Home Blog Page 2899

गुरुपौर्णिमेनिमित्त उद्गारतर्फे ‘ अर्पण ‘ मैफलीचे आयोजन

पुणे : गुरू पंडिता रोहिणीताई भाटे यांच्या कथक कलेचा वारसा ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये नि:स्वार्थ भावनेने पुढे नेत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची  दखल घेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्गार संस्थेने येत्या गुरुवारी (दि.११)  ‘ अर्पण ‘  या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोथरुड येथील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.
‘ अर्पण ‘ कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहिणी ताई व नीलिमा ताईंना नृत्यरुपी गुरुदक्षिणा अर्पण करण्याच्या उद्गारच्या संचालिका आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांचा मानस आहे. या कार्यक्रमात पंजाब घराण्याचे विख्यात तबलावादक पंडित योगेश शम्सी यांचे सुश्राव्य तबलावादन अनुभवण्याची संधी देखील रसिकांना लाभणार आहे.
कथक नर्तिका गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांनी कथक परंपरेला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. हा वसा निरपेक्ष भावनेने, कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय गेली कित्येक वर्षे नीलिमाताई अध्ये नेटाने पार पाडत आहेत.  त्यांच्या या निरलस कार्याची दखल घेतली जावी, हा देखील या मैफलीचा हेतू आहे.

माझ्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार – आशा बुचके

निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर जुन्नर विधानसभा निवडणूक लढविणारच – आशा बुचके
जुन्नर /आनंद कांबळे -निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारच अशी घोषणा जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी नारायणगाव येथे केली.
माझ्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोपही बुचके यांनी यावेळी केला.
येथील जयहिंद मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आशा बुचके बोलत होत्या.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी बहाल केली जाते. मात्र पक्ष संघटनेसाठी अहोरात्र वीस वर्षे झिजणाऱ्या महिलेची हकालपट्टी केली जाते. पक्षसंघटना वाढविली, पक्षाकडे उमेदवारी मागितली हा माझा गुन्हा झाला आहे का, असा प्रश्न आशा बुचके यांनी यावेळी केला.
 एकनिष्ठ व कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या बुचके यांची शिवसेना पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना त्यांना भावना अनावर होत होत्या.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पाटे, उपतालुकाप्रमुख संतोष खैरे, माजी सभापती संगीता वाघ, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, बाजार समितीच्या संचालिका सुरेखा गांजाळे, महेंद्र सदाकाळ, एकनाथ शेटे, अशोक पाटे, पंडित मेमाणे, पुष्पा आहेर, संगीता खैरे, सरपंच अर्चना औटी, कैलास मनसुख, आशिष माळवदकर, संतोष खंडागळे, डी. के. भुजबळ, ज्योती दुराफे, उमेश चव्हाण, सोपान खैरे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते बुचके यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.
आशाताई बुचके यांच्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब पाटे, कैलास मनसुख व काही कार्यकर्त्यांनी केला.
 अत्यंत भावूक होऊन बुचके म्हणाल्या, ” मी पक्षविरोधी काम केल्याने पक्ष प्रमुखांनी हकालपट्टी केल्याचे आढळराव पाटील सर्वत्र सांगत आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा पुरावा द्या,मी पाहिजे ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, अन्यथा शंकराच्या पिंडीवर हात ठेऊन खरं खोटं करण्यासाठी तयार व्हा. आढळराव पाटील पुरावा देऊ शकले नाहीत. मी पक्षसंघटनेचे मागील वीस वर्षे प्रामाणिकपणे  काम करत असताना पक्षाकडे उमेदवारी मागितली हा माझा गुन्हा आहे काय?
पक्षप्रमुखांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील पराभूत झाले त्यांचे पुनर्वसन केले. मी दोन वेळा पराभूत झाले माझ्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केला नाही ?
शिवसेनाप्रमुखांनी अन्याय सहन न करण्याची शिकवण आम्हा शिवसैनिकांना दिली आहे. माझी माय बाप जनताच मला न्याय देईल, यापुढे माझे कार्यकर्तेच माझे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. असे बुचके यांनी सांगितले.
आमदार सोनवणे यांना उमेदवारी देण्याची भूमिका असल्याने मातोश्रीवर चुकीची माहिती देऊन बुचके यांचे हकालपट्टी करण्यात आढळराव पाटील यांनी कट रचला, अशी टीका यावेळी बाळासाहेब पाटे, संतोष खैरे यांनी केली.
    गेली साडेचार वर्ष आमदार सोनवणे यांनी शिवसेना विरोधी भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत काही शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. असे असताना निष्ठावान शिवसैनिकांना डावलून आमदार सोनवणे यांना उमेदवारी बहाल केली जाते. सोनवणे यांच्या ऐवजी तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी संगिता वाघ, महेंद्र सदाकाळ, उपविभागप्रमुख रूषी डुंबरे यांच्यासह शिवसैनिकांनी केली.
यावेळी बुचके यांच्या कन्या अॕड. ज्योती दुराफे म्हणाल्या की,  गेली विस वर्ष माझ्या आईने घरादारावर तुळशीपत्र ठेवले व जनतेची निस्वार्थ सेवा केली.

