Home Blog Page 625

कसब्यात कमल व्यवहारे बंडखोरीच्या पवित्र्यात

पुणे- कसबा भाजपच्या ताब्यातून कॉंग्रेसकडे खेचल्यावर आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असली तरी गेल्या निवडणुकीत मिळाले तसे सहाय्य त्यांना यावेळी मविआ कडून मिळणार काय? असा सवाल उपस्थित होईल असे चित्र दिसू लागले आहे . त्याला कारणही तसेच घटना दिसत आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसब्यात बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.

कॉंग्रेसच्या माजी महापौर महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्ष’ च्या वाटेवर असून त्या कसबा मतदार संघात स्वराज्य पक्षा कडून लढणार असे येथे चित्र रंगविले जातेय. . उद्या सकाळी ठिक 10 वा. कसबा गणपतीचे दर्शन घेवून माझी राजकीय भूमिका जाहीर करणारं आहे असे कमल व्यवहारे यांनी जाहीर केलंय.

२०१९ ला देखील व्यवहारे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या विरोधात प्रथमतः बंडखोरीचा पवित्र जाहीर केला होता पण नंतर माघार घेतली होती.

अजित पवार गटाचे वडगाव शेरीत सुनील टिंगरे हेच उमेदवार -आज झाली घोषणा

पुणे -अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली, त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी काल (गुरूवारी) केला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या मतदारसंघात पेच निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळीच सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर
तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके

येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माननीय उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक Ajit Pawar , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare , माननीय मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , माननीय उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री Devendra Fadnavis for Maharashtra , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महायुती मध्ये सहभागी असणारे सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आणि माझ्या परिसरातले सर्व हितचिंतक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांचे आभार मानून मी या उमेदवारीच्या संधीचा स्वीकार करतो.-आमदार सुनील टिंगरे

महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या बोनसचा चेंडू:कामगार आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे- महापालिकेतील कंत्राटी कामगारांना २ वर्षे बोनस दिलेला नसून हि बाब बेकायदेशीर आहे एवढेच कळवून सहाय्यक कामगार आयुक्त नि . अ. वाळके यांनी पुन्हा बोनस देण्याचे आदेश संबधितांना द्या असे व्हेग आदेश त्यासोबत दिल्याने बोनस चा चेंडू पुन्हा कंत्राटदार आणि महापालिका यांच्यात इकडून तिकडे उडवाउडवी होण्याची शकयता आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त नि . अ. वाळके यांनी काल महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना लेखी पत्राने कळविले आहे कि,’आपणास कळविण्यात येते की. दि. ०३/११/२०२३ रोजीच्या या कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियमाच्या तरतुदी नुसार सन २०२२-२०२३ करीता कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना बोनस अदा कारावा असे आपणास या कार्यालयाव्दारे कळविण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कामगार अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी दि.०३/११/२०२३ रोजीच्या पत्रान्वये कंत्राटदार आस्थापनांनी कंत्राटी कामगारांना बोनस अदा करावा असे लेखी कळविले होते. असे निम्नस्वाक्षरी कर्ता यांचे समक्ष दि. २४/१०/२०२४ रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत उपस्थित संघटना (राष्ट्रीय मजदूर संघ) प्रतिनिधी यांनी नमुद केले आहे. तसेच सन २०२३-२०२४ या वर्षाचे देखील बोनस अदा केलेले नाही. सदर बाब कामगार कादयाचे उल्लंघन करणारी आहे सन २०२२-२०२३ व २०२३-२०२४ या वर्षाचे बोनस कंत्राटी कामगारांना तात्काळ करण्याचे आदेश संबधीतांना आपल्या मार्फत द्यावेत ही विनंती.

खासगी एफ.एम. वाहिन्या, कम्युनिटी रेडिओकरीता जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक-डॉ. रवींद्र ठाकूर

पुणे, : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारी जाहिरात, रेकॉर्डेड संदेश, जिंगल्स, यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. कम्युनिटी रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

डॉ. ठाकूर म्हणाले, जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, चित्रपटगृहे, रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस संदेश, जिंगल्स, ऑडिओ जाहिराती, तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणीकरण न करता जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्स यांनी उमेदवार, राजकीय पक्ष तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने अन्य त्रयस्त व्यक्तींकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणीत केल्याची खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नयेत, असे आवाहनही डॉ. ठाकूर यांनी केले.

