शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
मुळशीसाठी विकासाचा पुणे पॅटर्न राबवणार : गिरीश बापट
पुणे-पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले. बंटाराभवन येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते. हिंजवडी, माण, बाणेर, नांदे, सूस, सुतारवाडी, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला होता. माजी खासदार नानासाहेब नवले, प्रतापराव पवार, नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, हिंजवडीच्या सरपंच स्मिताताई जांभुळकर,उपसरपंच राहुल जांभुळकर, माण गावच्या सरपंच स्मिताताई जांभूळकर, उपसरपंच सपनाताई वाडकर, नांदे सरपंच बाळासाहेब रानवडे, उपसरपंच कविता माकर, सुस सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच गजानन चांदेरे,महाळुंगे सरपंच तुळशीराम भांडे, उपसरपंच पांडुरंग पाडाळे, कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष सतीश पै यावेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले की , देशातील एक प्रमुख आय.टी केंद्र म्हणून हिंजवडीची ओळख आहे. हिंजवडी मधील ग्रामस्थ तसेच आयटीयन्स येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होते. ती कोंडी कमी करण्यासाठी चांदे, नांदे,मान असे पर्यायी रस्ते करण्यात येत आहेत, आम्ही हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. आता ते काम सुरु झाले आहे. ही मेट्रो सुरु करणे हे माझे स्वप्न होते. या भागाचा शाश्वत विकास करण्याचा आमचा मानस आहे. मात्र हा विकास करताना शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. असे आम्हाला वाटते. इथला शेतकरी उद्योजक व्हावा, बिल्डर व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सिंगापूरच्या कंपनी सोबत करार झाला आहे. गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना सुरु करुन या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या सूचना तसेच आमचा कालबद्ध कार्यक्रम यांचा मेळ घालून या गावांचा विकास करण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील.
प्रतापराव पवार यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांचे कौतुक केले. गिरीश बापट हे एक कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता हा नेहमी समाजाचा विचार करत असतो. तो त्याच्या फायद्याचा विचार करत नसतो व असा विचार करणारे कार्यकर्तेच मोठे होत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी खासदार नानासाहेब नवले यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, विकासासाठी बापट यांनी हाती घेतलेली कामे लवकर पूर्ण व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली.
हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे डॉ.सतीश पै यांनी तीन वर्षांपूर्वी हिंजवडी असोसिएशनच्या वतीने आमच्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यातील बहुतांश समस्या सुटत आल्या आहेत. या साठी बापट यांनी प्रयत्न केल्याचे सांगून त्यांचे आभार मानले. या मुळे हिंजवडी आयटी क्षेत्रामध्ये 50 हजार नवीन नोकऱ्या तयार होतील असे ते म्हणाले .
चंद्रकांत महाराज वांजळे यांनी ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होत असताना कशा प्रकारे विकास झाला पाहिजे. याचे मूर्तिमंत उदाहरण या गावातून आपल्याला पाहायला मिळते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात 1000 कुटुंबियांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने विकासाच्या दृष्टीने सूचना मागवण्यात आल्या.
सत्कार स्वीकारण्यास बापट यांचा नकार
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येणारा सत्कार स्विकारण्यास बापट यांनी नकार दिला. सत्कार समारंभाला फाटा देऊन या भागाचा विकास करण्यासाठी भविष्यात आणखी काय करावे लागेल, याबाबत या बैठकीत ग्रामस्थांशी बापट यांनी चर्चा केली. यातून पालकमंत्र्यांची संवेदनशीलता अधोरेखित होते.
पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध, कलम ३७० रद्दकरण्याची मागणी
अपना टाईम आयेगा
बॉलीवूडच्या टिपीकल झगमगाटात न रमता आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मोजकेच दिग्दर्शक करतात. यामध्ये झोया अख्तरचे नाव प्राधान्याने येते. तिने यावेळी आपल्या झोनच्या पलीकडे जात एक वेगळा, फुल्ल टू एनर्जी असलेला ‘गलीबॉय’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. रणवीर सिंह आणि आलीया भटने कमाल अभिनय केलेले हा‘गलीबॉय’ मनाला भावतो.
