Home Blog Page 621

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये शनिवारी (दि. १५) दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी ३४६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्याने स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन महावितरणच्या ८० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी गाव व भोसरी एमआयडीसी, मंचर ग्रामीण परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राबाहेर अदानीच्या कार्यक्षेत्रातील ४०० केव्ही टॉवर लाइनखाली अज्ञाताने गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला आज दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी तब्बल ३४६ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्हीसह चाकण, चिंचवड, भोसरी, ब्रीज स्टोन, थेऊर आणि काठापूर या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरणच्या ८० उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, सांगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोली, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे, सारा सिटी, आळंदी फाटा, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. यासह पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, जय गणेश साम्राज्य, किवळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, निगडी, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, ब्लॉक जे, क्यू, एस, ईएल, टी, जनरल ब्लॉक, मंचरचा ग्रामीण परिसर, नारायणगावचा पूर्व परिसर, केसनंदआव्हाळवाडीपेरणेथेऊरवडतीकुंजीरवाडीलोणी काळभोरसोरतापवाडीफुरसुंगीउरुळी देवाची आदी परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी ३.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत तासभर बंद होता.  

तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये पीजीसीआयएल अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर टॉवर लाइनखालीच गवत पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या गवताच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ही आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा

पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर वस्तीतील पारी कंपनी जवळील पुणे महापालिकेचा दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प हटविण्यात यावा अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.काल रात्री लागलेल्या भिषण आगीत कचरा विलिनीकरण प्रकल्प जळुन खाक झाला. प्रकल्पातील कामगार गावी गेल्याने सुदैवाने कोणी मृत्यूमुखी पडले नाहीत.याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार लोकवस्तीच्या पाचशे मीटर दूर अंतरावर कचरा विलिनीकरण प्रकल्प असावा असा नियम आहे याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने दाट लोकवस्तीच्या मध्यभागी प्रकल्प उभारला आहे . प्रकल्प सुरू झाल्या पासून सातत्याने या प्रकल्पाला भीषण आगी लागत आहे.त्यामुळे स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे ‌

रात्री सुदैवाने कामगार व आसपासच्या लोकवस्त्यांतील रहिवाशांचे प्राण वाचले मात्रआगीत लाखो रुपयांची साहित्य जळुन खाक झाले‌
धायरीच्या मध्यवस्तीतील या प्रकल्पामुळे सोसायट्यांसह परिसरात भितीचे वातावरण आहे.प्रशासनाने तातडीने प्रकल्प बंद करावा.भीषण आगीच्या घटनांमुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशी तक्रार धनंजय बेनकर, निलेश दमिष्टे, सनी रायकर, संदीप विठ्ठल पोकळे,संतोष चौधरी, चिंतामणी पोकळे, अमर खेडेकर,नेताजी बाबर, सुरेश परकर, अजय बेनकर या स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन

मुंबई, दि. १४ मार्च २०२४ : “शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जागतिक महिला आयोगाच्या ६९ व्या सत्रानिमित्त स्त्री आधार केंद्राने ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते.

या परिसंवादात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा पाठक यांनी केले.

शिक्षण, महिला चळवळ आणि साहित्याचे महत्त्व – तारा भवाळकर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी यावेळी सांगितले की, “पूर्वी महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असे, परंतु मौखिक परंपरेद्वारे ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” त्यांनी ग्रामीण महिलांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. “गृहकृत्ये करताना स्त्रिया गाणी गात असत, त्यातून त्यांचे दुःख आणि आनंद व्यक्त होत असे. साहित्य हे केवळ औपचारिक शिक्षणापुरते मर्यादित नसून, ते अनुभवांवर आधारित आहे,” असे त्यांनी सांगितले.
आपत्ती व युद्धानंतर महिलांचे प्रश्न बाजुला पडतात : चांदनी जोशी , नेपाळ
नेपाळमध्ये, जेव्हा मला समजले की सुमारे तीन वर्षांपूर्वी महिला मंत्रालयाला इतर मंत्रालयांसोबत एकत्र केले जाणार आहे, तेव्हा सर्व महिलांच्या विचारमंथन गटाने पंतप्रधानांकडे धाव घेतली. त्यामुळे, आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी संवाद साधला आणि समजून घेतले की त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती. त्यानंतर, आता तिथे एक स्वतंत्र आणि पूर्ण सक्षम महिला मंत्रालय अस्तित्वात आहे.
असे चांदनी जोशी, नेपाळ यांनी मांडले
युरोपमधील कायदे आणि महिलांवरील हिंसाचार – अॅड. प्रणिता देशपांडे

युरोपमधील महिलांविरोधी हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर बोलताना अॅड. प्रणिता देशपांडे यांनी स्पेन आणि स्वीडनमध्ये घरगुती हिंसाचारासाठी विशेष न्यायालये कार्यरत आहेत असे सांगितले. “इस्तंबूल करार हा महिलांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अशा आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी भारतातही प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.”

