Home Blog Page 377

मंगेशकर रुग्णालय प्रकरण:फडणवीस म्हणाले,आता आंदोलन म्हणजे शोबाजी:धर्मादाय व्यवस्था ऑनलाइन करू

SOP तयार करण्यासंदर्भात काम सुरू

रुग्णालय परिसरात आंदोलन करणे योग्य नाही. या घटनेची दखल घेतली आहे.आता शोबाजी कशाला ? या संदर्भात जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहोत. मात्र विनाकारण शो बाजी करणे बंद झाले पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने जरी आंदोलन केले असेल तर ते चूक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई-धर्मादाय व्यवस्था ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा धर्मदाय आयुक्तांना जोडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून त्यांनी यावेळी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीला सुनावले. मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल शासनाने घेतली असून या संदर्भात योग्य ती कारवाई होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विनाकारण ‘शो’बाजी करणे बंद झाले पाहिजे, असे देखील फडणवीसांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या संदर्भात आपण त्यांना आश्वस्त केले असल्याचे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आपण त्यांना दिले असल्याचे देखील ते म्हणाले.

केवळ या प्रकरणात कारवाई करण्या पुरते मर्यादित न राहता यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी देखील काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या संदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती ही सर्व प्रकारच्या त्रुटींकडे लक्ष देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भविष्यात अशाप्रकारे होऊ नये म्हणून एक SOP तयार करण्यासंदर्भात आमचे काम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

धर्मदाय आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे किंवा जास्त अधिकार नसल्याने असे प्रकार होत असल्याचा आरोप केला जातोय. याला देखील मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात नवीन काही अधिकार धर्मदाय आयुक्तांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइन एका प्लॅटफॉर्मवर यावी, असे आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड्स आहेत. किती सध्या उपलब्ध आहेत. असतील तर ते योग्य पद्धतीने गरीब रुग्णांना दिले जात आहेत का? याचे सर्व मॉनिटरिंग करता यावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री आरोग्य कक्षाला देखील धर्मदाय रुग्णालयांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पुढील काळात यामध्ये मोठी सुधारणा आम्ही करू शकू, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. हे एक नावाजलेले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात. त्यामुळेच या हॉस्पिटलचे सर्व काही चूक आहे, असे म्हणण्याचे काही कारण नाही. मात्र कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावी आणि ती सुधारावी लागेल. जर रुग्णालय चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा आम्हाला आनंद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या,’ धनंजय मुंडे यांची मीच पहिली बायको;आता माझ्याशी लग्न करणाऱ्याला मुंडे 20 कोटी देणार असल्याचाही दावा

मुंबई-वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला आहे. करुणा यांची मुले मुंडे यांची आहेत, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी यासंबंधी केला आहे.

माझगाव कोर्टाने गत 29 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा यांनी आज आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी आदी विविध दस्तऐवज कोर्टापुढे सादर केले. त्यानंतर आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला.

दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या पुराव्यांचे कोणतेही महत्त्व नसल्याचे नमूद करत त्यांचा दावा धुडकावून लावला. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नाही. कोर्टाने त्यांना आपल्या लग्नाचे पुरावे आणण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी वसियतनामा व स्वीकृतीपत्र वगळता इतर दस्तऐवज आणले. त्याला काही अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तसे कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. करुणा यांनी सादर केलेल्या वसियतनाम्यातील उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही. हा वसियतनामाच खोटा आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले (लिव्ह इन रिलेशनशिप), पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असेही सायली सावंत यावेळी म्हणाल्या.

त्यानंतर करुणा यांच्या वकिलांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत आम्ही सादर केलेले पुरावे करुणा शर्मा यांचे मुंडेंशी लग्न झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला. कोर्ट पुढील 2-3 दिवसांत आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या वकिलांना काही मुद्यांवर चांगला युक्तिवाद करता आला नसल्याचे नमूद करत करुणा शर्मा यांनी काही मुद्यांवर स्वतःही युक्तिवाद केला.

दुसरीकडे, करुणा शर्मा यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा ठाम विश्वास केला. विशेषतः मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला धनंजय मुंडे यांनी 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

करुणा शर्मा म्हणाल्या, कोर्टाचा निर्णय माझ्याबाजूने लागेल याची मला खात्री आहे. आम्ही कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमुळे त्यांचे वकील हादरलेत. मी मुंडे यांची 1996 पासून पत्नी असल्याचे पुरावे सादर केलेत. माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ते आज काही कारणास्तव सादर करता आले नाही. त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र 2016 चे आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी व अंगठा आहे. त्यातही करुणा शर्मा आपली पहिली पत्नी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे नसले तरी, ते राजश्री मुंडे (धनंजय मुंडे यांच्या पत्नी) यांच्याकडेही नाही. आमचे मंदिरात लग्न झाले होते. त्यामुळे कोर्ट मुंडे यांचा दावा फेटाळेल यात शंका नाही.

धनंजय मुंडे यांनी मला रस्त्यावर आणले. मला हिरोईन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात फसवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मला व माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असेही करुणा शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या.

