Home Blog Page 2930

डॉ. अभ्यंकर विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वावर छाप पडणारे शिक्षक -रामराजे नाईक निंबाळकर

पुणे : “आपण निवडलेल्या क्षेत्रात एकनिष्ठ राहून काम करणे महत्वाचे असते. सर्व गोष्टींचा समतोल राखत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम डॉ. अभ्यंकर यांनी केले आहे. निर्भीड, परखड आणि आकर्षक व्यक्तिमत्व असल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वावर त्यांची नेहमीच छाप पडली आहे. आजच्या पिढीला वळण आणि नीतिमूल्यांची शिकवण देण्याची गरज आहे. त्यासाठी डॉ. अभ्यंकर यांच्यासारखे शिक्षक असायला हवेत,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, विविध शिक्षण संस्थांमध्ये संचालक आणि प्रशासक असलेल्या प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांच्या वयाच्या एकाहत्तरीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, केके वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राजु इंडस्ट्रीजच्या संचालिका परिमल चौधरी, डॉ. अभ्यंकर यांच्या सौभाग्यवती चित्रलेखा अभ्यंकर, गौरव समितीचे डॉ. सुरेश माळी, डॉ. विक्रम पाटील, बापूसाहेब सूर्यवंशी यांच्यासह शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. अभ्यंकरांनी लिहिलेल्या ‘अभियांत्रिकीचा शिक्षक का आणि कसा?’ या पुस्तकाचे व ‘हेमंतरंग’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मीदेखील काहीकाळ प्राध्यापकी केली. वकिली केली. आता राजकारणात आहे. पण आपण जिथे काम करतो, तिथे प्रामाणिकपणे शंभर टक्के योगदान देण्याची आपली भावना असली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात डॉ. अभ्यंकर यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक संस्थांची घडी बसविण्यात त्यांचा पुढाकार असतो. चांगले विद्यार्थी घडायचे असतील, तर चांगले शिक्षक हवेत. त्यासाठी डॉ. अभ्यंकरांनी पुस्तक लिहून मोहीम सुरु केली आहे. आमच्या फलटणच्या कॉलेजातही त्यांना घेऊन जाणार असून, आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळायला हवे. त्यांची पंच्याहत्तरी आमच्या राजेशाही पद्धतीने साजरी करण्याची संधी अभ्यंकरांनी द्यावी.”

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा सत्कार करताना मला आनंद होतो आहे. शिक्षकाच्या हस्ते शिक्षकाचा सत्कार हे केवळ पुण्यातच शक्य आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्राणवायू असतो, हे डॉ. अभ्यंकरांनी सिद्ध केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ अभियांत्रिकी शिक्षकांपर्यंतच मर्यादित नाही. प्रत्येक शिक्षक, प्राध्यापकांसाठी हे पुस्तक आहे. प्राध्यापक कसा असावा त्याच्या बदलाच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी या पुस्तकांत मांडल्या आहेत. आयुष्यात प्राध्यापक होताना या छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. उत्तम शिक्षक घडवणे हे अभ्यंकरांचे स्वप्न आहे.”

डॉ. दीपक टिळक म्हणाले, “ज्या शिक्षकाने आपल्या जीवनात चांगले ७५ शिक्षक बनवले तो शिक्षक या जगात सगळ्यात उत्तम शिक्षक असतो. ते काम अभ्यंकर सरांनी करून दाखवले आहे. शिक्षकांचेही मार्गदर्शक असलेल्या अभ्यंकरांनी आपल्या पुस्तकात व्यक्तिगत आणि कौशल्य अशी विभागणी केली आहे. शिक्षकाने कसे असावे, काय करावे व करू नये, स्त्री-पुरुष समानता, जेष्ठ व लहानांनी कसे वागावे, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर भर दिला आहे. पण आयुष्यात ही खूप मोठी शिकवण आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी धडपड करा, तुमचा उत्कर्ष आपोआप होईल, असा संदेश त्यांनी दिला आहे.”

बाळासाहेब वाघ म्हणाले, “एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदहारण अभ्यंकर सर आहेत. शिक्षकांबद्दल स्पष्ट मत मांडण्याचे आणि लिहिण्याचे धाडस त्यांनी केले आहे. शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपायोग होईल. माझ्या अडचणीच्या काळात अभ्यंकरांनी मला खुप मदत केली. एक उत्कृष्ट सल्लागार त्यांच्या रूपाने मला मिळाला आहे.”