चौथे राज्य महिला धोरण आणि ६९ वा जागतिक महिला आयोग – जेहलम जोशी

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. “लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण, निर्णय प्रक्रिया, गरिबी निर्मूलन, आरोग्यसेवा आणि सशस्त्र संघर्ष थांबवणे या महिलांशी संबंधित क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सुधारणा गरजेच्या आहेत,” असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय महिला धोरण आणि बदलते सामाजिक संदर्भ – डॉ. पाम रजपूत

राष्ट्रीय महिला आंदोलन अभ्यासक डॉ. पाम रजपूत यांनी बीजिंग+30 संदर्भात चर्चा करताना सांगितले की, “जागतिक ६९ व्या आयोगाच्या सत्रात पहिल्याच दिवशी जागतिक राजकिय सनद घोषित करण्यात आली. ९५ च्या कृती रूपरेषा निर्णयांचे महत्व अधोरेखित करण्यात येऊन शाश्वत विकास ऊद्दिष्टांशी समन्वयावर भर देण्यात आला आहे. न्युयॅार्कच्या येथील वातावरणातही स्री आधार केंद्राच्या या कृतीसत्रात ग्लोकल अशा दोन्हीवरील कृतीबाबत विचार केला जात आहे हे स्वागतार्ह आहे.’

स्त्री आरोग्य हक्क आणि समाजातील बदल – नीरजा भटनागर

विकास सल्लागार नीरजा भटनागर यांनी प्रजनन आरोग्य आणि मासिक पाळी व्यवस्थापन यासारख्या महिलांसंबंधी समस्यांवर प्रकाश टाकला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “भारतासह अनेक देशांमध्ये महिलांच्या आरोग्यासंबंधी मूलभूत अधिकारांकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे धोरणे आणि योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे प्रत्यक्षात व जागतिक महिला आयोगाच्या सत्रातही सनदेतुन हा विषय वगळला गेला हे चिंताजनक आहे .’

कचरा व्यवस्थापन आणि महिला सशक्तीकरण – शिरीष फडतरे

शिरीष फडतरे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील संधींवर चर्चा केली. “कचऱ्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्याचा उपयोग इंधन निर्मितीसाठी करता येतो. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.

नीलमताईंमुळे संकटग्रस्त महिलांना मदत – अंजली वाघमारे

सामाजिक कार्यकर्त्या अंजली वाघमारे यांनी संकटग्रस्त महिलांना त्यांच्या अडचणींवर मात करण्यास मदत केल्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, डॉ. नीलमताईंमुळे महिलांची राजकारणातील प्रतिमा सुधारली असून, काही महिला सरपंच किंवा गावप्रमुख बनू शकल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.

त्यानंतर, परिसंवादाच्या समारोपात ओएसडी श्री. अविनाश रणखांब यांनी सर्वांचे आभार मानले.
समारोप करतांन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, महिलांना समान वेतन आणि संधी मिळण्यासाठी केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यासाठी न्यायसंस्थेने अधिक सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. तसेच, समाजातील लिंगभेद दूर करून महिलांना सर्वच स्तरांवर समता मिळवून देण्यासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बदल आवश्यक आहे.

त्यांनी ऊसतोड मजूर महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधत सांगितले की, मजुरीच्या क्षेत्रात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे, त्यांच्यासाठी विशेष धोरणे आखून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिलांना डिजिटल शिक्षण मिळावे, सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन छळ यांसारख्या समस्यांवर कठोर कायदे करणे गरजेचे आहे. शेवटी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कायद्यांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर संपूर्ण समाजाने महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. “जगभरातील विविध देशांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू आहे. परंतु लिंग समानतेच्या दिशेने अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. यासाठी महिला कार्यकर्त्यां, लाडकी बहिणींचा नेतृत्व विकास , महिलांसाठी सुरक्षित आणि न्यायसंगत समाज घडवण्यासाठी अंमलबजावणीस चालना देण्याच्या सुचना सरकारकडे केल्या जाणार आहेत. ना. देवेंद्र फडणवीस, ना. एकनाथ शिंदे, ना.अजित पवार यांचेकडे मी अधीवेशनात मांडलेल्या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करायला सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन करत त्यांनी परिसंवादाची सांगता केली.

औरंगजेबाला 27 वर्षे राहूनही इथे राज्य करता आले नाही त्याचे प्रतीक म्हणजे ही कबर -रोहित पवार

मुंबई- औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणून त्याच्या खुलताबाद येथील कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी नुकतेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचे विधान केले होते. त्यानंतर आज रोहित पवारांनी हे विधान केल्यामुळे या प्रकरणी शरद पवार गटात मतभेद असल्याचे अधोरेखित झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा, अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कबर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.

रोहित पवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मोगल बादशहा औरंगजेब उत्तरेतून येऊन महाराष्ट्रात तब्बल 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणजे त्याची ही कबर आहे. ही कबर आज उखडून टाकली, तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल.

तत्पूर्वी, शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व गौरवाचे प्रतीक आहे. त्यांच्या शौर्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळाला पाहिजे. त्यामुळे ही कबर उखडून टाकू नये. सरकार राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी असे काहीतरी समोर आणत आहे. ते सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांवर बोलण्यास तयार नाही, असे म्हणाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी रोहित पवार व अभिजीत पाटील यांच्याहून वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष नव्हता असे म्हणत थेट औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. ते गत 11 मार्च रोजी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष किंवा समाजसेवक नव्हता. त्याला तुम्ही सामाजिक रूप देऊ नका. त्याची कबर हटवण्यात गैर नाही. त्यामुळे त्याची कबर काढून टाकली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.नीलेश लंके यांच्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात औरंगजेबाच्या कबरीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेने आज अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयी 17 तारखेला सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील, असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यामुळेखुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी एसआरपीएफची 1 तुकडी, तसेच 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडले जात आहे .

