Home Blog Page 3237

वेळीच जागे व्हा ,अन्यथा सारेच अधिकारी असे वागतील -मानकर यांचा इशारा (व्हिडीओ)

0

पुणे-एखादा अधिकारी किती उद्धट असू शकतो असे तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिले…त्यांची मनमानी सुरु असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे . — वेळीच जागे व्हा अन्यथा सर्व अधिकारी असेच वागतील असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी महापालिकेच्या खास सभेतून दिला .
महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल  ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर यावेळी दीपक मानकर पहा आणि ऐका काय म्हणाले

‘धिंगाणा’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

0

हिंदी मराठीतील कलाकारांनी मिळून घातलेला ‘धिंगाणा’ येत्या ८ डिसेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. धमाल कथानक, कलाकारांची भन्नाट अदाकारी, ठेका धरायला लावणारं संगीत असा करमणुकीचा भरगच्च मसाला असणाऱ्या ‘धिंगाणा’ या मराठी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ममता प्रोडक्शन हाऊसची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे निर्माते समीर सदानंद पाटील असून दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांचे आहे.

ठेका धरायला लावणारी ही गाणी प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असं सांगत हा ‘धिंगाणा’ प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करेल असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच मराठी सिनेमात काम करताना मजा आल्याची भावना शाहबाझ खान व कुनिका यांनी बोलून दाखवली. आनंद शिंदे यांनी या चित्रपटात ‘धिंगाणा’ हे चित्रपटाचे शीर्षक गीत गायले असून या गीताची निर्मिती सचिन पाठक (यो) यांच्या लेखणीतून झालेली आहे. या गीताला अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले आहे. शिंदेशाही घराण्यातील कर्तबगार सुपुत्र आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील ‘झिंगालाला’ हे गीत गायले असून या गीताची रचना वैभव जोशी या सुप्रसिद्ध कवीने केली आहे. तसेच या चित्रपटातील वेगळ्या धाटणीचे व युवा वर्गाला भावणारे ‘बिल्ली हुँ मै’! हे हिंदी, मराठी, आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतील गीत जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारले आहे. राज्ञी त्यागराज या नवोदित गायिकेला शशांक पोवार या संगीतकाराने प्रथमत: सिनेमात गाण्याची संधी दिली असून राज्ञी त्यागराज हिने या संधीचे सोने केले आहे. आणि प्रेक्षकांना तिच्या आवाजाची व संगीत रचनेची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.

‘धिंगाणाचं दिग्दर्शन करणाऱ्या चंद्रकांत दुधगावकर यांनी या सिनेमातून चीट फंड घोटाळ्याचा विषय हाताळला आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर, प्रकाश धोत्रे या मराठी कलाकारांसोबत रझा मुराद, शाहबाझ खान, अवतार गिल, कुनिका हे हिंदीतले कलाकार ही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. सुजीत कुमार यांनी या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘धिंगाणा’ ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तू जराशी ये उराशी….‘What’s Up लग्न’ मधील गाणे..

0

जगण्याचा वेग वाढलेला आहे पण भावनांची गती मात्र तेवढीच आहे. जगण्याचा हा वेग आणि भावनांचा आवेग यांच्यातली गमतीशीर तारांबळ म्हणजेच ‘Whats Up लग्न हा सिनेमा !!!! भावना म्हटल्या की गाणी आलीच….माणसाच्या भावना पोहोचवायला गाण्याइतकं सुंदर माध्यम दुसर नाही. मात्र चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गाणी करताना ती तितकीच आशयघन तरीही सहज सोपे शब्द सांगणारी असली पाहिजेत. त्याला तितकेच तरल आणि उत्कट संगीतही लाभले पाहिजे. आणि हा सुंदर मेळ जमून आला आहे, ‘Whats Up लग्न या चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांमध्ये.