परिमल चौधरी यांनी आकाशवाणीमुळे डॉ. अभ्यंकरांची ओळख झाल्याचे सांगून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही घडविणारा शिक्षक मला त्यांच्यात दिसला. शिक्षकांसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी आपण मदत करायची हे ठरवले. शिक्षकांनाही इंडस्ट्रीज ट्रेनींग महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “माझे स्नेही, मित्रपरिवार, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्याकडून झालेल्या या सत्कारामुळे भारावलो आहे. आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा आजच्या या सोहळ्याने दिली आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठीचे हे पुस्तक मुद्दाम मराठीत लिहिली आहे. आजवर ७५ शिक्षकांना घडवले आहे. अजून २५ शिक्षक घडविण्याचा माझा मानस आहे. चांगले शिक्षक घडण्यासाठी नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनत या गोष्टी आवश्यक आहेत. देशातील भ्रष्टाचार कमी व्हायचा असेल, तर चांगले शिक्षक निर्माण झाले पाहिजेत.”
यावेळी स्वागत गीत स्वरदा कुलकर्णी यांनी गेले, स्वागत डॉ. सुरेश माळी, प्रास्ताविक प्रा. डॉ. विक्रम पाटील यांनी केले. आभार बापूसाहेब सूर्यवंशी यांनी मानले. आशुतोष कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले.

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ च्या ‘मेगा जॉब फेअर ‘ मध्ये ५० कंपन्यांचा सहभाग

पुणे :
  ‘भारती अभिमत  विद्यापीठ ‘च्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये  शनिवारी,२५ मे २०१९ रोजी  ‘मेगा जॉब फेअर ‘  चे आयोजन करण्यात आले होते . ‘एपीजी लर्निंग्स ‘ च्या सहकार्यांने सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत  झालेल्या  या मेगा जॉब फेअर मध्ये ५० कंपन्या १२०० जॉबसंधी घेऊन सहभागी झाल्या .
‘ सिमेंटेक’ कंपनीच्या मनुष्य बळ विकास विभागाचे प्रमुख सुधांशू पंडित यांनी उद्घाटन केले . ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’  चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर अध्यक्ष स्थानी होते. हा कार्यक्रम आयएमईडी ‘च्या पौड रस्ता कॅम्पस मध्ये झाला.
 बँकिंग ,एचआर ,मॅन्युफॅकचरिंग ,आय टी ,बीपीओ ,सेल्स ,मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचा या मेगा फेअर मध्ये सहभाग होता. युवक -युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .

शेतक-यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

पुणे  दि. 25 :     कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतक-यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार भिमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहगडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व पंचायत समिती सदस्या निर्मलाताई काळोखे, सुवर्णाताई शिंदे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.जी पलघडमल, कृषी अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकात भोर इ. मान्यवर उपस्थित होते.

            या बैठकीमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांनी जिल्ह्यातील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम 2018-19 सर्वसाधारण क्षेत्र व प्रेरणी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता खरीप हंगाम 2019 साठी बियाणे व रासायनिक खते नियोजन कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, खरीप रब्बी सन 2018-19 पीक कर्जवाटपाबाबतची माहिती, सन 2019-20 चे कर्जवाटपाचे नियोजन, शेती पंपांना वीजपुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना इ. कृषी विषयक योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांची तातडीने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

            यावेळी बोलताना  शिवतारे यांनी कृषी विभागामार्फत जे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे त्याची नियोजनानुसार अमंलबजावणी करावी, सध्या बियाणांची व खतांची उपलब्धता असून शेतक-यांच्या वीजजोडणी व इतर योजनांकरीता निधीची आवश्यकता असल्यास जिल्हाधिका-यांमार्फत शासनास प्रस्ताव सादर करावा. या निधीकरीता राज्यस्तरीय बैठकीत मा. मुख्यमंत्री यांचेकडून मंजूरी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल, तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनुदानीत चारा छावण्यांमध्ये शेतक-यांची जनावरे घेण्याकरीता नाकारल्यास अशा शेतक-यांच्या तक्रारीवरून संबंधित संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच शेततळी प्लास्टीक पेपर चारा छावण्याबाबत तसेच नवीन विंधन विहीरींबाबतचे धोरण याविषयी आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यामध्ये चारा छावण्यांचे नऊ प्रस्तावांपैकी चार ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. तसेच नवीन प्रस्तावांना 24 तासात मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.

