Home Blog Page 531

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या वाहनावर गोळीबार

पुणे-शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबार केले की धक्कादायक घटना घडली आहे. वारजे माळवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातंकडून अचानक फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे.निलेश घारे हे घराकडे जात असताना ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे.

पुणे शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात तणाव निर्माण झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घारे यांच्या चारचाकी कारवर मंगळवारी रात्री 12वाजता फायरींग केले .यावेळी घारे हे आपले काम उरकून घराकडे निघाले होते. दरम्यान सहकारींसोबत गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते आले असताना, बाहेर पार्किंग केलेल्या घारे यांच्या काळ्या रंगाच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली.शिवसेनेच्या शिंदे गटाचे घारे युवा सेना जिल्हाप्रमुख असून त्यांच्या वाहनावरच राहत्या घराच्या परिसरात गोळीबार झाल्याने सदर भागात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिस यांच्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे .याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घारे यांचे कोणाशी यापूर्वी वाद आहे का किंवा पूर्ववैमानस्यातून सदरचा प्रकार केला आहे का याबाबत देखील पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.

मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या ओंकार मोरेला अटक

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची मागील वर्षी भरदिवसा हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहर आणि परिसरात मोठं वर्चस्व असणाऱ्या मोहोळच्या हत्येने गुन्हेगारी विश्वही हादरले होते. तसंच या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळी सक्रिय झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या ओंकार सचिन मोरे वय २३ वर्ष रा. मुठा कॉलनी पुणे याला अटक केली आहे. मोरे याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे असून या प्रकरणात यापूर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली .

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, शरद मोहोळ याची ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १३ आरोपींना अटक केली होती, ज्यामध्ये दोन वकिलांचाही समावेश होता. या प्रकरणात मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, धनंजय मटकर, सतीश शेंडगे, नितीन खैरे, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर, विठ्ठल गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान आणि आदित्य गोळे यांचा समावेश होता.
या हत्येच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत १६ आरोपींवर कारवाई केली होती. या आरोपींमध्ये गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचाही समावेश होता. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जातो. मारणे याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली होती. गणेश मारणे हा तुळजापूर, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा येथे लपून बसला होता. अखेर पुणे पोलिसांनी नाशिकजवळ मोशी टोलनाक्याजवळ पाठलाग करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, शरद मोहोळ हत्येच्या प्रकरणात आता ओंकार मोरेची अटक झाल्याने पोलिसांच्या तपासाला अधिक बळ मिळाले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अतिरीक्त कार्यभार मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी केली आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस; वाघोलीजवळ होर्डिंग कोसळून दुचाक्यांचे नुकसान

पुणे-शहरात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यवर्ती भागांसह अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या असून, हवामानात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे पावसामुळे एक भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाक्या अडकल्या असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यात मुसळधार पावसात भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू केले. सदर होर्डिंग अधिकृत परवानगीने उभारण्यात आले होते की नाही, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात कंपनीने या होर्डिंगचा सांगाडा कमकुवत झालेला असताना देखील दुर्लक्ष केल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. आता या होर्डिंगच्या कंपनीवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.गेल्या 3-4 दिवसांपासून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. आज सायंकाळी सुद्धा पुण्याला जोरदार पावसाने झोडपले. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे -अन् महावितरणची कसोटी

पुणे, दि. २० मे २०२५यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना देखील नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