रोमँटिक गाणी म्हटली  की, रसिकांच्या मनात २ नावं सहज येतात – संगीतकार निलेश मोहरीर व गीतकार अश्विनी शेंडे !!! या सांगीतिक जोडीने कितीतरी मधाळ गाणी मराठी रसिकांना दिलीयेत. इतकी सुंदर रोमँटिक गाणी दिल्यानंतरही, प्रत्येक नवीन गाणं तितकंच फ्रेश मिळणार यात रसिकांना कधीच शंका नसते. ‘Whats Up लग्न या चित्रपटासाठी सुद्धा या जोडीने ही किमया साधली आहे.

‘तू जराशी ये उराशी’ या  गाण्यातून या जोडीने प्रेमा मागाची उत्कटता! व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. प्रत्येक गाण्याची स्व:ताची अशी एक खासियत असते. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याची खासियत म्हणजे आधी चाल बांधून नंतर ते शब्दबद्ध करण्यात आलं. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम व्यक्त करणार हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास गीतकार अश्विनी शेंडे व संगीतकार निलेश मोहरीर यांनी व्यक्त केला आहे.

शब्दांचं सामर्थ्य आणि स्वरांची भावोत्कटता यांचा संगम झाला,  की त्यातून सुरेल गीत जन्माला येतं. गाणं साकार करणं हा सगळा अनुभव अत्यंत रोमांचकारी असतो. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याच्या बाबतीत निर्माते व दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी केलेलं सहकार्य व गाणं कसं असावं याबाबतीतलं त्याचं स्पष्ट व्हिजन यामुळे हे गाणं जमून आल्याचं मत या दोघांनी व्यक्त केलं. शिवाय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या केमिस्ट्रीमुळे तसेच गायक हृषीकेश रानडे आणि गायिका निहिरा जोशी यांच्या मधुर स्वरांनी या गाण्याची रंगत आणखीनच वाढवली आहे. चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं या हेतूने ३ महिने आधीच हे गाणं प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी आवर्जून केला आहे. याबाबतीत बोलताना विश्वास जोशी सांगतात की, शेवटी, खऱ्या अर्थे, चित्रपटाआधी सुद्धा त्याचे गाणेच लोकांना अपील होते. आणि चित्रपट संपल्यावरही लोक तेच गुणगुणत घरी जातात. हीच खरी संगीताची ताकद असते.

फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या ‘Whats Up लग्न या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे आहे. जाई जोशी आणि नानूजयसिंघानी प्रस्तुतकर्ते असलेल्या  या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रसिकांना ९ फेब्रुवारी २०१८ पर्यत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना या फिल्मच्या सुमधुर आणि मधाळ गीतांचा आस्वाद नक्की घेता येईल.

पुणे महापालिका मुख्य सभेतील तुकाराम मुंडेंचे संपूर्ण विवेचन …(व्हिडीओ)

0

पुणे -महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) 2016-17 या आर्थिक वर्षात 240 कोटी रुपये तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महापलिकेकडून संचलन तूट म्हणून 144 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावला मुख्यसभेत आज एकमताने मंजुरी देण्यात आली.

महापालिकेकडून पीएमपीला दरमहा १२ कोटी रुपयांचे हप्ते १२ महिने देण्यात येणार असून पीएमपीच्या ताळेबंदाचे लेखापरीक्षण झाल्यानंतर शेवटचा हप्ता दिला जाणार आहे.

पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे कंपनीच्या संचलन तुटीचा खर्च आणि बस खरेदीवरील करांची रक्कम दोन्ही महापालिकांनी आपापल्या हिश्श्यानुसार पीएमपीला द्यावी, असा आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये दिला होता. पीएमपीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात २४० कोटी रुपयांची संचलन तूट आली आहे. पुणे महापालिकेच्या हिश्श्यानुसार १४४ कोटी रुपये पीएमपीला देणे आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरी नंतर मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता.
या सभेत पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी केलेले संपूर्ण विवेचन पहा आणि ऐका…

रंगणार राणा आणि दलजितचा वज्रकेसरी सामना

0

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत गेले काही काळ ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहाताहेत तो क्षण अखेर येऊन ठेपलाय.
राणाचा अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या
राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहाण्याचं बळ दिलं. अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा
वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहीलाय. येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणार आहे .
अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे. पण दलजितला हाताशी घेऊन
नंदिताने काही नवे डावपेच आखलेत. अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणारेय.
या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले.