            यावेळी  दि. 25 मे ते 8 जून 2019 या कालावधीत रोहीणी नक्षत्राच्या मुहूर्तावर उन्नत शेती-समृध्द शेतकरी अभियान पंधरवडामध्ये कृषि विषयक योजनांची गावोगाव जनजागृती व प्रचार प्रसिध्दी मोहिमेचा शुभांरभ करण्यात आला. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. आभार कृषि विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी मानले

शपथविधी सोहळ्यावेळी प्रीतीभोजन शाकाहारी ठेवावे

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाकाहार पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश अभिनंदनीय आहे. येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करतील. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते, सन्माननीय व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सर्वांसाठी शाही प्रीतीभोजनही आयोजिले जाईल. या शाही भोजनात शुद्ध शाकाहारी पदार्थ असावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे स्वतः शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे या शाही प्रीतीभोजनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जगभर शाकाहाराचा संदेश पोहोचावा,” असे आवाहन शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “शाकाहार आणि अहिंसा भारतीय संस्कृती व परंपरेचा वारसा आहे. भारतातील विविध भागात अनेक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या येथील स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला द्यायला हवी. महत्वाची बाब म्हणजे जर्मनी सरकारने सगळ्या शासकीय समारंभात शाकाहारी भोजन अनिवार्य केले आहे. त्यांच्या पर्यावरण मंत्री बार्बरा हैड्रिक्स यांनी फेब्रुवारी महिन्यात हा निर्णय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण हानी याला मांसाहार कारणीभूत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शाकाहाराचा पुरस्कार करावा. तसेच आपल्या देशात असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर, मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी.”

या मागणीचे निवेदन डॉ. गंगवाल यांनी ईमेलद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठवले आहे

आयुर्वेदाला परदेशात मोठ्या संधी उपलब्ध -डॉ. कुशाग्र बेंडाळे

पुणे : “औषधविरहित (मेडिसिन लेस) उपचारांना परदेशात मोठी मागणी आहे. अशी उपचारपद्धती केवळ आयुर्वेद देऊ शकते. त्यामुळे जगभर आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सल्ला व मार्गदर्शन, पंचकर्म, संशोधन आदी गोष्टींचा समावेश आहे. परदेशात योग आणि आयुर्वेदाला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला तेथे या क्षेत्रात काम करण्यासाठी मोठा वाव आहे,” असे मत ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रॅक्टिशनर डॉ. कुशाग्र बेंडाळे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील केशायुर्वेद या पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित ‘आयुर्वेदाला असलेल्या परदेशातील संधी’ या विषयावरील एकदिवसीय सेमिनारमध्ये डॉ. बेंडाळे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील मेरिडियन प्लाझा येथे झालेल्या या सेमिनारवेळी केशायुर्वेदचे प्रमुख डॉ. हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. डॉ. बेंडाळे गेल्या ९ वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करीत आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी मान्यताप्राप्त केशायुर्वेदची शाखाही सुरु केली.
डॉ. कुशाग्र बेंडाळे म्हणाले, “बाहेरच्या देशात आपण आयुर्वेद पोहचवू शकतो, ही जिद्द आणि विश्वास आपल्याला पुढे नेते. आपल्या शास्त्राबदल बाहेरचे लोक येऊन सांगतात, ‘ते खूप छान आहे’. मग हे आपण त्यांच्यापर्यंत का पोहचू नये. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार तेथे करण्याची गरज आहे. लवकरच १० ते १५ मूला-मुलींचा एक गट ऑस्ट्रेलियात घेऊन जाणार असून, ते आपापल्या क्षेत्राप्रमाणे तिथे काही दिवस काम करतील. विदेशात काम करताना काय अडचणी येतील, याचा अंदाज त्यांना येईल.”

डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “फक्त भारतातील आयुर्वेदाचे ज्ञान मिळवण्याची जिद्द ठेवाच. त्याचबरोबर विदेशातही जाऊन तेथील त्यांचे आयुर्वेदाचे नवनवीन पद्धती जाणून घेणेही महत्वाचे आहे. आपण नाश पाऊ शकतो, पण आयुर्वेद नाही. म्हणून आपल्यानंतर आपल्या मागे आयुर्वेद राहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी विदेशात जाण्याचे ध्येय ठेवा. जिद्द, इच्छाशक्ती आणि प्रयत्न असेल, तर तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतात.”

पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…!