विकास कामांची बिले २४ मार्च पर्यंतच सादर करा, मुदतवाढ मिळणार नाही- आयुक्तांनी केले स्पष्ट

पुणे – महापालिकेच्या विविध विभागाकडून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही अखेरच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर करतात. यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. हे प्रकार बंद करण्यासाठी २४ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच तरतूद लॅप्स झाली तर त्याची जबाबदारी विभाग प्रमुख यांच्यावर असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नसल्याने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके २४ मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, या मुदतीत बिला सोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रासंह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रासह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास किंवा तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबधित खात्याची, विभागाची राहील. याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबधितांना वरील बाबतची सूचना देऊन विहित केलेल्या वेळेत बिले मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची सर्व खाते प्रमुख यांनी दक्षता घ्यावी. असेही आदेशात म्हटले आहे.


बनावट सर्टिफिकेट देऊन महापलिकेत रुजू झालेला अधिकारी म्हणतो ,मीच होणार आता शहर अभियंता ….

पुणे- महापालिकेत प्रशासकीय काळात बहुतांशीअधिकारी आणि कर्मचारी वर्ग बदलण्यात आला आहे, सर्वत्र नवे चेहरे दिसू लागले आहेत . कर्मचारी आणि त्यांचे खाते प्रमुख यांच्या संगनमताने घोटाळेबाज कारभार सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांच्या सारखी मंडळी महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेऊन अंकुश ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना आता या तिघांनी नुकताच गंभीर आरोप केला आहे. ड्रेनेज विभागातील अधिकारी आपले उखळ पांढरे करत आहेत तर बनावट सर्टिफिकेट देऊन महापलिकेत रुजू झालेला अधिकारी…मीच होणार आता शहर अभियंता …. अशी डरकाळी फोडताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय कारकिर्दीत लोकप्रतिनिधी नसताना कारभार अंकुश हिन प्रशासकीय मार्गाने चालतो आहे असे वाटावे अशी स्थिती आहे. असे असताना ड्रेनेज विभागात कामे कागदोपत्री दाखवून १०० कोटीची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात उज्वल केसकर यांनी प्रसिद्धीसाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नावे पाठविलेले पत्र येथे जसेच्या तसे देत आहोत … वाचा

माननीय प्रशांत वाघमारेजी शहर अभियंता
पुणे मनपा
सप्रेम नमस्कार,

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या कामाची पूर्तता करणे हे प्रत्येक अभियंत्याचे काम आहे.
ड्रेनेज विभागातील काही अधिकारी याबाबत मनापासून स्वतःचे उखळ पांढरे करीत आहेत.
ड्रेनेज विभागाच्या प्रत्येक कामाची आम्ही पुणेकर नागरिक म्हणून तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. #लक्षआहेआमचे
याबाबत आपण सर्व संबंधितांना कामाची तपासणी केल्याशिवाय खालच्या अधिकाऱ्यांनी सही केली म्हणून आम्ही केली असे सांगण्याचे स्वातंत्र्य न देता कामाची प्रत्यक्ष पाहणी करा जवळपास 100 कोटी रुपयांची ही कामे निघणार आहेत अशी आमची माहिती आहे.
त्याचे वाटप झाले आहे
कोणीतरी एक बनावट सर्टिफिकेट देऊन मनपा सेवेत रुजू झाले आहे आणि तो म्हणतो मी एक दिवस शहर अभियंता होणार त्याच्या आणि त्याच्या वरिष्ठांच्या प्रत्येक फाईल ची तपासणी होणे आवश्यक आणि गरजेचे आहे.
यात सर्व झोल आहे
.

आपले पुणे
आपला परिसर

उज्ज्वल केसकर

सुहास कुलकर्णी
माजी विरोधी पक्षनेता

प्रशांत बधे
माजी नगरसेवक
१६/३/२५

पीएमआरडीएकडून अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी,सोमवारपासून महामार्गासह मुख्य रस्त्यांवर होणार संयुक्त कारवाई

पुणे : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहिम यशस्वी पूर्ण होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी १७ ते ३० मार्चदरम्यान करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमिनदोस्त करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी विभागांमार्फत ३ ते १३ मार्चपर्यंत २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला आहे. यासह अनेक स्थानिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली. या अतिक्रमणविरुद्धच्या मोहिमेचा पहिला टप्पा संपत आला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात पुणे शहराच्या महामार्गासह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १७ ते ३० मार्चदरम्यान संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईमध्ये महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहे. पुढील टप्प्यामध्ये संयुक्त कारवाई ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई १७ ते ३० मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पुणे म.न.पा, पिंपरी चिंचवड म.न.पा हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

महामार्गाचे नाव, कारवाईची तारीख
१) पुणे–सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे) दि. १७ ते ३० मार्च २०२५
२) सुस रोड, दि. १७ ते ३० मार्च २०२५
३) हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, दि. १७ ते ३० मार्च २०२५
४) नवलाख उंब्रे ते चाकण, दि. १७ ते ३० मार्च २०२५
५) हिंजवडी परिसर – माण, दि. १७ ते ३० मार्च २०२५
६) तळेगाव – चाकण – शिक्रापूर, दि. १७ ते ३० मार्च २०२५