शूटिंगच्या पहिल्या
दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही इथे झाल्या. राणा आणि दलजीतचा सामना पाहाण्यासाठी
गावा गावातून लोकं आली असून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही
उपस्थित होते.

१. मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट

२. रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी पै. दादू मामा चौगुले

३. हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर

४. हिंद केसरी पै. दिनानाथ सिंह

५. हिंद केसरी पै. योगेश दोडके

६. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील

७. महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस

८. उपमहाराष्ट्र केसरी पै. रामा माने

९. ऑलिंपिकवीर बंडा मामा रेठरेकर

१०. पै. मारुती मानुगडे

११. पहिले हिंदकेसरी पै. श्रीपती तथा अण्णा खंचनाळे

१२. महापौर केसरी पै. अमृत भोसले तथा मामा भोसले

१३. प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी

यांचा या उपस्थिती मध्ये समावेश आहे .

२६ नोव्हेंबर संध्याकाळी . ८ वा.  झी मराठी वर हा सामना दिसेल .

प्रतापगडावर नेमकं काय घडलं???

0
अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगु सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते मिलिंद गुणाजी प्रथमच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजवर अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा यापूर्वी त्यांनी सिनेमातून साकारल्या आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी प्रथमच ‘एक मराठा लाख मराठा’ या सिनेमात साकारली आहे. या सिनेमात महाराजांची भूमिका करण्याचे विशेष असे कारण आहे, त्याबद्दल ते खुलासा करतात…
यापूर्वी मराठी सिनेमात मी शहाजी महाराजांची भूमिका केली आहे. तसेच एका तेलगु सिनेमात मी कल्यणगिरी राजा ही ऐतिहासिक भूमिका केली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला आजवर मिळाले नव्हते. एक दिवस गणेश शिंदे नावाचा तरुण मला भेटायला आला. त्याच्या सिनेमात मी काम करावं अशी त्यांची प्रांजळ इच्छा होती. मी आधी त्याला त्याचे अनुभव आणि सिनेमाचे कथानक विचारले. त्याने सिनेमाची गोष्ट सांगितली… आणि हा सिनेमा का करतोय याचं कारण देखील त्याने सांगितले. यापूर्वी दिग्दर्शनाचा कोणताही अनुभव त्याला नव्हता, सिनेमाचे बजेट देखील जास्त नव्हते, शिवाय माझे काम देखील जास्त नव्हते.. पण त्याची धडपड आणि काहीतरी वेगळे करण्याचे धाडस मला भावले म्हणून मी कसलाही विचार न करता त्याला होकार दिला.
प्रतापगडावर नेमकं काय घडलं? याबद्दल मिलिंद गुणाजी सांगतात की, या सिनेमात मी ज्याप्रकारे महाराजांची भूमिका साकारतो आहे त्यानुसार सिनेमात माझे दृश्य हे प्रतापगडावर चित्रित होणार होते. महाराजांच्या संपूर्ण वेशभूषेत मला गडाच्या वर जायचे होते. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मला ट्रेकिंगची आवड आहे, गड किल्ले माझा आवडता विषय आहे, आणि मला सवय असल्याने केवळ पंधरा मिनिटात मी प्रतापगडाच्या टोकाशी असायचो, पण सर्व सिनेमाचे युनिट यायला वेळ लागायचा आणि सर्वांची दमछाक व्हायची. तब्बल सोळा तास आम्ही गडावर चित्रण करत होतो. आजच्या आपल्या गड किल्ल्यांची अवस्था वाईट आहे याचे मला दु:ख होते. ट्रेकिंग करणारे काही मुलं अनेकदा आपल्या खिशातून पैसे काढून गड-किल्ल्यांची डागडुजी करतात. पण या सिनेमातून हा देखील एक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे की सरकारने देखील पुढाकार घेऊन आपला हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा, त्याची चांगल्याप्रकारे देखभाल करावी.