पुणे, दि.२५ मे :विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या सहाव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका व आदिवासी मुला – मुलींसाठी कार्य करणार्‍या श्रीमती निर्मला (देवकी) नवल सोनीस (नंदुरबार), ज्येष्ठ कीतर्नकार व प्रवचनकार ह.भ.प. सौ. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी (बीड), आरोग्य सेवा देणार्‍या डॉ.शशिकला अनंत सांगळे (पुणे), ज्येष्ठ समाजसेविका  डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन (पुणे) आणि आदिवासी गरीब कुटुंबाची पालन पोषणाची सेवा करणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सौ. मधुरा मुकुंद भेलके (पुणे) या पंचकन्यांना “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आदिवासी मुलांसाठी आश्रामशाळा चालविणार्‍या व ज्येष्ठ समाजसेविका सौ. सुशिला रतनलाल सोनग्रा (पुणे) यांना “विशेष जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. ११,०००/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दि. ३१ मे २०१९ रोजी, सकाळी  १०.१५ वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.
या समारंभासाठी लातूरचे माजी खासदार मा.डॉ. गोपाळराव पाटील हे सन्माननीय प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कृषीतज्ञ मा.डॉ. शिवाजीराव शिंदे आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व नाशिक येथील नवसंजीवनी वर्ल्ड पीस रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी विश्‍वस्त मा.श्री. सुभाषराव देशमुख हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.
पुरस्कारार्थींचा अल्प परिचय खालीलप्रमाणे-

श्रीमती निर्मला (देवकी) नवल सोनीस (नंदुरबार)ः या ज्येष्ठ समाजसेविका असून नंदुरबार येथील आदिवासी मुला- मुलींची लग्ने लावून देणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी फी माफ करणे, आदिवासी भागात निःशुल्क शिक्षण देणे, गरीब विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तके वाटणे ही सेवा करतात. तसेच, खेडोपाडी जाऊन कुटुंब नियोजनाची माहिती देऊन समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. आदिवासी क्षेत्रातील मुलांसाठी करीत असलेल्या बहुमूल्य कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थाकडून गौरव करण्यात आला आहे.
ह.भ.प. सौ. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी (बीड)ः या मराठवाड्यातील पहिल्या महिला कीर्तनकार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रात ५००० पेक्षा अधिक कीर्तने करून त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले आहे. महिला सक्षमीकरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्त्रीभ्रुण हत्या हे पाप आहे, स्वच्छतेचा संदेश, महिला बचत गट आदी सामाजिक मूल्यांचा कीर्तनातून प्रचार करीत आहेत. तसेच साक्षरता अभियान अंतर्गत प्रचार कीर्तने करतात.
डॉ.शशिकला अनंत सांगळे (पुणे)ः बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसन विभागाच्या त्या विभाग प्रमुख आहेत. नोकरी करून सरकारी आरोग्याच्या सर्व सेवा गरीबांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्या करीत आहेत. तसेच, आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सेवा देत आहेत. स्वाईन फ्लू सारखा संसर्ग रोगाच्या वेळेस त्यांनी राज्यात प्रमुख भूमिका पार पाडली.
डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन (पुणे)ः एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी सनवर्ल्ड फॉर सिनियर्स या वृध्दाश्रमाची स्थापना करून जवळपास ४० ज्येष्ठांची त्या सेवा करीत आहेत. वृध्दांना भेडसावणार्‍या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना संजीवन मंत्र देऊन कृतिशील जगण्याचे बळ देण्याचे कार्य करीत आहेत. १९८३मध्ये एक दशलक्ष चौरस फूट जमीन दान करून शिक्षणाच्या माध्यमाद्वारे समाजहिताचे कार्य चालू ठेवले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना बर्‍याच संस्थेतर्फे पुरस्कृत करण्यात आले.
सौ. मधुरा मुकुंद भेलके (पुणे)ःयांनी आदिवासी गरीब कुटूंबाची पालन पोषण व शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. तसेच, रामकृष्ण मठाद्वारे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक्स-रे सारख्या आधुनिक आरोग्य सुविधा देण्याचे कार्य करीत आहेत. क्षितिज संस्था मार्फत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग चालवितात. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. ग्रामस्थांसाठी नेत्र शिबीर व आरोग्य शिबीर चालवितात.
सौ. सुशिला रतनलाल सोनग्रा(पुणे)ः यांचा जन्म मध्यप्रदेश येथील खंडवामध्ये गरीब कुटुंबात झाला. बालवयातच लग्न झाल्यामुळे शिक्षण बंद झाले. अचानक पतीचे निधन झाल्यामुळे घरचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी जुन्या कपड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातच भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळी मदर टेरेसाचे कार्य पाहण्याचा योग आला. त्यांनी सुरू केलेल्या आदिवासी आश्रमशाळेत १५० मुलांना मोफत शिक्षण देत आहेत.

