Home Blog Page 521

धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठीक ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा – संदीप खर्डेकर.

वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा – संदीप खर्डेकरांची आयुक्तांकडे मागणी.

पुणे- धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठीक ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा,वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्त्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’ या वर्षी पाऊस 106% पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सालाबादप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर नदीपात्रालगत च्या इमारतींमध्ये किंवा वस्त्यांमध्ये पाणी शिरणार आणि मग “नेमीची येतो मग पावसाळा” ह्या काव्यपंक्ती प्रमाणे मनपा पुरामुळे बाधितांची कोणत्यातरी शाळेत व्यवस्था करणार, त्यांना जेवण, कपडे व इतर गोष्टी उपलब्ध करणार, अनेक स्वयंसेवी संस्था व राजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांना माणुसकीच्या नात्याने संसारोपयोगी साहित्याची मदत करणार, पाणी ओसरले की बाधित कुटुंब पुन्हा आपल्या घरी जाणार आणि मग पुढच्या वर्षीचा पाऊस, धरणातून विसर्ग, बाधित कुटुंबियांचे तात्पुरते स्थलांतर हे चक्र सुरूच राहणार.मी ह्या निवेदनाद्वारे आपणास आग्रही मागणी करत आहे की ” हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कायमस्वरूपी योजना केली असेल तर त्याचा तपशील जाहीर करावा, त्यातील काही अडचणी असतील तर त्या देखील पुणेकरांसमोर खुल्या कराव्यात आणि ज्या 50/100 ठिकाणी धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी शिरते त्याच्या सद्यस्थितीबाबत अवगत करावे”

पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव!

पुणे-वाढीव एफएसआय देऊन पुण्यातील कालवा उखडून देणार नाही ,कालव्याची जागा शहराची ऑक्सिजन झोन नलिका बनली पाहिजे या दृष्टीने या जागेवर पर्यावरण पूरकच कामे व्हावीत , या जागेचा किंवा या जागेवर वाढीव FSI देऊन हि जागा कॉंक्रीटच्या डायनोसॉर पासून वाच्विलीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत,चाफेकरनगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, शंकर थोरात व प्रशांत कांबळे, सुभाष करंडे, फॅबियन सॅमसन यांनी पत्रकार परिषद घेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव काही बिल्डर महापालिकेच्या मदतीने राबवीत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले,’ पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेला मुठा डावा कालवा (किलोमीटर 8 ते 27) म्हणजे 20 किलोमीटर लांबीचा कालवा हा पुणे शहरात वारजे ते गणेशखिंड रोड असा मध्यवर्ती भागातून जातो. यातील काही ठिकाणी या कॅनॉलमध्ये पाईप टाकून रस्ता बंदिस्त करण्यात आला आहे तर काही ठिकाणी हिरवाई जोग्गिंग ट्रॅक व तत्सम वॉकिंग, सायकल ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत. वाहतूक समस्येमुळे काही ठिकाणी हा पथ एकेरी वाहतुकीसाठी तर काही ठिकाणी पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वापरला जातो. काही भागावर वृक्षरोपण केले गेले आहे. मॉडेल कॉलनी भांडारकर रोड भागात या रस्त्यावर वृक्षांचे हिरवे आच्छादन तयार झालेले आहे.

परंतु आता पुणे महानगरपालिकेने काही बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी अधिकचा एफएसआय मिळावा यासाठी, या कॅनॉलला थेट पोहोच/ अप्प्रोच रस्ता म्हणूनच संबोधले आहे. या शहर विकास आराखड्यात वॉटर बॉडी दर्शवण्यात आलेल्या कॅनॉल रोडला थेट १२ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता संबोधून बेकायदेशीर रित्या वाढीव एफएसआय सहित बांधकाम नकाशे मान्य करण्यात आले आहेत. यासाठी बिल्डरला पाटबंधारे विभागाशी कॅनाल / कालव्याचा सेवापथ वापराचा एक वर्षाचा खंडित होणारा तात्पुरत्या स्वरूपाचा भाडेकरार करण्यास करण्यास सांगितले जात असून त्याद्वारे पाटबंधारे विभाग,मनपा बांधकाम विभाग आणि कॅनॉल शेजारील खाजगी जमीन मालक, बिल्डर हे संगनमताने बेकायदेशीर व्यवहार करीत आहेत. यासंदर्भातील अधिकृत बांधकाम नकाशे, भाडे करार आणि विकास आराखडे पत्रकार परिषदेत आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दाखवले.