समीर मुजावर चे ‘मिलेनियल फार्मा स्टुडंट्स कॉंग्रेस’मध्ये यश

0
पुणे :
‘पीएसआय बॉण्ड फार्मा स्टुडंट अँड इंडस्ट्री बिझीनेस ऑपर्च्युनिटी इन न्यू डोमेन’स्पर्धेमध्ये समीर मुजावर याला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. बी.एम. रेड्डी कॉलेज ऑफ फार्मेसी, बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘मिलेनियल फार्मा स्टुडंट्स कॉंग्रेस’ मध्ये तो सहभागी झाला.
समीर मुजावर हा महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ मध्ये बी. फार्मसी च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
‘भारतीय फार्मा 2018’ च्या राष्ट्रीय स्तरावरील पुढच्या फेरीत मुजावर अल्लाना फार्मसी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. फार्मा उद्योगांसाठी फायदेशीर असलेल्या ‘पॅकेजिंग आणि तंत्रज्ञाना’शी संबंधित संकल्पना आणि कल्पना सादर करण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी दिली.
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी समीर मुजावर चे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
समीर मुजावार ‘भारतीय फार्मा 2018’ च्या दरम्यान ‘लो कॉस्ट एरोसॉल्स’ विषयीच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष मॉडेल सादर करणार आहे.

मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्र्यांकडून शेतकऱ्यांना सवलत

0
मुंबई, : मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला 3 हजार 30 हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास 5 हजार रुपये भरण्याची सवलत आज जाहिर केली आहे. ही रक्कम दि. 30 नोव्हेंबर 2017 पर्यन्त भरावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबीराचे आयोजन दि. 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आपली देयके वाढून आली आहेत असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबीरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.

कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 ची घोषणा दि. 30 ऑक्टोबर 2017 ला ऊर्जामंत्र्यांनी केली होती. या योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यन्त असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

 
 

श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांची यशोगाथा महानाट्य रुपात

0

मराठा साम्राज्य स्थापन करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांचा सिंहाचा वाटा आहे.  हिंदुस्थानातील निजाम, हैदर मोगल, सिद्दी या सारख्या परकीय महासत्तांना मात देणारा अजिंक्य योद्धा म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. मराठी मुलखात आत्मविश्र्वास व स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’! दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. अशा या महापराक्रमी योद्ध्याची शौर्यगाथा आता ‘अजिंक्य योद्धा या नाट्यरूपाने आपल्या समोर येणार आहे.

संजय ह. पांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या तसेच पंजाब टॅाकीजची निर्मिती असलेल्या ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाटय़ाला लवकरच प्रारंभ होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाटय़’ आहे. या महानाट्यातून ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांचा इतिहास आणि जीवनचरित्र उलगडलं जाणार आहे. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात या पेशव्याने दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास घडवला. युद्ध कौशल्य, लष्करी गुण, मुत्सद्दीपण, प्रशासकीय कौशल्य यांचा सुरेख मिलाफ असलेले बाजीरावांचे व्यक्तिमत्व व त्यांचा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने या महानाट्याची निर्मिती करण्यात येत आहे.

