोक पत्की म्हणाले, “गाणे जन्माला आले तेव्हा त्याचे शब्द वेगळे होते. हे शब्द मला पटत नाहीयेत आणि तुम्ही गाणे लिहा असा मला स्वप्नील बांदोडकर यांचा फोन आला लागोलाग तो भेटायलाही आला. मी संगीतकार आहे गीतकार नाही हे मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हट्टच धरला होता. शेवटी त्याच रात्री धून सुचली आणि गाणे लिहिले.” ‘राधा ही बावरी’ या गाण्याने मी गाणे लिहू शकतो असा मोठा धीर मला दिला असे अशोक पत्की मिश्कीलपणे म्हणाले.

आजकालच्या जमान्यात शिक्षण हे सगळीकडून सतत मिळत असते. पण संस्कार काही मिळत नाहित. आम्ही सर्वच दिग्गज कलाकारांनकडून संगीताचे शिक्षण घेतले. पण पत्की काकांनी आमच्यावर शिक्षणापेक्षा जास्त संस्कार केले. आज हेच संस्कार आमच्या सोबत आहेत. जे शिकलात ते पुढच्या पिढीला द्या हा यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे, असे पुरस्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाले.

आम्ही या क्षेत्रात २५ हून अधिक वर्षे आहोत मात्र मुक्त संगीतासाठी असा पुरस्कार नव्हता. चित्रपटेतर संगीतासाठी या निमित्ताने एक नवीन प्रवास सुरु होणार असून नव्या पिढीच्या संगीतकार व गीतकारांना याद्वारे नवी उमेद मिळेल, असे स्वप्नील बांदोडकर म्हणाले.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने गौरविले गेले. याबरोबरच पं रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने तर जीवन धर्माधिकारी आणि विवेक काजवेकर यांना संगीत संयोजन विभागासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉंग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा तर पहिला आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

खान्देशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषांतील गाण्यांसोबतच मराठी मधील ‘पॉप’ संगीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये गाण्यांना देखील विविध विभागांमध्ये मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यामध्ये गौरविण्यात आले. आर जे राहुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बेरोजगारीविरोधात मेट्रोलाईनवर आंदोलन: आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याचा आरोप,आंदोलक नेत्याची पक्षातून हकालपट्टी

 पुणे -महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. स्त्रियांवर होणारे अत्याचार या विरोधात आणि मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलक गपचूप मेट्रो स्थानकात पोहोचले. यानंतर ते थेट मेट्रो रुळावर उतरले. त्यांनी जवळपास एक तास निदर्शने देत मेट्रो वाहतूक रोखून धरली. रविवारचा दिवस असल्याने हजारो पुणेकर मेट्रोने प्रवास करतात. या पुणेकरांना जवळपास तासभर एकाच ठिकाणी स्थानबद्ध व्हावं लागलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलकांनी मेट्रो रुळावर उतरुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मेट्रो स्थानकात दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला रुळावरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खाली उड्या मारु, असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रुळाच्या खाली संरक्षण जाळ्या धरुण पोलीस जवानांना उभं केलं.

कोणताही परवानगी न घेता आंदोलकांनी थेट मेट्रो सेवा ठप्प केली. पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणे, प्रशासनाला धमकावणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे असे प्रकार कोणत्याही स्तरावर खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास बळाचा वापर केला जाईल. अशा आंदोलकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. -संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

वाढती बेरोजगारी, शासकीय रुग्णालयातील भ्रष्टाचार, मोफत शिक्षण मागणी, राजकारणातील घराणेशाही बंद करणे,शिक्षणातील व्यावहारिक बाजार थांबवणे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शरद चंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मनपा मेट्रो स्थानकावर मेट्रो लाईन वर बसून आंदोलन केल्याचा प्रकार घडला.आत्मदहनाचा इशारा देत करण्यात आलेल्या या आंदोलनात पालकमंत्री येऊन येथे सांगू द्यात अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी झालेल्या पोलीस आणि आंदोलक यांच्यातील बाचाबाचीतून आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला .याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र पावटेकर याच्यासह ५ ते ६ पुरुष आणि १० महिलांवर विविध कलमांन्वये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अचानक कोणतीही परवानगी न घेता मेट्रो सेवा ठप्प केली. दोन तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो सेवा यामुळे विस्कळीत झाली. पोलिसांना या आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी मेट्रोच्या रूळावरच आंदोलन सुरू केल्याने, मेट्रो सेवा विस्कळीत झाली. कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रथमच मेट्रोच्या लाईनवर हे आंदोलन करण्यात आले पण पावटेकर यांनी आंदोलन पक्षाची परवानगी न घेता केले आणि पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली असा त्यांच्यावर आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

जगताप म्हणाले, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही.अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या आहे. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत .आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत आपल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अगर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जागेवर आणल्याशिवाय आपण उठणार नाही असा पवित्रा घेत, दीड तास मेट्रो सेवा ठप्प ठेवली. मेट्रो पुलावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने यावेळी पुलाखाली जाळी धरत बचाव कार्यासाठी तयारी देखील केली. पोलिसांची या प्रकारामुळे धावपळ उडाली तसेच त्यांनी वारंवार विनंती करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक यांनी पोलिस आणि माध्यमे यांच्यावर हात उचलण्याचा प्रकार घडला.अखेर पोलिसांनी सदर ठिकाणी शिरून आंदोलकांची धरपकड करत सदर आंदोलन मोडीत काढले.