ज्या भागात उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्या आहेत, तेथील वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर तसेच डबलपोल स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनी मातीचे असतात. विजेचा प्रवाह लोखंडी वीजखांबात उतरू नये यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनी मातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीज प्रवाह खंडित होतो.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारण म्हणजे वादळ वाऱ्यांमुळे वीजयंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे. वीज कोसळणे वा कडकडाटामुळे दाब वाढणे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने फिडर पिलर, रिंग मेन युनिट अशा वीजयंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. पीएमसी, पीसीएमसी, एमएनजीएल, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व इतर संस्थांच्या विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येते आहे. यात काही ठिकाणी भूमिगत वाहिन्या तोडल्या जातात व वीजपुरवठा खंडित होतो. तर काही भूमिगत वाहिन्याचे थोडेफार नुकसान होते. मात्र वीजपुरवठा खंडित होत नाही. परंतु पावसाला सुरवात झाली की साचलेले पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व बिघाड होतो. किंवा संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधणे, दुरूस्तीसाठी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट लावणे आदी कामे अविश्रांत करावी लागतात.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डबल पोल स्ट्रक्चर अशा वीजयंत्रणेजवळ घरगुती सुका व खाद्य पदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात. वीजयंत्रणेला या प्राण्यांचा स्पर्श झाला की शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये वीजयंत्रणेजवळ सुका कचरा, उस किंवा गवत पेटल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे तब्बल ८ प्रकार घडले आहेत. त्याचा सुमारे ७ लाख ६५ हजारांवर ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला आहे.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वप्रथम पर्यायी वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांशी संपर्क करणे, बिघाड शोधण्यासाठी पेट्रोलिंग करणे, झाडे, फांद्या हटविण्यासाठी विविध यंत्रणेशी संबंध, दुरूस्ती कामांसाठी वीजसुरक्षेचे परमीट, अंतर्गत संपर्क, साहित्य व इतर पाठपुराव्याची विविध कामे आदींसाठी स्थानिक अभियंते किंवा जनमित्रांचे मोबाईल प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सातत्याने व्यस्त असतात.

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचा बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरूस्तीचे काम करणाऱ्या अभियंते व जनमित्रांसाठी पावसाळी दिवस अतिशय आव्हानात्मक आहेत.

ज्ञानवृक्ष उन्मळून पडला…मंत्री चंद्रकांत पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. विज्ञान विषयातला ज्ञानवृक्ष असेच नारळीकर यांचे वर्णन करावे लागेल. खगोलशास्त्रातील त्यांचे श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व जगमान्य आहे. रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहून त्यांनी विज्ञानासारखा रुक्ष विषय सुबोध केला. केंब्रीज विद्यापीठात शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम, आयुका संस्थेची उभारणी, २०२१ नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असा त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे. नारळीकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.

ना. चंद्रकांतदादा पाटील

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे 20– “डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या विज्ञानविश्वाला हानी झाली आहे. ते केवळ एक महान खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाच्या लोकाभिमुखतेचे जनकवी होते,” अशा शब्दांत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यमंत्री मिसाळ शोक संदेशात म्हणाल्या की, “ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा संगम असलेल्या नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत विज्ञानवादी विचार समाजात रुजविले. त्यांनी केंब्रिजमधून घेतलेले शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील योगदान, आयुका (IUCAA) ची स्थापना आणि मराठीतून विज्ञानलेखन हे सर्वच भारतीय विज्ञानविश्वासाठी दीपस्तंभ ठरले. आज आपण एका ज्ञानवृक्षाला मुकलो आहोत. त्यांची जाण ही केवळ वैज्ञानिक समुदायासाठीच नव्हे, तर प्रत्येक जिज्ञासू मनासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. ही पोकळी भरून निघणं अशक्य आहे,” असेही त्या म्हणाल्या.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्यास कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या .
000

अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया व निर्यात सुरळीत

पुणे, दि. २०: अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठी आंब्यातील कोयकिड्याचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्यातीपूर्वी आंब्यावर विकिरण प्रक्रिया सुरळीत चालू असून ११ मे २०२५ पासून पुनश्च निर्यात सुरळीत झाल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. त्यानुसार पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून अमेरिकन निरीक्षकाच्या उपस्थितीमध्ये १ एप्रिल २०२५ पासून सदर प्रक्रिया करण्यात येत असून त्यांच्या तपासणीअंती आंब्याची निर्यात केली जाते. ८ व ९ मे २०२५ रोजी निर्यात झालेल्या काही कन्साईनमेंट मधील त्रुटीमुळे सदर आंबा कन्साईनमेंट अमेरिका येथे थांबवण्यात आल्या अशा आशयाच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या असून याबाबत कृषी पणन मंडळाकडून या बाबींच्या तपासणीचे कामकाज प्रगतीपथावर आहे.