वडगाव शेरी एकेकाळचे ७०० घरट्यांचे गाव. पुणे शहराजवळ असूनही शहराचा गंध न लागलेले….

शरद पवारांनी का दिली बाप्पू पठारेंना उमेदवारी, महेंद्र पठारे ,भैय्या जाधव यांनी पठारे यांचा लेखा जोखा …

महाराष्ट्रातील राजकारणात पुणे जिल्ह्याचा आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पूर्व पुण्याचे महत्त्व नव्याने अधोरेखित करण्याची गरज नाही. गेल्या अनेक दशकांपासून बापूसाहेब पठारे यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या भरीव कामगिरीमुळे तसेच दांडग्या जनसंपर्काच्या माध्यमातून पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेले आहे. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी एकेकाळचे ७०० घरट्यांचे गाव. पुणे शहराजवळ असूनही शहराचा गंध न लागलेले. आज या भागाचा कायापालट झाला आहे. बापूसाहेब पठारे याच भागात जन्मले, वाढले आणि पुढे या भागाचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारे नेतृत्व झाले.
वडील कै. तुकाराम पठारे, थोरले बंधू श्री. पंढरीनाथ पठारे यांच्याकडून लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. त्याच शिदोरीवर परिसरातल्या नागरिकांची लहानसहान कामे करत करत आमदारकी पर्यंतची मजल त्यांनी मारली. १९९५ साली खराडी गावचा सरपंच हा पहिला टप्पा. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पुणे महापालिकेचा दोन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष आणि वडगाव शेरी मतदारसंघाचा आमदार असा राजकीय प्रवास आजवर त्यांनी केला आहे. बापूसाहेब पठारे हे स्वतः ग्रामीण भागात वाढलेले असले, तरीही जाणत्या वयापासून त्यांनी कायमच आपल्या भागाची तुलना शहराच्या विकसित भागाशी केली. आपला भागही ग्लोबल बनवायचा, हे त्यांना पडलेले एक स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करणे त्यांना शक्य झाले आहे, असे म्हणता येईल. ग्रामीण भाग म्हणून गणल्या गेलेल्या खराडी- चंदननगर परिसराचा झालेला विकास, तो सगळ्यांच्या नजरेसमोर आहेच. येथे असलेली शिक्षण संकुले, खराडीचे आयटी पार्क, पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स याने या भागाचे रंगरूप पालटले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हा परिसर ग्लोबल बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले.