विविध रस्त्यांवर १३ मार्चपर्यंत झालेली कारवाई
१) पुणे–नाशिक महामार्गावरील चिंबळी (बर्गेवस्ती) ते सांडभोरवाडीपर्यंत अंदाजे २९ किलोमीटर परिसरात ३ ते १३ मार्चपर्यंत ८९८ अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून त्याचे अंदाजे क्षेत्रफळ ८९८०० चौ. फूट आहे.
२) पुणे-सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने अंदाजे ३३ किलोमीटर परिसरात १०४७ स्ट्रक्चर्सवर कारवाई करण्यात आली असून त्याचे अंदाजे क्षेत्रफळ १०४७०० चौ. फूट आहे.
३) चांदणी चौक ते पौड रस्त्याच्या बाजूस अंदाजे २१ किलोमीटर परिसरात ५५७ स्ट्रक्चर्सवरील कारवाई अंदाजे क्षेत्रफळ ५५७०० चौ. फूट आहे.

ग्राहकांनी सदैव जागरुक ग्राहक असावे – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर

पुणे, दि.१५: बाजारामध्ये अनेक प्रकारे फसवणूक होऊ शकते ती टाळण्यासाठी ग्राहकांनी सदैव जागरूक ग्राहक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वारगेट मेट्रो स्थानक येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. जवळेकर बोलत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश कांबळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील उपस्थित होते.

श्री. जवळेकर म्हणाले की, वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने जागरुक असणे आवश्यक आहे. आपल्या जागरुकतेमुळे दुसऱ्या एखाद्या नागरिकाची फसवणूक वाचू शकते. सर्वसामान्य जनतेला बाजारामध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होऊ शकते याची माहिती या प्रदर्शनातून चांगल्या प्रकारे मिळेल. दुकानदारांनी आणि विभागांनी आपली जबाबदारी पार पाडताना ग्राहकाला दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध द्याव्यात जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी दाद मागावी लागू नये, असेही ते म्हणाले.

श्री. तुषार झेंडे पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण परिषदेची जबाबदारी ही ग्राहक संरक्षणाचे कायदे व ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती व जाणीव करुन देणे ही आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना लेखी बिल किंवा पावती घेणे. उत्पादन, उत्पादनाची तारीख, वापराची कालमर्यादा, किंमत, उत्पादन करणारी कंपनी आदी माहिती वस्तूवर छापणे बंधनकारक असून खरेदी करताना ग्राहकांनी ही बाब तपासून घेणे गरजेचे आहे. आता ऑनलाइन सेवा व खरेदीतही ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. यासाठीही ऑनलाईन तक्रार दाखल करता येते, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केले. यावेळी ॲड. समृद्धी ढवण, ॲड. अनिता गवळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैधमापन शास्त्र, जिल्हा व सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, बीएसएनएल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यावतीने स्टॉल लावण्यात आले होते.

महाराष्ट्रातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा भाजपा युती सरकारचा प्रयत्न, फडणवीस मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना: हर्षवर्धन सपकाळ

0

सिंधुदुर्ग/मुंबई, दि. १५ मार्च २५

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वी. स. खांडेकरांचा जन्म झाला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते असा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडवगावर यांचा हा जिल्हा, मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे, एकापेक्षा एक सरस खासदार या जिल्ह्यातून झाले, ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे.
नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले, त्यांचा परभाव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले पण नंतर ते कडगोळे घेऊन दुसऱ्य़ा पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते व सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे, संस्कृती मोडून काढायची आहे. आगामी काळात हा जिल्हा काँग्रेसमय करा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा.पुष्पा चित्रपटातील झुकेगा नही साला या भावनेने काम करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे. काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेसचा विचार जिवंत ठेवा, हा विचार जिल्ह्यातील घरोघरी पोहचवा असे आवाहन सपकाळ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २०० वर्षानंतर महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली या दोनशे वर्षामध्ये भाजपाच्या त्याकाळातील पिल्लावळींना महाराजांचा इतिहास पुढे आणू द्यायचा नव्हता, आताही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एकही पुरावा ठेवायचा नाही यातून काही विध्वंसह घटना या लोकांना करायच्या आहेत. या विखारी विचारसरणीला थांबवावे लागणार आहे. असेही सपकाळ म्हणाले.

यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी आदी उपस्थित होते.