1995 साली पुणे शहरातून जाणाऱ्या कॅनॉल / कालव्याचा सेवारस्ता म्हणून खंडित स्वरूपात पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार दुचाकींसाठी दिवसा हा रस्ता पुणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला. आता या 20 किलोमीटर रस्त्यावर काही ठिकाणी वृक्ष काही ठिकाणी जोग्गिंग , वॉकिंग, सायकल रस्ता अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. परंतु भवितव्याचा विचार करता शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही.

या कॅनॉल रस्त्याच्या गैरफायद्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने आज उघड केले. शिवाजीनगर मधील आयुक्त बंगल्यासमोरील हरेकृष्ण मंदिर रोड वरील जीवन प्रदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने पाटबंधारे विभाग सोबत एक वर्षाचा भाडेकरार केला आहे. पुणे महानगरपालिकेची या रस्त्याबाबत पाटबंधारे विभागाने यापूर्वीच करार केलेला असतानाही या नव्या कराराद्वारे या कॅनॉल रोडचा वापर करण्यास पाटबंधारे विभागाने बेकायदेशीर परवानगी दिली. या तात्पुरत्या स्वरूपातील भाडे कराराला पोहोच रस्ता समजून या सोसायटी च्या बिल्डरने वाढीव एफएसआय घेत नवे नकाशे मान्य करून घेतले आहेत. याच धर्तीवर कॅनॉल हाच रस्ता दाखवून त्याद्वारे वाढीव एफएसआय मिळवण्याचे षडयंत्र पुणे शहरातील मध्यवर्ती प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी या तब्बल वीस किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर केले जाऊ शकते. यामुळे आम आदमी पार्टी तसेच चाफेकर नगर येथील स्थानिक रहिवाशी यांनी मिळून पुणे महानगरपालिका आयुक्त ,बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांची भेट घेतली. परंतु त्याकडे महानगरपालिकेने सहेतुक दुर्लक्ष केले. त्यामुळे आता यासंदर्भात आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत तसेच चाफेकर नगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, प्रभाकर तिवारी, सागर किंजालास्कर, गुलाब वाघ आदींनी सीपीसीच्या कलम 80 नुसार आयुक्त मनपा, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग पुणे व नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेने सदरचे नकाशे रद्द करावेत व बांधकाम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, अन्यथा आम आदमी पार्टी व चाफेकरनगर वस्ती नागरिक आयुक्तांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

शहरात असा २० किलोमीटर जमिनीचा पट्टा गणेशखिंड ते वारजे असा उपलब्ध आहे. शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही. असे असल्याने भविष्यात त्याचा अतिशय उत्तम वापर युरोपियन / जर्मनी च्या धर्तीवर जॉगिंग, व्यायाम , सायकल व पादचारीवापरासाठी, कलाकार कट्टा, शालेय विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी आदीसाठी वापरता येईल. शहराला हा ऑकसीजन झोन/ ब्रीधिंग झोन म्हणून वापरता येईल. मध्य शहरातील एफएसआय वाढवण्यासाठी याचा वापर होऊ नये अशी अपेक्षा आहे.