सरपंच म्हणून केलेले काम असो, वा जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विधानसभेच्या माध्यमातून केलेले काम असो, त्यांनी सातत्याने नागरिकांच्या प्रयत्नांना शाश्वत आणि दीर्घकालीन उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. येथील जटील असलेला पाणीप्रश्न सोडवल्यामुळे माता-भगिनींचे आशिर्वाद त्यांना लाभले. परिसरातील रस्ते, ड्रेनेज, पाणी व वीज या मूलभूत सोयी-सुविधांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. या कामांसाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि चिवटपणे ते प्रश्न मार्गी लावले.
पद कोणतेही असो त्यांच्यातील सामान्य नागरिकांसाठी झगडणारा कार्यकर्ता सतत जिवंत असल्याने परिसराच्या प्रश्नांबाबतही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. केवळ आपल्या परिसराचाच नव्हे, तर शहराचाही विचार आमदार या नात्याने त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या काळात केला. स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना मिळालेली अनुभवाची शिदोरी त्यांना यासाठी उपयुक्त ठरली. शहराचा सर्वकष विकास करीत असताना युवकांना रोजगार देणे, शहरातील वाहतुकीची समस्या सोडविणे, झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळवून देणे, महिलांचे सक्षमीकरण या साऱ्या बार्बीच्या पूर्ततेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आजही करत आहेत.गेली अनेक दशके पूर्व हवेली (पुणे) मध्ये राजकारणात ते स्वतः आणि कुटुंबातील सदस्य सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका व प्रभाव राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. आजच्या घडीला खराडीतील आयटी पार्क मध्ये ४ लाखाहून अधिक जण आयटी क्षेत्रात काम करतात. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात बापूसाहेब पठारे यांनी दूरदृष्टी ठेवून मोठे योगदान दिले. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. संपूर्ण पूर्व पुण्यासाठी पाणी प्रश्न हा गंभीर होता. त्यावर उपाय म्हणून भामा आसखेड प्रकल्प सुरू करण्यापासून त्यातील पाणी पूर्व पुण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी बापूसाहेब पठारे यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले. यासाठी केवळ राज्यच नाही तर केंद्रीय पातळीवरील मान्यता आणण्यासाठी त्यांनी चिवटपणे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळत नव्हते. राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर बापूसाहेब पठारे यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत तब्बल सात नगरसेकवक एकहाती महानगरपालिकेत निवडून आणले व राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवून दिली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. नागरिकांशी थेट संपर्क आणि कार्यकर्त्यांची बांधलेली मोट, प्रदीर्घ राजकीय प्रवासादरम्यान पूर्व पुण्यातील प्रत्येक कुटुंबासाठी कुठल्या ना कुठल्या रुपात केलेल्या कामामुळे जोडले गेलेले ऋणानुबंध यामुळे पूर्व पुण्यातील राजकारणात त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे. विधानसभा सदस्यत्वाच्या काळात पुणे शहरात असणाऱ्या एकूण ८ आमदारांपैकी, बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांचा बालेकिल्ला असलेल्या खराडीतील प्रभागामध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर तसेच जास्तीतजास्त मताधिक्याने निवडून आणण्यात बापूसाहेब पठारे यांनी निर्विवाद यश मिळवले. आजपर्यंत भूषवलेली पदे व जबाबदाऱ्या २००९-२०१४- महाराष्ट्र विधानसभा सदस्य २००७ साली पुण्यामध्ये सर्वाधिक मते मिळवत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. याच वर्षी त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचाही बहुमान मिळाला. २००२ साली पुणे महानगरपालिका निवडणुकीत उतरून त्यांनी प्रभाग क्रमांक ३ येथून पुण्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत नगरसेवकपदावर नाव कोरले, तर २००६-०७ साली त्यांना पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी बढती मिळाली. २००० साली, पुण्यातील खराडीस्थित विकास प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. तर २००१ साली त्यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात यासाठी कल्पवृक्ष महिला उन्नती केंद्र सुरू केले. १९९६-९७ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले तसेच त्याच वर्षी पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९९६ मध्ये पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर निवडून येत त्यांनी जिल्हा पातळीवरील राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये त्यांच्याकडे काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान, खराडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. १९९५ मध्ये त्यांना खराडी-चंदननगरच्या सरपंचपदाचा बहुमान मिळाला. १९९४ मध्ये खराडी- चंदननगर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी राजकीय वाटचालीची सुरुवात यशाने केली.

वाढलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे- युगेंद्र पवार

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पहिली यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मजेशीर लढती पहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या सामना रंगणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. बारामतीत स्थानिक पातळीवर वाढलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले.

गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू होती. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी 64 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

पवारसाहेब व राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा निर्णय स्वीकार करतो. मला दिलेल्या संधीचे सोने करीन, पवारसाहेबांना माझा अभिमान वाटेल असे काम मी करेन, असे ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. मुद्दे अनेक आहेत, बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा, बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसेच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये स्थानिक पातळीवरील वाढलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे, असे म्हणत युगेंद्र पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.

1960 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होती. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शेकापने शरद पवार यांच्या मोठ्या भावाला म्हणजे वसंतराव पवारांना उमेदवारी दिली. अन् शरद पवारांनी काँग्रेसला मदत करताना भावच्या विरोधात प्रचार केला. या निवडणुकीत वसंतराव पाटील यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले.

अहेरी विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघावर धर्मराव बाबा आत्राम यांची चांगली पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम अजित पवारांसोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आत्राम कुटुंबातही एकप्रकारे घरफुटी झाली. बाबा आत्राम अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम हलगेर यांना उमेदवारी जाहीर करुन बापासमोर लेकीला उभे केले आहे.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोक्का आरोपी पसार:पुण्यातील तीन पोलिस कर्मचारी निलंबीत