पंजाब टॅाकीज निर्मित ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्यासाठी सहाय्यक दिग्दर्शन व कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अभय सोडये यांनी सांभाळली आहे. या महानाट्यातील गाणी गायक आदर्श शिंदे, नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत. आदर्श शिंदे यांनी गायलेलं शीर्षकगीत अप्रतिम झालेले आहे. संगीत दिग्दर्शक  आदि रामचंद्र, आणि संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे असून वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे. सूत्रधार योगेश मोरे, कुणाल मुळये, रुपेश परब आहेत. उमेश तावडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.  अतिशय भव्य स्वरुपात ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’  या महानाट्याचे प्रयोग सादर होणार असून प्रेक्षकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरेल हे नक्की.

गीतकार शैलेंद्र यांच्या आठवणींना उजाळा !

0
पुणे :जुन्या पिढीच्या हिंदी चित्रपटगीतांच्या रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘तू प्यार का सागर है ‘सारख्या भावनाप्रधान गीतांपासून कामगारांच्या मोर्चाला प्रेरणा देणाऱ्या ‘हर जोर -जुल्म की टक्कर मे ‘सारखे संघर्षगीत लिहिणाऱ्या  गीतकार शैलेंद्र यांच्या स्मृतींना आज बुधवारी उजाळा मिळाला ! २८ संगीतकारांच्या १७५ चित्रपटांसाठी ७७५ गीते  लिहिणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांची जीवनगाथाच रसिकांसमोर उलगडली !
 
‘रसिक मित्र मंडळ’च्या ‘एक कवी -एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेत आज बुधवारी  प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्यावर विजय पाडळकर यांच्या दृक श्राव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला .  ‘रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला  यांनी स्वागत केले . अध्यक्षस्थानी मधू पोतदार होते . या व्याख्यानमालेचे हे ५२ वे पुष्प होते . 
 
विजय पाडळकर यांनी शैलेंद्र यांच्या कार्यकर्तृत्व ,शैलीचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला . ते म्हणाले ,’शैलेंद्र हे एकमेवाद्वितीय गीतकार होते . गुलझार ,नक्श लायलपुरी ,जावेद अख्तर यांनीही शैलेंद्र यांची थोरवी सांगितली ,यातच शैलेंद्र यांचे मोठेपण उठून दिसते . देशभक्तीपर गीतांसाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला . मथुरेवरून मुंबईला आल्यावर त्यांची कारकीर्द बहरली . पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या शैलेंद्र यांनी कामगारांच्या लढ्यातही भाग घेतला . ‘न्योता और चुनौती ‘सारखे पुस्तक अण्णाभाऊ साठे याना अर्पण केले . इप्टा ,रायटर्स असोसिएशन सारख्या संघटनांचे प्रतिनिधित्व केले . 
 
त्यांच्या ‘बरसात ‘,’आवारा ‘,’अनाडी ‘,जागते रहो ‘ या राज कपूरच्या चित्रपटात लिहिलेल्या गीतांनी रसिकांना वेड लावले . ‘मधुमती ‘,’परख ‘,’गाईड ‘मधून शब्दांचे गारुड कायम राहिले . 
 
‘मंझिल वही है प्यार की ‘,जागो मोहन प्यारे ‘,तू प्यार सागर है ‘,जीना इसिका नाम है ‘,ओ सजना ,बरखा बहार आयी ‘,’आज फीर जीने की तमन्ना है ‘ अशा शैलेंद्र गीतांचे दृक श्राव्य प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आले . जुन्या पिढीच्या  भरलेल्या सभागृहाने या गीतांना दाद दिली . 
 