शनिवारी पुण्यात ख्रिस्ती हक्क परिषदेचे आयोजन

पुणे : रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (31 मे)  ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस) केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अॅड. अंतुन कदम, जॉन मंतोडे,  जुबेर मेमन, पिटर डिसूझा, के.  बी. एन.  सॅमसन  आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रशांत (लुकस) केदारी म्हणाले,  ख्रिस्ती हक्क परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून, बिशप थॉमस डाबरे, राज्यसभेचे खासदार पी. विल्सन (DMS, तमिळनाडू) , श्री. दिलीप नाईक, श्री. पिटर डिसूझा, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहेमान, पा.पिटर जॉर्ज, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,आमदार बापूसाहेब पठारे, काँग्रेस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप,सतिश मेहेंद्रे, ऍंथोनी जेकब उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. 31 मार्च रोजी सकाळी  10 ते सायंकाळी 4 यावेळेत ही परिषद पापल सेमिनरी हॉल, नगर रोड, रामवाडी, वडगावशेरी, पुणे येथे होणार आहे. 

परिषदे विषयी अधिक माहिती देताना केदारी म्हणाले, यंदाची ख्रिस्ती हक्क परिशद ही सहावी परिषद आहे. यामध्ये समाजाच्या उन्नतीविषयी विविध विषयांवर चर्चा, ठराव आणि मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे, राज्यात 45 लाखांहून अधिक लोकसंख्या ख्रिस्ती समाजाची आहे, त्यापैकी 80 टक्के समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक विकास महामंडळ, विधान परिषद वा राज्यसभेत संधी, समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला आळा बसावा, महिला सशक्तीकरणासाठी पावले उचलणे, पुणे शहरात ख्रिस्ती समाजासाठी सांस्कृतिक भवन असावे आदि बाबींचा समावेश असल्याचे केदारी यांनी सांगितले.  तसेच परिषदेच्या दिवशी समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे त्यांचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

डी. पी. रोडवर रात्री उशिरा एका कॅफेसमोर कोयते घेऊन दहशत माजविली..पण पोलिसात तक्रारच नाही

पुणे: शहरातील एरंडवणे नजीकच्या उच्चभ्रू डी. पी. रोडवर उशिरा सुरू असलेल्या एका कॅफेसमोर तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि हातात कोयते, तत्सम हत्यारे असलेल्या तीन तरुणांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना २७ मे रोजी रात्री १२ वाजता घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन अनोळखी तरुण एका दुचाकीवर कॅफेजवळ येतात, तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात कोयता व इतर धारधार शस्त्रं असतात. अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी कॅफेमध्ये प्रवेश केला आणि लगेच बाहेर येताच वाहनांवर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची प्रतिक्रिया अथवा कॅफे चालकाने दिलेली तक्रार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही कोणतीही अधिकृत तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झालेली नाही. ना गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण व वादाचे स्वरूप अद्याप अस्पष्ट आहे.दरम्यान अलंकार पोलीस चौकीपर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे मात्र हॉटेल मालक ,चालक तक्रार द्यायला धजावत नसल्याचे वृत्त आहे

प्रत्येकी ३ भारतीय व्यक्तीपैकी १ जण पेय म्हणून करतो दूधाचे सेवन : गोदरेज जर्सी

पुणे, 29 मे, 2025 – जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने, गोदरेज जर्सीने “बॉटम्स अप… इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!” या अहवालाद्वारे भारतीय ग्राहकांच्या बदलत्या पसंतींचा गौरव केला आहे. या निष्कर्षांनुसार, दर तीनपैकी एक भारतीय व्यक्ती पेय म्हणून दूधाचे सेवन करते तर पुणेस्थित 39 टक्के ग्राहक पेय म्हणून दुधाला प्राधान्य देतात.

जोडीला, 39% ग्राहक फ्लेवर्ड दूध पिणे पसंत करतात किंवा घरी दूधात फ्लेवर मिसळून मग ते दूध पितात. पालकही आता फ्लेवर्ड दूध हे पोषणमूल्यपूर्ण, सोयीचे आणि आनंददायक पेय म्हणून आपल्या मुलांना देऊ लागले आहेत. दिवसभरात 37% पालक तर 41% खेळाच्या वेळेत फ्लेवर्ड दूध हे एक रिफ्रेशिंग पर्याय म्हणून मुलांना देतात.