मीच दोषी तरी माझीच समिती आणि माझीच चौकशी?:संतापजनक प्रकरणानंतर मंत्री हसन मुश्रीफांनी मंगेशकर रुग्णालयाला फटकारले

मुंबई:मंगेशकर रुग्णालयातील संतापजनक प्रकरणानंतर आता रुग्णालयाने चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र हॉस्पिटलच्या वतीने नेमण्यात आलेल्या या समितीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, तर मी दोषी कसा होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्या महिलेला दाखल करून उपचार केले असते तर काय झालं असते? असा प्रश्न त्यांनी रुग्णालयाला विचारला आहे. त्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून याकडे बघणे आवश्यक होते, असे देखील ते म्हणाले.

तनिषा भिसे या महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा जवळ सध्या दोन लाख रुपये आहेत, तेवढे घेऊन उपचार सुरू करण्याची विनंती कुटुंबीयांनी केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेला त्रास झाला आणि दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयाच्या कडून तयार करण्यात आलेल्या समितीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे.

मुंबईमधील कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदायी योजना नाही, अशी धक्कादायक माहिती सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला सवलत देण्यात आलेली आहे. हे रुग्णालय धर्मादाय आयुक्त खाली रजिस्टर असल्याने त्यांना कोणताही टॅक्स लागत नाही. मात्र या रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा होणे अपेक्षित असते. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत. असे असेल तर गरीब रुग्णांना लाभ कसा मिळेल. त्यामुळे त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करावी, तसे झाले तर अशा घटना घडणार नाहीत, अशी आपली विनंती असल्याचे देखील मंत्री मुश्रीफ म्हणाले.

परशुराम हिंदू सेवा संघाचा आक्षेप

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला पेपर वर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही, असे लिहून दिले आहे. यावर परशुराम हिंदू सेवा संघाने आक्षेप घेतला आहे. असे असले तर सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेले योजनेचे काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे. त्यामुळे या रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहावे लागणार नाही. मात्र आता ही योजनाच रुग्णालय राबवली जात नसल्याची धक्कादायक आरोप केला जात आहे.

आजपासून दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेणार नाही-वैद्यकीय संचालक धनंजय केळकर

हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली… हेचि काय फळ मम तपाला

पुणे-संपूर्ण राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.अशातच रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

केळकर म्हणाले, 2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.

कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.

हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -‘असंवेदनशीलता’ अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा. झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.

जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो. वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही. असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाने थकवला,6 वर्षात रुपयाही कर भरला नाही..अन महापालिका मात्र मुग गिळून ..

पुणे -दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात रुग्णालयाने एक रुपयाचा कर देखील भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकवल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पैशासाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने महानगरपालिकेचा गेल्या सहा वर्षापासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांचा कर थकवला आहे. एकीकडे धर्मदाय रुग्णालयाला मिळकतीवर सवलत असताना महानगरपालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन कडे 27 कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे.एकीकडे पालिकेचे आरोग्य खाते शहरातील रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यास टाळाटाळ करत असताना मिळकत कर विभागाने देखील ६ वर्षे याकडे डोळेझाक केल्याचे दिसते आहे .

दुसरीकडे मंगेशकर रुग्णालयातील या प्रकरणानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला रुग्णालयांना दिलेल्या कडक सूचना तपासण्याचे सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या या समितीला धर्मदाय नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का? हे तपासले जाणार आहे. तसेच सर्व धर्मदाय रुग्णालयाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्यातल्या सगळ्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. धर्मदाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

या बाबत समोर आलेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. तेव्हा जवळ सध्या दोन लाख रुपये आहेत, तेवढे घेऊन उपचार सुरू करण्याची विनंती कुटुंबीयांनी केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेला त्रास झाला आणि दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला. या घटनेने भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणा मुळे या महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या रुग्णालयाला जीवा पेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सह्याद्रि हॉस्पिटलने  कर्करोग रुग्णांसाठी उभारणी मदत गट:’ व्हेनेरियन ट्रूबीम ‘ सह अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार सुरू 

कर्करोगामधून बरे झालेल्या रुग्णांनी नव्या कर्क-रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी घेतली प्रतिज्ञा;
कर्करोगावर सर्वांगीण उपचार देण्याच्या कटिबद्धतेचा सह्याद्रि हॉस्पिटलचा पुनरुच्चार