८ व ९ मे २०२५ रोजी सुविधेवरील विकीरण प्रक्रियेची कॉम्पुटराईज्ड स्काडा सॉफ्टवेअरमधील माहितीची तपासणी केली असता किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेमध्ये आढळून आलेला असून आंब्याला विकीरण प्रक्रिया व्यवस्थितरित्या, परिणामकारक व नियमानुसार पुर्ण झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे. तद्नंतर अमेरिकन निरीक्षकांनी तपासणी व खात्री करून, डोझीमीटरचे रीडिंग मधील किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेत योग्य असल्यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र-२०३ स्वाक्षरीत करून दिलेले आहे व तद्नंतरच सदरहू आंबा अमेरिका येथे निर्यात झालेला आहे.

तथापि, त्यानंतर अमेरिकन निरीक्षक यांनी ८ व ९ मे २०२५ रोजी प्रक्रिया केलेल्या व अमेरिकेमध्ये पोहोचलेल्या १५ कन्साईनमेंटच्या डोजीमेट्री मध्ये काही त्रुटी आहेत असे कळविल्यामुळे १० निर्यातदारांच्या एकूण २५ मे. टन आंब्याच्या कन्साईनमेंट्स अमेरिकेमध्ये नाकारण्यात आल्या. मात्र येथे विशेषत्वाने असे नमूद करण्यात येते की, विकिरण प्रक्रिया संदर्भातील यु. एस. डी. ए., भारतीय एन.पी.पी.ओ. व अपेडा यांच्या दरम्यान स्वाक्षरीत झालेल्या ‘ऑपरेशनल वर्क प्लान’ मधील मुद्दा क्र. ११ मधील नमुद तरतुदीनुसार विकीरण प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्याबाबत सदरहू त्रूटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देणेबाबत व त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी तरतूद आहे.

मात्र, अमेरिकन निरीक्षकांनी असे न करता, इतर संबंधित यंत्रणांशी विचारविनीमय न करता थेट त्यांच्या अमेरिकेमधील वरीष्ठ कार्यालयास कथीत त्रुटींबाबत अवगत केले व त्यामुळे सदर १५ कन्साईनमेंट्स अमेरीकेमध्ये नाकारण्यात आल्या. सुविधेवरील अमेरीकन निरीक्षकांनी प्रमाणपत्र-२०३ देण्यापुर्वी सदर त्रुटी सुविधेवरील संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्रुटींची पुर्तता करण्याकरिता संधी दिली असती तर आंब्याच्या निर्यातीमधील नुकसान टाळता आले असते.

अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठीच्या प्रि-क्लिअरन्स प्रोग्रामचे संचालक श्रीमती इरीका ग्रोवर यांनी १० मे २०२५ रोजी दिलेल्या ई-मेलमध्ये सूचित केल्याप्रमाणे सुविधा केंद्र प्रमुख यांनी केलेल्या उपाययोजनाचा अहवाल यु.एस.डी.ए. च्या विहित नमुन्यांमध्ये ११ मे, २०२५ रोजी सादर करण्यात आला असून त्याआधारे त्याच दिवसापासून अमेरिकेला आंबा निर्यातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

वाशी येथील सुविधेवरुन ११ मे २०२५ पासून १८ मे २०२५ पर्यंत सुमारे ३९ कन्साईनमेंट द्वारे ५३ हजार ७२ बॉक्सेस (१८५.७५ मे. टन) आंबा अमेरीका येथे निर्यात करण्यात आला असून सदर आंबा अमेरिकन बाजारपेठेमध्ये विक्री केला जात आहे.. सदर आंब्यामध्ये राज्यातील हापूस, केशर, पायरी तर दक्षिण भारतामधील बैगनपल्ली, हिमायत व इतर वाणांची आंबा निर्यात सुरु आहे. उत्तर भारतामधील रसालु, लंगरा, चौसा, दशहरी आदी आंबा देखील विकीरण प्रकिया करुन निर्यात सुरळीत सुरु आहे.