या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सुरी म्हणाले, “गोदरेज जर्सीमध्ये आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. चव, ताजेपणा आणि पोषण यांचा समतोल राखून, ब्रँड नवीन पिढीसाठी दूध म्हणजे काय याची व्याख्या नव्याने करत आहे. गोदरेज जर्सी बदाम दूध हे केवळ चवीलाच आनंद देणारे नसून एक आरोग्यदायी, संपूर्ण पोषण देणारा पर्याय आहे. फक्त वर्ल्ड मिल्क डेपुरताच मर्यादित नाही तर हे दूध दररोज पिण्यासाठी योग्य पेय आहे.”

“भारत जसजशी अधिक सजग आणि जाणिवपूर्वक वापर करणारी संस्कृती स्वीकारतो आहे, तसतशी दुधाबाबतची धारणा बदलते आहे. आता केवळ परंपरेपुरते मर्यादित न राहता आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशा नाविन्यपूर्णतेपर्यंत हे पोहोचले आहे. गोदरेज जर्सी या बदलाचे नेतृत्व करत असून, परंपरेला नव्या कल्पनांशी जोडून दूध हे दररोजच्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग बनवत आहे,” असेही ते म्हणाले.

“बॉटम्स अप.. इंडिया सेज चीयर्स टू मिल्क” या शीर्षकाखाली झालेल्या सर्वेक्षणात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमधून माहिती गोळा करण्यात आली. त्यात  दुग्धजन्य पदार्थांना असलेली पसंती आणि गुणवत्तेची अपेक्षा यावर लक्ष केंद्रित केले गेले.

या निष्कर्षांमधून असे स्पष्ट होते की, दुग्धक्षेत्राने ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत राहण्यासाठी नाविन्यपूर्णता आणि गुणवत्तेचा मिलाफ साधत भविष्यातील वाढीस चालना दिली पाहिजे.

या सर्वेक्षणाची रचना आणि अंमलबजावणी YouGov मार्फत केली गेली. गोदरेज ग्रुपच्या गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) या वैविध्यपूर्ण अन्न व कृषिव्यवसाय क्षेत्रातील उद्योगसमूहाची उपकंपनी असलेल्या क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड मार्फत या उत्पादनांची गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने विक्री केली जाते. 

भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न:आरोपीला अटक

पुणे-खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरात घुसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47, रा. पुणे) या इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याने फक्त घरात घुसण्याचाच नव्हे, तर पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तापकीर यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून लक्ष वेधलं. त्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1), भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2)(3) (धमकी व झटापट), 132, 333 (सरकारी कर्मचाऱ्यास दुखापत), तसेच पोलिस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम 1922 अंतर्गत कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुमाळने तीन वेळा तापकीर यांच्या धनकवडीतील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ केली, धमकावलं आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी तापकीर यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला या व्यक्तीवर किरकोळ स्वरूपात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही आरोपीने वारंवार गोंधळ घालत धमक्या देत राहणं सुरू ठेवलं.गंभीरता लक्षात घेता आमदार तापकीर यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपायुक्तांच्या आदेशानुसार सहकारनगर पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीला अटक केली.

भीमराव तापकीर हे भाजपचे कार्यक्षम आमदार आणि मंत्रिपदाचे हक्काचे दावेदार असलेले ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी 2001 मध्ये पुणे महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात केली, आणि सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 च्या पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून विधानसभेत पदार्पण, त्यानंतर 2014, 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीत सलग विजय मिळवून आमदार झाले आहेत.