भक्तीमय वातावरणात रंगला ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार

पुणे :’ कैसा गाऊ गीती, कैसा ध्याऊं चित्ती । कैसी स्थिती मती ,दावी मज ।। तुका म्हणे जैसे ,दास केले देवा ‘ असे संत तुकारामांचे भावविभोर शब्द रंग नृत्यांतून समोर  आले अन्’आता आवडीचा पुरवावा सोहळा ‘ अशी रसिकांची भक्तीमय अवस्था झाली.
निमित्त होते ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आयोजित संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार !
आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे रविवारी, ७ जुलै रोजी   सकाळी ९. ४५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड, पुणे) येथे
आयोजित करण्यात आला होता.
 संकल्पना आणि दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांचे होते . अरूंधती पटवर्धन, पायल जाधव यांनी बहारदार सादरीकरण केले.
‘ सुंदर ते ध्यान ‘, ‘ भेटी लागे जीवा ‘ , ‘ बोलावा विठ्ठल – पहावा विठ्ठल ‘  , ‘याचसाठी केला होता अट्टहास ‘ ,अशा   अजरामर अभंगरचना या कार्यक्रमात प्रस्तुत केल्या गेल्या, संतांच्या जीवनातील प्रसंग नृत्यातून सादर करण्यात आले. त्याला रसिकांनी भक्तीमय दाद दिली.
याचबरोबर  संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या  अभंग रचनांचा नृत्याविष्कार  ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय  तर्फे ‘वैकुंठ नायका ‘ या नावाने याच कार्यक्रमात सादर करण्यात आला. ‘वैकुंठ नायका ‘ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे होते . वैकुंठनायका – अभंगउत्सव मध्ये
महाराष्ट्रीय संतांच्या अभंग रचनांचा नृत्याविष्कार सादर झाला.
‘वैकुंठनायका ‘आणि ‘देखील देवो ‘ या दोन अल्बम मधील अभंगांवर आधारित नृत्य स्पर्धांमधून बक्षीसपात्र नृत्य संरचनांचे सादरीकरण करण्यात आले.
गुरू शमा भाटे, पवित्र भट, मानसी वझे, अमृता , मनिषा अभय, तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या सहभागी झाल्या.
सर्व कलाकारांचा सत्कार नृत्य गुरु सुचेता चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे  : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉल बाबत केंद्र सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या परवान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार एक खिडकी योजना तयार करणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष मंत्री गटाची स्थापना करून एका महिन्यात ही प्रक्रीया पूर्ण करत ती सेवा हमी योजनेत अंतर्भुत करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
                महाराष्ट्र स्टेट सहकारी बँकेच्या माध्यमातून येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये तीन दिवस सुरू असणाऱ्या “साखर परिषद 20-20”चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, दिलीप भेंडे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख आदी उपस्थित होते.
               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. कृषीमालावर प्रक्रीया होत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांचा उद्धार होणार नाही. ऊस हे शाश्वत पीक असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पीकाकडे वळला आहे. सध्या साखर उद्योग अनेक संकटांचा सामना करत आहे. अतिरिक्त साखरेचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पडलेले साखरेचे दर ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. जागतिक बाजारपेठेमुळे साखरेचे दर पडले असून बाजारपेठही आकुंचित झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉलसह इतर उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे.