पाणवठ्यांच्या उभारणीत ‘जीआयएस’ महत्वपूर्ण -प्रा. सागर कोळेकर

 

पुणे : “कोणत्याही भागात पाझर तलाव, शेततळे किंवा माध्यम स्वरूपाचे बंधारे उभारण्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात ‘जीआयएस’ महत्वपूर्ण ठरते. ‘जीआयएस’च्या मदतीने योग्य पाण्याचे केंद्र शोधण्यात मदत होते,” असे मत भौगलिक माहिती प्रणालीचे अभ्यासक प्रा. सागर कोळेकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजिलेल्या वैज्ञानिक कट्ट्यावर भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) वापर व जल संरक्षण या विषयावर प्रा. कोळेकर बोलत होते. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे झालेल्या या कट्टयावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र., प्रा. राजेंद्रकुमार सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.
 
प्रा. सागर कोळेकर म्हणाले, “उपग्रहावरून त्या परिसराचा अभ्यास करण्यासाठी परिसराचा फोटो, एकंदरीत नकाशा मिळवून त्या परिसरात कोणत्या प्रकारची माती उपलब्ध आहे, हे पाहणे. त्याठिकाणी पावसाचे प्रमाण किती, पाणी झिरपते कि वाहून जाते, याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार पाणवठे तयार केले, तर अधिक चांगला परिणाम मिळतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे पाणी अडवण्यासाठी काम करत असतो, तेव्हा या गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे. दिसली जागा बांधला ओढा शेततळे असे होत नाही त्या परिसराचा जागेचा अभ्यास करणे हि महत्वाचे आहे. आजही आपण इग्रजांच्या काळात त्यांनी तयार केलेले टोपोशीट वापरून त्या त्या जागेचा अभ्यास करू शकतो. त्या काळात इग्रजांनी बनवलेले टोपोशीट अगदी आजही योग्य तसेच आहेत.”
प्रा. विनय र. र. यांनी आभार मानले. प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रस्तावना केली.

दानशूर माहेश्वरी समाजाने राष्ट्रविकासात योगदान द्यावे -रामेश्वरलाल काबरा

पुणे : “समाजात दोनच जाती असल्या पाहिजेत. एक गरीब आणि दुसरी गरिबाला मदत करणारी. माहेश्वरी समाज दानशूर आहे. समाजातील गरजू, गरीब व होतकरूना सर्व प्रकारची मदत करण्यात माहेश्वरी समाजातील अनेकजण कायम पुढे येतात. मुकुंददास लोहिया यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. माहेश्वरी समाज दानशूर असून, समाजाने राष्ट्राच्या विकासातही मोठा वाटा द्यायला हवा,” असे प्रतिपादन उद्योगपती आणि समाजसेवक पद्मश्री रामेश्वरलाल काबरा यांनी केले.
माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन व महेश सांस्कृतिक भवन संचालित उभारण्यात येत असलेल्या मुकुंददासजी लोहिया सॅनिटोरियम व अतिथी भवनाचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभावेळी रामेश्वरलाल काबरा बोलत होते. अप्पर इंदिरानगर येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या समारंभावेळी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती शामसुंदर सोनी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, राजेंद्र भट्टड, हरीभाऊ भुतडा, शामसुंदर कलंत्री, मदनलाल भुतडा, संतोष लड्डा, अशोक राठी, दिलीप धूत, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, रामविलास तापडिया आदी उपस्थित होते.
यावेळी अतिथी भवनाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या पुरुषोत्तम लोहिया, पुष्पलता झंवर, धनराज राठी यांच्यासह इतर देणगीरांचा सत्कार करण्यात आला. मुकुंदनगर येथील टिमवि कॉलनीमध्ये सॅनिटोरियम व अतिथीभवन आणि बहुद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी, व्यक्तिगत कामांसाठी येणाऱ्या समाजबांधवांना राहण्याची सोय व्हावी, याची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये २१ सॅनिटोरियम, २१ अतिथी कक्ष, अल्प दारात भोजनव्यवस्था, वातानुकूलित हॉल, प्रशस्त पार्किंग अशी नऊ मजली इमारत उभारण्यात येत आहे.
रामेश्वरलाल काबरा म्हणाले, “समाजाने केवळ आपल्यापुरते मर्यादित राहू नये. देशातील इतर समाजातील अनेक लोकांना मदतीची गरज आहे. समाजातील एकही मुलगा-मुलगी पदव्यूत्तर पेक्षा कमी शिकणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीमध्ये दातृत्वाचे संस्कार देणे महत्वाचे आहे. आपला माहेश्वरी समाज संस्कार, अर्थार्जन, संघटन, शिक्षण या सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहे. त्यामुळे समाजासाठी योगदान देताना आपण आपल्या स्वतःसाठी काम करत आहोत, ही भावना ठेवली पाहिजे. चांगल्या कामांसाठी पैसे कधीही कमी पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे भवन वेगवेगळ्या भागात व्हावीत.”
शामसुंदर सोनी म्हणाले, “पुण्यात शिक्षण, आरोग्य व उद्योग यांसारख्या कामांसाठी अनेक समाजबांधव येत असतात. त्यांच्या सोयीसाठी हे अतिथीभवन उपयुक्त ठरेल. दानशूरांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या वास्तू ऐतिहासिक ठरतात. त्यामुळे पुण्याच्या चारही बाजूने अशी अतिथीभवन व्हावीत. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनने समाजाच्या कार्याला दिशा देण्याचे काम केले आहे.”
मधुसूदन गांधी म्हणाले, “पुणे शहर हे दूरदृष्टी असलेल्या लोकांचे आहे. पुण्यातून अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक कामांचा शुभारंभ होतो आणि त्याची देशभर दखल घेऊन इतर ठिकाणी तशी कामे होतात. समाजातील अनेक दानशूर लोक पुढे आले, तर अशा प्रकारची सामाजिक भवने इतर ठिकाणीही उभारता येतील. पुण्यातील समाजाने यासाठी पुढाकार घेतला आहे.”
पुरुषोत्तम लोहिया यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या अतिथी भवनाच्या उभारणीत योगदान दिले असून, त्याचे समाधान शब्दांपलीकडील आहे, अशी भावना व्यक्त केली. अशोक राठी यांनी प्रास्ताविक करत फाउंडेशनच्या कामाचा आढावा घेतला. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. संजय चांडक यांनी आभार मानले.