शोषित, पीडित, महिला यांचा आवाज व्हा-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे आवाहन

पुणे : महात्मा गांधींनी समर्पणातून आपल्याला स्वत:चा आवाज ऐकवला. आज बाहेरचा आवाज वाढला आहे. शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, महिला यांचा आपण आवाज झाला पाहिजे. हिंसेचे उत्तर अहिंसेनेच दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ‌मेधा पाटकर यांनी रविवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील तिसऱ्या दिवसाच्या सत्रात ‘ माझा आतला आवाज’ या विषयावर त्या बोलत होत्या. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि एम. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.


पाटकर म्हणाल्या, आपण आतला आवाज गांधींच्या प्रेरणेने ठरवतो तेव्हा तो जीवनप्रणाली आणि कार्यप्रणाली होतो. आज गांधींचा वारसा संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असले तरी ते कधी यशस्वी होणार नाही कारण गांधी सत्ताधीश नव्हते. ते सत्यवादी होते. गांधींनी फाळणी केली असा आरोप केला जातो. गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर असा वाद सत्ताधारी रंगवतात पण गांधींनी कधीच कोणाला शत्रू मानले नाही. वोट बँकेच्या काळात आपण आतला आवाज आणि गांधींचा आवाज ऐकू शकतो का ? इतिहास केवळ घटनाक्रम नाही तर तो प्रेरणेचा स्त्रोत असतो. गांधींचा वारसा टिकवण्याची आज गरज आहे. नदी, जल, जंगल वाचवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. देशात विभाजनाचे राजकारण होत असताना आपण शोषित, पीडित, दलित, कष्टकरी, शेतकरी आणि महिलांचा लढा पुढे नेला पाहिजे.
सावंत म्हणाले, आतला आवाज सामान्य माणसालाही ऐकता येतो. त्यासाठी महात्मा असण्याची गरज नाही, असे गांधी सांगायचे. आतला आवाज ऐकण्यासाठी नैतिकता असणे गरजेचे आहे. आपण एकटे असतो आणि संकटात सोबत कोणी नसते, तेव्हा आतला आवाज मदतीला येतो. मी एमकेसीएलमध्ये काम करताना गडचिरोलीच्या आमच्या प्रशिक्षण केंद्रातील दोन चालकांमध्ये वाद झाला होता. त्यातील एकाने माझ्यावर अॅट्रोसिटीचा खटला दाखल केला. वास्तविक या वादाशी माझा संबंध नव्हता. मी मुंबईहून पुण्याला जात होतो. त्यावेळी ही बाब मी मंत्री आणि अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी मला गायब होण्याचा सल्ला दिला. मला आश्चर्य वाटले. मी नागपूर खंडपीठात माझी भूमिका मांडली. सहा वर्षांनी हा खटला संपला. निकाल माझ्या बाजूने लागला कारण बापू पाठीशी होते.
सप्तर्षी म्हणाले, माणसाचे समाजाशी कायमचे नाते जोडलेले असते. समाजातील विसंगती व्यक्तीमध्ये येतात. मी समाजाचे काम करणार नाही म्हणणारा माणूस अहंकारी असतो. माणूस समाजाशिवाय राहू शकू शकत नाही. आतला आवाज ऐकण्यासाठी लोकांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करता आले पाहिजे. लोकांचे दु:ख समजणे ही ईश्वर होण्याची प्रक्रिया आहे. मन निर्मळ असल्याशिवाय आतला आवाज ऐकू येत नाही. चारित्र्य आणि शील असेल तर आतला आवाज ऐकता येतो. प्रामाणिक होता म्हणून कोणी मरत नाही. प्रामाणिक होता म्हणून ईडी मागे लागत नाही. आतल्या आवाजाचा आनंद घेता आला पाहिजे.
स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. चिन्मय कदम याने आभार मानले.

आदिवासींमध्ये भांडणे लावली जात आहेत

खैरलांजी ते मणिपूर अशी सगळीकडे हिंसा सुरू आहे. देशात अहिंसा कुठे दिसते का ?
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. जमिनीखालील निसर्गाचा खजिना देत नाही म्हणून आदिवासींमध्ये भांडणे लावली जात आहेत, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.