पुणे-येरवडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी पकडलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी निखिल कांबळे (वय-२८) हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नजर चुकवून ससून रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीवेळी २१ ऑक्टोबर रोजी पसार झाला. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस कर्मचारी सुशांत भोसले, विठ्ठल घुले व सुरज ओंबासे यांना पोलिस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपी निखील कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०९ (४) ३ (५) व महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम १९९९चे अन्वये त्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. येरवडा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण करुन त्यास गंभीर जखमी करत लुटमार केल्याचा गुन्हा कांबळे याच्यावर होता. त्याला या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यातून ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन पुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात आणणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांची गाडी गुंजन चौकात पोहोचल्यावर त्याने पोलिसांना अस्वस्थ वाटत असल्याचा बहाणा करुन पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर पोलिसांनी गाडी थांबवून एक पोलिस कर्मचारी त्याला पाणी आणण्यासाठी गेला. याच दरम्यान गाडीतील पोलिस चालकाकडून आरोपीने त्याची हातकडी उघडून घेतली. त्यानंतर हळूच नजर चुकवून तो गाडीचा दरवाजा उघडून पसार झाला. त्याचा पाठलाग पोलिस कर्मचाऱ्यांनी केला परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान, याप्रकरणी सदर तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तसेच शिस्तीचे पालन न केल्याने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. योग्यप्रकारे दिलेली जबाबदारी पार न पाडल्याने आरोपी पसार झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबन काळात पोलिस कर्मचाऱ्यांना निम्मा पगार मिळणार असून कोणतेही खासगी कामे कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. दरम्यान, पसार झालेल्या निखील कांबळे यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास पुन्हा जेरबंद केले आहे. परंतु याप्रकारामुळे पोलिसांची प्रतीमा मलीन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर)इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (आयआयआरएफ) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान

पुणे: इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (आयआयआरएफ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान प्राप्त झाले आहे. देशातील फार्मसी महाविद्यालयांच्या यादीत ‘सूर्यदत्त’ने चमकदार कामगिरी करत या क्रमवारीत देशात ७२ वे स्थान मिळवले आहे.

उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून या क्रमवारीचे सूक्ष्मपणे मूल्यांकन करण्यात येते. २०२४ या वर्षाची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मासिकात नुकतीच जाहीर झाली. अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, भविष्यवेधी मार्गदर्शन, रिटर्न व इन्व्हेस्टमेंट आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या पाच मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते.

या क्रमवारीने सूर्यदत्तच्या समर्पित भावनेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव झाला आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेच्या मान्यतेने बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मान्यतेने डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात. उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सूर्यदत्तसाठी ही मान्यता प्रोत्साहन आहे. सद्यस्थितीत आरोग्य क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन इथे प्रात्यक्षिक व पाठ्यपुस्तकातील ज्ञान दिले जाते.

सूर्यदत्त कॉलेज फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (एससीपीएचआर) औषधनिर्माणशास्त्राच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा उद्योगातील विविध भूमिकांसाठी तयार करण्याचे ध्येय संस्थेचे आहे. महाविद्यालयाने औषधनिर्माण पद्धतींना सुधारण्यास आणि रुग्णांच्या देखभालीत सुधारणा करण्यासाठी अभिनव संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आधुनिक सुविधा आणि चांगल्या प्रकारे सुसज्ज प्रयोगशाळांसह, ‘एससीपीएचआर’ विद्यार्थ्यांना सिद्धांतात्मक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते. कॅम्पसमध्ये आधुनिक वर्गखोल्या आणि प्रगत सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना सतत विकसित होणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रातील करिअरसाठी मदत होते.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नामांकित क्रमवारीतील स्थानाबद्दल फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले. अतिशय महत्वाच्या अशा या क्रमवारीत ‘एससीपीएचआर’ला स्थान मिळाल्याचा आनंद आहे. यातून महाविद्यालयाची उत्कृष्टतेबाबत असलेली समर्पित भावना आणि उच्च प्रतीचे फार्मसी प्रोफेशनल घडविण्याचे ध्येय अधोरेखित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आलेख असाच उंचवत राहावा. तुम्हाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,कसबा धंगेकर च लढविणार

मुंबई :महाविकास आघाडी पक्षातील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (23 ऑक्टोबर 2024) जाहीर केली. त्यानंतर आज (24 ऑक्टोबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या 45 तर काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार

अक्कलकुवा (एसटी) – अॅड. के. सी. पाडवी
शहादा (एसटी) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
नंदूरबार (एसटी) – किरण दामोदर तडवी
नवापूर (एसटी) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
साकरी (एसटी) – प्रवीण बापू चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
रावेर – अॅड. धनंजय शिरिष चौधरी
मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड – अमित सुभाषराव झनक
धामणगाव रेल्वे – प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
अमरावती – डॉ. सुनिल देशमुख
तिवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
देवळी – रणजीत प्रताप कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
नागपूर उत्तर (एससी) – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
चिमुर – सतीश मनोहरराव वारजूकर
हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
नायगाव – मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
फुलंब्री – विलास केशवराव औताडे
मीरा भायंदर – सय्यद मुझफ्फर हुसैन
मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी (एससी) – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी – अमिन अमिराली पटेल
पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
भोर – संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ – रविंद्र हेमराज धंगेकर
संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
करवीर – राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले (एससी) – राजू जयंतराव आवळे
पलूस काडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

दुर्गम भागातील कातकरी पाड्यांवर  दिवाळी सरंजाम वाटप

जेधे फाऊन्डेशनच्या उपक्रमाने  उजळली वंचितांची मने !

पुणे :

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि  श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट(पुणे) या संस्थेच्या वतीने.मुळशी तालुक्यातील भोडे गावालगत असणाऱ्या दुर्गम अशा ४ कातकरी पाड्यांवर  दिवाळी सरंजाम   वाटप करण्यात आले. दिवाळी सण साजरा करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूचा समावेश त्यात होता. एकूण ४५ कुटुंबांना सरंजाम वाटप करण्यात आले.दि. २३ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम अध्यक्ष  कान्होजी दयानंद जेधे  यांच्या पुढाकाराने  झाला. यावेळी नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे,जयराज वाडेकर,अभिषेक गोळे,राजवीर जेधे,उमेश सपकाळ हे उपस्थित होते.या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते
‘अन्न,वस्त्र,पाणी,निवारा नसताना प्रतिकूल निसर्ग,दैनंदिन अडचणीना तोंड देत हलाखीची परिस्थिती जगणाऱ्या वंचितांची दिवाळी करण्यासाठी आम्ही  सर्व जण पायवाटा तुडवत दुर्गम भागात पोचलो.अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा सण साजरा करण्यासाठी  आणि माणुसकीचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला’,असे कान्होजी दयानंद जेधे यांनी सांगितले.जेधे मॅन्शन,गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिराजवळ(पुणे ) येथे असणाऱ्या या मंडळाला समाजभूषण आप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव जेधे यांचा वारसा आहे.अनेक पुरस्कार या मंडळाला मिळाले आहेत. विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात.
*माणुसकीचा धागा जोडणारा दिवाळी सरंजाम* 
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि  श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट या संस्थेच्या वतीने.देण्यात आलेल्या दिवाळी सरंजाममध्ये २ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो बेसन,डालडा ,तेल,मैदा,भाजके पोहे,फुटाण्याची डाळ,चकली भाजणी,खोबरे गोटा,मीठ,पिठी साखर,चिवडा मसाला,मोती साबण,उटणे,सुगंधी तेल,४ पणत्या,आकाश कंदील,फटाके,लाईट माळ ,रांगोळीचे रंग,रांगोळी स्टिकर,लक्ष्मी पावले,अत्तर,देवतांच्या तसबिरी,फुलांचे तोरण यांचा समावेश होता. 

आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन

शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार; दूध उत्पादक शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना प्रगतीची संधी

पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. बेनिसन मीडियाच्या पुढाकारातून ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होत असलेले हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत (दि. २६) सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात जवळपास १०० दूध व दुग्धजन्य उत्पादने आणि यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद मेश्राम, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ दूध) चेअरमन अरुण डोंगळे, जाफा कॉम्फीडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वाघ, द वर्ल्ड व्हेटर्नरी पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. जितेंद्र वर्मा, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे वसंतकुमार शेट्टी, कंपाउंड लिव्हस्टॉक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे चेअरमन दिव्याकुमार गुलाटी, यांच्यासह संयोजक प्राची अरोरा व आनंद गोरड आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिक, शेतकरी युवक, युवतींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.

डॉ. मिलिंद मेश्राम म्हणाले, “महाराष्ट्रात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दुधाचे उत्पादन व त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी दुभत्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे असते. जनावरांना चांगला चारा, पौष्टिक पशुखाद्य देण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लसीकरण, गरजेनुसार उपचार व्हायला हवेत.”