               साखर कारखाने सध्या मोठ्या संकटात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सहकारी बँकेने गेल्या काही दिवसात अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना अभूतपूर्व मदत केली आहे. नवीन गुंतवणूक करण्याची क्षमता साखर कारखान्यांत निर्माण करण्यासाठी राज्य बँकेला विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. बंद पडलेले आणि आजारी साखर कारखान्यांमध्ये राज्य शासनाचे आणि बँकांचे पैसे निरर्थकपणे अडकून पडले आहेत, यावर धोरण आखण्याची गरज असून राज्य शासन त्याबाबत विचार करत आहे.
              राज्यात पाण्याचा प्रश्नही गंभीर असून त्यासाठी उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सुक्ष्म सिंचनाच्या योजनेला काही कारखान्यांनी योग्य प्रतिसाद दिलेला नाही. त्यांसाठी राज्य शासन कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी हे आपल्या सर्वांचे सामाजिक दायित्व आहे. त्यासाठीही साखर कारखान्यांनी आपला वाटा उचलण्याचे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत राज्य शासन साखर उद्योगाच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*साखर कारखान्यांनी इथेनॉल*
*उत्पादनाकडे वळावे –  नितीन गडकरी*
             केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, साखर कारखानादारी समोर साखरचे अधिकचे उत्पादन ही मोठी समस्या आहे. साखर कारखाने हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. देशात पाण्याची कमतरता नाही, मात्र त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर हा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणण्याची आवश्यकता आहे. बाजाराच्या पुरवठा आणि उत्पादन यांचा विचार करून कारखान्यांनी साखरेच्या ऐवजी इथेनॉलसारखे उपपदार्थ तयार करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. इथेनॉल विकत घेण्यासाठी पारदर्शक, दूरदर्शी धोरण केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केले आहे.
                साखर कारखान्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी साखर कारखान्यांनी बायोडिजेल इंधनाचा वापर करावा. त्याच बरोबर बायो सिएनजी वापरावर भर देण्याची आवश्यकता आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व गाड्या बायो सिएनजीवर आणल्या असून विदर्भातील पाच जिल्हे डिझेल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बंद पडलेले आणि आजारी असणाऱ्या साखर कारखान्यात शुगरकेन ज्यूस ते इथेनॉल निर्मिती यावर भर देण्यासाठी नवे धोरण तयार करण्याचे काम सरकार करत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
             सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, साखर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात मोठी रोजगार निर्मिती होते. ऊस हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना हे शाश्वत पीक वाटते. मात्र शेतकऱ्यांसह कारखान्यांनीही ऊस पीकाच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
               खासदार शरद पवार म्हणाले, साखर उद्योग  हा राज्यातील महत्वाचा धंदा आहे. देशातील साखरेचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. साखर व्यवसायासमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याच्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक भूमिका  घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
            यावेळी “साखर परिषद 20-20”च्या कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
    मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्य सहकारी बँकेच्यावतीने पाच कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
             यावेळी विद्याधर अनास्कर यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला राज्यातील विविध सहकारी, खासगी साखर कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी स्थायी समितीचा पुढाकार