सर्व ठिकाणी पुरुषांनी महिलांचा सन्मान राखावा हे कर्तव्यच – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

सौ. मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादांनी पाडला नवीन पायंडा

जागतिक महिला दिन व मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन

पुणे-8 मार्च जागतिक महिला दिन आणि 9 मार्च सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर यांचा वाढदिवस.ह्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी आज वेगळेच घडले आणि सर्व उपस्थित भारावून गेले.
केदार एम्पायर, कर्वे रस्ता येथील शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना ओवाळायला थांबलेल्या भगिनींच्या हातातून ताट घेतले आणि सौ. मंजुश्री यांना स्वतः ओवाळले !!
पुरुषांनी सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान करणे व त्यांना समान वागणूक देणे हीच महिला दिनाची खरी भेट असल्याचे प्रतिपादन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोणत्याही पुरुषाने कुटुंबातच नव्हे तर कुठे ही महिलांना त्रास न देणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचेही मा
चंद्रकांतदादा म्हणाले !! हे सांगतानाच महिलांनीच कां पुरुषांना ओवाळायचे ? पाच पुरुषांनी महिलांना कां ओवाळू नये व त्यांचा सन्मान का करू नये, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
तसेच आरोग्य शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहताना वेळोवेळी आरोग्य तपासणी साठी आणखी एक बस उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. तसेच आत्ता उपलब्ध असलेल्या एका बस मध्ये सर्व प्रकारच्या अद्यावत उपकरणे बसविणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.उदघाट्न प्रसंगी त्यांनी उपस्थित महिला डॉक्टर्स ना कॅडबरी देऊन त्यांचा देखील सन्मान केला.


यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी,नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले,सुनील पांडे,मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सुभाषशेठ नाणेकर,सौ. कल्याणी खर्डेकर,राजेंद्र येडे, निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, अपर्णा लोणारे, मंगलताई शिंदे,सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, राम भिसे, विनायक गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एम एन जी एल च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेशजी पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ह्या उपक्रमाचे समन्वयक सुनील पांडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्तम संयोजन सुधीर फाटक,अनिकेत मंडाले, हर्षल होजगे, राहुल चौधरी, आकाश जाधव,सचिन पवार, रोहित मंडाले, अभिषेक पवार, अमोल जाधव, रोहित बाबर, सौरभ खंकाळ यांनी केले.
काल जागतिक महिला दिनानिमित्त पतित पावन संघटनेच्या माध्यमातून श्रावणधारा वसाहत येथे देखील आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पतित पावन चे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, मारुती धुमाळ, संजय येनपुरे इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी महिलांनी मंजुश्री खर्डेकर यांचा विशेष सत्कार केला व मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गायन, वादनाने रंगला निरामय संगीत सोहळागांधर्व महाविद्यालय आणि जयंत केजकर शिष्यवृंदातर्फे आयोजन

पुणे : कला शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. कलेविषयीचे प्रेम, परिश्रमांची तयारी, गुरुंवरील निष्ठा आणि प्रयत्नांमधील सातत्य, यांच्या आधाराने व्यक्ती स्वतःमधील कलाकार घडवू शकतो याचा प्रत्यय देणाऱ्या प्रगल्भ सादरीकरणातून युवा आणि ज्येष्ठ कलाकरांनी रसिकांची दाद मिळवली.
गांधर्व महाविद्यालय आणि जयंत केजकर शिष्यवृंद आयोजित निरामय संगीत सोहळा रविवारी हॉटेल प्रेसिडेंट झाला. गायन, वादन आणि सहगायनाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
निरामय संगीत सोहळ्यात सुरवातीला उस्ताद बाले खाँ यांच्या शिष्या किशोरी कुलकर्णी यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग अहिरभैरव मध्ये आलाप, जोड झाला या क्रमाने वादन केल्यानंतर तीन तालातील रचना सादर केली. त्यांना तबल्याची साथ महेश केंगार यांनी केली.
त्यानंतर डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी राग तोडी सादर केला. ‌‘दैय्या बट दुबर भयी‌’ हा विलंबित त्रिताल आणि जोडून द्रुत तीनतालात ‌‘मै तुमरी शरणागत प्यारी‌’ ही रचना ऐकवली. त्यांना श्रीपाद शिरवळकर (तबला), मयुरेश गाडगीळ (हार्मोनियम) तसेच विनय कोहाड व कन्हैया भोसले यांनी तानपुरा साथ केली.
त्यानंतर कन्हैया भोसले आणि विनय कोहाड या युवा कलाकरांचे सहगायन रंगले. त्यांनी राग भटियार मध्ये बडा ख्याल ‌‘बरनीन जाय‌’ (विलंबित त्रिताल), छोटा ख्याल ‌‘काहे को हमसंग करत‌’ (ताल त्रिताल) सादर केला. त्यांना श्रीपाद शिरवळकर (तबला), मयुरेश गाडगीळ (हार्मोनियम), तर कौस्तुभ लिमये व प्रद्युम्न नाडगौडा (तानपुरा) यांनी साथ केली.
कार्यक्रमात पुढे पं. प्रमोद मराठे यांचे संवादिनी वादन रंगले. त्यांनी सुरुवातीस राग किरवाणी सादर केला. तसेच पहाडी धून पेश केली. तबलासाथ अभिजीत जायदे यांनी केली. त्यांच्या संवादिनी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सांगता जयंत केजकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग ललत मधील ‌‘अरे मन राम‌’, ‌‘जोगिया मोरे घर आये‌’ या रचना सादर केल्यानंतर राग लंकादहन सारंग मध्ये ‌‘चरणतक आये‌’ ही विलायत हुसेन खाँ यांची बंदिशी सादर केली. त्यांना अभिजीत जायदे (तबला), पं. प्रमोद मराठे (संवादिनी), कन्हैया भोसले आणि विनय कोहाड (तानपुरा) यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी अरकडी यांनी केले.
गांधर्व महाविद्यालय तसेच इंडियन डायबेटिक असोसिएशन या संस्थांना त्यांच्या कार्यानिमित्त डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी देणगी दिली. पं. प्रमोद मराठे आणि डॉ. भास्कर हर्षे यांनी देणगीचा स्वीकार केला. मनोगतात डॉ. प्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‌‘मी वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द केली पण लहानपणापासूनच मला संगीत क्षेत्राची आवड होती. पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे माझे वडील संगीत शिकले होते. मी भूलतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कार्यातून निवृत्त झाल्यानंतर संगीत कला शिकण्यास सुरुवात केली. आवाज साधनेचा अभ्यास केला.‌’
कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका मधुवंती देव, प्रसिद्ध गायक पुष्कर लेले, डॉ. विद्या गोखले, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अरुण पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यांच्या कला-साहित्यातून उलगडली ‌‘ती‌’