डाँ.अमोल कोल्हे शिवनेरीवर

जुन्नर / आनंद कांबळे
शिरुर लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मातेची पूजा केली तसेच शिवकुंज येथील बालशिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले , शिवजन्मभूमीला नतमस्तक झाले.
शिवनेरी किल्ल्यावर विजयानंतर नतमस्तक होणारा पहिलाच खासदार म्हणून डाँ.अमोल कोल्हे  ठरले आहेत. कोल्हे हे खरे मावळे आहेत अशी भावना शिवप्रेमी जनतेत निर्माण झाली आहे.
शिरुर मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार आहोत. शिवमहोत्सव सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शंभू स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यास प्राधान्य दिले.
यावेळी युवा नेते अतुल बेनके , दिनेश दुबे,भाऊ कुंभार ,पापाशेठ खोत,सुनिल ढोबळे  आदि मान्यवर त्यांच्या सोबत होते.

‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’ ला राष्ट्रीय सर्वेक्षणात १३ वे मानांकन

पुणे :

 ‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ (पुणे ) ला राष्ट्रीय सर्वेक्षणात  १३ वे मानांकन मिळाले आहे .  ‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ (पुणे ) चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . दिल्लीतील ‘मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएट्स’ आणि ‘इंडिया टुडे ‘या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या १२०७ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात हे मानांकन मिळाले आहे .खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या श्रेणीत हे मानांकन मिळाले आहे .  भारताच्या पश्चिम  विभागात या महाविद्यालयाला तिसरे स्थान मिळाले आहे .

‘शैक्षणिक गुणवत्ता ,पायाभूत सुविधा ,रोजगार संधी ,व्यक्तिमत्व आणि  नेतृत्व विकसन अशा अनेक मुद्द्यांवर हे सर्वेक्षण देशभर झाले . नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ असा या सर्वेक्षणाचा कालावधी होता .

‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ ने गुणवत्ता विकसनाची  आणि प्रशासनाची विविध पातळ्यांवर प्रभावी आणि अभिनव कार्य पद्धती  निर्माण केली आहे. उत्तम पायाभूत सुविधा ,तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि भविष्यवेधी समुपदेशन याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हे मानांकन प्राप्त झाले ,’ असे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी सांगितले .

मासे आणण्यासाठी गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाले -होडी उलटून दुर्घटना

एन.डी. आर. एफ पथकाकडून शोध
जुन्नर /आनंद कांबळे
केवाडी येथेधरणातून  मासे  आणण्यासाठी  गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाल्याची घटना घडली आहे, सकाळी साडेसातच्या सुमारास होडी उलटून ही दुर्घटना घडली.स्थानिक तरूण आणि पोलीसांकडून शोघकार्य करण्यात आले परंतू त्याला यश न मिळाल्याने एन.डी.आर.एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले .
दोन बोटी आणि आठ जवानांनी बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह दुपारनंतर शोधून काढले.अधिक माहीतीनुसार पाच परप्रांतीय मच्छीमार त्यांची होडी घेऊन मासेमारीसाठी निघाले होते. त्यावेळी केवाडीच्या आसपासच्या गावात राहणारे तीन तरूण तेथे आले .त्यांनी मासे आणण्यासाठी  होडीत बसण्याची  विनंती त्यांना करत ते होडीत बसले. मात्र ही होडी  काही अंतरावर गेल्यानंतर उलटली. त्यात गणेश भाऊ साबळे(वय२२),स्वप्नील बाळू साबळे(वय २२) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे ( वय २५)हे पाण्यात पडून बुडाले. इतरांनी पोहून किनारा गाठल्याने ते वाचले.