‘शैलेंद्र यांच्या १० गीतांमध्ये रिमझिम हा शब्द आणि पावसाचे वर्णन आहे असे सांगून रसिकांच्या मनावर शैलेंद्र साठी जे सिंहासन आहे ,त्याची जागा कोणी घेऊ शकला नाही ‘असे सांगून विजय पाडळकर यांनी समारोप केला . यावेळी प्रदीप निफाडकर,मंदा कुलकर्णी ,रमेश गोविंद वैद्य  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते 

शिवसेना शहरप्रमुखपदावर दोन माजी आमदार

0

पुणे : शिवसेना पुणे शहरप्रमुखपदी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर यांची नेमणूक आज करण्यात आली. मोकाटे यांच्याकडे कोथरुड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती तर बाबर यांच्याकडे हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगांवशेरी, खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  दोन शहरप्रमुखांबरोबरच नगरसेवक बाळासाहेब  ओसवाल, संजय मोरे व किरण साळी यांच्याकडे उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

युवासेनेचे शहरप्रमुख असलेल्या साळी यांच्याकडे उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना वडगावशेरी मतदारसंघ वडगावशेरी विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष पदी नगरसेवक संजय भोसले यांची निवडकरण्यात आली

पाचजणांच्या टीमबरोबरच प्रशांत बधे, शाम देशपांडे व अजय भोसले या शहर पातळीवरील वरिष्ठांना सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या शिवाय महिला आघाडीला दोन शहरप्रमुख नेमण्यात आले आहेत.सविता मते व नगरसेविका संगिता ठोसर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार व शिवसेना नेते संजय राऊत व पुण्याचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी मुंबईत शिवसेना भवनात आज ही घोषणा केली. माजी आमदार विनायक निम्हण हे जवळपास दोन वर्षे शहरप्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळातच पुणे महपालिकेची निवडणूक झाली. निम्हण यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून संघटनचे काम थंडावलेले होते. 

आधीच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विखुरलेल्या मूळच्या शिवसैनिकांना एकत्र करून शहरात संघटना भक्कम करण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे नूतन शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले. शाखा हा शिवसेच्या विस्ताराचा पाया आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व शाखा भक्कम करण्याबरोबरच शाखा विस्ताराचे काम हाती घेण्यात येईल. समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेनेचा आधार वाटला पाहिजे हा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणार असल्याची भावना मोकाटे यांनी व्यक्त केली.

नगरसेवकांच्या आक्षेपांचा सामना न करताच मुंडेनी सभागृह सोडले -महापलिका सदस्य संतप्त

0

पुणे : सभागृहात सदस्यांची भाषणे सुरू असतानाच त्यांच्या आक्षेपांचा सामना न करता मुंडे यांनी  सभागृहच सोडले. यामुळे तमाम नगरसेवकांना मुंडे यांनी टोलवून लावल्याची भावना पसरली आणि मुंडे यांनी पुणेकरांचा ,सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला .यावेळी मुंडे यांच्या कृत्याबाबत सभापती किंवा कोणालाही उत्तरे देता न आल्याने , सभेच्या शेवटी पीठासीन अधिकारी उपमहापौर धेंडे यांनी हि  मुंडेंचा निषेध करूनच सभा संपविली .
मुंडे सभागृहात आल्यानंतर प्रथम त्यांनी आपली ओळख करून द्यावी असा आग्रह कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी केला तेव्हा त्यांनी आपले नाव सांगून ,मी आल्यानंतर काय केले याबाबत अर्धा तास विवेचन केले .त्यानंतर सभासद बोलू लागले , प्रशांत जगताप, धीरज घाटे , यांची भाषणे झाली , पल्लवी जावळे या बोलायला उभ्या राहातच मुंडे हे तरातरा सभागृहाबाहेर पडले आणि चेतन तुपे पाटील ,अरविंद शिंदे,अविनाश बागवे, यांनी ते कुठे गेले अशी विचारणा केली. पिठासन अधिकारी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना ते सांगता आले नाही. त्यावरून  सदस्यांनी गोंधळ सुरू केला. महापौरांना न विचारता गेले सभागृहाचा अपमान झाला अशी भूमिका घेत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. खुलासा करा अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सभागृह नेते भिमाले विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. आम्ही शहराच्या हितासाठी काम सोडून आलो आहोत, त्यांना काही घेणे दिसत नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. त्यांना परत बोलवा अशी मागणी होऊ लागली. धेंडे यांनी या गोंधळातच कामकाज सुरू केले. भाजपाच्या सदस्यांना त्यांनी बोलण्यास सांगितले.