ऋत्विक सेंटर आयोजित कार्यक्रमात व्यक्त झाले कलाकार

पुणे : कला हे अभिव्यक्तीचे माध्यम असते, त्यात भावना निर्माण होण्यासाठी ‌‘ती‌’चे अस्तित्व असावेच लागते. चित्रपट सृष्टीतील स्त्रीच्या प्रतिमेचा प्रवास अत्यंत निसरडा आहे. कारण हे माध्यम पुरुषांनी पुरुषांसाठी स्त्रीयांना वापरून निर्माण केले आहे. चित्रकलेच्या माध्यमातून स्त्रीरूप साकारताना तिच्याकडे ‌‘ऑब्जेक्ट‌’-‌‘प्रॉडक्ट‌’ म्हणूनच पाहिले जाते. परंतु चित्रकाराची स्त्रीकडे पाहण्याची नजर दैनंदिन व्यवहारात जशी स्त्री दिसते तशी असावी. नृत्याच्या क्षेत्रात स्त्रीने पुरुषाची नजर मान्य केली आहे, असे दिसते. कलाकार स्त्री असली तरी नृत्याद्वारे व्यक्त होणाऱ्या भावना पुरुषाच्या लेखणीतूनच उमटल्या आहेत, असा सूर ‌‘कलाकारांच्या नजरेतून ती‌’ या परिसंवादात उमटला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‌‘ती‌’ या अनोख्या संकल्पनेवर विशेष कार्यक्रमाचे कोथरूडमधील ऋत्विक सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर, प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार, भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ. परिमल फडके यांचा सहभाग होता. त्यांच्याशी पॉडकास्टर सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या निमित्ताने प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या अमूर्त चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

सुनील सुकथनकर म्हणाले, आपल्या समाजावर चित्रपट सृष्टीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या माध्यमातून स्त्री नेहमीच पुरुषाला बघायला आवडेल तशीच दाखविली जाते. बाईला रडविणे आणि पुरुषाला हसवीणे हीच चित्रपटांची प्रतिमा निर्माण झाली आहे. समांतर चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न घडत आहे. आजच्या चित्रपटांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा आभास होतो, परंतु तो परिपूर्ण वाटत नाही. आज चित्रपट क्षेत्रातील तांत्रिक विभागात स्त्रियांचा सहभाग कमी जाणवतो. स्त्रीने स्त्रीप्रधान चित्रपटाची निर्मिती करणे ही चौकट मोडल्यास आजच्या चित्रपट सृष्टीचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजू सुतार म्हणाले, पूर्वीच्या काळी चित्रकलेच्या विश्वात पुरुष कलाकारांचे वर्चस्व असल्याने ते स्त्रीच्या शरीरापलिकडे कधीच गेले नाहीत. या क्षेत्रात आज ‌‘डिमांड तसा सप्लाय‌’ अशी परिस्थिती आहे. आजचे चित्रकलेचे मार्केट इन्व्हेस्टरचे आहे. या क्षेत्रात कलाकाराने वाट बदलल्यास नवनिर्मिती होऊ शकते. आज शाळांमध्ये कला या विषयाला दुय्यम स्थान आहे. तसेच कला महाविद्यालयांमध्ये कलेचे व्याकरण शिकता येते पण कलाकाराच्या प्रतिभेला, विचारांना वाव मिळत नाही. आपल्या समाजाकडे आर्ट गॅलरी पाहण्याची नजरच नाही. आज चित्रकलेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्त्री कलाकार कार्यरत असूनही प्रगतीशील काम होताना दिसत नाही.