पुणे, ५ एप्रिल २०२५ – गेल्या दशकात कर्करोगावरील उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली आहे. हे उपचार आता
अधिक अचूक, रुग्ण-केंद्रित व प्रगत तंत्रज्ञान आधारित झाले आहेत. स्तनाचा, फुप्फुसाचा आणि मोठ्या
आतड्यांचा कर्करोग आजही मोठ्या प्रमाणात आढळतोच आहे, पण याचबरोबर पचनसंस्थेतील म्हणजेच
स्वादुपिंडाचा (पॅन्क्रिया) आणि यकृताचा (लिव्हर) कर्करोग यांसारख्या निदानास कठीण असलेल्या कर्करोग
प्रकारांतही वाढ दिसून आली आहे. भारतात देखील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, २०१२
ते २०२२ या कालावधीत कर्करोगाची नोंदणीकृत प्रकरणे ३६ टक्क्यांनी वाढली. २०१२ मध्ये हा आकडा १०.१
लाख इतका होता, तर २०२२ मध्ये तो १३.८ लाखांपर्यंत पोहोचला. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही
३०.३ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक स्तरावर कर्करोगाच्या रुग्णांची संख्या विचारात घेतली असता, त्यात
भारताचा क्रमांक तिसरा (१३.८ लाख रुग्ण) लागतो, तर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुसरा क्रमांक (८.९
लाख मृत्यू) लागतो. सध्या प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे १२१ रुग्ण असे कर्करोगाचे भारतातील प्रमाण
आहे.
तसेच, तरुणांपेक्षा वृद्ध व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे.
आजच्या काळातील कर्करोग उपचारांमध्ये इम्यूनोथेरपी (प्रतिकारशक्ती आधारित उपचार), टार्गेटेड थेरपीज
(लक्ष केंद्रीत औषधोपचार) आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-आधारित निदान उपकरणे यांचा समावेश आहे.
त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडे तयार करणे शक्य झाले आहे. तरीदेखील, उपचारांना
होणारा प्रतिकार (ट्रीटमेंट रेसिस्टन्स) आणि सतत आवश्यक असलेली सहाय्यता व आधार सेवा ही आव्हाने
अजूनही रुग्ण व ऑन्कोलॉजिस्ट यांच्यासमोर कायम आहेत.
आरोग्यसेवा क्षेत्रातील या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सह्याद्रि हॉस्पिटलने ‘बीमिंग होप’ या नावाने
महाराष्ट्रभर सर्वांगीण कर्करोग उपचारांना बळकटी देणाऱ्या एक आगळ्या कर्करोग रुग्ण सहाय्यता गटाची
(सपोर्ट ग्रुप) घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे सह्याद्रि केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर सहवेदना,
नवकल्पना आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे रुग्णांवरील उपचारांच्या संपूर्ण प्रवासात सुधारणा घडवून आणण्याची
आपली बांधिलकी जपत आहे. ‘बीमिंग होप’च्या घोषणेमुळे सह्याद्रि रुग्णालयांच्या “रुग्ण-केंद्रित” उपचार
तत्त्वज्ञानाला आणखी बळ मिळाले आहे. या माध्यमातून उपचार केवळ औषधोपचारांपुरते मर्यादित न राहता
रुग्णाच्या मानसिक, भावनिक आणि व्यवहारिक गरजांनाही समजून घेतात. रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात
एकमेकांशी जोडणे, समान अनुभवातून गेलेल्या इतरांसोबत संवाद साधण्याची त्यांना संधी देणे आणि
समुदायाची भावना व मानसिक आधार उपलब्ध करून देणे, हे या गटाचे उद्दिष्ट आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल समुहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले, “आज
कर्करोग उपचार हे केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याच्या संपूर्ण व
उपयुक्त जीवनशैलीला प्राधान्य देणे हेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. ‘बीमिंग होप’च्या माध्यमातून आम्ही

रुग्णाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंवर भर देत आहोत. मजबूत आधार यंत्रणा उपलब्ध करून
देऊन, रुग्ण केवळ वाचतीलच नव्हे तर या प्रवासात नव्या जोमाने जीवन जगू लागतील अशी आमची अपेक्षा
आहे. उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला मानसिक व सामाजिक आधार मिळवून देण्याचा आमचा
सर्वांगीण दृष्टिकोन आहे.”
नवे रुग्ण, कर्करोगामधून बरे झालेले रुग्ण, रुग्णांची काळजी घेणारे नातेवाईक आणि वैद्यकीय तज्ञ यांच्यात
हा सहाय्यता गट परस्पर संवाद घडवून आणेल. या संवादातून त्यांना एकमेकांचे अनुभव समजून घेता
येतील, तसेच कर्करोग उपचारांमधील शारीरिक व भावनिक अडचणी कशा हाताळायच्या याबाबत उपयुक्त
मार्गदर्शन मिळेल.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट
डॉ. विनोद गोरे म्हणाले, “कर्करोगावरील उपचारांचा प्रवास हा अनेक भावनिक व मानसिक आव्हानांनी
भरलेला असतो. ‘बीमिंग होप’ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे रुग्ण आपले भीतीचे क्षण आणि यशोगाथा
या दोन्ही गोष्टी मोकळेपणाने शेअर करू शकतील आणि दररोज नव्या आत्मविश्वासाने जगण्यासाठी बळ
मिळवतील. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहूंना उपचार प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण
मानसिक आधार मिळेल. हा उपक्रम केवळ आजारावरील उपचारांशी संबंधित नाही, तर कोणीही एकटे पडू
नये, यासाठी भावनात्मक सुरक्षितता देणारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे.”
रुग्णांचा उपचारांचा अनुभव अधिक सकारात्मक व परिणामकारक व्हावा यासाठी, सह्याद्रि हॉस्पिटल्सने
‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणालीचीही सुरुवात केली आहे. हे एक अत्याधुनिक किरणोत्सर्ग (रेडिओथेरपी) तंत्रज्ञान
आहे. कर्करागावरील उपचारांची अचूकता आणि गती ते लक्षणीयरीत्या वाढवते. या संदर्भात डेक्कन जिमखाना
येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “व्हेरियन
ट्रूबीम प्रणालीमुळे कर्करोगवरील किरणोत्सर्ग उपचार देण्याच्या पद्धतीत मोठी प्रगती घडून आली आहे.
फुप्फुस किंवा पोटातील ट्युमरसारख्या गाठी श्वासोच्छ्वासादरम्यान हलत असतानाही ट्रूबीम प्रणाली
अचूकपणे लक्ष्य साधते. यामुळे उपचाराचा कालावधी कमी होतो आणि रुग्णाला होणारा त्रासही लक्षणीयरीत्या
घटतो.”
डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जगदीश
शेजुळ म्हणाले, “‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि अत्याधुनिक ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांचा एकत्रित
उपयोग करून आम्ही आतापर्यंत २५ पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ट्रूबीम तंत्रज्ञानामुळे
आम्ही ट्युमरवर एक मिलीमीटरच्या अचूकतेने उपचार करू शकतो. संवेदनशील भागांजवळ असलेल्या
ट्युमरच्या बाबतीत हे फार महत्त्वाचे ठरते. अशाच एका विशेष प्रकरणात, ७५ वर्षांच्या वृद्ध रुग्णाच्या
मेंदूमध्ये असलेल्या गाठीवर आम्ही या प्रणालीतून उपचार केले. हे उपचार अचूक आणि विशिष्ट पद्धतीने
झाले नसते, तर त्या रुग्णाला पक्षाघात होण्याचा मोठा धोका होता. ट्रूबीमच्या अचूकतेमुळे आणि जलद
उपचार प्रक्रियेमुळे आरोग्यदायी ऊतींवर होणारा परिणाम अत्यल्प ठेवता येतो. त्यामुळे अधिक प्रभावी आणि
सुरक्षित उपचार शक्य होतात. याशिवाय, ट्रूबीम तंत्रज्ञान हे रुग्णांना इंजेक्शनविना आणि शरीरावर कोणतेही
व्रण न ठेवता उपचार देण्यास सक्षम आहे. साहजिकच उपचाराच्या प्रक्रियेत रुग्णाला अधिक आराम,
सुरक्षितता आणि समाधान मिळते.”
‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांच्या माध्यमातून सह्याद्रि हॉस्पिटलने पुन्हा
एकदा कर्करोगच्या सर्वांगीण व रुग्ण-केंद्रित उपचारांमधील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे दोन्ही उपक्रम

केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीपुरते मर्यादित नसून, कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात
शारीरिक आणि मानसिक पातळीवरही संपूर्ण आधार मिळावा, यासाठी सह्याद्रिची कटिबद्धता दर्शवतात.

अखेर महापालिकेच्या आरोग्य खात्याला जाग आली…

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बजावली नोटीस

हिंदी चित्रपटात शेवटाला पोलीस येतात तशी यांची कारवाई ..

कोणते रुग्णालय किती बिल आकारते ? आगाऊ रक्कम किती मागते ?रुग्णांना आणि नातलगांना कशी वागणूक देते ? रुग्णसेवा हा सेवा धर्म म्हणून पाळते कि धंदा म्हणून करते यावर महापालिकेचा का उरला नाही अंकुश ?

पैशाची चिंता न करता रुग्णाला दाखल करून उपचार सुरु करायला हवे होते हे मुख्यमंत्र्यांना सांगण्याची वेळ आली तत्पूर्वीच महापालिकेच्या आरोग्याप्रमुखांनी याची नोटीस रुग्णालयांना का नाही दिली ?

वैद्यकीय सेवा ही मुलभूत मानवी हक्कांपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी आपत्कालीन उपचार नाकारता येऊ शकत नाहीत. हे महापालिकेच्या आरोग्य खात्याला माहिती का नाही ?

पुणे- दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर , आवारात काल दिवसभरात चक्क १२ आंदोलने झाली आणि ३/४ स्तरावरून चौकशी समित्यांनी आपापले अहवाल नोंदविले त्यानंतर महापालिकेचे झोपी गेलेले आरोग्य खाते जागे झाले आणि ते होताच तथाकथित रुग्ण हक्काचे नारे देऊन स्वतःला महासंस्था म्हणविणारे देखील जागे झाले.’माय मराठी’ ने महापालिकेचे आरोग्य खाते झोपले आहे काय ? असा प्रश्न करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे,याप्रकरणी सर्व माहिती सादर करावी, असा आदेश देण्यात आला. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
आरोग्य विभागाने पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने शुक्रवारपासून चौकशी सुरू केली. समितीच्या सदस्यांनी दीनानाथ रुग्णालय, वाकड येथील सूर्या रुग्णालय व बाणेर येथील मणिपाल रुग्णालयाला भेटी देऊन माहिती घेतली. डॉ. पवार यांच्यासह सहाय्यक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना कांबळे या सदस्यांनी ही चौकशी केली.