निर्भेळ यशाबद्दल खासदार काकडेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

पुणे, बारामती, शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाविषयी
मुख्यमंत्री फडणवीस व खासदार काकडे यांच्यात सविस्तर चर्चा

पुणे-: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा संपूर्ण देशभरात सुपडासाफ झाला आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल 352 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकून भाजपा व शिवसेना महायुतीने मोठा विजय संपादित केला. महाराष्ट्रातील या विजयात मोदी यांच्या करिश्म्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनपूर्वक कामाचा सिंहाचा वाटा आहे. देशात व राज्यात मिळालेल्या निर्भेळ यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी दोघांमध्ये पुणे, बारामती, शिरुर व मावळ या चार लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या मतदानाबद्दल सविस्तर चर्चादेखील झाली.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार लोकसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाबद्दल दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. चार लोकसभा मतदार संघातील एकूण 24 विधानसभा मतदार संघापैकी 15 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे तर, 9 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना कमी मतदान झाले. यामध्ये पुणे शहर लोकसभेतील वडगावशेरी, शिवाजीनगर, कसबा, कोथरुड, पर्वती व पुणे कॅन्टोन्मेंट या सहाही मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असून, बारामतीमधील खडकवासला व दौंड आणि शिरुर लोकसभेतील भोसरी व हडपसर विधानसभामध्ये महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण व पनवेल या पाच विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले असून कर्जत विधानसभेमध्ये कमी मते मिळाली आहेत. बारामती लोकसभेतील बारामती, इंदापूर, पुरंदर व भोर विधानसभा आणि शिरुर लोकसभेतील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर विधानसभेत महायुतीला कमी मतदान झाले आहे. या सर्व मतदार संघातील आकडेवारीसह आणि त्याठिकाणी कराव्या लागणाऱ्या कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस व खासदार काकडे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही जालना लोकसभेतील विजयाबद्दल खासदार काकडे यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती करण्यापासून ते उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचे नियोजन करण्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी प्रत्येक मतदार संघाबाबतीत सुक्ष्म नियोजन केले आणि त्यामुळेच कधी काळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चितच करिश्मा आहे. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारने केलेल्या कामाला व निवडणूक काळात केलेल्या प्रचाराच्या नियोजनाला नजरेआड करता येणार नसल्याचे खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

सुरतमधील इमारतीत भीषण आग, जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

सुरत: येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्पलेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. ३५ जण अडकल्याची माहिती आहे. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. तक्षशीला कॉम्पलेक्स हे एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र एसी डक्ट्स आणि कॉम्प्रेसर्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नव्या सरकार कडून बांधकाम व्यावसायिकांच्या पहा काय आहेत अपेक्षा

0

शांतीलाल कटारिया उपाध्यक्ष क्रेडाई नैशनल 

स्थिर सरकार राहिल्याने होणारा फायदा बांधकाम क्षेत्रासही होईल. घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीने मोदी सरकारने गेल्या तीन ते चार वर्षात अत्यंत प्रभावी निर्णय घेतले याचा फायदा अनेक मध्यमवर्गीयांनाही होत आहेत . या निर्णयांचा विचार करता, बांधकाम क्षेत्राची  उलाढाल वृध्दींगत होण्यास व्हावा अशी आशा आहे. कोणत्याही क्षेत्रात स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे असते. बांधकाम क्षेत्रापुरते सांगायचे झाल्यास, ग्राहकांचे व विकसकांचे अनेक निर्णय हे बाजारातले स्थैर्य या गोष्टींवर अवलंबून आहेत. बांधकाम क्षेत्रात सध्या आशेचे वातावरण असून बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुंतवणूक दारांसाठीही आता चांगले दिवस आले आहेत.

पायाभूत सुविधांवर सध्याचा सरकारचा भर असल्याने  आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, राज्यातील मेट्रो प्रकल्प, एकूणच देशभरात कार्यान्वित असलेले विविध विकास प्रकल्पांचाही फायदा बांधकाम क्षेत्राच्या भरारी होईल असे वाटते. नवीन सरकार कडून बांधकाम क्षेत्राला असणाऱ्या अपेक्षांचे सादरीकरण आम्ही प्रधानमंत्री कार्यालयात सादर केले असून त्यावरही सकारात्मक निर्णय होतील अशी क्रेडाईची अपेक्षा आहे.