डॉ. परिमल फडके म्हणाले, नृत्य या कलाक्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण खूप असले तरी तिच्या भावना, अवस्था यांचे वर्गीकरण पुरुषांनीच केल्याचे जाणवते. नृत्य करणारी स्त्री आणि पाहणारा तो ही परिस्थिती असल्याने नृत्य कलेवरही पुरुषी वर्चस्वाचा पगडा जाणवतो. गेल्या काही वर्षांत नृत्य पाहणाऱ्या स्त्रिया आणि त्या विषयी विचार करणाऱ्या स्त्रिया यांची संख्या वाढल्याने आज नृत्य क्षेत्रामध्ये वैविध्य निर्माण होताना दिसते. नृत्याचे पारंपरिक व्याकरण सोडून आजची ‌‘ती‌’ नवे व्याकरण निर्माण करू पाहते आहे. विविध नृत्य शैलीतील नृत्यांगना एकत्र येऊन नवे काही मांडू पाहत आहेत.

स्त्रीचे अधिकार कवितेतून मांडले : वैभव जोशी

‌‘कवीला उमगलेली ती‌’ या विषयी बोलताना प्रसिद्ध कवी वैभव जोशी म्हणाले, मी पुरुषसत्ताक घरातूनच आलो आहे. लहानपणी निरागसपणे पडलेल्या स्त्री-पुरुष भेदाच्या प्रश्नांना मला कधीच समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. पुरुषसत्ताक वातावरण मी झुगारले. त्यातून रूपकात्मक स्त्रीचे अधिकार माझ्या कवितेतून मांडले गेले. वैभव जोशी यांच्या कवितेत अष्टनायिका सापडतात का या संकल्पनेतून समिरा गुजर-जोशी यांनी वैभव यांना बोलते केले. विंदा करंदीकर, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, सुरेश भट यांच्या कविता या प्रसंगी सादर करण्यात आल्या. कलह करणारी, विरहात बुडालेली, धाडसी आणि मातृत्व दर्शविणाऱ्या स्त्रीयांचे रूप वैभव जोशी आणि समिरा गुजर-जोशी यांनी उलगडले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांना भरभरून दाद दिली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक सेंटरचे संचालक प्रकाश गुरव यांनी केला. तर सूत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची होती.

महिलांत अशक्य ते शक्य करण्याचे ताकद-डाॅ.प्रिती पाडपांडेः

‘एमआयटी एडीटी’त कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण

पुणेः महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली उच्च शिक्षण घेत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. मात्र, तरीही कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. तरीही, योग्यवेळी संधी, कुटूंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यास महिला कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, इतकी ताकद त्यांच्यात असते, असे मत औद्योगिक शिक्षण मंडळ शिक्षण समूहाच्या (एएसएम) ट्रस्टी डाॅ. प्रिती पाचपांडे यांनी व्यक्त केले.  
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, रिलायन्स लाइफ सायन्सच्या व्यावसायिक प्रमुख डाॅ.शैलजा सक्सेना, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा.डाॅ.मोहित दुबे, एमआयटी स्कुल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डाॅ.रेणू व्यास, डाॅ.अश्विनी पेठे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ.सक्सेना म्हणाल्या, अनेक विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला शिकली तर ती दोन कुटूंबांचा उद्धार करते. त्यामुळे मुलींना शिकविण्यात पालकांनी कुचराई टाळायला हवी. तसेच, मी माझे बाळ अवघे वर्षभराचे असताना संशोधन (पी.एच.डी.) कार्य सुरु केले. बाळाचा सांभाळ करतानाच संशोधन तर पूर्ण केलेच परंतू, कोरोना काळात स्वतः चाचणी लॅब टाकू शकले याचा आनंद आहे. त्यामुळे, आई झाल्यानंतरही महिला कुटूंबाचा पाठिंबा असेल सामाजात बदल घडवू शकते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वशांती प्रार्थनेने झाला. त्यानंतर विद्यापीठाच्य विद्यार्थ्यांनी महिलांवरील नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात करण्यात आला. 

कर्तृत्ववान महिलांचा गौरव-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा एमआयटी एडीटीतर्फे पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये सौ.गौरी देशपांडे, प्रतिमा जोशी, डाॅ.अनिंदिता बॅनर्जी, डाॅ.सारिका भोसले-फुंदे, सौ.वृषाली खंडागळे, डाॅ.पारुल गंजू, सौ.सुनिता शेंडे, सौ.वंदना येरमरकर, प्रा.निशिगंधा पटेल, डाॅ.रिना पगारे यांचा समावेश होता. 