खुद्द दिनानाथ रुग्णालयाने चौकशी समिती नेमून कालच अहवाल सादर केला , पोलिसांनी कालच आपल्या चौकशीची माहिती गृहविभागाला कळविली.आणि कालच खुद्द मुख्यमंत्री यांनी हि चौकशी समिती नेमून या समितीने तातडीने कामकाजाला प्रारंभ देखील केला .महिला आयोगाने देखील महापालिकेला पत्र देऊन एकीकडे कान उघडणी केली तर दुसरीकडे तातडीने चौकशी समिती नियुक्त केली . महापालिकेच्या आरोग्य खात्याने महापालिकेच्या हद्दीतील शासकीय आणि खाजगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्या ऐवजी आपापले हितसंबध जोपासण्यातच धन्यता मानली असल्याचा आरोप होतो आहे. रुग्णांच्या हक्काच्या नावाने ओरड करणाऱ्या संस्था आरोग्य खात्यातील अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनाच्या टोळ्या बनल्या आहेत. औषधे खरेदीत घोटाळ्या पासून बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे काम असा प्रामुख्याने कारभार असलेल्यांनी रुग्ण हक्काचे मुखवटे घातले आहेत. जे दिनानाथ प्रकरणी काल गळून पडलेत .ते पुन्हा चढविण्यासाठी आता ते बैल गेला आणि झोप केला प्रमाणे आंदोलन करणार असल्याचे वृत्त आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना काही पहिलीच नाही. राज्यात आणि देशभरात अशा घटना अनेकदा ऐकायला येत असतात. त्यामुळेच मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा धागा पकडून व्यापकपणे या प्रश्नाकडे पहायला हवं.महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 साली आले असले तरी त्याची अंमलबाजवणी व्यवस्थित झालेली नाही असे सांगितले जाते. अजूनही 80 ते 90 टक्के खासगी रुग्णालयं हे नियम पाळत नाहीत. प्रत्येक रुग्णालयाने तिथे मिळणाऱ्या 15 महत्त्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारात दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत. मात्र बहुतांश ठिकाणी ते दिसत नाही.शिवाय, प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्कांची सनद लावायला हवी.या सनदीप्रमाणे रुग्णाला आजाराबाबतची सगळी माहिती, स्वरूप, गुंतागुंतीची शक्यता हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसंच, दुसरे मत (second opinion) घेण्याचा, तपासण्यांचे अहवाल, वैद्यकीय निष्कर्ष जाणून घ्यायचा हक्कं आहे.हे सगळे अधिकार रुग्णाला माहीत असायला हवेत. मात्र, रुग्णालयात ते लावलेले नसतात.तिसरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात एक रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष आणि त्याचा टोल फ्री नंबर असायला हवा. रुग्णांना काही तक्रार असेल तर ते तिथे फोन करून मदत किंवा सल्ला घेऊ शकतात

धर्मदाय रुग्णालयात 10 टक्के मोफत खाटांची तरतूद आहे. पण त्यासाठीची व्यवस्था अजूनही पूर्णपणे नीट चालत नाही.

कोणत्या रुग्णालयात सद्यपरिस्थितीत किती खाटा उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती मोजकीच रुग्णालयं देतात

अनेक योजनांतून रुग्णालयांना आर्थिक व भूखंड,TDR बाबतचे सहाय्य करणाऱ्या महापालिकेला खासगी रुग्णालयाच्या सेवांच्या दरांचं नियंत्रण करण्याची गरज वाटत नाही काय ?

केंद्र सरकारच्या वैद्यकीय स्थापना अधिनियम या 2010 च्या कायद्याप्रमाणे खासगी रुग्णालयांनी सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारणं बेकायदेशीर आहे.

या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याची काळजी महापालिकेच्या आरोग्य खात्याने घेतली तर अशा घटना कमी घडतील असे वाटत नाही काय ?
भारताच्या संविधानात कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला “जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क” आहे. या हक्काचा विस्तार इतका व्यापक आहे की, आपत्कालीन वैद्यकीय उपचार मिळवण्याचा हक्क देखील त्यामध्ये समाविष्ट आहे.याचा स्पष्ट अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीला फक्त आर्थिक कारणांमुळे किंवा उपचाराचा खर्च देऊ शकत नसल्यामुळे आपत्कालीन उपचार नाकारता येणार नाहीत.

भारताच्या सर्वोच्च्य न्यायालयानेही काही महत्वाच्या निकालांमध्ये हेच अधोरेखित केलं आहे. परमानंद काटारा विरुद्ध भारत सरकार हा 1989 चा खटला याचं महत्त्वाचं उदाहरण आहे.एका दुचाकीस्वाराचा अपघातात झाल्यानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तेव्हा एका मानवाधिकार कार्यकर्त्याने त्याबद्दलची जनहित याचिका सर्वोच्च्य न्यायालयात दाखल केली होती.एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्या दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.पण त्याठिकाणच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. हे वैद्यकीय-वैधानिक (medico-legal) प्रकरण असल्याने रुग्णास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अधिकृत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मात्र, त्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला.सरकारी असो वा खाजगी, कोणताही डॉक्टर आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करण्यास बांधील आहे, असं सर्वोच्च्य न्यायालयाने या प्रकरणात अधोरेकीत केलं होतं.

त्याचप्रमाणे, पश्चिम बंगाल खेत मजदूर समिती विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य (1996) या प्रकरणात न्यायालयाने वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणं हे संविधानातल्या कलम 21 चं उल्लंघन मानलं जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

सर्व निर्णयांमधून हे स्पष्ट होतं की, वैद्यकीय सेवा ही मुलभूत मानवी हक्कांपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी आपत्कालीन उपचार नाकारता येऊ शकत नाहीत.

चीनने लादला अमेरिकेवर 34 टक्के कर; ट्रम्प यांचा इशारा:महागात पडेल

वाशिंग्टन- जागतिक व्यापार युद्ध आणखी वाढले. चीनने अमेरिकन आयातीवर ३४ टक्के कराची घोषणा केली. चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, नवीन आयात कर १० एप्रिलपासून लागू होईल. चीनची ही प्रत्युत्तरादाखलची कारवाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात करावरील प्रतिक्रिया आहे. चीन म्हणाले, कराच्या नावाखाली अमेरिका दादागिरी करत आहे. ते सहन केले जाणार नाही.ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशल वर पोस्ट केले की, चीनने अमेरिकेच्या करानंतर घबराटीतून हा कर जाहीर केला. चीनने कर लावून मोठी चूक केली आहे. अशा प्रकारचा आयात कर चीनला महागात पडेल. एका अन्य पोस्टमध्ये ते म्हणाले, करावरून धोरणात काहीही बदल केला जाणार नाही. अमेरिका आणखी श्रीमंत होणार आहे. त्यातच चीनने अमेरिकेच्या १६ कंपन्यांना सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफरवरदेखील स्थगिती दिली आहे.

