श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष
पुणे : “दशरथ हा घे हे पायच दान…”,“मन हो राम रंगी रंगले…”, “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…”, “आगा वैकुंठीच्या राया…”, “पंढरी निवास सखा पांडुरंगा…” अशा भक्तिगीतांनी तुळशीबाग राम मंदिर परिसरात भक्तिरसाची अविस्मरणीय मैफल रंगली. प्रख्यात गायक पंडित आनंद भाटे यांनी सादर केलेल्या भावमधुर गायनाने उपस्थित भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त तुळशीबाग राम मंदिर येथे आनंद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उत्सवाचे अखंडित २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राग यमन कल्याणने करून काही भक्तिरचना आनंद भाटे यांनी सादर केल्या. “पंढरी निवासा सखा पांडुरंगा…” या भक्तीगीतानंतर अतिशय दुर्मिळ गायली जाणारी प्रभू रामचंद्रांना समर्पित ‘रघुराजा हा माझा विसावा’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी सांगितले की, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली या भव्य मंदिराची स्थापना केली. यंदा २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा तसेच श्रीरामराज्याभिषेक सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच रामायण वाचन, प्रवचन आणि संगीत कार्यक्रम अशा सांस्कृतिक उपक्रमांचाही समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील वरिष्ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांकडे जबाबदारी
मुंबई, दि. २४ मार्च २०२६.
काँग्रेस पक्ष संघटना बुथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमितीने “संघटन सृजन अभियान” हाती घेतले असून महाराष्ट्रात हे अभियान सुरु करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील सृजन संघटन अभियानासाठी ३७ केंद्रीय निरीक्षक व राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, आ. डॉ. नितीन राऊत यांच्यासह माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह १८३ सदस्यांचा या यादीत समावेश आहे.पुण्यातील रमेश बागवे,मोहन जोशी,अभय छाजेड, यांचा समावेश आहे तर अनंत गाडगीळ, दीप्ती चौधरी,गोपाळ तिवारी, प्रशांत जगताप, भाऊसाहेब आजबे पाटील यांचा समन्वयक म्हणून समावेश आहे.
या समितीचे सदस्य प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. बूथ स्तर ते राज्य स्तरापर्यंत पक्षाला सशक्त करणे, समर्पित कार्यकर्त्यांना सक्षम करणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शकपणे वाटप करणे तसेच महिला व युवकांना पक्ष संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. या अभियानातून जिल्हाध्यक्षांसह विविध पदांच्या केल्या जाणाऱ्या नियुक्त्या या पारदर्शक पद्धतीने केल्या जातात, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला खरातशी संबंधित इतरांवर कारवाई कधी करणार.?
मंत्री पोलिसांकडून मार खातात हे अत्यंत गंभीर; साताऱ्यातील प्रकरणाने वोटचोरीवर पुन्हा शिक्कामोर्तब.
मुंबई, दि. २४ मार्च २०२६ दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गडाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे, यातून आपण धडा घेतला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात, जाती जातीत वाद कोण निर्माण करत आहे. द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरात सारख्या विकृती जन्माला येतात याची दखल घेतली पाहिजे. २०२४ पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याच काळात अशोक खरात सारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आताही जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मित्रपक्षांना जेरीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे निषेधार्ह आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे पण इतर सर्व संबंधितांचे काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले..
समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच खरात सारखे विकृत निर्माण होतात, खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे काम पुढे घेऊन गेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरात सारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.
राज्यात मंत्रीच मार खातात..! सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली असून मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनीच मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हे लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे तसेच साताऱ्यात जे झाले त्यातून वोट चोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
अशोक खराताप्रमाणे भ्रष्टाचाराचीही विकृती.. आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड ज्या विकासाच्या वल्गना करत आहेत, त्यांनी कोणत्या गावात किती पैसे खर्च केले याची श्वेतपत्रिका काढावी. सर्व कंत्राटे तर त्यांच्या घरात व नातेवाईकांकडेच आहेत. रेतीची अवैध कामे कोण करत आहे, मटक्याची दुकानेही त्यांचीच आहेत. ३५ कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फार्च्यूनर कार आली, असे ते सांगत आहेत, तर ते ज्यातून फिरतात ती कोट्यवधींची डिफेंडर कार कोठून आली हेही त्यांनी सांगावे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत किती पटीने त्यांची संपत्ती कशी व किती वाढली हेही त्यांनी जाहीर करावे. निराधार लोकांना घरे बांधून देण्यासाठी २० एकर जमीन दान केली होती, त्याचे काय झाले हेही सांगावे. महाराष्ट्रात अशोक खरातची विकृती समोर आली तशीच भ्रष्टाचाराचीही विकृती समोर येत आहे हे चिंताजनक आहे असेही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ‘पाताळलोक’ अंतर्गत भुयारी रस्ते, बोगदे, उड्डाणपूल, नदी पुनरुज्जीवन आणि ‘रिव्हरफ्रंट एक्स्पिरियन्स पार्क’सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ‘संकल्प ते सिद्धी’ या धर्तीवर विकासाचा रोडमॅप मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५४ किमी लांबीचे भुयारी रस्ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा ते कात्रजदरम्यान १४.