‘गलीबॉय’ ही कथा आहे, मुंबईतील धारावी १७ मध्ये राहणाऱ्या मुराद (रणवीर सिंह) या महावियायालीन मुलाच्या संघर्षाची आणि जिद्दीची. झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या मुरादला आपल्या गरिबीवर मात करायची आहे, त्यासाठी काय करावं याबद्दल त्याला फारसं काही माहीत नाही. मात्र स्वतःचं अस्तित्व शोधताना त्याला व्यक्त होण्याचा एका मार्ग सापडतो तो म्हणजे लिखाण. ग्रज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुरादला एक मैत्रीण आहे सफीना (आलिया भट्ट), ती एका श्रीमंत घरातली मुलगी असून ती सर्जन होणार आहे. दरम्यान मुरादचे वडील (विजय राज) दुसरं लग्न करतात. आईची होणारी फडफड तो पाहतो. पण वडिलांसमोर बोलायची त्याची हिंमत नाही. दरम्यान, मुरादच्या कॉलेजमध्ये रॅपर एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला लागते, कारण आपण जे लिखाण करतो ते म्हणजे रॅप असल्याची जाणीव त्याला होते. मग आपणही एमसी शेर सारखे व्हावे असे मुरादला वाटते. दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन) होते. मात्र नोकरी की रॅप या द्विधा मनःस्थितीत तो असतो. मुराद त्याचं रॅपर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण करतो का? हे जाणून घेण्यासाठी एकदा ‘गली बॉय’ पाहायला हवा.
झोया अख्तरचं दिग्दर्शन अप्रतिम झाल आहे’. ‘गलीबॉय’ साकारताना कुठेही केवळ ती एका मुलाची कथा रहात नाही तर ती अख्ख्या पिढीची गोष्ट होते. या चित्रपटाची कथा पक्की आहे. पटकथा तर इतकी नेमकी आहे की सिनेमाच्या सुरुवातीपासनं ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवते आणि संवादांची तर गोष्टच वेगळी. इतके सहज संवाद आहेत की चित्रपट कधी आपल्या मनात बोलका होतो ते कळतच नाही. या चित्रपटाचा गाभा म्हणजे त्याची संवेदनशीलता आणि ती फार सुंदर जपली आहे. त्याला साथ लाभलीय उत्तम कॅमेरावर्कची.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर रणवीर सिंहने कमाल केली आहे, त्याला याला कुठच्याही भूमिकेत बसवलं तरीही तो त्या भूमिकेचाच होतो. रणवीर सिंगने ही बेभान भूमिका इतकी संयतपणे साकारली आहे की काही क्षण स्वतःला विसरावं आणि मनापासनं त्या व्यक्तिरेखेच्या पेमात पडावं. आलिया भटचा अत्यंत सहज, मोकळा वावर तिच्या प्रेमातच पाडतो. तिचा पेहराव, देहबोली आणि आक्रमक, क्रांतीकारी वृत्ती यातली तफावत अक्षरशः अचंबित करते. एमसी शेर अर्थात सिद्धांत चतुर्वेदीही लक्षात राहतो. अनेक सीन्समध्ये रणवीरवर आलिया आणि सिद्धांत भारी पडलेले दिसतात. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे सिद्धांतकडे पाहून कळतं. विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलीन, विजय मौर्या यांनी आपली कामे चोख बजावली आहेत.
रॅपरच्या आयुष्यावर सिनेमा म्हटल्यावर त्यात उत्तम गाणी आणि कविता असणार यात शंका नाही, ‘शंकर- एहसान- लॉय’ यांच्या संगीताने सिनेमाला चार चाँद लावले आहेत. अपना टाईम आयेगा या गाण्याने सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच तरुणांची मनं जिकंली आहेत. सिनेमाचे बॅकग्राऊंड स्कोर आणि विजुअल्स हॉलिवूडच्या तोडीचे आहेत.