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या.
पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.
विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे
राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घ्यावी. सर्व मानाच्या पालख्यांना सेवा सुव्यवस्थित राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपल्यावर पोलीस बंदोबस्तासाठी पुढील जिल्ह्यातील पोलिसांनी अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वाखरी : मॉडेल वारकरी तळ करणार
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावर्षीही राहणार समूह विमा
पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘निर्मल वारी, हरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा
वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
36 वॉटरप्रुफ मंडप
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी वारकरी, पालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.
विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

मिर्झा मशिद ट्रस्ट, रजाशाह हॉल (दर्गा), जोग दर्गा, हजरत सिद्दिक शाह मोल्ला दर्गा अशा अतिक्रमणांवर कारवाईसाठी आमदार टिळेकर रस्त्यावर आक्रमक …

पुणे- शहरातील गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून येथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेने तात्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली. या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अतिक्रमणांविरोधात व हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलिस चौकीसमोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. विविध हिंदू संघटना, संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका प्रशासन लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसात आरक्षित जागा ताब्यात घेऊ, असे आश्वासन देत नाही, तोवर रास्ता रोको सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेतल्याने वाहतूकही खोळंबल्याचे पाहायला मिळाले. जवळपास अडीच ते तीन तास रास्ता रोखून धरला.

योगेश टिळेकर म्हणाले, हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही. मात्र, त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमणे आणि त्यातून घडणाऱ्या राष्ट्रविरोधी घटना रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे. या परिसरात महानगरपालिकेचे भाजी मंडईचे आरक्षण आहे. मात्र, ४० वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही व आरक्षित जागा ताब्यात घेत नाही. ही जागा ताब्यात घेऊन येथे नागरिकांसाठी भाजी मंडई उपलब्ध करून द्यावी. महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करतेय, याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे.

महापालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई करावी. प्रत्येकवेळी पोलिसांना पुढे करून महापालिकेने याकडे दुर्लक्ष करू नये. अतिक्रमणे आणि त्याबरोबर होणाऱ्या राष्ट्रविरोधी घटनांना आळा घालण्यासाठी येथील हिंदू समाज जागरूकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही योगेश टिळेकर यांनी नमूद केले.दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योगेश टिळेकर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

‘फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे, 28 मे 2025 – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष असलेली महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक 17 नागरिकांसाठी आज खुली ठेवण्यात आली होती.

1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकर यांचे वास्तव्य या खोलीत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली होती. तसेच इथेच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी राष्ट्रप्रेरक काव्यरचना केली.

या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे गणवेश, वैयक्तिक वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रांचे संग्रह पाहायला मिळतो. ही खोली आजही अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून ओळखली जाते.

1905 साली विदेशी वस्त्रांची होळी प्रकरणामुळे त्यावेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून वगळले होते, त्यावर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार निषेध केला होता.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन केले असून दरवर्षी सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वांसाठी खुली केली जाते.

आजच्या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य श्याम मुडे आणि उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 :- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय आज (दि. 28 मे) नियोजन विभागाने जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. श्री क्षेत्र जोतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून, त्याचा विकास करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणे, श्री जोतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन करणे, देवस्थान समिती/प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे, श्री जोतिबा डोंगरावर दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणे, श्री जोतिबा डोंगरावर केदार विजय गार्डन निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, श्री जोतिबा डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर चव्हाण तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर वाहनाकरिता पार्कंग व्यवस्था करणे, श्री जोतिबा डोंगरावर पाणपोई व शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे. या कामांवर पहिल्या टप्प्यात 259.59 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 81.60 कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्त्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्त्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात येणार असून या समित्यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जोतिबा देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव, महड, पाली, सिद्धटेक मंदिर जीर्णोद्धारास 148 कोटींच्या खर्चास मान्यता

मुंबई, दि. 28 :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात मंत्रालयात सातत्याने संबंधीतांच्या बैठका घेऊन त्यांनी अष्टविनायक मंदिर जीर्णोद्धार आणि विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मान्यनेनंतर दोन आठवड्यातंच 147 कोटी 81 लाख खर्चाचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय आज जारी झाला. त्याबद्दल अष्टविनायक भक्तांकडून, स्थानिक नागरिकांकडून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधीत आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार 2021-22 मध्ये 92 कोटी 19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर 2024 मध्ये 147 कोटी 81 लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार, पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण शंभर कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी 47 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभ

पुणे, दि. २८: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत २०१८-२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यात ९ हजार ६२३ अर्जदारांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. मंजूर कर्जाचे नियमित हप्ते भरून परतफेड करणाऱ्या कर्जदार लाभार्थ्यांना ५९ कोटी ८८ लाख रुपये परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे विभागीय समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे.