५ किमी लांबीचा ट्विन टनेल उभारण्यात येणार आहे. तसेच शनिवारवाडा ते स्वारगेटदरम्यान भुयारी मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहराच्या विकास आराखड्यातील कोथरूड-पाषाण आणि हिंगणे-धनकवडी या दोन महत्त्वाच्या बोगद्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याशिवाय शहरात अनेक उड्डाणपूल, पूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान पॅलेस परिसरातील पूल, सनसिटी-कर्वेनगर पूल, साधू वासवानी पूल आणि विश्रांतवाडी उड्डाणपूल हे प्रकल्प लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. शास्त्रीनगर, बिंदूमाधव ठाकरे चौक आणि सेनापती बापट चौक येथील उड्डाणपूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मुंढवा-खराडी, चांदणी चौक-भूगाव आणि शिवणे-नांदेड सिटी जोडणाऱ्या प्रकल्पांसह अनेक नव्या कामांचीही घोषणा करण्यात आली आहे. गंगाधाम चौकातील उड्डाणपूल पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘पुणे रिव्हरफ्रंट एक्स्पिरियन्स पार्क’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यामध्ये स्काय व्हील, मल्टीमीडिया रिव्हर शो, झिपलाईन, कयाकिंग, स्कायवॉक आणि अॅडव्हेंचर झोनसारख्या सुविधा उपलब्ध असतील. यामुळे पुण्याचा पर्यटन नकाशावर ठसा उमटणार असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत ११ पैकी १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे अंतिम टप्प्यात आली असून, यंदा चार केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. ५३ किमी मुख्य मलवाहिन्यांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सेंट्रल स्काडा प्रणाली प्रस्तावित आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीकाठाचा विकास साबरमतीच्या धर्तीवर करण्यात येत असून, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, उद्याने आणि जॉगिंग पार्क विकसित करण्यात येत आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन आणि पुढे मुंढवा हा टप्पा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सध्या ४४ किमीपैकी १७.८० किमी काम सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वारजेपर्यंतच्या ४.१० कि.मी. टप्प्यात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पार्किंग समस्येवर उपाय म्हणून आरक्षित जागांवर पीपीपी तत्त्वावर बहुमजली पार्किंग विकसित करण्यात येणार असून, जीआयएस मॅपिंगद्वारे पार्किंग व्यवस्थापन अधिक सक्षम केले जाईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत बालेवाडी, धानोरी, कोंढवा, हडपसर आणि वडगाव येथे सहा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार असून, ४७२५ घरे उभारली जाणार आहेत. याशिवाय मध्यवर्ती पेठांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आराखडाही तयार करण्यात येणार आहे.
मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना आणि खड्डेमुक्त रस्ते मोहिम; रस्ते विकासाला गती शहरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात रस्ते विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, रस्ते दत्तक योजना, हेरिटेज रस्ते आणि खड्डेमुक्त रस्ते मोहिम अशा विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. विकास आराखड्यातील ३२ मिसिंग लिंकपैकी १२ रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती पूर्ण झाल्यानंतर सुमारे ६५ किलोमीटर रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत. या कामांसाठी भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी १२ नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून, उर्वरित प्रकल्प पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ‘रस्ते दत्तक योजना’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ३५ प्रमुख रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सीएसआरअंतर्गत कॉर्पोरेट कंपन्या, संस्था आणि विकसकांना देण्यात येणार आहे, ज्यामुळे संस्थात्मक सहभागातून रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वाकड ते कात्रजदरम्यान सेवा रस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादन टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सेवा रस्ते उभारले जाणार असून, नवले पुलाजवळील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा शिवणे-खराडी रस्ता प्राधान्याने विकसित केला जाणार आहे. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे ५० मीटर रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्यवर्ती पुण्यातील लक्ष्मी रस्ता, थोरले बाजीराव रस्ता आणि छत्रपती शिवाजी रस्ता यांना हेरिटेज स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते कुंटे चौक या भागातील काम सुरू होणार आहे. जुना विमानतळ रस्ता नागपूर चाळ ते ५०९ चौकदरम्यान रुंद करण्यात येणार असून, सीएसआरच्या माध्यमातून त्याचे सुशोभीकरण केले जाईल. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘एक रस्ता-एक एकक’ या संकल्पनेनुसार अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्सप्रमाणे अडथळाविरहित, स्वच्छ आणि सुरक्षित पदपथ उपलब्ध करून दिले जातील. तसेच रस्त्यांवरील चेंबर समपातळीत आणणे, खड्डेमुक्त रस्त्यांची अंमलबजावणी आणि इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार गतिरोधक उभारणे यासाठी निश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेला गती; कार्यक्षम सांडपाणी व्यवस्थापन शहरातील नागरिकांना समान व पुरेसा पाणीपुरवठा करण्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. पुणे शहराची २०४७ सालची वाढती गरज लक्षात घेऊन समान पाणीपुरवठा योजना या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नियोजित १४१ पाणीपुरवठा झोनपैकी ७५ झोन लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे शहरभर पाणीपुरवठ्यात समतोल साधण्यास मदत होणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही महापालिकेने मोठी झेप घेत भारतातील पहिला ‘झिरो स्लज’ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. अॅक्टिव्ह मॅग्नेटिक टर्बो ब्लोअर तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरणार असून, जल व ध्वनी प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प पुण्याला आधुनिक सांडपाणी व्यवस्थापनात देशात अग्रस्थानी नेणारा ठरेल. मुळा-मुठा नदीत जाणारे विनाप्रक्रिया सांडपाणी रोखण्यासाठी ‘परम’ प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, सध्याच्या ४७७ एमएलडी क्षमतेत ३९६ एमएलडीची भर पडणार आहे. यासोबतच खासगी सोसायट्यांमधील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प २४x७ सुरू राहण्यासाठी सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम विकसित करण्यात येत आहे. यावर्षी सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन असून, त्यामुळे सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि नदी प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे.