चीनकडून या कंपन्यांना सेमीकंडक्टर चिप, दुर्मिळ खनिज उदाहरणार्थ- लँथेनम, सेरियमची निर्यात होते. त्याचा वापर इलेक्ट्रिक कारपासून स्मार्ट बाॅम्ब बनवण्यापर्यंत होतो. अमेरिकेच्या या १६ कंपन्या खासगी व सरकारी क्षेत्रातील आहेत. त्या नागरी व लष्करी उपकरणे तयार करतात.चीनने अमेरिकन आयात कराच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटनेतही तीन नव्या याचिका दाखल केल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर महिनाभरात १० टक्के-१० टक्के कर लावला.चीनवर एकूण ५४ टक्के कर लावला.

अमेरिका-चीन मध्ये व्यापार

एकूण व्यापार ५८१ अब्ज डॉलर
चीन आयात ४३८ अब्ज डॉलर
चीनला निर्यात १४३ अब्ज डॉलर
अमेरिकेला तोटा २९५ अब्ज डॉलर
दैनिक भास्करशीे विशेष करारांतर्गत

पुढे काय : प्रत्युत्तर कराच्या तयारीत ईयू, कॅनडा-मेक्सिकोही सोबत

चीनच्या प्रत्युत्तरानंतर आता ईयू (युरोपीय संघ) देखील अमेरिकेवर कर लावण्याच्या तयारीत आहे. ईयूवर ट्रम्प यांनी २० टक्के कर लावला. तेवढाच कर ईयूदेखील अमेरिकेस लावू शकते. कॅनडा-मेक्सिकोही कर वाढवू शकते.

बाजार संकोच : सेन्सेक्समध्ये ९३१ अंक घसरण, वॉल स्ट्रीटला धक्का

कर युद्धादरम्यान शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ९३१ अंक तर निफ्टीमध्ये ३४६ अंकांची घसरण झाली. अमेरिकन वॉल स्ट्रीटमध्येही धक्के बसले. एसअँडपी व डाऊ जोनमध्ये घसरण झाली. जपानी निक्केईमध्येही घसरण नोंदली गेली.

व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत लोटू शकते, यात चीनचे पारडे जड राहणे शक्य

पहिल्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती अमेरिका व दुसऱ्या क्रमांकाची महाशक्ती चीन यांच्यातील व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत ढकलू शकते. चीन-अमेरिकेसह भारतावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. परंतु ट्रम्प सतत कराचा मारा करत आहेत. ते पाहता चीनचे पारडे जड राहू शकते.आयात कच्चा माल, तयार उत्पादनांवरील वाढता खर्चातून महागाई वाढेल. फेडरल रिझर्व्हला व्याजदरात बदल करावा लागू शकतो. कृषी उत्पादने उदाहरणार्थ-सोयाबीन, मका, मांस इत्यादी अमेरिकेतून चीनला प्रमुख निर्यात होते. ऊर्जा क्षेत्रात तेल, नैसर्गिक गॅसवरील कर वाढेल. अमेरिकन विमान उपकरण व ऑटोमोबाइलचे सुटेभाग चिनी बाजारात महागडे होतील.

निर्यातीत घट होऊ शकते कारण चीन अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ३४ टक्के करातून त्याच्या निर्यातीत (विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रे, ग्राहकोपयोगी साहित्य) मोठी घट होऊ शकते. यातून चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. चीनला नवीन बाजारपेठ शोधावी लागेल. चीनच्या देशी उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. कारण अमेरिकन सामान महागडे झाल्याने स्थानिक उत्पादनांची मागणी वाढू शकते.

अमेरिकन करामुळे चीनने आपले स्वस्त सामान भारतात डंप केल्याने भारतीय उत्पादकांचे नुकसान होऊ शकते. अशा डंपिंगपासून भारताने दक्षता बाळगावी. ही भारतासाठी आत्मनिर्भरता वाढवण्याची संधी आहे. व्यापार युद्धात भारत व चीन व्यापार वाढू शकतो. तसेही उभय देश व्यापारवाढीच्या प्रयत्नात दिसून येतात.

वडगाव,धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तासभर वीज खंडित

महापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड;

पुणे, दि. ०४ एप्रिल २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, किरकीटवाडी, नांदेड सिटी या परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीमध्ये आज सायंकाळी ५.४५ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या १३ उपकेंद्रांसह ६६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामुळे वडगाव, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदेड गाव, सिंहगड रस्ता आदी परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.५० वाजेपर्यंत तासभर बंद होता. तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ६.१८ वाजेपर्यंत अर्धा तास बंद होता. महापारेषणकडून इतर अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या १३ उपकेंद्रांना व ६६ वीजवाहिन्यांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, बिघाड झालेल्या वीजवाहिनीचे काम महापारेषणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा.

खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदा करा.