मराठा समाजातील बेरोजगार तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येते. महामंडळाच्या या योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १ लाख ४० हजारावर तरुण तरुणींनी १३ हजार २८६ कोटी रुपये कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करीत आदर्श निर्माण केला आहे.

महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेसाठी अर्जदार पात्र असल्याचे पत्र देण्यात येते. या पत्रासह अर्जदाराने बँकेकडे कर्ज प्रस्ताव करावा लागतो. अर्जदाराने बँकेच्या कर्जाचा हप्ता अदा केल्यानंतर त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम महामंडळाकडून जमा करण्यात येते.

महामंडळाच्या या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत ११ हजार ८५० अर्जदार पात्र ठरले आहेत. यापैकी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी ९ हजार ६२३ जणांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्या प्रकल्पासाठी ९०८ कोटी ६९ लाख रुपये कर्जवाटप केले.

महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात फक्त एकच जिल्हा कार्यालय आहे. महामंडळाच्या नावाखाली कोणी त्रयस्त व्यक्ती पैसे घेत असेल, स्वतःला महामंडळाचा कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून संबोधित असेल तर त्यांच्यावर महामंडळाच्या आदेशानुसार गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात यावा. मराठा समाजातील बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन लांबोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करा अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई :महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पुणे दि. २८ : पुणे शहरातील कात्रज,बिबवेवाडी ,धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे आदेश देण्यात आले. बैठकीला आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कात्रज,बिबवेवाडी ,धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, कात्रज,बिबवेवाडी, धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा.

अमनोराकडून मिळालेल्या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार : अमितेश कुमार

अमनोरा सिटी कॉर्पोरेशनतर्फे पोलीस दलाकडे नऊ वाहने सुपूर्द

पुणे : अमनोरा सिटी कॉर्पोरेशनने पोलीस दलाला दिलेल्या नऊ वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढीस लागण्यास उपयोग होणार आहे. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. पुण्यातील वाहतूक प्रश्नासह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.
सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा) यांनी सी. एस. आर. फंडामधून पुणे शहर पोलीस दलास नऊ चारचाकी वाहने (किया कॅरेन्स) रितसर खरेदी प्रक्रिया राबवून पोलीस दलाकडे सुपूर्द केली. वाहने हस्तांतरणाचा सोहळा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आज (दि. 28) अमनोरा पार्क टाऊन क्लब, हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा)चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे या वेळी सुपूर्द केल्या. आदित्य देशपांडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकात अनिरुद्ध देशपांडे यांनी अमनोराच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांचे सबलीकरण, पाणी बचतीचा संदेश, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले जात आहे. आरोग्य उपक्रमांतर्गत 1200 महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अमनोरा येथील घरेलु कामगार महिलांना (अवंतिका) पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून येत्या वर्षभरात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे. खामगाव येथे पारधी मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली असून तेथील 150 विद्यार्थ्यांना कौशल्यविकास उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, शहर सुरक्षेसाठी पोलीस दल सतत कार्यरत असते. यात महिला पोलीस शक्तीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात प्रथमच पोलीस दलात किया कॅरेन्स ही वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
महिला पोलीस सारथ्य करत असलेल्या नऊ किया कॅरेन्सला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अनिरुद्ध देशपांडे, आदित्य देशपांडे हिरवा झेंडा दाखविला व वाहने पोलीस दलात सामिल करून घेण्यात आली.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, पुण्यासारख्या सातत्याने विस्तारित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणे अवघड आहे; परंतु तंत्रज्ञान, मनुष्यबळ यांच्या मार्फत नागरिकांचे सुरक्षा, वाहतूकप्रश्न सोडण्यासाठी पोलीसदल कटीबद्ध आहे. नागरिकांनी आमच्या कामास सहकार्य करून सहभागही नोंदविल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच शहराला शिस्त लागण्यास मदत होईल.
नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी आणि प्रश्न 112 या क्रमांकावर पोलीस विभागाकडे मांडावे. प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत रहावा. आम्ही त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा प्रयत्न करू. या परिसरात रस्त्यावर, पादचारी मार्गांवर स्पिकरवर मालाचा भाव सांगत, आरडाओरडा करून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले पाहण्यात आले. अशा प्रकारे रस्तेवाहतूक आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सूत्रसंचालन स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी केले तर आभार डॉ. राजकुमार शिंदे यांनी मानले.