झिरो वेस्ट’कडे पुण्याची वाटचाल सीबीजी प्रकल्प, बायोमायनिंग आणि स्मार्ट स्वच्छता सुविधांना गती पुणे : शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प, बायोमायनिंग, यांत्रिकी साफसफाई आणि स्मार्ट टॉयलेट्सच्या उभारणीद्वारे स्वच्छ व शाश्वत शहर उभारण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. सेंद्रिय कचऱ्यापासून स्वच्छ इंधन निर्मितीसाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामुळे कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, कार्बन उत्सर्जनात घट आणि स्थानिक रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. तसेच अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होणार आहेत. देवाची उरुळी येथे साठलेल्या जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यात येत असून, या योजनेचा चौथा टप्पा यावर्षी सुरू होणार आहे. उर्वरित १८ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे ४० एकर जागा पुनर्प्राप्त (रिक्लेम) करण्यात येणार आहे. या जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने भू-भराव टाकण्याचे नियोजन आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर वाढविण्यात आला असून, परिमंडळ क्रमांक १ ते ४ मधील बारा प्रमुख रस्त्यांवर मेकॅनिकल रोड स्वीपर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच झाडणकामासाठी कंत्राटी सेवकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मांसकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी २५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाद्वारे चिकन, मटण आणि अंड्याच्या कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे. शहरातील स्वच्छता सुविधांच्या उन्नतीसाठी प्रत्येक परिमंडळात प्रवेशद्वारांवर स्मार्ट पब्लिक टॉयलेट उभारण्यात येणार असून, १५ स्मार्ट टॉयलेट प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. विद्यमान २०० सार्वजनिक स्वच्छतागृहांचे अद्ययावतीकरण केले जाणार असून, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून स्थानिक पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया अधिक प्रभावी केली जाणार आहे. जैववैद्यकीय कचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी विद्यमान यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल.
७५ रोल मॉडेल शाळांसह ‘विद्यावर्धिनी’ गुणवत्ता वाढ पुणे महापालिकेच्या ७५ ‘रोल मॉडेल’ शाळा, विद्यावर्धिनी गुणवत्ता वाढ उपक्रम, शाळांमधील गुणवत्तावाढीच्या योजनांची पुनर्रचना अशा विविध योजना स्थायी समितीच्या यंदाच्या अंदाजपत्रकात जाहीर करण्यात आल्या. महापालिकेच्या शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य देत भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महापालिकेच्या ७५ शाळा ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे या शाळांमध्ये दर्जेदार भौतिक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि गुणवत्ता वाढीच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘विद्यावर्धिनी’ गुणवत्ता वाढ उपक्रमांतर्गत ३२० शाळांमध्ये ई-लर्निंग, विषय कक्ष, डेटा एंट्री ऑपरेटर, क्रीडा व कला कक्ष तसेच समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महापालिकेच्या आठ इंग्रजी माध्यम शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम, आधुनिक परीक्षा पद्धती आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन प्रणालीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विद्या निकेतन, क्रीडा निकेतन, संगीत अकादमी, शिक्षक सहयोगी दल आणि शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन या योजनांची पुनर्रचना करून त्यांना संस्थात्मक स्वरूप देण्यात येणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणवत्तेला चालना मिळणार असून शिक्षण व्यवस्थेची परिणामकारकता वाढणार आहे.