थोडक्यात सांगायचे तर ‘कोई दुसरा अपुन को आके बोलेगा के मै क्या है… अपून भी कुछ है… अपुन की भी औकात है…असं ज्यांना वाटते त्या प्रत्येकाचा हा चित्रपट आहे.
चित्रपट – गलीबॉय
निर्मिती – रितेश सिधवानी, फरहान अख्तर
दिग्दर्शक- झोया अख्तर
संगीत – शंकर – एहसान – लॉय
कलाकार- रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलिन, विजय मौर्या, ज्योती सुभाष
रेटिंग – ३.५
– भूपाल पंडित
प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’
एकोणीसाव्या शतकात भारतात सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षातून मुलींसाठी शाळा सुरु केली होती, मात्र समाजाच्या मानसिकते मध्ये अजूनही फार बदल झालेला नव्हता अशा परिस्थितीत एका स्त्री ने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले आणि तिच्या पतीने ते पूर्णत्वास नेले. स्त्री शिक्षण म्हणजे व्याभिचाराला निमंत्रण असे समजले जायचे त्या काळात सातासमुद्रापार जाउन डॉक्टरेट मिळविण्यासाठी एका महिनेने आणि तिच्या पतीने म्हणजेच आनंदीबाई आणि गोपाळराव यांनी जो सामाजिक संघर्ष केला त्याची कथा म्हणजे समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट होय.
दहा – बारा वर्षाच्या यमुना साठी तिचे आईवडील वर संशोधन करत आहेत. सोमण बुवा यमुनासाठी पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशीचं (ललित प्रभाकर) स्थळ घेऊन येतात. बिजवर असलेल्या गोपाळरावांचा हुंडा, मानपान अशा गोष्टीना विरोध आहे. लग्नासाठी. फक्त त्यांची एक अट असते, ती म्हणजे मुलीला लिहिता वाचता यायला हवं. त्यानंतर गोपळरावाशी लग्न करून यमूना आनंदीबाई गोपाळराव जोशी बनते. यमुनाचे आई वडील मनातून मात्र स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असे मानणारे आहेत यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. मात्र,गोपाळरावांच्या हट्टीपणापुढे त्यांचे काही चालत नाही आणि आनंदीचे प्राथमिक शिक्षण सुरू होते.
दरम्यान गोपाळरावांची अलिबागला बदली होते, येथे दोघांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू होतो. मात्र, त्याचवेळी गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे निधन होते. त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा आणि सासूबाई (गीतांजली कुलकर्णी) यांना घरी घेऊन येतात. याच काळात या जोडप्याला मुल होते मात्र आजारपणामुळे ते दगावते, या घटनेतून सावरताना त्या डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात, गोपाळराव त्यांना पाठिंबा देतात मात्र, त्यासाठी या जोडप्याला जो संघर्ष करावा लागतो तो जाणून घेण्यासाठी ‘आनंदी गोपाळ’ बघायला हवा.
या चित्रपटाची कथा वास्तव आहे, चित्रपटात १८६५ ते १८८७ चा काळ दिसतो. मुळातच ही गोष्ट फक्त आनंदीबाईंची नाही, तर ती त्यांना खंबीर आणि अमूल्य साथ देणाऱ्या त्यांच्या पतीची- गोपाळरावांचीही आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या जोडप्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो काहीसा वरवरचा वाटतो. चित्रपटात संवाद चांगले आहे, त्या काळातील बोली भाषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कथेचा वेग मंदावला आहे. मध्यंतरानंतर आनंदीबाईंचा अमेरिकेतील वास्तव्याचा भाग सविस्तरपणे आला असता तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम आहे.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, संतापी वृत्ती, जिद्द हे सारं ललितने चांगले साकारले आहे. भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाई व्यक्तिरेखांच्या जवळ जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे., गीतांजली कुलकर्णी यांची भूमिका लक्षवेधून घेते, इतर कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
हृषीकेश – सौरभ – जसराज यांचे संगीत ही सुद्धा जमेची बाजू आहे, आनंदीबाईंचा प्रवास दाखवणारे “रंग माळियेला”,नाचरे अवखळ “वाटा वाटा”, स्फूर्तिदायक “माझे माऊली” , शांत भासणारे “मम पाऊली” आणि शेवटी येणारे “तू आहेस ना” ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात.