महिला दिनानिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई पुरस्कार महिलांना उर्जा देणारा : केतकी कुलकर्णी

पुणे : आपल्या आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या बळावर ठसा उमटविणाऱ्या महिलांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने केलेला सन्मान हा भविष्यातील वाटचालीसाठी उर्जा देणारा ठरेल, असे प्रतिपादन पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी केले. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तव्याचा हा सन्मान संस्काराची जपणूक करणारा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कऱ्हाडे ज्ञातीतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान केतकी कुलकर्णी आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. कर्वेनगरमधील युनायटेड वेस्टर्न सोसायटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुचित्रा कुलकर्णी, श्रुती नाटेकर, सुधाताई जावडेकर, मुक्ता पंडित, वृषाली आठल्ये, मंजिरी धामणकर यांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने तर वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या अनुराधा देसाई, सुनंदा बेळगी, निला शेवडे, सुनिता सरदेसाई, अरुणा पळसुले-देसाई, इंदूताई धामणकर, शीला महाजनी, उषाताई नानल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शंभरीकडे वाटचाल करीत असलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या कार्याचा गौरव करून केतकी कुलकर्णी म्हणाल्या, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे तसेच संघटनात्मक दृष्टीने सुरू असलेले कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे काम अभिनंदनीय आहे.
पुरस्कारप्राप्त महिलांच्या वतीने बोलताना मुक्ता पंडित म्हणाल्या, पुरस्काराच्या रूपाने कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त तसेच उत्साह वाढविणारी ठरणार आहे.
पुरस्काराविषयी प्रास्ताविकात माहिती सांगताना कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर म्हणाल्या, कऱ्हाडे ज्ञातीतील महिला आपल्या बुद्धी-युक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने यशस्वी महिलांचा गेल्या काही वर्षांपासून ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पुरस्कारप्राप्त महिलांचा परिचय आणि आभार प्रदर्शन अद्वैता उमराणीकर यांनी केले.

.

0

औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात संरक्षण: – मुख्यमंत्री फडणवीस

औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च-औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला आपल्या गुरुच्या कबरीजवळ दफन करावे, अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च झाला, तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झाला, अशी माहिती हिंदू जनजागृती संघटनेचे सुनील घनवट यांनी दिली. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे अनुदान रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई-औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात एएसआयचे संरक्षण मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच प्रत्येकाला असच वाटते की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, असेही ते म्हणाले.विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. छावा चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशाप्रकारे केला याबाबत दाखवले आहे. त्यातच सपाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुती सुमने उधळत त्याचे कौतुक केले होते. यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी केली होती. अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त मोठे विधान केले.

औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली. काँग्रेसच्या काळात ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या गंभीर आरोपावर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचे पालन करून हटवणे अथवा बदलवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन

0

पुणे-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखानाने एक वॉकाथॉन आयोजित केला होता. अभिनव जोशी, एव्हीपी – ऑपरेशन्स, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना यांच्या संकल्पनेतून साकारलेला
हा कार्यक्रम कार्य-जीवन संतुलन, पोषणतत्त्वांची काळजी, महिलांची सुरक्षा आणि लिंग समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला होता. त्यांनी वॉकाथॉनमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथील अनेक उत्साही महिलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी जांभळ्या रंगाच्या आरामदायक क्रीडावस्त्रांमध्ये यात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथून सुरू झाला आणि छत्रपती संभाजी महाराज गार्डन, जे.एम. रोड येथे संपन्न झाला, जिथे तज्ञ आहारतज्ञ मालविका करकरे यांनी सर्व सहभागींना आरोग्यदायक आहाराचे महत्त्व विषद केले. प्रमुख नर्सिंग सुपरिटेंडंट शशिकला कामठे यांनी कार्यस्थळी महिलांची सुरक्षा याबद्दल जनजागृती केली आणि एचआर सीनियर मॅनेजर ॲड. शीतल मोरे यांनी कार्य-जीवन संतुलन आणि लिंग समानतेबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाने बागेमधील अनेक लोकांचे लक्ष वेधले, जिथे त्यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, फोटो काढले आणि सहभागींसोबत त्यांचे विचार देखील व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप नाश्त्याने झाला.

सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात व्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आहेत, तर जर्मनीत हिटलरचा पक्ष सत्तारूढ होत आहे. असे लोक जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा अशाच कालखंडात गांधी जन्माला येतात आणि काम करतात. सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ असून गांधी जन्माला येण्यासाठी दुसरा सुवर्णकाळ कोणता नाही. गांधी गेले नाहीत. ते पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी शनिवारी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील
दुसऱ्या दिवसाच्या पाचव्या सत्रात ‘पुन्हा पुन्हा गांधी !’ या विषयावर
आवटे बोलत होते. लेखक चंद्रकांत झटाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे
प्रसाद गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
आवटे म्हणाले, ‘भारत हा देश नसून भौगोलिक अभिव्यक्ती आहे. युरोपातील दोन
देशांमध्ये जेवढे साम्य आहे, तेवढे साम्य देखील भारताच्या पंजाब आणि
बंगाल या दोन प्रांतांमध्ये नाही, असे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान
विस्टन चर्चिल यांनी १९४० मध्ये भाषण करताना सांगितले होते. पण गांधी
नावाच्या माणसाने त्यानंतरच्या काळात भारत नावाचा देश एकसूत्रात बांधला.
याचे सर्व श्रेय महात्मा गांधींकडे जाते. नई तालीम म्हणून शिक्षण पद्धती,
आरोग्य, शेतीचे प्रयोग, राजकीय विचारवंत गांधी अशा विविध क्षेत्रात
त्यांनी काम केले. त्यामुळे आपल्याला गांधींशिवाय पर्याय नाही. गांधी सर्वदूर
पोहोचत आहेत. नव्या पिढीला कळले आहे की गांधी ही समस्या नसून समाधान आहे.
जेव्हा सर्व वाटा बंद होतात तेव्हा गांधीमार्गच वाट दाखवितो. गांधी आजही
सामान्य माणसाला समर्पक वाटतात, हे समजून घेतले पाहिजे. १९१५ साली गांधी
आफ्रिकेतून भारतात आले आणि अवघ्या पाच वर्षात गांधी हे राष्ट्रीय नेते
झाले. मी सनातनी हिंदू आहे असे गांधी सांगत पण धर्माच्या चौकटीला त्यांनी
धक्का दिला, हे त्यांचे वेगळेपण आहे. गांधींच्या भजनात राम होता, तो आपण
सोडला म्हणून तो चुकीच्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या गोठ्यात गाय होती,
ती आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली.’

गावडे म्हणाले, ‘माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग या भागात गाव
आहे. हा पर्यावरणशी निगडीत संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी वाघाचा अधिवास
असलेला अख्खा डोंगर खाणकामातून अवघ्या आठ वर्षात नामशेष झाला. तेव्हा
कोकण वाचविण्यासाठी काहीतरी करायचे ठरविले आणि गांधी यांच्या
ग्रामस्वराज्य या चळवळीशी मी जोडला गेलो. गावातील लोकांना हिंदुत्ववादाची
गरज नाही, ते जे जीवन जगत आहेत तीच त्यांची संस्कृती आहे. कोकणात पर्यटन,
विकास प्रकल्प यामुळे चंगळवाद बोकाळला आहे. पर्यावरणीय बुद्धिमत्ता हे
तत्वही गांधींकडून शिकलो. गेल्या दहा वर्षातील विकासाचे प्रारूप हे
पर्यावरणाला घातक आहे. कोकणात रिफायनरी होत आहे, ती पर्यावरणासाठी
विनाशकारी आहे. या ठिकाणचे लोक, मच्छिमार रिफायनरीला विरोध करत आहेत. पण
हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचा आहे. कारण भारतासाठी सह्याद्री हा
महत्त्वाचा असल्याने तो तसाच राखला पाहिजे. याकरिता गांधी मार्गाने लढा
देणे आवश्यक आहे. मोठे रस्ते, औद्योगिक वाढ यातून गावचे गावपण हरवत चालले
असून ते धार्मिकरित्या नव्हे, तर नैसर्गिकरित्या जपले पाहिजे. गावाचे
गावपण जपणे हाच गांधीवाद आहे.’

कोणताही काळ येवो गांधींशिवाय पर्याय नाही. शेतकरी आंदोलन गांधी मार्गाने
केले म्हणून केंद्राला शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले, असे सांगून झटाले
म्हणाले, ‘भगतसिंग यांची फाशी रद्द व्हावी, याकरिता गांधींनी सहा पत्रे
लिहली, हे लॉर्ड आयर्विनने हे लिहून ठेवले आहे. भगतसिंग यांची फाशी रद्द
होण्यासाठी गांधींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, हे भगतसिंग यांच्या
वडिलांना देखील माहीत होते, त्यामुळेच ते भगतसिंग निवर्तल्यानंतर
काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले होते. त्यामुळे गांधीवाद्यांनी आता
आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन वकिलाच्या भूमिकेत आले पाहिजे. रा.
स्व. संघ, हेडगेवार यांनी भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी काय केले? असा
प्रश्न विचारला पाहिजे. गांधी हे १९१५ साली भारतात आले आणि १९२० साली
ते राष्ट्रीय नेते झाले. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला. अवघ्या
२७ वर्षात गांधींमुळे देश स्वतंत्र झाला. मग गांधी यांच्यामुळे उशिरा देश
स्वतंत्र झाला हा आरोप खरा की खोटा? जीवनात सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले,
पण कधी सुरक्षा घेतली नाही. गांधी हे बीज आहे, त्यामुळे ते पुनः पुन्हा
उगवत राहणार’.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा

पुणे :  बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि .. च्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.

बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र त्याचा ताबा बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे.  या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून  महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला.

भदंत नागघोष महाथेरो, भंते राजरत्न, भंते बुद्धघोष थेरो, भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद, भंते यश, भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल आदी बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चातलाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची  सुरूवात झाली. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला. भंते च्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलका चौकात सभा घेवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले.

मोर्चाला संबोधीत करताना भंते राजरत्न म्हणाले, इ. स. पूर्व 563 पासून तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्यांच्या काळात ऐतिहासिक बौद्ध विहाराची निर्मिती केली आहे. मात्र आज त्या विस्तीर्ण बौद्ध विहाराच्या परिसरात अतिक्रमण करण्यात आले असून इतर देवी देवतांच्या नावाने तेथील विहार रूपांतरीत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी महाविहार आहे त्याच्या उजव्या बाजूस बौद्ध मूर्तीं सापडून देखील तिथे  इतर देवी देवतांची मंदिर उभारली जात आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणून आज जागतिक स्थरावर भारताकडे आदराने पाहिले जात. अन् आज त्याच देशात महाबोधी महाविहार मुक्तीसाथी जगभरात आनंदोलन केली जात आहेत. लोकं रस्त्यावर उतरली आहेत. ही भारतसरकारसाठी निंदनीय बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील भंते राजरत्न यांनी केली.

भंते नागघोष म्हणाले, जगात बौद्ध धम्म बुद्धगया येथून प्रसारित झाला आहे, भारत देशाची ओळख जगात बुद्धभूमी अशी आहे. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती  अन्य देशांच्या प्रमुखांना बुद्ध मूर्ती देतात. सम्राट अशोकाणे बांधलेले बुद्ध विहार  आपल्या ताब्यात नाही. बुद्धिस्ट टेंपल मॅनेजमेंट कामिटी मध्ये ९ पैकी ५ लोक हिंदू आहेत यामुळे तिथे हिंदूचे बहुमत आहे, त्या जोरावर तिथे कर्मकांड केले जाते. बुद्ध चरणी आलेल्या अनुयायांना मात्र कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत, यामुळे जो पर्यंत १९४९ चा कायदा रद्द होणार नाही तो  पर्यंत महाविहार मुक्त होणार नाही. बिहार पोलिस आणि शासन तिथे बसलेल्या उपोषण करत असलेल्या भंते आणि बौद्ध अनुयायांवर दडपशाही करत आहे. श्रीलंकेतून आलेले भंते अनागारिक यांनी १८९१ साली सुरू केलेला महायबिधी महाविहार मुक्तीचा लढा १३५ वर्षे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

धम्म पालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली.

स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पुण्यात संपन्न

रेडबेल मीडिया प्रस्तुत नवीन सिनेमाची घोषणा

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत. भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक स्वप्नसुंदरी चित्रपट ठरणार असल्याची निर्मात्यांनी ग्वाही दिली आहे. स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त महिलादनिानिमित्त 8 मार्च 2025 रोजी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रेक्षकांना एक वेगळी कथा अनुभवायला मिळणार आहे.

देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा: बी. जी. कोळसे पाटील.

मस्साजोग ते नेकनूर पहिल्या दिवशी २३ किमीची पदयात्रा, मुक्काम नेकनूर, नंतर पदयात्रा बीडकडे मार्गक्रमण

नेकनूर, बीड, दि. ८ मार्च २०२५
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने त्याचे औचित्य साधत ही सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु केली. समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार संघाला मान्य नाही. आजपर्यंत संघ प्रमुख महिला झालेली नाही, महिलांना एक वस्तू माननारी ही प्रवृत्ती आहे. राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा खेळ मांडला आहे, त्याविरोधी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, आपण संविधानाचा विचार पुढे घेऊन जाऊ, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मस्साजोग येथून सकाळी सुरु झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या करण्यात येते हे चिंताजनक आहे. स्त्री पुरुष प्रमाणात बीड जिल्हा मागे आहे. आजच्या महिला दिनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. मनुवादी विचार सरणीमुळे स्त्री भृण हत्यांचे प्रकार वाढले आहेत. मनुवादी विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा पाण्यात बिडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना त्रास दिला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचार हाच होता.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा आयडिया ऑफ इंडिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपाच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देते, पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपाचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे. समाजातील विषमता दुर करण्यासाठी सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, सरकारविरोधात बोलले की ईडी, सीबीआय, आयकर मागे लावले जातात, मतदार याद्या बदतात, यामुळे आता घराघरात पोहचावे लागेल. महाराष्ट्र काँग्रेसला आज बुद्ध व गांधींच्या मार्गाने चालणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांचे नेतृत्व लाभले आहे. तर देशाला राहुल गांधी यांच्यारुपाने एक दमदार नेतृत्व उभे लाभले राहिले आहे. देशातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे या परिस्थितीत आपण देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले.

यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अर्थतज्ञ देसरडा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.