क्रीडा नर्सरीपासून हायपोक्सिक प्रशिक्षणापर्यंत सुविधा ‘फिट पुणे, फिट इंडिया’ या संकल्पनेच्या अंतर्गत क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा नर्सरी, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, नेहरू स्टेडियम विकास आणि क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध उपक्रमांची घोषणा पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अंदाजपत्रकात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात आला आहे. बालकांमध्ये लहानपणापासून क्रीडा कौशल्य विकसित व्हावे यासाठी हडपसरसह शहरातील विविध भागांमध्ये क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गुणवंत खेळाडू घडण्यास प्रोत्साहन मिळून शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा विकास करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण सुविधा आणि सरावासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार असून, मध्यवर्ती भागातील खेळाडूंना याचा मोठा लाभ होईल. तसेच गणेश कला क्रीडा रंगमंचही अद्ययावत करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सुसज्ज व अद्ययावत क्रीडांगणे विकसित करण्यात येणार असून, युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा, प्रशिक्षणाच्या संधी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच अॅथलेटिक्स, मॅरेथॉन, सायकलिंग आणि पर्वतारोहण यांसारख्या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना अत्याधुनिक हायपोक्सिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, फिटनेस मॉनिटरिंग आणि परफॉर्मन्स अॅनालिसिसची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन विविध भागांत क्रीडांगणे, बहुउद्देशीय क्रीडा संकुले, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक, क्रीडा साहित्य अनुदान, दत्तक योजना, नोकरीत आरक्षण, शालेय स्पर्धा, शिष्यवृत्ती आणि पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
महसूल व्यवस्थापनावर भर स्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन वाढीसाठी प्रयत्न पुणे : महानगरपालिकेची आर्थिक क्षमता मजबूत करण्यासाठी महसूलवाढीवर लक्ष केंद्रित करत महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. महसूल व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र समिती, विशेष कक्ष आणि करसंकलनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. महानगरपालिकेची स्वतंत्र महसूल समिती स्थापन करण्यात येणार असून, उत्पन्नवाढीच्या योजनांचा साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे. या समितीमार्फत कर संकलन आणि थकबाकी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. विकास प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अधिक निधी मिळविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विविध अनुदानांपोटी व शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत केला जाईल. शहर विकासासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी ‘सीएसआर’ कक्ष अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रमांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर वसुलीसाठी अभय योजना राबविण्यात येणार असून, दंड व व्याजामध्ये सवलत देऊन थकबाकीदारांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच प्रलंबित वाद सोडविण्यासाठी लोकअदालतींचे आयोजन केले जाईल. मिळकतकर संकलन वाढविण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दरमहा विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. मालमत्ता नोंदणी, कर आकारणी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला जाईल. तसेच सेल्फ अॅसेसमेंट सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जाहिरात महसूल वाढविण्यासाठी होर्डिंग पॉलिसीची फेररचना केली जाणार असून, अनधिकृत फलकांवर नियंत्रण आणले जाईल. तसेच शहरातील ओव्हरहेड केबल टप्प्याटप्प्याने भूमिगत करून त्यातूनही अतिरिक्त महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या अॅमेनिटी स्पेसेस भाडेतत्त्वावर देण्यासाठी धोरण तयार करण्यात येणार असून, मालमत्तांचे अचूक मॅपिंग करून त्यांचे व्यवस्थापन आणि पतवृद्धी साधली जाईल. पडून असलेल्या मालमत्तांचा प्रभावी वापर करून उत्पन्नवाढीसाठी स्वतंत्र आर्थिक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच समाविष्ट गावांमध्ये मिळकत कर आकारणी टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यामुळे महसूलवाढीस चालना मिळून त्या भागांमध्ये मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा बळकट; सुरक्षित शहरासाठी नवे उपक्रम शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा आणि पूरनियंत्रण उपाययोजनांना प्राधान्य देत महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या शहर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सक्षम यंत्रणा उभारण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी शीघ्र कृती दल (क्यूआरटी) स्थापन करण्यात येणार असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येईल. क्षेत्रीय आणि प्रभाग स्तरावर उपाययोजना राबविण्यासोबतच तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे विस्तारीकरण व अद्ययावतीकरण करण्याचाही प्रस्ताव आहे. अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लोहियानगर येथील मध्यवर्ती अग्निशमन केंद्राची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार असून, आधुनिक उपकरणे, वाहने आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी शहरातील नाल्यांलगत ८८ ठिकाणी सीमाभिंती बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी ३८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांमध्ये पूरनियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पुणे ‘ग्रोथ हब’कडे वाटचाल जीसीसी, गुंतवणूक सुविधा कक्षातून आर्थिक विकासाला चालना शहराच्या आर्थिक विकासाला वेग देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी), ‘पुणे ग्रोथ हब’ आणि गुंतवणूक सुविधा कक्ष अशा महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर सक्षम केंद्र बनविण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. राज्याच्या नवीन उद्योग धोरणानुसार पुण्याला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळून गुंतवणूक वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. या प्रक्रियेसाठी पुणे महानगरपालिका आवश्यक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘पुणे महानगर ग्रोथ हब’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याद्वारे तंत्रज्ञान, उद्योग-उत्पादन, शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांमध्ये पुण्याला जागतिक पातळीवर अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोजगारनिर्मिती वाढविणे आणि शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरात गुंतवणूक वाढीसाठी ‘गुंतवणूक सुविधा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून, गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या, मार्गदर्शन आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे उद्योग स्थापन प्रक्रियेला गती मिळून पुण्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसृष्टी, भारत मंडपम, हेरिटेज कॉरिडॉर आणि विविध स्मारकांच्या उभारणीद्वारे पुण्याची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी’ उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. तसेच लोहगाव येथे नवी दिल्लीच्या धर्तीवर ‘भारत मंडपम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन व प्रदर्शनांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहराच्या प्रवेशद्वारांवर छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून, प्रकाशयोजना, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक प्रतिकृतींच्या माध्यमातून शहराची ओळख अधोरेखित केली जाईल. पर्यटन वाढीसाठी सारसबाग ते पर्वती रोप-वे, सारसबागेत काचेचा पूल आणि ‘ऑर्बी’ या अत्याधुनिक हवाई अनुभव केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय, सांस्कृतिक आराखडा आणि आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पुणे प्रथम’ या ब्रँडिंगद्वारे शहराची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, बाणेर-बालेवाडी येथे ‘पुणे कला अकादमी’ची स्थापना आणि कोथरूड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कला, साहित्य आणि संस्कृतीला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. इतिहास जतन करण्यासाठी भिडेवाडा येथे महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक, संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे स्मारक, तसेच सावरकर, तानाजी मालुसरे आणि उमाजी नाईक यांच्या स्मारकांचे जतन व विकास करण्यात येणार आहे.