अरुण डोंगळे म्हणाले, “डेअरी आणि पशुखाद्याची सुरक्षा घेऊन होत असलेले हे प्रदर्शन शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, डेअरी व्यवसायाला पूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण केला पाहिजे. गोकुळने दर्जा जपत संकलन वाढवले आहे. लाखो लिटर दुधाचे संकलन आणि हजारो शेतकरी बांधव गोकुळचे सभासद आहेत.”

प्रकाश कुतवळ म्हणाले, “व्यवसायात नावीन्य असणे प्रगतीचे लक्षण आहे. डेअरीत चांगल्या दर्जाचे दूध मिळत नाही. दुधाच्या भेसळीवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर काम करणे अधिक महत्वाचे आहे. सहकार आणि खासगी अशा दोन शाखा या क्षेत्रात काम करतात. एखादी डेअरी किती दूध संकलित करते, यापेक्षाही त्याचा दर्जा काय, हे जास्त महत्वाचे आहे.”

प्राची अरोरा म्हणाल्या, “प्रदर्शनाचे आठवे वर्ष असून, यंदाची संकल्पना ‘मिल्क अँड फीड सेफ्टी’ अशी आहे. जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, निर्यातीमधील संधी, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केट यावर तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा झाली.”

गेल्या सातही प्रदर्शनांमध्ये अत्याधुनिक मशिनरींची प्रात्यक्षिके पाहून व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अनेक शेतकऱ्यांनी व ग्रामीण युवक युवतींनी स्वतःचा लघु व मध्यम स्वरूपाचा दुग्धजन्य पदार्थ किंवा पशुखाद्य निर्मिती प्रकल्प उभारून स्वतःच्या ब्रँडनेमने विक्री यंत्रणा सुरु केली आहे, असे आनंद गोरड यांनी नमूद केले.

प्रसाद वाघ यांनी दुधाच्या दर्जेदार उत्पादनात पशुखाद्य कसे महत्वाचे आहे, याविषयी माहिती दिली. वसंतकुमार शेट्टी यांनी पोल्ट्री उद्योगाविषयी आपले विचार मांडले. जयाविजया राव यांनी सूत्रसंचालन केले. अश्वनीकुमार यांनी आभार मानले.

पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल 

पुणे -पर्वती विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष  आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता येथील लढत आता रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पर्वती  मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांना वारंवार भेटून साकडे घातले होते.त्यांना पक्षश्रेष्ठींनी अनुकूलता दर्शवली आहे. सध्या   महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने,आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष , महाविकास आघाडी आणि अपक्ष म्हणून गुरुवारी (दि. २४ ) उमेदवारी अर्ज दाखल केला.  जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे,असा ठाम विश्वास व्यक्त करताना यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच आणि पर्वती मतदारसंघात परिवर्तन करणारच असा निर्धारही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे. परिणामी यंदा या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार असून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत.  

राजेश पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती

पुणे – महाराष्ट्र भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य आणि चौफेर संघटनशैलीने महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पांडे यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेत पक्षाने पांडे याना ही नवी जबाबदारी दिली आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर (एक्सवर) पोस्ट करून माहिती दिली आहे.

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षापासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. दहा वर्ष पूर्ण वेळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता. त्याचे नेतृत्व आणि नियोजन पांडे यांनी केलेले. तेव्हापासूनच त्यांच्या संघटन कौशल्याची चुकून दिसून आली.

अलीकडच्या काळात भाजप उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले. मेरी माती मेरा देश, हर घर तिरंगा असे अभियान त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवत गिनीज रेकॉर्ड पूर्ण केले. याशिवाय जी२० परिषद, अयोध्या दर्शन अभियान असे अनेक संघटन उपक्रम त्यांनी पूर्ण ताकदीने यशस्वीपणे राज्यभर अमलात आणले. पुणे पुस्तक महोत्सवाचे ते आयोजक आणि संयोजक असून आतापर्यंत ७ गिनीज रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.

शिक्षण, सहकार, साहित्य, कौशल्य विकास आणि रोजगार, आरोग्य, क्रीडा, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रात पांडे यांनी युवा सक्षमीकरणावर काम केले आहे. लोकसहभाग हा त्यांच्या कामाचा गाभा राहीला आहे. संघटन कौशल्य आणि सर्वपक्षीय जनसंपर्क हि त्यांच्या राजकीय कामाची ओळख सांगितली जाते.