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिवस साजरा:वार्षिक पुरस्कारांचे वितरण

गुणवत्तापूर्ण कामातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्धी होईल : प्रसाद कुलकर्णी
पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी असली तरी माझ्या जन्मभूमीसाठी देखील मी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू इच्छित आहे. ज्यायोगे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बघताना भारत उत्पादन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने ग्रामीण भागात पुरेशा व्यवस्था उपलब्ध करून गुणवत्तापूर्वक काम केल्यास भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील आणि विकास साधला जाईल, असे प्रतिपादन सॅप पार्टस्‌‍चे कार्यकारी संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा (पीएमए) 49वा स्थापना दिवस आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा ऑटो क्लस्टर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रसाद कुलकर्णी बोलत होते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, राहुल जोशी तसेच ‌‘सकाळ‌’चे संपादक सम्राट फडणीस, ॲकॅडेमिक अलायन्सचे ऋषिकेश धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : राजेंद्र चोडणकर, फर्स्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : के. केशवन, वुमेन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : स्वाती वितोंडे, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर : एसपीपीयू, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम, एनजीओ विथ सोशल इम्पॅक्ट : सेवा वर्धिनी, इन्क्युबेटर ऑफ द इयर : एआयसी पिनॅकल, स्टुडस्टंस्‌‍ चॅप्टर ऑफ द इयर : एआयएसएसएमएस, सीओई ऑफ द इयर : पीएमए सीओई – एचआर, एक्सपोर्टर ऑफ द इयर : सुप्रिया लाईफसायन्स लि. यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण तसेच एचआर मित्र या त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढीस लागल्यास शिक्षित युवा पिढीचा मोठ्या शहरांकडे असलेला ओढा कमी होऊन शहरी व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

सम्राट फडणीस म्हणाले, उद्योग, व्यवसाय, शिक्षण यासह पुण्याची सांस्कृतिक ओळखही महत्त्वाची आहे. या क्षेत्रांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उद्योग, व्यवसाय क्षेत्रात भरारी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनने दीपस्तंभासारखे कार्य करत रहावे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे काय होईल, याचा पुरेसा अंदाज नसल्यामुळे पीएमए सारख्या संस्थांनी स्वत:च्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवावी. उद्योजक आणि व्यावसायिकांनी भारतीय संस्कृती व्यवस्थापनातील कौशल्य, संयम बाळगत नेटाने प्रगती करावी. भारतीय संस्कृतीला लाभलेला अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा धागा धरून ठेवत यशस्वी व्हावे.
शैक्षणिक संस्था आणि उद्योग-व्यवसायातील संधी यांच्यातील परस्पर संबंध उलगडत ऋषिकेश धांडे म्हणाले, विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. या करिता विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयात गेली 25 कार्यरत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त पुस्तकी शिक्षण न घेता प्रत्यक्ष कार्यक्षेत्राविषयी माहिती प्राप्त करून घेत भविष्यातील उज्ज्वल वाटा शोधू शकतो.
स्वागतपर प्रास्ताविकात बाळ पाटील यांनी पीएमएच्या 49 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. नव्या तंत्रज्ञानाला आपलेसे करत व्यवस्थापन विकास क्षेत्रात पीएमएतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रसाद मिरासदार आणि डॉ. संजय गांधी यांनी करून दिला. प्रा. अभिजित खुरपे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. निधी बिष्णोई, डॉ. गिरीश तेलंग यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राहुल जोशी यांनी मानले.