पुणे ‘ग्रोथ हब’कडे वाटचाल जीसीसी, गुंतवणूक सुविधा कक्षातून आर्थिक विकासाला चालना शहराच्या आर्थिक विकासाला वेग देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी), ‘पुणे ग्रोथ हब’ आणि गुंतवणूक सुविधा कक्ष अशा महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर सक्षम केंद्र बनविण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. राज्याच्या नवीन उद्योग धोरणानुसार पुण्याला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळून गुंतवणूक वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. या प्रक्रियेसाठी पुणे महानगरपालिका आवश्यक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘पुणे महानगर ग्रोथ हब’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याद्वारे तंत्रज्ञान, उद्योग-उत्पादन, शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांमध्ये पुण्याला जागतिक पातळीवर अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोजगारनिर्मिती वाढविणे आणि शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरात गुंतवणूक वाढीसाठी ‘गुंतवणूक सुविधा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून, गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या, मार्गदर्शन आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे उद्योग स्थापन प्रक्रियेला गती मिळून पुण्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मेट्रो विस्तार, पीएमपी सक्षमीकरण आणि एकात्मिक वाहतूक आराखड्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. सध्या पुणे मेट्रोच्या ३३.२८ किमी मार्गावरून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करत असून, वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका कार्यान्वित आहेत. या मेट्रोच्या विस्ताराला गती देत स्वारगेट ते कात्रज, खडकवासला ते खराडी, नळस्टॉप ते माणिकबाग आणि रामवाडी ते वाघोली या नवीन मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग मे महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. येत्या काही वर्षांत पुणे परिसरात सुमारे २०० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचा मानस आहे. मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांच्यात एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करून प्रवाशांना ‘एन्ड टू एन्ड’ सेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे. पीएमपी बस, ई-रिक्षा आणि ई-सायकल यांसारख्या फीडर सेवांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ करण्यात येईल. मेट्रो मार्गांच्या परिसरातील ‘टीओडी झोन’साठी सहा महिन्यांत सर्वंकष वाहतूक नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच कोथरूड, वारजे आणि दांडेकर पूल येथे मेट्रो व उड्डाणपूलांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी या वर्षी स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस आणि जीसीसी तत्त्वावरील ५९९ बस ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत आणखी एक हजार बस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएमपीचा सर्वसमावेशक बिझनेस प्लॅन तयार करण्यात आला असून, सुतारवाडी-पाषाण आणि निगडी येथील भक्ती-शक्ती डेपो येथे बीओटी तत्त्वावर डेपो व व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व बसस्थानकांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ६० वर्षांवरील नागरिकांना पीएमपीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार आहे.
समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि हरित क्षेत्र विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध विकास आराखड्याद्वारे समाविष्ट गावांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखड्याचा इरादा जाहीर करून एका वर्षाच्या आत प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, रुग्णालये आणि शाळांसाठी आवश्यक आरक्षणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, लोहगाव आणि वाघोली या भागांमध्ये २८ साठवण टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. मलनिस्सारण व्यवस्थेसाठी अमृत-२ योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, या वर्षात अत्यावश्यक मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच ११ गावांमध्ये ५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार असून, सांडपाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक केंद्रांची उभारणी केली जाईल. सांडपाणी थेट नाले व नद्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रणाली उभारण्यात येणार आहे. आंबिल ओढा, माणिक नाला आणि नागझरी नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येतील. नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या २७ केंद्रे कार्यान्वित असून, पुढील वर्षात त्यात वाढ होणार आहे. समाविष्ट गावांमध्ये रस्ते आणि पदपथांचा विकास करण्यासाठी ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासोबत जागतिक दर्जाचे पदपथ उभारले जाणार आहेत. तसेच उद्यानांसाठी आरक्षित जागा ताब्यात घेऊन विविध थीम पार्क विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हरित क्षेत्र वाढण्यासोबतच नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि सार्वजनिक जागांचा लाभ मिळणार आहे.