पुणे : धनकवडी येथील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेवारील आरक्षण उठविण्यासाठीचा घाट महापालिकेने घातला आहे. यासाठी राज्य शासनातील एक मंत्री आणि  ने पुढाकार घेतला असल्याचा आरोप नगरसेवक विशाल तांबे यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये आयुक्तांनी हस्तक्षेप करून स्थायी समिती समोरील हा प्रस्ताव आपल्या अधिकारामध्ये सर्वसाधारण सभेत ठेवावा अशी मागणी देखील तांबे यांनी केली.
याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, धनकवडी – चैतन्यनगर येथील स.न. २९ येथे २००४ च्या विकास आराखड्यामध्ये ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षण टाकले आहे. सातारा रस्त्या लगत असलेल्या जागेचा सातबारा हा पी. बी. कदम यांच्या नावे असून,  इतर अधिकारामध्ये प्रवीण उत्तमराव भिंताडे यांचे नाव आहे. प्रवीण भिंताडे हे गणेश भिंताडे या नावाने परिचित असून ते बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. सन २०१७ मध्ये त्यांनी धनकवडी येथून भाजपकडून निवडणूकही लढवली आहे.
आरक्षित जागेवर ओटा मार्केट आणि पोलीस चौकी सुरू करावी यासाठी गेली अनेक वर्षे मी पाठपुरावा करत आहे. अगदी महापालिकेपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडेही पाठपुरावा केला आहे. दरम्यान, भिंताडे यांनी महापालिकेने भूसंपादन केले नसल्याने जागा मूळ मालकांना परत द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला. शासनाने यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावर मी आणि महापालिकेने हरकत नोंदवली होती. मात्र नगरविकास विभागाने यावरील सूनवणीला मला बोलवले नाही.   यावर्षी १ मार्चला  शासनाने धनकवडीकरांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करून भिंताडे यांची खरेदी सूचना नोटीस मान्य केली.  विशेष की डिसेंबर २०१८ मध्ये भिंताडे यांनी अर्जासोबत कोणतेही कागदपत्र जोडलेली नसल्याने त्यांची खरेदी सूचना फेटाळण्यात आली होती.
शासनाने याबाबत १ मार्च रोजीच आदेश दिला, परंतु महापालिकेला तो थेट २७ मार्च रोजी मिळाला. त्यानंतर भिंताडे यांनी खरेदीची सूचना मान्य झाल्याने पाठपुरावा करुन आयुक्तांनी आरक्षित जागा संपादीत करण्यासाठी ६ मे रोजी प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला. परंतु आता आता बिल्डारासाठी आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे.
हा आरक्षित भूखंड मेट्रो क्वारिडॉर मध्ये येतो. त्याला चार एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे या जागेची किंमत २०० कोटी होणार आहे. त्यामुळे यातून मिळणारी मलई खाण्यासाठी सत्तेतील बोके सरसावले आहेत, असा आरोप देखील तांबे यांनी केला. अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांना याबद्दल निवेदन दिले असून , ६० दिवसांत समितीने निर्णय न घेतल्याने महापालिका अधिनियमानुसार हा आयुक्तांनी हा प्रस्ताव स्वत:च्या अधिकारात मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे मांडावा अशी मागणी केली आहे. याप्रसंगी नगरसेवक बाळा धनकवडे, नगरसेविका अश्विनी भागवत  उपस्थित होते.

राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत-रावसाहेब दानवे

पुणे :गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना चालत आहे. कोणी अध्यक्ष होण्यास तयार नाही. पक्षाच्या उमेदीच्या काळात गांधी घराण्याने अध्यक्षपद भोगले. परंतु आज पक्षाला उभारी देण्याची गरज असताना राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात शनिवारी केली.

जनसघांचे श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने सभासद नोंदणी अभियान दानवे यांच्या हस्ते सुरू केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक उपस्थित होते.
भाजपच्या सुरुवातीच्या काळात केवळ दोन खासदार निवडून आले म्हणून टिंगल-टवाळी करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे केंद्रात सलग दुसर्‍यांदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आले. दुसरीकडे दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? काँग्रेसला संघटनात्मक मजबूत करण्याची गरज असताना राहुल गांधी व गांधी घराणे मैदान सोडून पळ काढत आहे, अशी टिका त्यांनी केली.