२७२७ कोटीचे उद्दिष्ट पण वसुल झाले २१५० कोटीच.. आता महिलांचे ‘दामिनी’पथक देणार झुंज

पुणे शहरात कर संकलनाच्या अनुषंगाने दामिनी महिलांची 12 पथके तयार करण्यात आलेली आहे सदर प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांचेमार्फत शहरातील थकबाकीदार मिळकतींची पाहणी करून वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सदरचा प्रयोग हा प्रथमच राबवण्यात आलेला असून त्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे सदर पथकाकडून दहा लाख इतके रक्कम थकबाकी जमा करण्यात आली असून तीन मिळकती जप्त करण्यात आलेले आहेत

-उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप

उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप , महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , प्रशासन अधिकारीरवींद्र धावरे सर, प्रशासन अधिकारी सोपान वांजळे , प्रशासन अधिकारी श्रीमती.रजनी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पेठ धायरी येथे मध्यवर्ती महिला वसुली पथक व टीम यांचे समवेत मिळकत कारवाईसाठी गेलेल्या पथकाने , मिळकतदाराकडून PDC व चालू चेकने रक्कम रुपये दहालाख रुपये वसूल केले.ही वसुलीमहिला पथक प्रमुख वंदना पाटसकर, प्रीती चव्हाण,शुभांगी खसासे वैशाली कामथे दिपाली चव्हाण गौतमी कोडम व सर्व विभागीय निरक्षक पेठ निरीक्षक चेतन मोकाशी यांनी केली.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मिळकतकर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.यासाठी महिलांची १२ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यात ६० महिलांचा समावेश आहे.पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७२७ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण या वर्षात हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे जवळपास निश्‍चित झाले असून, आत्तापर्यंत २१५० कोटी रुपयेच वसुल झाले आहेत.त्यामुळे उर्वरित १५ दिवसात सुमारे ६५० कोटी रुपये कर वसुली करणे प्रशासनाला अशक्य आहे. पण या शेवटच्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर वसुली करून ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरु आहेत.त्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बॅंड वाजविणे, इमारती जप्त करणे, टाळे ढोकणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी खास महिला कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसुलीचे १४ पथक तयार केले आहेत. त्यात ६० महिलांचा समावेश आहेत.

मिळकतकर विभागाचे उपयुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीच्या वसूलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १२ पथके वसूलीसाठी नेमण्यात आली आहेत.महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असून, पहिल्या दिवशी या पथकाने तीन मिळकती जप्त केल्या आहेत. तर १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

लिंगायत महिला मंचतर्फे ताणतणाव व्यवस्थापन आणि फिटनेस मार्गदर्शन 

महिलांसाठी रॅम्पवॉक स्पर्धा ; मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
पुणे: लिंगायत महिला मंचाच्या वतीने महिलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आपटे रस्त्याजवळील सेंट्रल पार्क येथे करण्यात आले होते. महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ताणतणाव व्यवस्थापन आणि फिटनेस यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आणि योग्य आहार, व्यायाम व मानसिक स्वास्थ्याची महत्वाची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी उपक्रमासाठी सुप्रिया हत्ते, सुप्रिया गाडवे, नीना लिगाडे, राजश्री हापसे, सीमा तोडकर आणि सोनाली कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांसाठी रुद्रपठण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला  तसेच, रॅम्पवॉक विशेष आकर्षण ठरला, जिथे विविध वयोगटातील महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला. या स्पर्धांचे परीक्षण रूपा सुत्तट्टी आणि पल्लवी शिवकुमारश्री यांनी केले. विविध कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली असून, त्यांना स्वतःच्या आरोग्याची आणि सशक्तीकरणाची जाणीव यानिमित्ताने झाली आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका:शरमन जोशी

‘एमआयटी एडीटी’च्या ‘पर्सोना महोत्सवा’चा समारोप

पुणेः आयुष्य प्रचंड आव्हानात्मक आहे. मात्र आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला ‘ऑल इज वेल’ म्हणत विद्यार्थ्यांनी धीराने तोंड द्यायला हवं. यासह, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात करिअर करायला हवं. आवडीचे क्षेत्र ठरल्यानंतर परिणामाची चिंता न करता 

‘नेवर गिव अप’ वृत्ती स्विकारुन यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका आणि यश प्राप्तीनंतर त्यात झोकून देऊन आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. या प्रक्रियेत ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांचाच विचार करावा व ज्या नाहीत त्यांची चिंताच करू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते

शरमन जोशी यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोत्सवाच्या समारोपात बोलत होते. याप्रसंगी, शरमन यांच्या पत्नी प्रेरणा चोप्रा-जोशी

, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.विपुल दलाल, डाॅ.रेणू व्यास, डाॅ.सुराज भोयार आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी शरमन जोशी यांनी त्यांच्या ‘थ्री इडियट्स’ या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील ‘गिव मी सम सनशाईन’ या गाण्यातील कवितेच्या ओळी म्हणत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील विचाराप्रमाने एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांचे तोंडभरून कौतुक देखील केले.  प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना २००९ साली अमीर खान व शरमन जोशी यांचा सहभाग असणारा

, ‘थ्री इडियट्स’ हा अतिशय सुंदर सिनेमा पाहण्यात आला. त्या सिनेमात देण्यात आलेल्या संदेशा प्रमाणे विद्यार्थ्यांना कला, डिजाईन आणि तंत्रज्ञान यांचा संगम असणारे व त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे शिक्षण देणारे एखादे विद्यापीठ असावे, अशा विचाराने एमआयटी एडीटी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, असे ते शरमन जोशी यांना उद्देशून म्हणाले. तसेच, पर्सोना सारखे महोत्सव विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे तथा त्यांच्यातील कलेचा साक्षात्कार करून देणारे उत्तम व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता, पसायदानाने करण्यात आली. ज्याचे, प्रास्ताविक डाॅ.सुराज भोयार यांनी तर आभार, डाॅ.सुदर्शन सानप यांनी मानले. 