सद्यस्थितीत वाशी येथील विकीरण सुविधेवरुन आतापर्यंत १ हजार ४१३ मे. टन आंब्याची अमेरिका येथे निर्यात झाली असुन सुमारे २ हजार मे. टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथे २७ मे. टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे, असेही पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे-राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

पुणे, दि. 20: हाताने मैला उचलणारे सफाई कर्मचारी अजूनही मल:निस्सारण वाहिनीमध्ये कामे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, या कामातून त्यांची सुटका करण्यासोबतच त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनाने एक कालमर्यादा निश्चित करावी, असे निर्देश राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (19 मे) आयोजित हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे, २०१३ या अधिनियमांची अमलंबजावणी तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांच्या निराकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, ससून रुग्णालयाचे प्रतिनिधी, अशासकीय सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, शासकीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लहान बालके, युवक-युवती, वयोवृद्धांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करावे. या सर्व बालकांना शाळेत 100 टक्के प्रवेश देण्यात यावा. युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता पीएम-विश्वकर्मा योजना अशा कौशल्य विषयक केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा. वयोवृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्रतेप्रमाणे लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच बेघर नागरिकांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करुन द्यावे.

सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. किमान वेतन कायदा तसेच कामगार कायद्यानुसार सफाई कामगारांच्या खात्यात कत्रांटदारांने वेळेत वेतन अदा करावे, याबाबीचे उल्लघंन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने नियमानुसार शासनास प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, असे असेही श्री.डुडी म्हणाले.
0000

भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीतही श्रद्धांजली अर्पण

मुंबईदि. २०:  भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली.

डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA)’ ‘आयुका’ या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ला पर्यायी संकल्पनाही त्यांनी मांडली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्य देखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिकदृष्ट्या अजरामर अशीच राहील. कारण त्यांनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत केलेल्या लेखनामुळे नव्या पिढीत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढीस लागली. ‘आकाशाशी जडले नाते’ असे पुस्तकरुपातून सांगणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यातूनही त्यांच्या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य आणि गुणवत्ता लक्षात यावी.

डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत. या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक – भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन:पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे-भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे एक थोर वैज्ञानिक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळल्याची भावना व्यक्त होत आहे.डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ व वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. तर आई सुमती ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचा विवाह 1966 साली मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरीजा व लीलावती अशा 3 कन्या या दाम्पत्याला आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत नारळीकरांना कोणताही गंभीर आजार नव्हता. पण वयोमानानुसार त्यांची प्रकृती काहीशी कमी-जास्त होत होती. त्यांनी मंगळवारी पहाटे झोपेतच अखेरचा श्वास घेतला. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते काहीसे खचले होते.

जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीतच झाले. 1957 साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1972 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर 1988 मध्ये त्यांची पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्य कळवीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. विविध मराठी नियतकालिकांतून त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत. या माध्यमातून त्यांनी देशभरात विज्ञान प्रसरणाची ज्योत पेटवली. त्यांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत.

डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. भारत सरकारने खगोल क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाविषयी 1965 मध्ये त्यांचा पद्मभूषण, तर 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. याशिवाय त्यांनी रँग्लर या पदवीसह खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतरही अनेक सन्मानांवर आपली मोहोर उमटवली आहे. नारळीकरांनी जागतिक पातळीवरही शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले.

जयंत नारळीकरांनी केवळ संशोधन क्षेत्रातच कार्यरत न राहता लेखनाच्या माध्यमातूनही विज्ञानवादाचा प्रसार केला. त्यांची ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘सूर्याचा प्रकोप’ ही पुस्तके चांगलीच गाजली. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा !

महसूल मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला सूचना

मुंबई – वाळूगट अन् खाणपट्टयांसाठी आवश्यक असणारे पर्यावरण मंजुरीचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाने तातडीने मंजूर करावेत तसेच, पर्यावरण विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानगीचा कालावधी कमी करून, त्रृटी असतील तर तर त्यांची विनाविलंब पूर्तता करुन घ्यावी, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या बैठकीवेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना केली. मंत्री पंकजाताई मुंडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नदीमधील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊ नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी नवीन एम सँण्ड धोरण सरकारने मंजूर केले आहे. एका जिल्ह्यात ५० क्रशरना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनाही पर्यावरणीय परवानगी जलदगतीने मिळावी अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

  • प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेणार

वाळू धोरणाबाबत ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रस्ताव जिल्हा स्तरावरुन आले तर तर ते लवकर मंजूर करुन देता येतील. त्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात. असे पर्यावरण सचिव जयश्री भोज म्हणाल्या. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जातील अशी सकारात्मकताही त्यांनी दर्शविली.