पुणे-पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. पुणे शहर राहण्यासाठी सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भिमाले यांनी यावेळी सांगितले.महिलांसाठी विशेष योजना जाहीर करताना, 31 मार्च 2026 पर्यंत मालमत्तेवर नाव असलेल्या महिलांना 50 टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात 100 मोफत स्वच्छतागृहे उभारण्याची योजना असून, महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात वाहतूक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 1 हजार ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी देशातील पहिली अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरातील प्रदूषण पातळी 350 पर्यंत पोहोचली असून ती 50 पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रातही मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या 53 बाह्यरुग्ण विभाग आणि 20 प्रसूतिगृहांमार्फत मोफत सेवा दिली जात असून, नागरिकांना 80 कोटी रुपयांची औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. बाणेर येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आले असून, लवकरच त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारजे येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कामही सुरू आहे.
शहरी गरिबांसाठीच्या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात येणार असून, त्यासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शहरातील उद्याने, तलाव आणि प्राणीसंवर्धनावरही भर देण्यात आला आहे. राजीव गांधी झुलॉजिकल पार्कच्या विकासासाठी 60 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून, नवीन वन्यप्राणी आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
निरोगी पुण्यासाठी वैद्यकीय कवच पुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देत पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “निरोगी पुणे” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्य सभेसमोर सादर केलेल्या या अंदाजपत्रकात आरोग्य सेवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून विद्यमान सुविधांचे सक्षमीकरण आणि नव्या सेवा सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापालिकेचे ५३ बाह्य रुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे, ४०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय कार्यरत आहेत. दररोज सरासरी १२ हजार बाह्यरुग्ण व ३०० आंतररुग्ण उपचार घेत असून दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांना आरोग्य सेवा मिळते. दरवर्षी ८५०० प्रसूती महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये होतात. या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असून शहरी गरीब औषधे व अंशदायी वैद्यकीय साह्य योजनांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयांचे आधुनिकीकरण व विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विकसित करण्यात येणार असून आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारजे येथे १० हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
कर्करोग उपचारासाठी बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत महापालिकेचे पहिले कॅन्सर रुग्णालय सुरू होणार असून येथे लिनियर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपीसारखे उपचार ‘सीजीएचएस’ दरात उपलब्ध होतील. तसेच गंगाधाम परिसरात एमआरआय व सिटी-स्कॅन केंद्र उभारण्यात येणार असून त्यामुळे महागड्या निदान चाचण्या कमी दरात उपलब्ध होतील. या सर्व उपाययोजनांमुळे पुणेकरांना स्वस्त व दर्जेदार आरोग्य सेवा शहरातच उपलब्ध होणार आहेत.
प्रसूतिगृहांमध्ये ‘आयव्हीएफ’ उपचार सेवा
महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ उपचार सेवा सुरू करण्यात येणार असून वंध्यत्वावरील आधुनिक उपचार गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
कर्करोग, डायलिसिस उपचारांसाठी आर्थिक साह्य मर्यादेत वाढ
कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठी डायलिसिस उपचारांवरील आर्थिक सहाय्य मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची फेररचना करून ती अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडणार असून पदव्युत्तर शिक्षण, जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सुविधा आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालय परिसरात विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी निवासासाठी १४ मजली इमारत उभारण्यात येणार आहे.
कात्रज प्राणीसंग्रहालयाचा विकास, ‘नमो गार्डन’ आणि मिरॅकल गार्डनची संकल्पना
शहरातील हरित क्षेत्रांचा विस्तार आणि नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात उद्यान आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात “उद्याने – शहराचा श्वास” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचा आंतरराष्ट्रीय दर्जात विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. सध्या येथे १०४ वन्यजीव प्रजाती असून ती संख्या १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. जिराफ, झेब्रा, आफ्रिकन चित्ता, अनाकोंडा, बबून यांसारख्या विदेशी प्रजातींचा समावेश केला जाणार असून बर्ड पार्कमध्ये देशी-विदेशी पक्ष्यांच्या साठ प्रजातींचे संवर्धन केले जाईल. कालबाह्य झालेल्या सर्पोद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून संग्रहालयासाठी भव्य प्रवेशद्वार उभारण्याचेही नियोजन आहे.
शहरात सध्या २१६ उद्याने असून आणखी आठ उद्यानांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो गार्डन’ संकल्पनेतून प्रेरणा घेत विविध राज्यांच्या संस्कृती, कला आणि जीवनशैलीचे दर्शन घडविणारी थीम आधारित उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. अर्बन ९५ संकल्पनेअंतर्गत लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक जागा निर्माण करण्यात येणार असून कोंढवा खुर्द येथे नेचर बेस्ड फॅमिली पार्क विकसित होत आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मिरॅकल गार्डन’ उभारण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक फुलांची रचना आणि थीम आधारित उद्यान संकल्पना साकारण्यात येणार आहे. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात बोटॅनिकल गार्डन उभारून जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांना निसर्गानुभवाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम प्रकल्पातील प्रलंबित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक हरित, स्वच्छ आणि आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार असून कुटुंबांसाठी दर्जेदार विरंगुळा केंद्रे निर्माण होतील. प्राणीसंग्रहालय आणि मिरॅकल गार्डनमुळे पर्यटनाला चालना मिळेल, तर उद्यानांमधील सुविधा वाढल्याने नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपकडून मित्रांनाच संपवण्याचे कारस्थान:एकनाथ शिंदेंचे आदेशही अधिकारी जुमानत नाहीत; निवडणुका हायजॅक करून हुकूमशाहीकडे वाटचाल पुणे-सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. मतदारांना मतदान करू दिले नाही. ही सर्व प्रक्रिया हायजॅक करण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हे काही त्यांनी मनाने केलेले नाही, त्यांना कुणीतरी सांगितलेले असेल. भाजपने असे राजकारण करणे योग्य नाही, कारण शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे. पण यांच्याकडे शत्रू ऐवजी मित्रांनाच संपवण्याचे काम सुरू आहे असे दिसून येत आहे, असे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही करु तो कायदा अशा पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे.महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला वॉर्ड रचना, निवडणूक प्रक्रिया यातून दिसून आल्या आहेत. कुठला अधिकारी कुठली निवडणूक घेणार हे ठरवत लोकशाही संपवण्याचे काम भाजपने निवडणुकीच्या माध्यमातून केले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल आदेश दिला होता की जा चुकला त्याला घरी बसवले पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे.चूक नसेल तर पुन्हा घेता येईल. पण अर्धा तासात तो निर्णय राम शिंदेंनी तो निर्णय बदलला. एकनाथ शिंदेंनी सांगूनही ही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हतबलता येण्याचे काम झाले आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, या पद्धतीचे राजकारण करायचे असेल तर निवडणूक घेताच कशाला? काय करायचे ते तुम्हीच ठरवा.हुकुमशाहीकडे जाणाऱ्या राज्याला, देशाला कोण वाचवणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. हा देश लोकशाही मानणारा आहे. देशामध्ये गल्लोगल्ली विरोधकांना ठेचण्याचे काम सुरू आहे, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. या सर्व प्रकरणाला तेच जबाबदार आहेत. त्यांनी पहिले
रवींद्र धंगेकर म्हणाले की, जयकुमार गोरे ज्या पद्धतीने पोलिसांची बाजू मांडत होते त्यातून त्यांना पाठिंबा देत आपली कामे करुण घेणे. त्यांना चाकोरीत आणत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता. साताऱ्यातील त्या पोलिस अधिकाऱ्यांना घरी बसवले पाहिजे. तरच हे कायद्याचे राज्य म्हणता येईल. नाहीतर हुकुमशाही सुरू झालेली आहे. गल्लोबोळात सुद्धा हेच सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मुद्दाम त्रास देणं योग्य नाही. मित्र केवळ कामापुरता नसावा तो कायम असावा. निवडणूक आयोगाच्या फालतू लोकांसमोर जर नेत्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर तो जनतेसमोर जाणार कसा? असा सवाल धंगेकरांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, भाजपचा इतिहास पाहिला तर मित्रांनाच पहिले संपवते हे दिसून येते. हे नेते शिंदेंचे काही ऐकत नसतील तर आम्ही कार्यकर्ते कोणाकडे जाणार? हे राजकारण आता थांबवले पाहिजे. अशोक खरात प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी मदत केली हे शोधले पाहिजे. यात कोणी उद्योगपती अडकले आहेत का? हे शोधले पाहिजे. तर अशोक खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाला भेट देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज राजगुरू नगर येथे भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या तर्फे आयोजित “वंदे मातरम् सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमा निमित्ताने मंत्री अँड आशिष शेलार हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हुतात्मा राजगुरू स्मारकाचे जे जतन संवर्धनाचे काम पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत आहे, या कामाची पाहणी व आढावा यावेळी मंत्री शेलार यांनी घेतला. तसेच त्यानंतर मंत्री शेलार यांनी दिवंगत राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब आपटे यांचे स्मारक म्हणून ‘आपटे वाडा’ प्रसिद्ध असलेल्या स्मारकाला ही भेट दिली. यावेळी संबंधित सर्व अधिकारी तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी ही उपस्थितीत होते.
पुणे, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, समर्थ पोलीस ठाणे समोर, पुणे येथे सकाळी १० वाजता अल्पसंख्यांक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ५ उद्योजकांनी त्यांचा सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून २५० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, डिप्लोमा अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक व बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहिती करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरी इच्छुक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, पुणे यांनी केले आहे. 00000
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत मुद्दा उपस्थित; मानवी तस्करी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी
पुणे: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
आपल्या निवेदनात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या समस्येचे स्वरूप अत्यंत चिंताजनक असून, गृह विभागाच्या आकडेवारीनुसार २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी २३ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. दररोज सरासरी १३२ महिला बेपत्ता होत असल्याचे आढळले आहे. मुंबई, रायगड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई यांसह पुण्यातही अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातच गेल्या १५ दिवसांत १३ ते १७ वयोगटातील २० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीच्या संघटित जाळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. जबरदस्तीने पळवून नेणे, खोट्या प्रेमसंबंधांच्या माध्यमातून फसवणूक, तसेच सोशल मीडियाचा गैरवापर यांसारख्या बाबीही पुढे येत असल्याचे निरीक्षण गृहविभागाने नोंदवले आहे.”