वर्षातील सर्वोत्तम ‘पर्सोनां’चा गौरव-पर्सोना महोत्सवाच्या समारोप प्रसंगी, विद्यापीठात वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट पर्सोना ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये तन्वी बोगाडे, अनुष्का जोशी, शिवनेश मोरे, मृण्मयी गोडमाने, सौरेश जबे, तेजस डोंगरे, अक्षत वशीष्ठ, धीर जैन, ओंकार शिंदे, अमोघा पाठक, राहुल देवगावकर, कॅडेट हरमनदीप कौर, आर्या पाटणकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासह, ‘एमआयटी एडव्हेंचर क्लब’ला वर्षातील सर्वोत्तम क्लब म्हणून गौरविण्यात आले.

औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची औरंगजेबाच्या कबर विरोधात तीव्र भूमिका : दिनांक १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन
पुणे : औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चे काढेल, आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आहे. तसेच पुण्यात सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ ( फाल्गुन कृष्ण तृतीया, छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११.३० वाजता आंदोलन करून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणार आहोत, अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली

यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे,श्रीपाद रामदासी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी ,विश्वासघात व हिंदू द्वेष यात घालविणारा,आपल्या सख्या भावांचे खून करणारा,बापाला कैदेत टाकणाऱ्या, काशी विश्वनाथ,मथुरा,सोमनाथ मंदिरे फोडणारा ,छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली पाहिजे.

नितीन महाजन म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही.

स्वतःच्या वडीलांना तुरुंगात टाकून मारणारा, स्वतःच्या भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही त्याच्यासाठी राष्ट्रातले नागरिक व समाजाची काय किंमत असणार ? अशा राष्ट्रघातकी, क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमी असेल.

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) भांडवल बाजाराची प्रमुख नियामक संस्था. मुंबईतील न्यू इंडिया बँकेच्या पाठोपाठ इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांना कोट्यावधी रुपयांचा “चुना” लागला आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नियामक खरोखरच लायकीचे किंवा योग्य क्षमतेचे आहेत किंवा कसे हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. फक्त “दुर्वा “उपटण्याचे काम या नियामक संस्था करतात काय? त्यांना जाब विचारण्याची व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. इंडसइंड बँक प्रकरणाचा घेतलेला धांडोळा.

इंडसइंड बँकेने गेल्या पाच वर्षात त्यांचा व्यवसाय वाढवताना अनिवासी ठेवींवर (एनआरआय) विशेष भर दिलेला होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जादा व्याजदरही देण्यात येत होता. बँकेच्या ताळेबंदानुसार डिसेंबर 2024 अखेरच्या तिमाहीमध्ये बँकेकडे 58 हजार 600 कोटी रुपयांच्या अनिवासी ठेवी होत्या. एका बाजूला ही ठेवीतील वाढ खूप चांगली झालेली असली तरी त्याचबरोबर बँकेचा ताळेबंद स्वच्छ असणे, बँकेचे परकीय चलन व्यवहार पारदर्शक व योग्य असणे अपेक्षित होते. परंतु बँकेची याबाबतची अंतर्गत रचना अत्यंत गुंतागुंतीची असून खूप जोखमीची होती. परकीय चलनातील ठेवी हा अत्यंत महत्त्वाचा व जोखमीचा विषय असतो. उदाहरणार्थ एखादा अनिवासी भारतीय बँकेत आला व त्याने एकरकमी दहा लाख डॉलर्सची मुदत ठेव एक वर्षासाठी ठेवली. तर या रकमेचे रूपांतर भारतीय रुपयांमध्ये त्यावेळेचा विनिमय दर लक्षात घेऊन केले जाते.अर्थातच ही रक्कम बँकेतर्फे कर्ज वितरणासाठी वापरली जाते. मात्र या ठेवीची मुदत संपली की किंवा मुदत संपण्यापूर्वीच तो ठेवीदार ही रक्कम परकीय चलनामध्ये परत घेऊन जातो. यामुळे परकीय चलनाची गुंतवणूक जोखीम बँकेला टांगत्या तलवारीसारखी असते. ही जोखीम कमी करण्यासाठी इंडसइंड बँकेने ‘ हेजिंग’ च्या पर्यायाचा वापर केला. अर्थात अशा प्रकारे परकीय चलनातील व्यवहाराचे ‘हेजिंग’ करणे हा एक धोरणात्मक निर्णय असतो व तो बँकेने केलाच पाहिजे अशी आवश्यकता नसते.

प्रत्येक बँकेमध्ये ‘ॲसेट – लायबिलिटी मॅनेजमेंट’ विभाग असतो. त्यांची प्रामुख्याने जबाबदारी असते ती बँकेची सर्व येणी आणि देणी यांचे योग्य व्यवस्थापन करणे. अर्थातच यामध्ये परकीय चलनातील ठेवींचा समावेश असतो. त्यामुळे हा विभाग नेहमी एकूण मालमत्ता, दायित्व, व्यवसायातील रोख रकमेची ये-जा ( कॅश फ्लो) तसेच चलनविनिमय दरातील चढ उतार व त्यातील जोखीम या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. वर उल्लेख केलेली मुदत ठेव हातात आली तर त्याचे रूपांतर साधारणपणे एक डॉलरला 87 रुपये असा दर लक्षात घेतला तर बँकेला 8.70 कोटी रुपये रक्कम हातात मिळते. त्यामुळे बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेनुसार ही रक्कम चलनाचे खरेदी विक्री करणाऱ्या’ ट्रेडिंग डेस्क’ ला दिली जाते. त्यावेळी 8.70 कोटी रक्कम ॲसेट मॅनेजमेंट करणाऱ्या विभागाला मिळते. त्यानंतर हे दोन्ही विभाग एकमेकांना ठराविक मुदतीने म्हणजे पंधरवडा किंवा महिन्याने व्याजाची देवाण घेवाण करतात. अर्थात ते करताना डॉलर व रुपया यांचा विनिमय दर व प्रचलित व्याजदर लक्षात घेतला जातो. या ठेवीची मुदत संपते तेव्हा ‘ट्रेडिंग डेस्क’ दहा लाख डॉलर्स परत करते व त्या बदल्यात त्यांना 8.70 कोटी रुपये अधिक त्यांनी ठरवलेली फी मिळते. या सर्व व्यवहारांमध्ये डॉलर व रुपया यांच्या विनिमय दरातील चढ-उतार व व्याजदरातील फरक लक्षात घेऊन अंतर्गत रित्या हे व्यवहार पूर्ण केले जातात.

याच वेळी ‘ट्रेडिंग डेस्क’ हा काही आंतरराष्ट्रीय बँकांबरोबर परकीय चलनाचे डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार करतात. म्हणजे कागदोपत्री डॉलर्सचे खरेदी – विक्री व्यवहार करतात. विनिमय दरामध्ये सातत्याने लक्षणीय चढ उतार होत असल्यामुळे बँकेची अंतर्गत यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारातील खरेदी-विक्रीची जोखीम याचा ताळमेळ न बसल्यामुळे इंडसइंड बँकेला अशा व्यवहारात कोट्यावधी रुपयांचा फटका बसून तोटा झाल्याचे लक्षात आले. वरील उदाहरणात विनिमयाचा दर 80 रुपये झाला तर त्याचा किती फटका बसू शकतो हे लक्षात येऊ शकते. म्हणजे प्रत्येक अनिवासी ठेवी मागे आणि चलनाच्या विनिमय दरातील चढ उतारामुळे बँकेला काही लाख रुपयांचा तोटा होत राहीला. त्यातच त्यांना दिलेला जादा व्याजदर काही तोटा वाढवणारा होता व या सर्वाचा परिणाम बँकेच्या एकूण ताळेबंदावर अत्यंत विपरीत पद्धतीने झालेला होता. अर्थात या ठेवी फक्त डॉलर्समध्ये नसून अन्य चलनातील म्हणजे येन, युरो यामध्येही असल्याने त्यातील चढ उताराचा बसणारा जादा फटका सहज लक्षात येऊ शकतो.

इंडसइंड बँकेने बँकेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व व्यवहारात सुमारे 2100 कोटी रुपयांचा तोटा बँकेला झालेला आहे. ही रक्कम बँकेच्या एका तिमाहीच्या नफ्याएवढी लक्षणीय आहे. आजच्या घडीला बँकेकडे 4 लाख कोटींच्या ठेवी आहेत तर 3.60 लाख कोटींची कर्जे त्यांनी दिलेली आहेत. बँकेचे एकूण भांडवल ( नेट वर्थ) 65 हजार कोटीच्या घरात आहे. तसेच सरकारी रोखे व बाँड्समध्ये एकूण गुंतवणूक 1.18 लाख कोटींच्या घरात आहे. म्हणजे एकूण ठेवींच्या तुलनेत जवळजवळ 45 टक्के ठेवींची बँकेची द्रवता आहे. तसेच आजच्या घडीला बँकेच्या सर्व मालमत्ता विकल्या व काही अनुत्पादित बुडीत कर्जे लक्षात घेतली तरीही सर्व ठेवीदारांच्या रकमा परत देण्याची क्षमता बँकेत आहे. त्यामुळे या बँकेत आजच्या घडीला तरी कागदोपत्री काही धोका वाटत नाही.