नवीन जबाबदारी स्वीकारताना मी देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आभार मानतो. विधानसभा निवडणुका सुरु झालेल्या आहेत. पक्षाच्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे संघटनेचे संपूर्ण लक्ष्य भाजप आणि महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठीच्या नियोजनावर आहे. निवडणुकीसाठी बूथ रचना, सरकारच्या लोककल्याणकरी योजना लोकांपर्यंत पोहचवणे यावर सध्या काम सुरु आहे. – -राजेश पांडे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा

हडपसर मधून प्रशांत जगताप तर वडगाव शेरीतून बाप्पू पठारेंना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर ..

आज ४५ जागा जाहीर – खडकवासला ,पर्वती उद्या जाहीर करणार

पुणे-महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात इस्लामपूर येथून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काटोल येथून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, घनसांगवी येथून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंब्रा- कळवा येथून पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड व इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील,हडपसर मधून प्रशांत जगताप तर वडगाव शेरीतून बाप्पू पठारेंना, बारामतीतून युगेन्द्र पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीसारखीच हायव्होल्टेज लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा सामना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

नाव – प्रशांत सुदामराव जगताप
वय – ४६ महाविद्यालयीन शिक्षण नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ठाम व आक्रमक भूमिका घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांसोबत राहण्याचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौराचे नाव वगळणे हा पुणे शहराचा अपमान होता. महापौरपदाचा सन्मान राखण्यासाठी थेट संघर्ष

पुण्याच्या पाणीप्रश्नावरून तत्कालीन पालकमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. गिरीषभाऊ बापट यांच्याशी संघर्ष
महापौरपदाच्या कार्यकाळात ‘पीएमपीएमएल’चे सक्षमीकरण
पुण्यात २४ x ७ पाणीपुरवठा योजनेची सुरुवात
डिसेंबर २०१६ मध्ये महापौरपदाच्या कार्यकाळात पुणे मेट्रोचा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका. गेल्या चार वर्षांत सर्वाधिक आंदोलने

१९९७ – सामाजिक कार्यास सुरुवात
१९९९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य. पक्षात आतापर्यंत सरचिटणीस ते शहराध्यक्ष अशी २५ वर्षांची संघटनात्मक कारकीर्द
२००० – चिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००२ – सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००३ – सदस्य, पुणे महानगरपालिका परिवहन समिती (पीएमटी)
२००६ – पुनश्च सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००७ – आई रत्नप्रभाताई सुदाम जगताप नगरसेविका म्हणून विजयी
२०१२ – वानवडी – कोंढवा प्रभागातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून विजयी
२०१२ – पीएमपीएमएल संचालकपदी निवड
२०१६ – २०१७ – पुण्यनगरीच्या महापौरपदी निवड
२०१७ – नगरसेवक म्हणून विजयी
२०१९ – (विधानसभा निवडणूक) प्रभारी अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
७ मे २०२१ पासून – अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
माजी संचालक – एसआरए
माजी संचालक – पीएमआरडीए
माजी संचालक – पुणे स्मार्ट सिटी

भोसरीत पाण्याची टाकी कोसळून भीषण अपघात :

पुणे-भोसरीच्या सदगुरू नगर येथील लेबर कॅम्पमधील पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये पाच ते सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. अद्याप मृतांची नावे समोर आलेली नाहीत. तर पाण्याची टाकी कोसळली त्याठिकाणी आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन व पोलीस प्रशासन उपस्थित मदत काय॔ सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना घडली. यात पाच ते सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी ही पाण्याची टाकी महापालिकेची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाण्याची टाकी कोसळल्याची घटना जिथं घडली तो लेबर कॅम्प एन एन सी एल या कंपनीचा आहे. या लेबर कॅम्प मध्ये राहणारे सर्व बांधकाम मजूर आहेत. या मजुरांना आंघोळ करण्यासाठी ठेकेदाराने जवळपास 12 फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारली होती. सकाळी काही मजूर टाकी खाली आंघोळ करत होते. टाकीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याच्या टाकीचा संपूर्ण ढाचा कामगारांवर कोसळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

जिथे हा लेबर कॅम्प उभारण्यात आला होता ती जागा रेड झोनची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान संबंधित टाकी महापालिकेनं उभारलेली नव्हती मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे. तर घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.