: डॉ अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी- महाराष्ट्र राज्य सचिव ) यांची मागणी

पुणे- शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गुंतागुंतीची प्रसूती असणाऱ्या गरोदर महिलेला (तनिषा भिसे) ॲडव्हान्स रक्कम न भरल्यामुळे उपचार नाकारण्याची आणि त्यानंतर त्या रुग्णाचा इतरत्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सध्या राज्यभर गाजते आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये (यामध्ये तथाकथित धर्मदाय पण कॉर्पोरेट स्टाईलने चालणारी मोठी रुग्णालये सुद्धा आली) भरपूर ॲडव्हान्स रक्कम भरल्याशिवाय तातडीच्या प्रसंगी सुद्धा उपचार मिळत नाही ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने खुलासा केलेला असला तरी तब्बल 10 लाख रुपये डिपॉझिट लेखी मागितल्याची बाब त्यांनी नाकारलेली नाही, हे महत्वाचे आहे. मयत रुग्ण महिलेच्या नणंदेने इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीनुसार रुग्णाचा ब्लड प्रेशर वाढलेला होता तसेच योनिमार्गाद्वारे रक्तस्त्राव होत होता. अशावेळी सदर रुग्णाला भरती करून उपचार मिळणे आवश्यक होते. धर्मदाय रुग्णालयांना तातडीच्या रुग्णांसाठी ॲडव्हान्स मागता येत नाही असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

ही केवळ एक घटना नसून अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत असतात. अनेकदा तातडीच्या वेळी व्यक्तीला उपचार मिळणे हे आवश्यक असताना खासगी रुग्णालय प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या ॲडव्हान्सची मागणी होते. ती पूर्ण करणे कित्येक रुग्णांना त्या क्षणी शक्य होत नाही. परिणामी अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना राजरोसपणे राज्यात घडत आहेत.

राज्यात खासगी हॉस्पिटलने किती ॲडव्हान्स मागावा याचा ठोस नियम नाही. याबाबत संदिग्धता असल्याने हॉस्पिटल कडून अनेकदा रुग्णांकडून भरमसाठ ॲडव्हान्स रक्कम मागितली जाते. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना उपचार नाकारला जातो. ॲडव्हान्स मागणे गैर नाही पण ॲडव्हान्स दिल्याशिवाय तातडीचे उपचार सुरु करणार नाही असा अनेक खासगी रुग्णालयांचा आग्रह योग्य नाही.

मुर्दाड कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्थेविरोधात नागरिकांच्या मनामनामध्ये असलेला असंतोष दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात उत्स्फुर्तपणे उघड होत आहे. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ अभिजीत मोरे यांच्याकडून खालील मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जाहीररित्या करण्यात येत आहे.

1) जवळच्या सरकारी, खासगी अशा कोणत्याही रुग्णालयात गंभीर, किचकट प्रसूतीच्या महिला भगिनींना उत्पन्नाची अट न घालता राज्य सरकार द्वारे फ्री युनिव्हर्सल इमरजन्सी मॅटरर्निटी केअर द्या.
2) खासगी रुग्णालय नफेखोरी प्रतिबंध कायदा बनवण्यात यावा. खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा. खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदेशीर तरतूद करा. या कायद्याद्वारे राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दरांमधील पारदर्शकता बंधनकारक करण्यात यावी. सर्व रुग्णांना उपचारापूर्वी संबंधित रुग्णालयाचे दरपत्रक देण्यात यावे. सर्व रुग्णांना उपचाराच्या खर्चाचे अंदाजे बिल उपचार सुरू करण्यापूर्वी देण्यात यावे. तसेच रुग्णांना त्यांची उपचाराची कागदपत्रे न देणे हा दखलपात्र गुन्हा समजला जावा.

मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्या आक्रमक:डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची केली तोडफोड

पुणे-डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे देखील खासगी रुग्णालय आहे. याच रुग्णालयाची भाजपच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. गर्भवती महिलेच्या उपचाराअभावी निधन झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आंदोलन केले आहे.

डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. डॉ. घैसास यांनी भिसे कुटुंबीयांकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र 10 लाख उपलब्ध न झाल्याने उपचार देण्यात आले नाहीत. त्यामुळे रुग्णाला भिसे कुटुंबीयांना नाईलाजाने दुसऱ्या रुग्णालयात न्यावे लागले होते. त्यानंतर सूर्या रुग्णालयात गर्भवती महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला व त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉ. घैसास यांच्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

आंदोलकांनी असेही सांगितले कि,’ दीनानाथ रुग्णालायचा अहवाल देखील आला असून यात सर्व कर्मचारी व डॉक्टरांना क्लिनचीट देण्यात आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांचे खासगी रुग्णालय गाठून या रुग्णालयात तोडफोड केली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या की, त्यांनी जीव घेतला आहे आणि त्याच पैशांनी एवढे मोठे हॉस्पिटल बांधले आहे. त्यांना माणुसकी नाहीये. त्यांच्यामुळे दोन बाळं निराधार झाली आहेत. त्या बाळांचे संगोपन त्यांनी करायचे आहे, अशी मागणी देखील महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत असताना त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यावेळी अडीच लाख रुपये सध्या आहेत उर्वरित रक्कम देतो असे सांगूनही प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भिसे कुटुंबाने गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.

लंडनहून मुंबईला निघालेले विमान उतरले तुर्कीत !

३० तास अडकलेल्या प्रवाशांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दिलासा

लंडनवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे तुर्कीत लष्करी विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या संवेदनशीलतेने प्रवाशांना दिलासा

पुणे-
लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने हार्ड लँडिंग होउन गियरमध्ये समस्या निर्माण झाली. तसेच या विमानतळावर सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या. त्याचप्रमाणे संबंधित विमानतळ हे इतर देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान व्यवसायिक विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी भारतीय प्रवासी ३० तास अडकून पडले होते. त्यातील काही प्रवाशांच्या ओळखीच्या लोकांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत बाेलणे करत व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.