पहा सुरुवातीच्या सभेची हि व्हिडीओ झलक – संपूर्ण सविस्तर सभा पाहू इच्छिणाऱ्यांनी कृपया  आमच्या फेसबुक वरील https://www.facebook.com/MyMarathiNews/ या पेजला भेट द्यावी .या पेजवर हि सभा मुंडे यांचे विवेचन आणि सर्वांची भाषणे  लाइव्ह करण्यात आली आहे .

कोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला तर, बीडीपीची जागा शिवसृष्टीसाठी हस्तांतरित करावी; खासदार संजय काकडे यांची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

0

पुणे, दि. 22 : पुणे मेट्रोच्या स्टेशनसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा तर, शिवसृष्टीसाठी कोथरुड बीडीपी ची जागा द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे.

पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे आवश्यक आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून त्यास आणखी गती मिळण्यासाठी कचरा डेपोची जागा मेट्रोला त्वरित मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात दोन महिन्यापूर्वी निर्णयही झाला होता. मात्र अद्याप त्या जागेचे हस्तांतरण पुणे मेट्रोला झालेले नाही. तसेच, कचरा डेपोच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या शिवसृष्टीसाठी कोथरुड येथीलच बीडीपीची जागा देण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकामी स्वत: जातीने लक्ष घालावे आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यास सूचना कराव्यात, असे खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला व बीडीपीची जागा शिवसृष्टीला मिळाल्यास दोन्ही विकासकामे मार्गी लागतील. कोथरुडच्या व पर्यायाने पुण्याच्या वैभवात त्याने भरच पडणार असल्याचेही खासदार काकडे म्हणाले.

शिवसृष्टी कोथरूडलाच होणार ,पण राजकारण नको -भाजप (व्हिडीओ)

0

पुणे- शहरातील कोथरूड येथे प्रस्तावित शिवसृष्टी व्हावी आणि ती होईलच अशी आमची भूमिका आहे  . याबाबत पालकमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे . मात्र याबाबत कोणीही राजकारण करू नये. असे प्रतिपादन आज खास सभेत भाजपच्या वतीने स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले .
शिवसृष्टी च्या कामाचा  मुहूर्त   न केल्यास  मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांनी मुख्यसभेत दिला याला शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दर्शवला.
या मुख्य सभेत मानकर ,तसेच शिवसेना गटनेते संजय भोसले,नगरसेवक अविनाश बागवे, सुभाष जगताप तसेच कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विपक्ष् नेते चेतन तुपे पाटील  या सर्वांनी भाजपला या विषयावर  लक्ष्य केल्याने  भाजपच्या वतीने उत्तरे देताना पहा आणि ऐका .. मोहोळ आणि भिमाले नेमके काय म्हणाले …

शिवसृष्टीसाठी दीपक मानकरांनी दिला 1 महिन्याचा अल्टीमेटम (व्हिडीओ)

0

पुणे-पुणे- शहरातील कोथरूड येथे प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते असे असताना मुख्यमंत्री 5 वेळा पुण्यात येऊन देखील कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे येत्या महिन्या भरात शिवसृष्टीच्या कामाचा प्रारंभ न झाल्यास मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांनी मुख्यसभेत दिला याला शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दर्शवला.आज शिवसृष्टी बाबतच्या खास सभेचे आयोजन करण्यात आले होते.महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे हे दोघे अनुपस्थित असल्याने हि खास सभा वर्षा तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
या मुख्य सभेत मानकर ,तसेच शिवसेना गटनेते संजय भोसले,नगरसेवक अविनाश बागवे, सुभाष जगताप तसेच कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विपक्ष् नेते चेतन तुपे पाटील पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले …प्रत्यक्ष व्हिडीओ