प्रस्ताव योग्य पद्धतीने आले तर तातडीने मंजूर करुन देण्यात काहीच अडचण येणार नाही. या विभागाचे सहकार्य महसूल विभागाला असेल. सरकारी विभागांमध्ये समन्वय ठेवून या परवानग्या जलद दिल्या जातील.-पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री

सर्वसामान्य लोकांना सहज वाळू उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणांतर्गत वाळू ठेक्यांचे लिलाव करुन सरकारला मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी मिळते. या वर्षभरात साधारणतः ३ हजार कोटी रुपये महसूल शासनाला मिळणे अपेक्षित आहे.-चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शहांना फोन..अन भुजबळ मंत्री झाले

NCP ने धनंजय मुंडेंची पोकळी भरून काढली-

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद कापले होते. यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. पण आता त्यांना मंत्रिमंडळात घेऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली आहे. पण मुळात राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिपद देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांना सहजपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा केला जात होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ हे राज्यातील बडे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समुदायात त्यांचा एक्का चालतो. पण राष्ट्रवादीने त्यांनाच मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणाही साधला. एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले.

छगन भुजबळांनी आपल्यावर लोकसभा निवडणुकीवेळीही अन्याय झाल्याचा आरोप करून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत सापडले. या प्रकरणात त्यांचे मंत्रिपदही गेले. यामु्ळे ओबीसी समुदायाचा एक मोठा नेते मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तेव्हाच मुंडे यांच्या जागी भुजबळांना संधी दिली जाईल असा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. त्यानुसार, छगन भुजबळांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना धनंजय मुंडे यांचेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी 8 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलणे झाले. त्यानंतर भुजबळांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले. ओबीसी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समुदायात नाराजी पसरली होती. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर फटका बसण्याची भीती होती. त्यामुळे ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडताच मंत्रालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचे दालन जवळपास 2 महिन्यांनंतर उघडण्यात आले आहे. तिथे युद्ध पातळीवर साफसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे भुजबळांना हेच दालन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुजबळांना मुंडेंचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयही मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांनी मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी नेटाने पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत.

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

मुंबई, दि. २०:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी मंत्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.

जन्म ठिकाण: नाशिक.

शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).

ज्ञात भाषा:  मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती :  विवाहित, पत्नी श्रीमती मीना.

अपत्ये:  एकूण १ (एक मुलगा)

व्यवसाय: शेती.

पक्ष:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ: ११९ – येवला, जिल्हा-नाशिक.

इतर माहिती: संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि.जे. टी.आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा खान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटीदरम्यान महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला. माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, १९८५ ‘दैवत’ व १९९० ‘नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केली, ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री, नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

छंद : क्रिकेट, चित्रपट, वाचन व प्रवास

परदेश प्रवास : १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा; १९९१ मध्ये ओसाका, जपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभाग, ऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड, दुबई, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, बेल्झिअम व स्विर्त्झलँड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा, याच दौऱ्यात लंडनमधील स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाः २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयॉर्क, जिनिव्हा, लंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रिया, स्वीडन, नॉर्वे, स्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

ऑगस्ट 1991 मध्ये अनेक आमदार सोबत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करून काँग्रेसमध्ये प्रवेश.
त्यावेळी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ॲड. बी. डी. झुटे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेले अन्न व नागरी नागरी पुरवठा मंत्री पद भुजबळ यांना देण्यात आले.
महात्मा फुले समता परिषद परिषदेची स्थापना केली. यातून वंचित, उपेक्षित दलित, मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यासह देशभर लाखोंचे मेळावे घेतले. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, १९९४ मध्ये पुण्यातील महात्मा फुले पेठ (गंजपेठ) येथील महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एस. पी. कॉलेज येथे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत “समताभूमी” स्मारक राष्ट्राला लोकार्पण केले. तेंव्हा पासून दरवर्षी समताभुमी येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिवशी (२८ नोव्हेंबर) देशभरातून लाखो लोक महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यानंतर देशभर जयपुर देशातील अनेक ठिकाणी ओबीसी समाजाचे लाखोंचे मिळावे घेऊन देशभर ओबीसी समाजाचे प्रश्न मांडून संघटन उभारले.