त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महारष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील माेहाेळ यांच्याशी चर्चा केली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पाेपहार देण्यात आले, र्गभवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपल्बध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु साेडवण्यात अपयश आले. कारण, संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लॅँडिग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हाॅटेल मध्ये रहाण्याची साेय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानतळावर नेऊन पर्यायी विमानाने घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करण्याचा मार्ग देखील सूचित करण्यात आला. दरम्यान, माेहाेळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता

याबाबत मुंबईतील उच्च न्यायालयात कामकाज करणारे ॲड .सत्यम सुराणा यांनी सांगितले की, लंडनवरून मुंबईला येणाऱ्या संबंधित विमानात माझा एक मित्र प्रवास करत होता. त्यांनी अचानक तुर्कीत अडकून पडल्याची मला माहिती दिल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मला तात्काळ निरोप आला, त्यांनी संपर्क साधत सविस्तर घटना जाणून घेतली .हवाई मंत्रालयातील दोन अधिकारी सातत्याने वेगवेगळे यंत्रणांशी संपर्क करण्यासाठी नेमण्यात आले. वेगवान हालचाली केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकला आहे. या माध्यमातून केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता दिसून आली आहे.

भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ

श्री रामजी संस्थान तुळशीबाग येथील श्रीरामनवमी उत्सवात ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी कार्यक्रम ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… कानडा राजा पंढरीचा… अशाच एका सरस रचनासह नमो ज्ञान राजा… या संतांनी काही नवीन स्वरबद्ध अभंग पेशवेकालीन तुळशीबा श्रीराम मंदिरात सादर केले. भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ या कारणाने रसिकांनी अनुभवला.

श्रीरामजी संस्थान तुळशीबागवतीने श्रीराम मंदिर श्रीरामनवमी उत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.

संस्थानचे कार्यप्रणाली विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले य तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

काल मी रघुनंदन पाहिले… या ग.दी. माडगूळकर यांनी मांडल्या आणि सुधीर फडके उरफ बाबुजी यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… दशरथा घे हे पायसदान… यांस उत्तम सुपरिचित भक्तीरचनांचा स्वराविष्कार देखील पुणेकरांना अनुभव आला. श्रीराम जय राम जयजयराम निनादात संपूर्ण मंदिराच्या भक्तीमय झाला होता. स्हल दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

पुण्यात 6 एप्रिलला गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे होणार उद्घाटन

— पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट मध्ये देशभरातील नामांकित संघ व खेळाडू मोठ्या प्रमाणात होनार सहभागी—
पुणे –
येत्या 6 एप्रिल ला पुण्यात होणाऱ्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन होणार आहे .ही गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा संकलित जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे तर एकूण 16 संघ आणि 180 ते 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ 13 एप्रिल 2025 रोजी पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार असल्याची माहिती गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले .
पुढे ते म्हणाले की ,अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .आज देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत .पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग 2025 ची घोषणा करण्यात आली .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
आंतरराष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे .व सर्व यजमान संघाचा नुकताच स्वागत समारंभ पार पडला.
या प्रिमियर लीगचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे .
या वेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुप चे अनिरुद्ध सेवलेकर,ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट चे रोहन सेवलेकर,एस गोल्फिंग चे आदित्य मालपणी ,ऑक्सफर्ड रिसॉर्ट चे व्यवस्थापक कौशिल वोरा पत्रकार परिषदेस उपस्थित होते .
या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स,
पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी सांगितले आहे .

चित्रप्रदर्शनातून उलगडणार वन्दे मातरम्‌‍चा इतिहास,भारतमातेच्या विविध रूपांचेही घडणार दर्शन

दिग्गज चित्रकारांची मूळ चित्रेही बघण्याची संधी

पुणे : वन्दे मातरम्‌‍ या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती (150) जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सुरवातीलाच वन्दे मातरम्‌‍चा इतिहास मांडणाऱ्या तसेच गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवार, दि. 8 ते शनिवार, दि. 12 एप्रिल या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 .30 वाजता खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि वन्दे मारतम्‌‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रवींद्र सातपुते यावेळी उपस्थित होते. दि. 12 एप्रिल पर्यंत प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुली असणार आहे.
रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पंडित श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. संगणकीय मांडणी अनंत कुलकर्णी यांची आहे.
वन्दे मातरम्‌‍च्या 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत भरविण्यात येत असलेल्या ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवा अंतर्गत चित्रप्रदर्शनाच्या आयोजनात वन्दे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समितीचे सहकार्य लाभले आहे. ऋषी बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‌‘आनंदमठ‌’ या संगीत नाटकाचा प्रयोगाने होणार आहे. मराठी रंगभूमीवर गेल्या 125 वर्षामध्ये आनंदमठ ही कादंबरी प्रथमच नाट्य स्वरूपात आणण्यात आली आहे. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत कोलाज क्रिएशन्स निर्मित व विनिता तेलंग लिखीत व रवीन्द्र सातपुते दिग्दर्शित या संगीत नाटकाला 2025 च्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांत व सर्वोच्च एकूण 8 पारितोषिके मिळाली आहेत. नाट्यप्रयोग सशुल्क असून चित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.