तपास आणि शोधकार्याचा वेग अत्यंत कमी असल्याचे सांगून प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, २०२४ मधील ४५ हजार प्रकरणांपैकी १५ हजार प्रकरणांमध्ये अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही. २०२५ मधील ४८ हजार प्रकरणांपैकी १३ हजार महिला अद्याप सापडलेल्या नाहीत. म्हणजेच, गेल्या दोन वर्षांत सुमारे २८ हजार महिला व मुलींचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बेपत्ता झालेल्या महिलांचे भवितव्य काय, त्यांची तस्करी झाली का, त्यांना परदेशात विकले गेले का, किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला का, असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
या समस्येवर उपाय म्हणून काही ठोस मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये ‘गोल्डन अवर्स’मध्ये त्वरित शोध घेण्यासाठी आधुनिक व जलद तपास यंत्रणा उभारणे, मोबाईल ट्रॅकिंग प्रणाली अधिक सक्षम करणे, सार्वजनिक ठिकाणी कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे व त्यांचे सतत निरीक्षण करणे यांचा समावेश आहे. तसेच, जबरदस्ती धर्मांतर आणि विवाहाच्या प्रकरणांवर कठोर कारवाई, अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण, तसेच प्रवास आणि हॉटेलमध्ये ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट व ओळख प्रणाली अधिक सक्षम करण्याचीही आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.
नाशिक :महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अशोक भोंदू खरातला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपली. त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर केले. त्यात त्यांनी पुन्हा त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीतच राहणार आहे. तत्पूर्वी, झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भोंदू खरातवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला.
यासंबंधीच्या माहितीनुसार, एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यानी न्यायालयात प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगताना अशोक खरात विषयी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, आरोपी अशोक खरात महिलांना खडे, पेढे देत होता. त्यांना पाण्यात काही पदार्थ मिसळून ते पिण्यास देत होता. यामुळे महिलांना अस्वस्थ वाटत असे. त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करत असे. पोलिसांनी आरोपीच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, रोकड व काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे. आरोपीकडे असणाऱ्या एकूण काडतुसांपैकी काही काडतुसे गहाळ आहेत. त्यामुळे त्यांचा कुठे काही वापर झाला का? याचा तपास केला जात आहे. आरोपीने काही विधींमध्ये नरबळी दिल्याचा संशयही आम्हाला आहे.
अशोक खरात आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत होता. तो नकली साप व वाघ यांचा वापर करून भीती निर्माण करत होता. तो कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करत होता. त्यामुळे त्याने वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन केल्याचा संशय आहे. परिणामी, या प्रकरणाच्या तपासासाठी आम्हाला त्याच्या आणखी 7 दिवसांच्या कोठडी हवी आहे, अशी मागणी पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी केली. पण बचाव पक्षाने त्यावर जोरदार हरकत घेतली. या प्रकरणी आणखी पोलिस कोठडीची गरज नाही. पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही होऊ शकतो, असे ते म्हणाले.
त्यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे नमूद करत पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला. ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार व इतर बाबींचा तपास अद्याप बाकी आहे, असे ते म्हणाले. अखेर न्यायालयाने आरोपीवर असणारे गंभीर आरोप व तपासातील नव्या गोष्टी लक्षात घेऊन भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अशोक खरात न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना मान खाली घालून उभा होता. तो स्वतःचेच बोट पाहत होता. न्यायालयाने एसआयटी अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोठडी सुनावण्यापूर्वी खरातला ‘तुम्हाला काही बोलायचे आहे का?’, असा प्रश्न केला. त्यावर खरात मोजून 5 वाक्य बोलला. तो म्हणाला, मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्री, श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरे दिली.
दुसरीकडे, न्यायालयीन सुनावणीनंतर पोलिस अशोक खरातला कडेकोट बंदोबस्तात घेऊन जात होते. यावेळी न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खरातला तेथून घेऊन निघून गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली वाजवेल, असे देसाई यावेळी म्हणाल्या.
पुणे- आपण राहतो त्या प्रभागाच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा आपुलकीचा समारंभ प्रभाग क्र. ३० मधील नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे सदस्य स्वप्नील देवराम दुधाने यांनी आयोजित केला होता ,आपल्या गोड आणि कटू अनुभवाचे बोल सांगत ज्येष्ठ नागरिकांनी युवा पिढीतील स्वप्नील देवराम दुधाने यांच्याशी मनमोकळा संवाद साधला
यावेळी दुधाने यांनी सांगितले कि,’आपल्या प्रभाग क्र. ३० मधील राजाराम पुल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येत असून आपला वेळ व्यतीत करत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची भेट घेऊन मनमोकळा संवाद साधण्याची मनिषा होती.आज त्यांच्याशी संपर्क करत आणि हितगुज साधले. यावेळी त्यांनी त्यांचे प्रचंड अनुभवांचे गाठोडे उघडत अमूल्य मार्गदर्शन केले. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी प्रभागाच्या आणि पर्यायाने शहराच्या विकासासाठी योगदान ते सदैव आमच्यासोबत असतील, असा निर्वाळा त्यांच्याकडून प्राप्त झाला.