राजीव परीख अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र 

बांधकाम उद्योगात सुलभता येण्यासाठी पर्यावरण, शहर नियोजन, एनए परवानगी यात बदल करणे अपेक्षित आहे. जलद आणि ऑनलाइन प्रकल्प मंजुरी, कर संरचना सुधारणा यावर आगामी सरकारने भर द्यावा.  परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे येत्या काळात आवश्यक आहे. पायाभूत सुविधा बरोबरच शहर सुधारणेसाठी रस्ते, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मुबलक पाणी पुरवठा करण्यावर भर द्यायला हवा. एकूणच वेगवान विकासासाठी व बांधकाम व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब आगामी सरकारने करावा असे वाटते.

————————–

 अतुल गोयल व्यवस्थापकीय संचालक  गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि

विजयाने आत्मविश्वास वाढतो. आणि सकारात्मकतेची उत्पत्ती होते. म्हणूनच हा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नवीन सरकारला निधीची उपलब्धता सुनिश्चित करून बाजाराची उन्नती करण्याकडे भर द्यावा.  या सरकारची धोरणे  विकासात्मक असली तरी पण खाजगी उद्योगाद्वारे रोजगार तयार करणे हे मोठे आव्हान या सरकारपुढे असेल. यासाठी ठोस निधीची पूर्तता करावी लागेल. २०२० पर्यंत आम्ही  बाजारात मोठ्या वाढीची आम्ही अपेक्षा करतो.

प्रियांका कुदळे आणि उमेश कचरे यांचा सत्यशोधक विवाह संपन्न

0
सातारा- फुले शाहू आंबेडकरएज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 21मे2019 रोजी दुपारी 1 वाजता वावरहिरे , महादेवदरा येथे सत्यशोधक उमेश कचरे आणि सत्यशोधिका प्रियांका कुदळे यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ श्रीरंग ढोक यांनी स्वतः जमवून महात्मा फुले यांचे वेशभूषेत मोफत लावला.
या विवाह प्रसंगी ढोक यांनीसत्यशोधक विवाह का, कसे,आणि कसा करावा या विषयी मौलिक माहिती देऊन सद्या भयानक दुष्काळ असताना अक्षता म्हणून तांदळाची नासाडी सर्वत्र करतो आहोत हे चुकीचे असून ही प्रथा पूर्ण बंद करून अक्षता म्हणून फुले वापरावेत असे आवाहन केले.,फुले वापरल्याने लोकांना रोजगार मिळेल .पुढे असे देखील म्हणाले की पालकांनी आपल्या वधु वरांचे सामुहिक सत्यशोधक विवाहसोहळ्या मध्ये सहभाग घेऊन नाहक खर्च वाचविला पाहिजे.क्षणिक डी. जे.ऑर्केस्ट्रा व इतर खर्च वाचवून तो पैसा आपल्या संसाराला उपयोगी पडेल याकडे पहावे. दुसर्याने मोठा खर्च केला म्हणून आपण कर्जबाजारी होऊ नये असे म्हंटले.
या वेळी आकाश ढोक यांनी वावरहिरे पंचक्रोशीत सावतानगर येथे सर्व समाजातील वधु वर यांचे साठी आधुनिक सोयी सुविधा सह मोफत बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र चालू केले असून गरजवंतानी लाभ घ्यावा व इतरांना माहिती द्यावी असे आवाहन केले.
यावेळी या सत्यशोधक विवाहात कचरे कुटुंबाने अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरल्या त्या बद्दल त्यांचे सरपंच चंद्रकांत वाघ ,पोलीस निरीक्षक नवनाथ कुदळे व अनेकांनी अभिनंदन केले.
सत्यशोधक विवाहाला सुरवात करताना वर उमेश कचरे यांचे शुभहस्ते थोरसमानसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि वधु प्रियांका कुदळे हिच्या हस्ते भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी महात्मा फुले रचित मंगलाष्टक सामजिक कार्यकर्ते बाजीराव वाघ आणि सुरेश बोराटे यांनी गाऊन चांगले वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी वधु वर यांना रघुनाथ ढोक आणि सौ आशा ढोक यांचे हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.या विवाहासाठी वावरहिरे व वालचंदनगर पंचक्रोशीतील तसेच पुणे, मुंबई परिसरातील सर्व समाज आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वी करणेकरिता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे सौ आशा ढोक,आकाश-क्षितिज ढोक ,अशोक राऊत ,सौ.कोमल ढोपे यांनी सहकार्य केले.