परंतु रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना प्रचंड त्रास देतात, झारीतल्या शुक्राचार्या सारखे चांगल्या बँकांची अडवणूक करतात असे चित्र आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका किंवा इंडसइंड सारख्या खाजगी बँकांच्या बाबतीत नियामक मूग गिळून बसलेले दिसतात. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकाद्वारे 1 एप्रिल 2024 पासून बँकांमधील डेरीव्हेटीव्हजच्या अंतर्गत व्यवहारांना बंदी घातलेली आहे. त्यामुळेच इंडसइंड बँकेने अंतर्गत लेखापरीक्षण केल्यानंतर त्यांना एवढा मोठा तोटा झाल्याचे लक्षात आले व त्यांनी ते मान्य केलेले आहे. हा तोटा अलीकडचा नाही. या बँकेला गेल्या पाच ते सात वर्षातील एवढा प्रचंड वाढणारा तोटा लक्षात आला नाही ही अंतर्गत लेखापरीक्षणातील गंभीर चूक आहे. बँकेचे जोखीम व्यवस्थापन व अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षण प्रक्रिया यातील त्रुटी यामुळे चव्हाट्यावर आल्या आहेत. यात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे किंवा कसे हे निश्चित सांगता येणार नाही पण इंडसइंड सारखा प्रकार अन्य काही बँकांमध्ये झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंडसइंड बँक सध्या विविध घडामोडींमुळे चर्चेत व अडचणीत येताना दिसत आहे. बँकेच्या प्रमुख वित्त अधिकाऱ्याने अलीकडेच तडका फडकी राजीनामा दिला. एवढेच नाही तर सर्वात गंभीर बाब आहे ती इनसाईडर ट्रेडिंग सारख्या गंभीर गुन्ह्याची. बँकेची सर्व अंतर्गत माहिती असणाऱ्या वरिष्ठ मंडळींनी गेल्या काही महिन्यात त्यांचे समभाग बाजारात विकून मोठा नफा कमावलेला आहे.
बँकेला मोठा तोटा झाल्याची त्यांनाच फक्त माहिती होती.त्यामुळे त्यांनी त्याचा वापर करून शेअरची बाजारात खुली विक्री केली. हा इनसाईडर ट्रेडिंग चा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. बँकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुमंत कठपालिया यांनी सरासरी 1437 रुपयांना शेअर्स विकून 118 कोटी रुपये मिळवले आहेत तर उपप्रमुख कार्यकारी अधिकारी खुराणा यांनी 1451 रुपयांना शेअर्स विकून 70 कोटी रुपये मिळवले आहेत. या दोघांनी हे व्यवहार गेल्या काही महिन्यात केलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक परदेशी वित्त संस्थांनीही गेल्या सात आठ महिन्यात त्यांच्याकडील भाग भांडवलाची विक्री केली. त्यांच्याकडे 40.3 टक्के भाग भांडवल होते ते डिसेंबर अखेरीस 24.7 टक्क्यांवर घसरलेले आहे.गेल्या दोन-तीन महिन्यात अजून विक्री झालेली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातील स्थानिक वित्त संस्था व म्युच्युअल फंडांनी यामध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यांचे भाग भांडवल 28 टक्क्यांवरून तब्बल 43 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. ज्या स्थानिक वित्त संस्था व म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली त्यांचे बाजार मूल्य 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरलेले आहे. आजमीतिला बँकेच्या प्रवर्तकांकडे 16 टक्के भाग भांडवल आहे तर स्थानिक वित्त संस्थांचे भाग भांडवल 50 टक्क्यांपेक्षा जास्त झालेले आहे. यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, मिराई ॲसेट, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूटीआय, एलआयसी,टाटा,महिंद्रा, क्वांटम असे देशातील सर्व टॉप 25 म्युच्युअल फंड आहेत. आणि या सर्वांना मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना साहजिकच मोठा चुना इंडसइंड बँकेच्या प्रकरणात लागलेला आहे यात शंका नाही. गेल्या सहा महिन्यात या शेअरचा भाव 50 टक्क्यापेक्षा जास्त घसरल्याने बँकेचे भांडवल मूल्य 14,000 कोटींनी पाण्यात गेलेले आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी या इंडसइंड बँकेचा शेअर चा गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव 1576.35 रुपये होता तर सध्याची घसरण 606 रुपयापर्यंत खाली झालेली आहे. बँकेचे एकूण 4.10 कोटी ग्राहक असून 340 शाखा आहेत व 311 एटीएम आहेत. सर्व साधारण भागधारक 6.17 लाख म्हणजे जवळजवळ 84 टक्के आहेत. त्यात म्युच्युअल फंड,विमा कंपन्या व अन्य वित्त संस्था यांचा समावेश आहे.तसेच किरकोळ भागधारक 3.42 लाखाच्या घरात आहेत.

या साऱ्या घडामोडी एक दोन चार दिवसात झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभरापेक्षा जास्त काळ हा प्रकार सुरू आहे. अशावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सेबी सारख्या प्रमुख नियमक संस्था केवळ “दुर्वा” उपटण्याचे काम करतात काय असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदार विचारत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने या सर्व प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर चौकशी करून गुंतवणूकदार व भागधारकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.

लेखक:प्रा.नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे – भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना आता गोरगरिबांच्या पोराबाळांना दुध पिणे महाग होऊन बसले आहे . कुंचे वडील , आजोबा चरवीभर , पितळी तांब्याभर दुध पीत आणि नातवाला अभिमानाने पाजत पण आता तो जमाना गेला,जर्सी गायी, म्हशी आल्या,पण दुध महागच होत गेले.आता नवी बातमी आहे दुधाच्या दारात आजपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सर्वसामान्य नागरिकांना दूध दरात दोन रुपये अधिकचे द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता गाईचे दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 74 रुपयाला मिळणार आहे. पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात झालेल्या सहकारी आणि खासगी दूध संघाच्या शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

दूध संघाच्या या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुधाच्या दरात वाढ झाली आहे. बाकी इतर राज्यात देखील हळूहळू ही दरवाढ दिसून येईल. या निर्णयानुसार आजपासून दुधाच्या किमती दोन रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दूध संघटनांनी सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला कात्री लावणारा आहे, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले. दुधाचे दर आम्हाला परवडणारे नाहीत, याचा सर्वांनी विचार करायला हवा, असे देखील काही ग्राहक म्हणत आहेत.

सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे. या संदर्भात एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर मध्ये वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दर सर्वच ठिकाणी लागू होतील, असे देखील ते म्हणाले.