भाजपचे गांधी विरोधी सोशल वॉर पुन्हा सुरु, राहुल गांधींचा चेहरा मिक्स करत मीर जाफर संबोधले

भाजपने केंद्रात सत्ता मिळविण्यापूर्वी सोशल मिडिया वरून सोनिया गांधी यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच अण्णा हजारे यांची प्रचंड मोठ्ठी बदनामी करत आणि अशीच मिक्स छायाचित्रे बनवून , ती व्हायरल केल्याचा काल सर्वांना आठवत असेल, कॉंग्रेस ने कधी ज्या बदनामीचा मुकाबला करण्याचाही प्रयत्न केला नाही . अशाच पद्धतीने मिडिया वॉर आता राहुल गांधीं विरोधात सुरु झाले आहे कि काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे ,भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये, राहुल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र केले आहेत. यासोबतच दोघांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी मालवीय यांनी या पोस्टरसह लिहिले- राहुल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदनही केले नाही. ते वारंवार विचारतात की आपण किती विमाने गमावली. पण, राहुल यांनी कधीही विचारले नाही की या युद्धात भारतीय सैन्याने किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त झाले.

यासोबतच, मालवीय यांनी राहुल यांना आजच्या काळातील मीर जाफर असे संबोधणारे आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. खरंतर, मुघल सेनापती मीर जाफर हा इंग्रजांचा मित्र होता.

या पोस्टरमध्ये राहुल पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पाठीवर बसले आहेत. ते भारतीय सीमेकडे पाहत आहेत आणि विचारत आहेत की आपण किती विमाने गमावली? खाली शाहबाज म्हणतात, मोठ्याने विचारा.

राहुल सतत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्रास देत आहेत. ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे, ज्यामुळे हवाई दलाचे नुकसान झाले. यासोबतच परराष्ट्रमंत्र्यांचा एक व्हिडिओही शेअर केला जात आहे.
मीर जाफर कोण होता?

मीर जाफर हा एक मुघल सेनापती होता. जो भारतीय इतिहासात विश्वासघाताचे प्रतीक मानला जातो. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत तो इंग्रजांशी सामील झाला आणि नवाब सिराज-उद-दौलाचा विश्वासघात केला. मीर जाफरने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीशी एक गुप्त करार केला, ज्यामुळे सिराज-उद-दौलाचा पराभव झाला आणि भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया रचला गेला. नंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले.

पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’ – राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज सोमवार, 19 मे रोजी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्मारक येथून शंखनादन व हनुमान चालीसा पठाण करून या सिंदूर यात्रेची सुरुवात होऊन परत तिथेच समारोप सभा झाली.

मातालहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

लहान मोठ्या रणरागिणींकडून लाठीकाठी चे प्रदर्शन करण्यात आले,
महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा ताई फरांदे म्हणाल्या , ही सिंदूर यात्रा आपल्या मातृ शक्तीचा प्रतीक आहे ज्या भगिनींनी पहेलगाम हल्ल्यामध्ये आपले कुंकू गमावले आपल्या भारतीय सैन्यातील कुशल स्त्रीशक्तीने दुश्मनावर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले आहे त्यामुळेच आपली ही सिंदूर यात्रा तमाम स्त्री शक्ती साठी समर्पित आहे.

मेजर देशपांडे यांच्या प्रतिकात्मक संदेशात स्त्री शक्तीची महानता नमूद करण्यात आली. त्यांचे दोन्हीही पुत्र सैन्यात असून त्यांना त्याचा खूप अभिमान आहे.

या सिंदूर यात्रेत भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा अध्यक्ष सौ हर्षदाताई फरांदे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे, गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, स्वाती मोहोळ यांच्या सह विविध संघटन
नांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व पुणेकर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते