Home Blog Page 445

विबग्योर शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके.

पुणे – अग्निशमन दलाकडे आग व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये याबाबत शहर परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स, सरकारी आस्थापना व विविध निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये जनजागृतीपर विविध व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक करुन दाखविले जातात. या अशा जनजागृतीपर कार्यामुळे प्राथमिक स्तरावर आग वा आपत्तीचा सामना कसा करावा याबाबत माहिती देण्यात येते आणि शहरातील नागरिक यामुळे जागरुक होतात व आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास सहकार्य करत मदत करीत असतात.

याप्रकारे आज सकाळी विगब्योर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथे अशाप्रकारे अग्निशमन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान कशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असतात हे जाणून घेत अग्निरोधक उपकरण त्याचे प्रकार व वापर तसेच विविध क्षेत्रातील आगी, अपघात याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उस्फूर्तपणे नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आणि शिक्षकांनी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे आणि जवानांचे आभार मानले.

“अग्निशमन दल सातत्याने याप्रमाणे जनजागृतीपर विविध उपक्रम राबवित असते. नागरिकांकडून देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळतो. प्रत्येकजण याबाबत जागरुक असावा जेणेकरून आपले शहर यापासून सुरक्षित राहण्यास मदतच होईल.”असे अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्या निर्देशामुळे राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना दिलासा

विविध कार्यकारी सोसायट्यांना मिळणार राज्य सहकारी बँकेचे पाठबळ !

पुणे (प्रतिनिधी)
राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बॅंका अडचणीत आहेत किंवा बंद आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून होणार वित्त पुरवठा बंद झाला आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत असून यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवा सोसायट्यांना आधार मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या काही जिल्हा बँकामधून विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना हंगामासाठी कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे हंगामासाठी पैसे हवे असतील तर इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याची बाब शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी निदर्शनास आणून दिली होती.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सहकारी बँकने या विषयात लक्ष घालावे अशी सूचना बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना केली होती. आता या नियमांतील बदलामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांनाही काही निकष पाळून वित्त पुरवठ्याबाबत राज्य सहकरी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गेली तीन वर्षे नफ्यात आहेत, ज्यांचा एनपीए १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा सोसायट्यांना थेट वित्त पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. राज्यात एकूण २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो.

सोसायटी सक्षम तर गावही सक्षम : केंद्रीय मंत्री मोहोळ

गावचे अर्थकारण मजबूत ठेवण्यात गावातील सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायट्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय ज्या जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या बॅंकांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बॅंकेतून थेट कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गावची सोसायटी सक्षम असेल तर गावचे अर्थकारणही सक्षम असते, म्हणूनच सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांची क्षमता २०० खाटांपर्यंत करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

पुणे: लोहगाव येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येत्या ऑक्टोबर अखेरीस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली आहे.

सोबतच, आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता २०० खाटांपर्यंत करा, अशीही निविदनाद्वारे मागणी केली आहे.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यासाठी बापूसाहेब पठारे अनेक वर्षांपासून सातत्याने विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत. सन २०१३ मध्ये या रुग्णालयासाठीची मंजुरी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. पुणे शहरातील ससून रुग्णालयावरील ताण कमी करणे, तसेच परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, या हेतूने हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ते सुरू करण्याचा मनोदय बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला आहे. पठारे सातत्याने या रुग्णालयाच्या कामाची पाहणी व पाठपुरावा करत आले आहेत.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबत आरोग्यमंत्र्यांना विचारणा केली होती. यावर आरोग्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असल्याची माहिती दिली होती.

लोहगाव परिसरात नागरिकरण वेगाने वाढत असून पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर जिल्ह्यांतील तसेच परराज्यातून आलेले अनेक नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. यामुळे लोहगावमधील हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या या परिसरात अंतर्गत व बाह्य रिंगरोडची कामे सुरू असल्याने भविष्यात लोहगावचा विकास वेगाने होईल, हे लक्षात घेता या रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता अपुरी पडणार आहे. भविष्यात शहरात नवीन रुग्णालयासाठी जागा मिळणे अवघड असेल, म्हणून सद्यःस्थितीतच रुग्णालयाची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ते सातत्याने पाहणी व पाठपुरावा करत असून संबंधित प्रशासनाकडेही विनंती केली आहे.

नवीन उद्योगाकरिता टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे दि. 24 : मैत्री सेल उद्योग विभागाअंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता 18002332033 टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात येणार असून अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.

या टोलफ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन 022-22622322, 22622361 दुरध्वनी क्रमांकवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. यामध्ये नवउद्योजकांना उद्योग सुरु करण्याकरिता लागणाऱ्या अनुज्ञाप्ती, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, उद्योगधंद्यासंदर्भात शासनाशी निगडित येणाऱ्या अडीअडचणी व त्यावर उपायायोजना, विविध उत्पादनांचे विदेशामध्ये निर्यात करणे, निर्यातीकरिता शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही श्रीमती कोठारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा यशदा करणार

मुंबई, दि.२४ :- पुणे महानगर प्रदेश (PMR) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, यशदाच्या प्रभारी महासंचालक पवनीत कौर, निबंधक राजीव नंदकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात भारतासाठी १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा करण्यात केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्र प्रदेश) आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) या चार शहरी क्षेत्रात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये ग्रोथ हब (G-HUB) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब (G-HUB) म्हणून विकसित करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यानुसार नीती आयोगाने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश केला. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक कॉरिडोर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, दवाखाने असल्याने ग्रोथ हब बनण्यासाठी पुणे महानगर प्रदेश आघाडीवर आहे. पुण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था यशदा पुणे महानगर प्रदेश क्षेत्रासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून कामाबाबतचे निरीक्षण विभागीय आयुक्त करणार आहेत. यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणेने कामाबाबत अंमलबजावणी करावी.
पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वात प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुणे असेल, यामुळे पुणे महानगर विकास प्राधिकरणासह पुण्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील कामात सातत्य ठेवावे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीसाठी पुण्यामध्य यशदा येथे लवकरच सर्व संबंधित यंत्रणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक पुण्यात तंत्रज्ञान व नवप्रवर्तन केंद्र: माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत. शिवाय एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव इ.) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे. मेट्रो व रिंग रोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने वारसा पर्यटन, कृषी पर्यटन, आध्यात्मिक सर्किट, अ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दीप अमावस्येनिमित्त पारंपरिक दिव्यांचे पूजन

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आरती

पुणे : समई, निरांजन, पणती, लामणदिवा अशा विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. दीप अमावस्येनिमित्त मंदीरात फुलांचे लामणदिवे आणि दीपज्योती नमोस्तुते अशी साकारण्यात आलेली फुलांची आरास पाहण्याकरिता भाविकांनी अलोट गर्दी केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या वतीने दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे वतीने अध्यक्ष अ‍ॅॅड. शिवराज कदम जहागिरदार व कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांनी त्यांचा सत्कार केला.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे आणि निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारा दीप असतो. त्यामुळे त्याचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यापासून एक उत्साहाचे, आनंदाचे पर्व सुरु होते, त्याचा श्रीगणेशा या दीपपूजनाने केला जातो. त्यामुळे मंदिरात विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. तसेच फुलांची आकर्षक आरास देखील करण्यात आली.

सोनल पाटील म्हणाल्या, न्याय्य हक्कांपासून परिस्थिती अभावी वंचित राहिलेल्या दिन दुर्बल आणि अबलांना कायदेविषयक मार्गदर्शन व मदत  देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरण सातत्याने करत आहे. आषाढ अमावस्येचे नकारात्मक चित्र दूर करून सकारात्मक संदेश देणारे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे.

पुणे विद्यार्थी गृह व प्रोग्रेशन स्कुल यांच्यात सामंजस्य करार-अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयात ‘अजेंटिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणार

पुणे: येथील पुणे विद्यार्थी गृहाचे (पीव्हीजी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय व प्रोग्रेशन स्कुल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत महाविद्यालयात ‘अजेंटिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणार आहे. या केंद्रामुळे एआय क्षेत्रातील संशोधन व विकास वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमतेचा झपाट्याने वाढणारा वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे.

जागतिक एआय दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने ‘भविष्यातील एआयचा वापर’ यावर चार दिवसीय अजेंटिक एआय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण घेता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’च्या वतीने अत्याधुनिक ५०० आसनक्षमतेचे, पूर्णपणे वायफाय सक्षम सभागृह डायनॅमिक लर्निंग हबमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे ३०० ते ४०० सहभागींसाठी एकाच वेळी थेट कोडिंग सत्रे आयोजित केली गेली. या मोठ्या प्रमाणावरील हॅण्ड्स ऑन सहभागामुळे चार दिवसांत जवळपास १००० हून अधिक सहभागींना अजेंटिक एआयचे बारकावे सखोल आणि विस्तृत पद्धतीने शिकण्याची संधी मिळाली.

एक्सेलरंट टेक्नॉलॉजीजचे (लर्निंग अँड डेव्हलपमेंट) व प्रोग्रेशन स्कूलचे संचालक विवेक अग्रवाल यांनी कार्यशाळेचे नेतृत्व केले. उद्योजक रोहित घोष यांनी महत्त्वाचे व्यावसायिक दृष्टिकोन सांगितले. प्रोग्रेशन स्कूलच्या माईंड कोच श्रीमती मृदुला उज्वल यांनी ताण व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने भागीदार कंपन्यांबरोबर धोरणात्मक बाबींच्या पूर्ततेसंदर्भात चर्चा केली. महाविद्यालयाचे संचालक सुनिल रेडेकर, प्रा. राजेंद्र कडुसकर, प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आणि डॉ. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

सुनील रेडेकर म्हणाले, “प्रगत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानातील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व सर्वांगिण प्रगतीसाठी आयोजित करण्यात येतील. तंत्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकास आणि महत्त्वपूर्ण औद्योगिक शैक्षणिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यास महाविद्यालय आधिकाधिक उपक्रम राबवेल.”

‘सिनेमा इस कमिंग होम’ अनुभवासाठी 98-इंच ब्रॅव्हिया 5 मिनी-एलईडी टीव्हीसह सोनी इंडियाचे सुपर लार्ज स्क्रीन विभागात पदार्पण

नवी दिल्ली: सोनी इंडियाने आज आपल्या अत्यंत अपेक्षित 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 ची घोषणा केली आहे, जी त्यांच्या प्रतिष्ठित ब्रॅव्हिया टीव्ही लाइनअपमधील सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावी टिव्ही आहे. ब्रॅव्हिया 5 ही केवळ एक टीव्ही नाही, तर ती एक सिनेमॅटिक कॅनव्हास आहे जी शुद्ध दृश्य आनंदासाठी बनवलेली आहे. तिचा विशाल 98-इंच स्क्रीन भव्य दृश्य देतो, तर कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR तपशील, रंग आणि हालचाल मानवाच्या दृष्टीने जुळवून घेतो. डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉस मल्टिडायमेन्शनल स्पष्टता आणि भरभराटीचा साउंड देतात, जे प्रत्यक्ष सिनेमागृहाच्या आवाजासारखे अनुभव देतात. सोनी पिक्चर्स कोरसह, तुमचा लिव्हिंग रूम एक खासगी चित्रपटगृहात रूपांतरित होतो, जिथे स्टुडिओ दर्जाच्या ब्लॉकबस्टर्स त्यांचा संपूर्ण सिनेमॅटिक वैभव अनुभवायला मिळतो.

1.    उन्नत AI प्रोसेसर XR सह, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 उत्कृष्ट चित्र गुणवत्ता असलेले दृश्य सादर करते

249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 चा उन्नत AI प्रोसेसर XR ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सिग्नल्स आणि डेटा मशीन लर्निंगद्वारे विश्लेषित करतो, आणि त्याचबरोबर मानवी दृष्टी आणि श्रवणानुसार कंटेंट प्रक्रियेसाठी कॉग्निटिव्ह इंटेलिजन्सचा वापर करतो. या द्विगुणित पद्धतीमुळे चित्रे अधिक नैसर्गिक आणि जिवंत दिसतात, ज्यामुळे अतुलनीय वास्तववाद आणि सुधारित चित्र गुणवत्ता प्राप्त होते.

2.    249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 च्या XR बॅकलाइट मास्टर ड्राइव्हसह दृष्टी थक्क करणारे दृश्य अनुभव घ्या

XR बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 स्वतंत्रपणे नियंत्रित होणाऱ्या LED च्या समूहाचा आणि अचूक डिमिंग अल्गोरिदमचा वापर करून अप्रतिम तेजस्वी हायलाइट्स आणि अतिशय गडद काळे रंग सादर करते. या बुद्धिमान बॅकलाइट नियंत्रणामुळे आश्चर्यकारक कॉन्ट्रास्ट आणि विस्तारित डायनॅमिक रेंज मिळते, ज्यामुळे दृश्ये अधिक नैसर्गिक, सूक्ष्म पोत असलेली आणि गुंतवून ठेवणारी वाटतात — अगदी कठीण प्रकाशमान परिस्थितीतही. मग तो मेणबत्तीचा सौम्य प्रकाश असो किंवा सूर्योदयाची तेजस्वी छटा, प्रत्येक लहानसे तपशील जिवंतपणे पुन्हा तयार होतो, प्रेक्षकांना कथानकात अधिक खोलवर घेऊन जातो.

3.    डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉससह सिनेमॅटिक HDR दृश्ये आणि बहुआयामी सराउंड साउंडचा अनुभव घ्या

डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉस तंत्रज्ञानामुळे, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 आपल्या घरात खरी सिनेमागृहसदृश अनुभूती देते. ग्राहक आता अधिक समृद्ध रंग, खोल कॉन्ट्रास्ट आणि उत्तम उजळणी यांसह उच्च दर्जाची चित्र गुणवत्ता तसेच अधिक आकर्षक, त्रिमितीय आणि स्थानिक ध्वनी अनुभवू शकतात. ही दोन्ही तंत्रे दृश्य आणि ध्वनी दोन्हीच्या दर्जात भर घालतात, ज्यामुळे 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 हे संपूर्ण सिनेमॅटिक अनुभवासाठी घरासाठी एक आदर्श पर्याय ठरते.

4.    स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोडमुळे अनुभवा खरी सिनेमॅटिक दृश्ये – जशी निर्मात्यांनी पाहिली तशीच सादरीकरण

249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 मध्ये समाविष्ट स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने ठरवलेली चित्र गुणवत्ता घरच्या वातावरणात अचूकपणे पुनरुत्पादित करतो. आधीपासून असलेल्या नेटफ्लिक्स अडॅप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोर कॅलिब्रेटेड मोडसोबत, प्राइम व्हिडिओ कॅलिब्रेटेड मोड हा नवीनतम पर्याय असून, ग्राहकांना निर्मात्यांच्या दृष्टीकोनातून प्रीमियम मनोरंजनाचा अधिक व्यापक अनुभव देतो. या मोडमुळे ग्राहक सिनेमे, मालिकांबरोबरच प्रथमच थेट क्रीडा कार्यक्रमांसाठीही स्वयंचलितपणे कॅलिब्रेट झालेली उत्कृष्ट चित्र गुणवत्ता अनुभवू शकतात.

5.    सोनी पिक्चर्स कोर मुळे ग्राहकांना IMAX Enhanced शीर्षकांसह जवळजवळ 4K ब्लू-रे दर्जाच्या विशाल चित्रपट संग्रहाचा अनुभव

सोनी पिक्चर्स कोर फीचरच्या माध्यमातून, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 घरच्या ठिकाणी सोनी पिक्चर्सच्या चित्रपटांना सर्वोच्च प्रतिमादर्जा आणि सुधारित फॉरमॅटमध्ये सादर करतो. नवीनतम ब्लॉकबस्टर्स असोत की कालजयी क्लासिक्स, सोनी पिक्चर्स कोर प्रेक्षकांना सूक्ष्म तपशील आणि खोलपणाने भरलेले उच्च दर्जाचे कंटेंट अनुभवण्याची संधी देते, ज्यामुळे टीव्हीच्या प्रगत डिस्प्ले आणि ध्वनी तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ घेतला जातो.

किंमत आणि उपलब्धता:

विशेष लाँच ऑफर अंतर्गत, सोनी इंडिया 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 वर तीन वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी देत आहे. काही निवडक क्रेडिट कार्ड्सवर रु. 25,000/- ची कॅशबॅक आणि ग्राहकांसाठी खरेदी अधिक सोयीची करण्यासाठी रु. 19,995/- च्या विशेष ठराविक EMI पर्यायाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रॅव्हिया 5 भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्स आणि मुख्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर खरेदीस उपलब्ध आहे.

मॉडेलबेस्ट बायउपलब्ध दिनांककॅशबॅकस्पेशल तयार केलेला फिक्स्ड ईएमआय
K-98XR55A6,49,990/- रुपये23 जुलै 2025 पासून25,000/- रुपयेआता खरेदी करा.19,995/- रुपये देऊन

भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे ‘मेक इन इंडिया’च्या नवयुगाची सुरुवात: टीव्हीएस मोटर

नवी दिल्ली / लंडन, २४ जुलै २०२५ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) वर स्वाक्षरी झाल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने आज स्वागत केले. हा ऐतिहासिक करार २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ६० अब्ज डॉलर्सवरून १२० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे आणि ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या पूर्ततेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा करार भारत सरकारच्या प्रमुख ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठा खुल्या करण्याची संधी निर्माण करतो. टीव्हीएस मोटर कंपनीसाठी हा करार अत्यंत योग्य वेळी आला आहे, कारण कंपनीने नुकतेच खरेदी केलेल्या प्रतिष्ठित ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्सची नवीन श्रेणी यूकेमध्ये सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या कराराचे स्वागत करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधर्शन वेणु म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि भारताला जागतिक उत्पादन आणि डिझाइनसाठी केंद्र बनवण्याचा दृढ निश्चय आम्हाला प्रेरणा देतो. भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार हा निर्णायक टप्पा आहे—भारतीय कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’चा जागतिक स्तरावर विस्तार करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेषतः यावर्षी आम्ही जेव्हा नवीन नॉर्टन मोटरसायकल्स लाँच करत आहोत, तेव्हा भारत–ब्रिटन व्यापार संबंध बळकट होणं आमच्या जागतिक उद्दिष्टांसाठी ऊर्जा देणारं आहे आणि आम्ही जागतिक दर्जाची उत्पादने व ब्रँड तयार करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करतो.”

टीव्हीएस मोटरच्या मते, भारत–ब्रिटन FTA मुळे भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्यासाठी अपार संधी उपलब्ध होतील आणि देशाच्या नवकल्पना व अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल.

वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर,महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान

0

मुंबई, दि. २४ जुलै २०२५: फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स 2025’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. वीज मागणीच्या अचूक अंदाजासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा कल्पक वापर केल्याबद्दल हा सन्मान झाला असून महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. फिक्कीच्या पुरस्कार सोहळ्यात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि मशिन लर्निंगचा वापर करून विजेच्या मागणीचा अचूक अंदाज करण्यासाठी आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या प्रकल्पाला सन्मानाने मान्यता देण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.

विजेची मागणी सतत बदलत असताना विजेच्या मागणीबद्दल अचूक अंदाज करून त्यानुसार तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी या विशेष प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.

महावितरणने विकसित केलेल्या यंत्रणेमध्ये हवामान, यापूर्वीचा वीजवापर, आर्थिक घडामोडी, औद्योगिक व्यवहार, सणवार, जीवनमानातील बदल आणि सरकारची धोरणे अशा विविध घटकांचा विचार करून विजेच्या मागणीबाबत अचूक अंदाज केला जातो. वीज उत्पादन केंद्रे कधी बंद आहेत, त्यांची देखभाल कधी होणार आहे, वीज खरेदी करारांची स्थिती आणि इंधन पुरवठा या बाबींचा विचार करून विजेच्या उपलब्धतेबाबतही अचूक अंदाज केला जातो. 

विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत निश्चित करून एक दिवस आधी किंवा तातडीने वीज खरेदीसाठी रणनीती ठरविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर आधारित व्यवस्थेचा उपयोग होतो. पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीसाठी बोली लावतानाही या व्यवस्थेचा उपयोग होतो. या व्यवस्थेमुळे महावितरणला अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी मदत होते तसेच ग्रीडचे स्थैर्य राखण्यातही मदत होते.

टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला

पुणे -टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला आहे. फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे असे त्याचे नाव आहे. हा हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे लपून बसला असताना पुणे पोलिसांनी त्याला पकडला .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२), ३२९ (३),३५१ (२),३५२,१८९(१),१८९(२),१९१ (२) सह ६१(२),१११ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३(१), ३(२), ३ (४) या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी फैयाज गफार बागवान यास मियापुर पोलीस स्टेशन, हैद्राबाद तेलंगणा हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे व राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

धनकवडीत वाहनांची तोडफोड करणारे, स्वतःला भाई म्हणविणारे सराईत ५ भामटे पकडले, तिघे अल्पवयीन …

पुणे- धनकवडीत वाहनांची तोडफोड करणारे सराईत ५ भामटे पोलिसांनी पकडले असून यात तिघे अल्पवयीन आहेत तर अन्य दोघांची नावे रोहीत कैलास आढाव वय २१ वर्षे रा.मु. पो. किरकट वाडी ता. हवेली जि. पुणे आणि सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता. हवेली जि. पुणे अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले .

पोलिसांनी असेही सांगितले कि,’दि.२३/०७/२०२५ रोजी फिर्यादी रा. केशव कॉम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदीराजवळ धनकवडी, पुणे यांची मारुती सियाज कार तसेच सार्वजनीक रोडवर नागरीकांनी पार्क केलेल्या इतर गाड्यांच्या काचा अनोळखी इसमांनी लाकडी बांबु, दगडान फोडुन मोठ मोठ्याने ओरडत आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, आम्हास कोणी नडला तर त्यास सोडणार नाही असे ओरडुन नागरीकांमध्ये दहशत केली त्या बाबत अनोळखी इसमाविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या. सं. २०२३ चे कलम ३२४ (१) (२), ३२४ (४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लॉ अमॅटमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.२४/०७/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा सहकारनगर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहीत आढाव याने त्याचे इतर साथीदार यांचे सह केला असुन तो त्याच्या मित्रास भेटण्यास नवले ब्रिज येथे येणार आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन थांबलो असता काही वेळातच बातमीतील वर्णनाचा इसम त्याचे साथीदारासह दुचाकी वरुन येवुन नवले ब्रिज जवळ गप्पा मारत थांबलेले दिसले. बातमी प्रमाणे खात्री होताच त्यांना स्टाफच्या मदतीने चारही बाजुंनी घेरुन पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) रोहीत कैलास आढाव वय २१ वर्षे रा.मु. पो. किरकट वाडी ता. हवेली जि. पुणे २) सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यानी सदरचा गुन्हा त्यांचे इतर तिन अल्पवयीन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने त्यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन सर्व आरोपींन कडे तपास केला असता सदर गुन्हयाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३२४ (१) (२), ३२४ (४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लॉ अमॅटमेंट कलम ७ हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन गुन्हयात वापरलेली ३०,०००/- रूपये किंमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रकरणी हस्तक्षेपासाठी खा. मेधा कुलकर्णी यांनी घेतली केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची भेट

पुणे: महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) ६२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व अन्य थकीत रक्कम योग्यरीत्या मिळण्याकामी हस्तक्षेप करण्याची मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली. अन्यायग्रस्त या ६२ कर्मचाऱ्यांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले होते. सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यामध्ये लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

गुरुवारी खा. मेधा कुलकर्णी यांची सिंधिया यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. १० मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयानेही या कर्मचाऱ्यांना थकीत वेतन, नोकरीवर असताना कापलेले वेतन त्वरित देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ‘एमटीएनएल’ने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करीत या कर्मचाऱ्यांना रक्कम परत केलेली नाही.

याप्रकरणी खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ” उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन ‘एमटीएनएल’ने केले नाही, ही गंभीर बाब आहे. न्यायालयीन आदेशानुसार, ‘एमटीएनएल’ने कर्मचार्‍यांकडून स्वेच्छा निवृत्ती योजनेवेळी अन्यायाने वसूल केलेली रक्कम परत करणे अपेक्षित होते. तसेच त्यांच्या वेतनात ‘बेसिक पे’मध्ये अन्यायकारक कपात केली गेली. परिणामी त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या हक्कांवर विपरीत परिणाम झाला आहे. चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नाही. 

“उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्याऐवजी, ‘एमटीएनएल’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे. ‘एमटीएनएल’च्या या भूमिकेमुळे या कर्मचार्‍यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये अनेक कर्मचारी ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचा उदरनिर्वाह निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेळेत त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप करून या निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,” असेही खा. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.

सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवांमध्ये हयगय नको; वीजबिलांच्या वसूलीला आणखी वेग द्या

0

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

सोलापूरदि. २४ जुलै २०२५: सर्व वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा देण्याच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही हयगय करू नका. पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक वसाहतींसह सर्व भागात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणार्‍या प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. यासह सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा देण्यासाठी सजग राहावे आणि वाढती थकबाकी कमी करण्यासाठी वीज बिलांच्या वसूलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी गुरुवारी (दि. २४) दिले.

सोलापूर येथील नियोजन भवनात पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील विविध कामे, योजनांचा श्री. लोकेश चंद्र यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे (प्रकल्प) व श्री. धनंजय औंढेकर (पायाभूत आराखडा व विशेष प्रकल्प), प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे, मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर (बारामती) व श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर) उपस्थित होते.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट वीजसेवा व ग्राहकसेवा देण्याची क्षमता आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत ही क्षमता सिद्धही केली आहे. मात्र त्यात आणखी तत्परता व सकारात्मकता अपेक्षित आहे. महसूलवाढीसाठी नवीन ग्राहकांचे स्वागत करा. सर्व ग्राहकांच्या समाधानासाठी सेवेच्या कृती मानकांनुसार कालमर्यादेतच सेवा द्या. ग्राहकांशी समन्वय साधा. त्यांच्या अडचणी समजून घेत आवश्यक मदत करा. पायाभूत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक आराखडे करून संबंधित कामांना वेग द्यावा. गेल्या काही दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर बाब आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वीज बंद ठेवण्याचा कालावधी कमी करावा व संबंधित ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

गेल्या एप्रिलपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महसूलाच्या उद्दिष्टांप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. महसूल वाढ व वसूलीमध्ये हयगय केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पुणे प्रादेशिक विभागात वीजबिलांच्या थकबाकीमुळे १५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. परिणामी वीजहानीत वाढ होत आहे. पुणे विभागात पुणे ग्रामीण मंडळाची वीज हानी ६.९४ टक्के आहे तर सोलापूर मंडळाची वीजहानी सर्वाधिक २८.३१ टक्के आहे. हे चित्र गंभीर आहे. प्रत्येक विभागात कायमस्वरूपी वीज खंडित असलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करा. यासह इतर ठिकाणी मोहीम राबवून वीजचोरी आढळल्यास त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून येत्या मार्च २०२६ पर्यंत राज्यातील ५ लाख तर पुणे विभागातील एक लाख घरगुती ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषिपंप आदींची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्याचा ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी ग्राहक संवाद व प्रबोधन करण्यात यावे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनेला आणखी गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती द्यावी. गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली.

औद्योगिक वीज दर होणार कमी –

सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांशी श्री. लोकेश चंद्र यांनी विविध मुद्द्यांच्या सादरीकरणातून संवाद साधला. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीमुळे महाराष्ट्रात प्रथमच वीज दरात कपात झाली आहे. त्याचा फायदा औद्योगिक ग्राहकांनाही निश्चितपणे होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये लघु व उच्चदाबाच्या औद्योगिक वीज दरात घट होत जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उद्योजकांच्या विविध वीज प्रश्नांवर चर्चा करून ते त्वरीत सोडविण्यासाठी स्थानिक यंत्रणेला निर्देश दिले. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी योजनांच्या कंत्राटदार एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली व विविध कामांना वेग देण्याची सूचना केली.

भारतात यूकेच्या गाड्या-ब्रँडेड कपडे स्वस्त होणार:दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

भारतात यूकेच्या गाड्या, कपडे आणि पादत्राणे स्वस्त होतील. आज २४ जुलै रोजी भारत आणि यूकेने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. २०२२ पासून वाटाघाटी सुरू होत्या.आता भारतातील ९९% वस्तू शून्य शुल्कावर युकेला निर्यात केल्या जातील. तर युकेच्या ९९% वस्तू ३% सरासरी शुल्कावर आयात केल्या जातील. यामुळे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समकक्ष केयर स्टार्मर यांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटिश व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली.याचा फायदा युकेलाही होईल. आयात केलेल्या व्हिस्कीवरील भारताचा कर १५०% वरून ७५% पर्यंत कमी केला जाईल. कराराच्या दहाव्या वर्षापर्यंत तो नंतर ४०% पर्यंत कमी केला जाईलयूकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सरासरी कर १५% वरून ३% पर्यंत कमी केला जाईल. १० वर्षांत ८५% वस्तू पूर्णपणे करमुक्त होतील. यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होतील:

व्हिस्की आणि जिन: युकेमधून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील भारताचा कर १५०% वरून ७५% पर्यंत कमी केला जाईल. नंतर कराराच्या दहाव्या वर्षापर्यंत तो ४०% पर्यंत कमी केला जाईल. उदाहरण – ५००० रुपयांची स्कॉच बाटली ३५०० रुपयांना उपलब्ध असेल.

लक्झरी कार: कोटा सिस्टीम अंतर्गत यूके कारवरील (जसे की जग्वार लँड रोव्हर, रोल्स-रॉइस) टॅरिफ १००% वरून १०% पर्यंत कमी होतील. यामुळे या कार २०-३०% स्वस्त होऊ शकतात.

अन्न आणि पेये: युकेमधून आयात होणाऱ्या सॅल्मन, कोकरू, चॉकलेट, बिस्किटे आणि शीतपेयांवरचे शुल्क कमी केले जाईल. यामुळे ही उत्पादने स्वस्त होतील.

सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे: यूके सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस भागांवरील कमी कर या वस्तू स्वस्त करतील. हा कर १५% वरून ३% पर्यंत कमी होईल.
कापड, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि रसायन यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल.

यूकेमध्ये भारतीय कपडे आणि बेडशीट आणि पडदे यांसारख्या घरगुती कापडांवर ८-१२% कर आता पूर्णपणे रद्द केला जाईल. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांच्या तुलनेत आपले कपडे स्वस्त आणि अधिक स्पर्धात्मक होतील. तिरुप्पूर, सुरत आणि लुधियाना सारखी निर्यात केंद्रे पुढील तीन वर्षांत ४०% पर्यंत वाढू शकतात.

भारतातून युकेमध्ये जाणाऱ्या दागिने आणि बॅग्ज, शूज यासारख्या चामड्याच्या वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही. लहान व्यवसाय (एमएसएमई) आणि लक्झरी ब्रँडसाठी याचा मोठा फायदा होईल. यासोबतच, युकेद्वारे युरोपमध्ये भारताचे वर्चस्व आणखी वाढेल.

यूकेने भारतीय यंत्रसामग्री, अभियांत्रिकी साधने आणि कारच्या सुटे भागांसारख्या ऑटो पार्ट्सवरील आयात कर रद्द केला आहे. यामुळे भारत, यूके आणि युरोपमधील औद्योगिक पुरवठा साखळी आणखी मजबूत होईल. पुणे, चेन्नई आणि गुडगाव सारख्या उत्पादन केंद्रांना याचा फायदा होईल.

भारतीय औषध कंपन्यांना यूकेमध्ये जेनेरिक औषधांसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी मिळेल. यामुळे भारतीय औषधे यूके आरोग्य सेवा (एनएचएस) पर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि औषधांना देखील लवकर मान्यता मिळेल.

बासमती तांदूळ, कोळंबी, प्रीमियम चहा आणि मसाल्यांसारख्या सागरी उत्पादनांवरील यूके आयात कर रद्द केला जाईल. यामुळे आसाम, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या प्रदेशांच्या निर्यात उद्योगाला मोठी चालना मिळेल.

कृषी रसायने, प्लास्टिक आणि विशेष रसायनांवरील कर कमी केल्याने गुजरात आणि महाराष्ट्र सारख्या प्रमुख केंद्रांमधून निर्यात वाढेल. या करारांतर्गत, भारत २०३० पर्यंत युकेला होणारी रासायनिक निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

या करारामुळे सौर, हरित हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) पायाभूत सुविधांसह अक्षय ऊर्जेमध्ये संयुक्त उपक्रमांसाठी मार्ग मोकळा होईल. यूके भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आणखी गुंतवणूक करेल, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा सह-विकास होईल.

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एफटीए अनेक प्रकारे फायदेशीर आहे:

निर्यातीत वाढ: ९९% भारतीय वस्तू ब्रिटनला शून्य शुल्कात निर्यात केल्या जातील. यामुळे कापड, चामडे, रत्ने आणि दागिने, सागरी उत्पादने आणि अभियांत्रिकी वस्तू यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल. २०३० पर्यंत भारताची ब्रिटनला होणारी निर्यात २९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

रोजगार वाढेल: कापड आणि चामड्यासारख्या कामगार-आधारित क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण होतील. कापड क्षेत्रातील रोजगार दुप्पट होऊ शकतो.

एमएसएमईला चालना: भारतातील ६ कोटी एमएसएमईंना याचा फायदा होईल. भारताच्या निर्यातीत त्यांचा वाटा ४०% आहे. या करारामुळे त्यांना नवीन बाजारपेठा आणि चांगला नफा मिळेल.

गुंतवणुकीत वाढ: यूके कंपन्या भारतात आयटी, वित्तीय सेवा आणि हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवतील. यामुळे भारताचे उत्पादन आणि सेवा क्षेत्र मजबूत होतील.

आर्थिक वाढ: या करारामुळे २०३० पर्यंत भारत-यूके व्यापारात दरवर्षी १५% वाढ होईल. यामुळे भारताला १०० अब्ज डॉलर्सचे व्यापार लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल.

हा करार २४ जुलै २०२५ रोजी झाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते. कारण भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि यूके संसदेची मान्यता आवश्यक आहे. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

भारत आणि ब्रिटनमधील करारावरील वाटाघाटी १३ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाल्या, ज्या सुमारे ३.५ वर्षांनी पूर्ण झाल्या. २०१४ पासून, भारताने मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए (युरोपियन मुक्त व्यापार संघटना) सोबत असे ३ मुक्त व्यापार करार केले आहेत. भारत युरोपियन युनियन (ईयू) सोबत अशाच प्रकारच्या करारांवर सक्रियपणे वाटाघाटी करत आहे.