एकंदरीत सांगायचे आजची स्मार्ट स्त्री विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करते. कुटुंब, पाल्यांची जडण-घडण करण्यात तिचा मोठा वाटा आहे. परंतु सुमारे १३० वर्षा पूर्वी स्त्री शिक्षण हा विचार करणे सुद्धा पाप मानले जायचे,अशा काळात गोपाळराव जोशी यांनी पत्नी आनंदीबाईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. या यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
चित्रपट – आनंदी गोपाळ
निर्मिती – . झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स
दिग्दर्शक – समीर विद्वांस
संगीत – हृषीकेश – सौरभ – जसराज
कलाकार – ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण
रेटिंग – ***
-भूपाल पंडित
पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने मोर्चा
पुणे- ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशन व पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे लष्कर भागात महात्मा गांधी रोडवरील गुरु वजीर भगत संघेलिया चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये मुस्लिम समाजामधील सिया पंथीय , मुस्लिम इराणी , मुस्लिम बलुची , तबलिक जमात बांधव व मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते .
या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवानी काळ्या फिती बांधल्या होत्या . तसेच , पाकिस्तान मुर्दाबाद ,दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या . इस्लाम धर्म कोणत्याही दहशतवादाला समर्थन करत नाही हे दाखविण्याकरिता समस्त मुस्लिम समाज दशतवादाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला . या हल्ल्यामधील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी मुस्लिम समाज मस्जिद मधून आर्थिक निधी गोळा करणार आहे . हा निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहेत , अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी दिली
या निषेध मोर्चामध्ये खासदार संजय काकडे ,इकबाल अन्सारी , जावेद खान , अमीन शेख , मुस्ताक अलबुशरा , माजी नगरसेवक मंजूर शेख ,बाप्पुसाहेब भोसले , भारत कांबळे , माजी नगरसेवक मंजूर शेख ,अमानुल्ला खान , मुस्ताक पटेल , हाजी उस्मान तांबोळी , अफसर कुरेशी , हाजी नदाफ , सादिक कुरेशी,वाहिद बियाबानी , अतिक रियाझ खान , रियाझ काझी , सालेम खान , आयमान दरबार ,मतीन मुजावर, अली इनामदार , रफीउद्दीन शेख , मुन्नावर कुरेशी , नईम शेख , शेर अली शेख , अबूशेठ तांबे , सय्यद मुनीर मिर्झा , रिझवान सय्यद , वस्ताद अफझल शेख , बशीर शेख , जावेद शेख , शाहरुख मिर्झा बेग ,फुरकान शेख , अझहर शेख , मुझफर शेख , अबिद शेख , मज्जू शेख , धनंजय उरुड व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते .
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून हल्ल्याचा निषेध करण्यात आला . पाकिस्तानविरोधात घोषणा देण्यात आल्या . या निषेध रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली .
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने शिवजयंती महोत्सव
मुख्यमंत्र्याची सभा ओझर येथे होणार-आमदार शरद सोनवणे
शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर – विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल होणार गौरव
ध्येयपूर्तीसाठी सातत्य, परिश्रम आवश्यक- शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी
सत्ताधाऱ्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी – पी.बी. सावंत
पुणे-देशातील सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. तर त्यांना मनुवादी हिंदू धर्माचे राज्य आणायचे असून या सरकारने केवळ भांडवलशाही मजबूत करायची कामे केली आहे. देशातील सर्वसामन्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. अशा शब्दात निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच सत्ताधारी राजवटीला राज्यघटना अमान्य असल्याचेही ते म्हणाले. मतदार जागृती परिषद आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते, तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले यावेळी उपस्थित होते. यावेळी पी.बी. सावंत म्हणाले, आगामी निवडणूक लक्षात घेता विरोधकांनी एकत्र येऊन आपत्ती दूर केली नाही. विरोधी पक्षांनी योग्य उमेदवार निवडावे. असे सांगत त्यांनी विरोधी एकजुटीला मत देण्याचे आवाहन केले.
लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतोय : श्रीपाल सबनीस
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आजअखेर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काहींनी बुडवले. शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर हे सरकार काहीही ठोस करताना दिसत नाही. मात्र न्यायव्यवस्था, सीबीआय यांच्या कामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार हस्तक्षेप असतो. या माध्यमातून लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतो. अशा शब्दात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मागील ७० वर्षात ज्या पक्षांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या. मात्र त्याहून सर्वाधिक घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात घडल्याचेही ते म्हणाले.
माफी नाहीच, बदला घेऊ; सीआरपीएफची गर्जना; मोदींचा इशारा..रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेऊ
श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार नाही, माफी नाहीच. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ. मोदी म्हणाले, अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ.अतिरेक्यांना संपवण्याचे ठिकाण, वेळ व स्वरूप ठरवण्याचे सर्वाधिकार आता लष्कराला देण्यात आले आहेत. सरकारने १९९६ मध्ये पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. यामुळे पाकिस्तानातून आयात वस्तूंवरील अबकारी शुल्क भारत वाढवू शकतो.
– गुरुवारी शहिदांची संख्या ४४ सांगण्यात आली होती. आता सीआरपीएफने स्पष्ट केले की, ४० जवान शहीद झाले आहेत.सूत्रांनुसार, घटनास्थळी दोन मृतदेह सापडले. एक बसचालकाचा असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
अतिरेकी हल्ल्याविरुद्ध २० राज्यांत निदर्शने, जम्मूतील बंददरम्यान हिंसाचार व तोडफोड, ६ भागांत संचारबंदी
जम्मूतील परिस्थिती तणावपूर्ण होती. बंद काळात निदर्शकांनी १२ वाहनांना आग लावली. अनेक गाड्या फोडल्या. शहरात संचारबंदी लागू केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विविध घटनांत पोलिसांसह आठ लोक जखमी झाले. रस्त्यांवर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले. त्यामुळे वैष्णोदेवीला जाणारे भाविक आणि पर्यटकांना अडचणी आल्या.काही काश्मिरी प्रवाशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीमुळे शहरांत तणाव होता.
अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्ससह २५ देशांच्या राजदूतांशी भेटून पाकिस्तानच्या नाकेबंदीस सुरुवात
गरज : लष्करी ताफ्याबरोबर इतर वाहने चालवण्यावर बंदी
– सुरक्षा दलांनी श्रीनगरमध्ये तपासणी कडक केली. अनेक ठिकाणी चौक्या लावल्या. पोलिसांनी या हल्ल्याच्या धाग्यादोऱ्यांबाबत स्थानिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
– शुक्रवारी खोऱ्यात सुरक्षा दलांच्या ताफ्याची वाहतूक बंद राहिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांसह सामान्य नागरिकांना वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली.
जबाबदारी : पाक वकिलातीपुढे निदर्शने, सीआरपीएफचा बंदोबस्त
– पुलवामा हल्ल्यानंतर देश संतप्त झाला आहे. शुक्रवारी दिल्लीसह अनेक शहरांत निदर्शने झाली. दिल्लीत अनेक संघटनांनी पाक वकिलातीसमोर निदर्शने केली. या वेळी निदर्शक संतप्त झाले होते. निदर्शकांची संख्या सातत्याने वाढत होती. या वेळी पाक वकिलातीसमोर केंद्रीय राखीव पोलिस दलाचेच (सीआरपीएफ) जवान बंदोबस्ताला होते. या जवानांनीच संतप्त निदर्शकांना पांगवले.
तपास : हल्ल्यात ८० किलो आरडीएक्सचा वापर झाला
– पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले. पाक नागरिक कामरानने हल्ल्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी गाझीचे नाव आले होते.
– एनआयएच्या तपासानुसार, स्फोटासाठी ६० ते ८० किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. गुरुवारी ३५० किलो आरडीएक्सची बाब समोर आली होती. अतिरेक्याने वाहन बसला धडकवले होते.
आडमुठेपणा : मसूद अझहरला अतिरेकी घोषित करण्यावरून चीनचा आडमुठेपणा कायम
– अतिरेकी मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहंमद या संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, चीन आता अझहरच्या बाजूने उभा राहिला आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता म्हणाला, अझहरला अतिरेकी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाप्रति चीनच्या भूमिकेत बदल होणार नाही. चीनचा आडमुठेपणा कायम आहे.
‘त्या’ चेकपोस्ट सुरू असत्या तर घटना घडली नसती..सीआरपीएफचे माजी अधिकारी राणा यांची खंत
नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय राज्य राखीव दलात १३ वर्षे उच्च पदावर जबाबदारी सांभाळलेले आणि तब्बल ३३ वर्षे विशेष सुरक्षा दलात शाैर्य गाजवलेले अॅड. दिलीपसिंग राणा यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
श्रीनगरपासून ते काझीगुंडपर्यंत पूर्वी अनेक चेकपोस्ट होत्या. त्यामुळे कोणीही तेथे संपूर्ण तपासणीशिवाय येणे शक्य होत नव्हते. काही वर्षांपूर्वी श्रीनगर येथील पंथ चौकाजवळ एका भरधाव वाहनाबाबत संशय आल्यानंतर चेक पोस्टवरील एका जवानाने टायरवर गोळी झाडून ती गाडी थांबवली होती. मात्र वाहनात स्थानिक नागरिक होते. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी गोळी झाडणाऱ्या जवानाविरुद्धच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याच संवेदनशील प्रकरणाची दखल घेत स्थानिक सरकारने या ठिकाणी असलेल्या सर्व चेक पोस्ट हटवल्या. या निर्णयास तेव्हाही तीव्र शब्दांत सैन्य दलाने विरोध केला होता. मात्र तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हापासून तेथे वाहनांची कसून तपासणी होत नाही. त्यामुळे पुलवामापर्यंत सहज वाहन घेऊन जात हल्ला करणे दहशतवाद्यांना सोपे गेले, असे राणा यांनी सांगितले.
स्थानिकांशी संपर्क महत्त्वाचा
आपल्या कार्यकाळातही असाच कट दहशतवाद्यांनी अनेकदा आखला. मात्र, श्रीनगरच्या रहिवाशांशी असलेल्या संबधांमुळे हल्ल्यापूर्वीच माहिती मिळून आम्ही सजग व्हायचो. त्यामुळे अनेक हल्ले होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असे. म्हणून जवानांनी स्थानिक लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायला हवेत, असे राणा म्हणाले.
नगरसेवक रवींद्र धंगेकरांसह तिघांची कोठडीत रवानगी
पुणे-महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात नगरसेवक रवींद्र धंगेकरसह तिघांना शुक्रवारी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी पी. डी. सावंत यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यासह तिघेजण पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. धंगेकर यांच्यासह मंदार हेमंत पुरोहित (वय २४), अमित मोहन देवकर (३८, दोघेही रा. कसबा पेठ) या तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही २३ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की होऊन त्यांच्या अंगावर चप्पल भिरकविण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींनी ही निविदा भरली होती का, गुन्ह्याचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. आरोपींचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. विपुल दुशिंग, अॅड. मनिष पाडेकर यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. धंगेकर गेली २० वर्षे नगरसेवक आहेत. भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून खोटी तक्रार करून धंगेकर यांना अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला.