राज्यातील अनेक आजी -माजी आमदार, खासदार व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, ज्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन मजबूत होईल, अशांना पक्षात घ्यायला काहीच हारकत नाही, परंतु स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊनच प्रवेश दिला जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेला २२० जागांवर युतीचा विजय होईल
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. परंतु भाजपची विधानसभेची तयारी यापूर्वीच झाली असून, सभासद नोंदणी ही 2024 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. विधानसभेत भाजप-सेना युतीचे 220 पेक्षा अधिक आमदार विजय होतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

सहयोगी सदस्यांवर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही-

भारतीय जनता पक्षाचा सदस्य असणे आणि पक्षाचा सहयोगी असणे, यात फरक आहे.सहयोगी सदस्यांवर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही सहयोगी व्यक्तीने सर्व्हे करावा, की दुसरे आणखी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पक्षाच्या सदस्यांना तसे वागता येणार नाही, असा टोला  रावसाहेब दानवे यांनी पक्षाचे सहयोगी सदस्य खा. संजय काकडे यांचे नाव न घेता लगावला. खा. संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रावसाहेब दानवे पराभूत होतील, असे भाकित केले होते. दानवेंच्या मतदारसंघात आपण सर्व्हे केल्याचा दावाही काकडे यांनी केला होता.

या संदर्भात पत्रकारांनीचं दानवे यांना छेडले …तेव्हा  ते म्हणाले, सहयोगी आणि पक्षाचे सदस्य यात फरक आहे. त्यांनी काय करावे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या सर्व्हेनंतरही मी अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो. ते जरी सहयोगी असले तरी त्यांच्यावर भाजप सदस्यांसारखे बंधन नाही. घटक पक्षांच्या लोकांनी काय बोलावे, कसे वागावे हे त्यांचा प्रश्न आहे, तसेच सहयोगींचेही आहे, असेही स्पष्टीकरण दानवे यांनी दिले

महाबळेश्‍वरमध्ये जोरादार पाऊस …

महाबळेश्‍वर -परिसरात होत असणाऱ्या संततधार पावसामुळे व वेण्णालेक वरून वाहत असल्यामुळे महाबळेश्वर वाई रस्त्यावर रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः प्रभावी झाली असून झाली आहे. महाबळेश्‍वर परिसरात मागील आठ दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने महाबळेश्वर पाचगणीला पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

हे पाणी रस्त्यावर आल्यामुळे महाबळेश्वर वाई रस्ता वाहतूक प्रभावित झाले आहे. गेहू गेरवा केंद्र समोर समोरील रस्त्यावर पाणी साठले आहे. यामुळे मुंबई पुणे वाई बाजूकडून महाबळेश्वरला जाणार आहे. महाबळेश्वरला जाणारी वाहने संथ गतीने जात आहेत. आता पोलिसांनी ही वाहतूक बंद केली असून क्षेत्र महाबळेश्वर कडून वाहतूक महाबळेश्वर शहराकडे वळविण्यात आली आहे.

महाबळेश्वर येथे एक जूनपासून बाराशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मागील एक दिवसात 123 मिलिमीटर पाऊस महाबळेश्वर येथे पडला आहे. यामुळे या परिसरात ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून पाणी वाहणारे रस्ते बंद केल्यामुळे बंद केल्यामुळे पाणी आता रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे या परिसरातील महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला मोठा पाण्याचा धोका बसू शकतो.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प!!

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि वाशिष्ठी (ता. चिपळूण) या नद्या धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या नद्यांना पूर आला असून दोन्ही ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे.

मरीन ड्राईव्हच्या समुद्रात दोन तरुण बुडाले…

0

मुंबई- मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू झालाय. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दुपारपासून अग्निशमन दलाचे जवानांकडून या तरुणांचा शोध सुरू आहे, पण चार तास उलटूनही त्यांचा पत्ता लाग नाहीये. बुडालेल्या तरुणांपैकी एकाचे नाव जावेद शेख असून तो ड्रायव्हर आहे. विशेष म्हणजे आज समुद्रात भरती आहे. दुपारी समुद्रात एक मुलगा बुडत होता, तेव्हा पोहता येत असलेल्या जावेदने त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्याला वाचवण्यात जावेदला यशही आले, पण एक मोठी लाट आली आणि दोघांनाही आत घेऊन गेली. या लाटेमुळे दोघेही वेगवेगळे झाले. हे दोघे बुडताना पाहून पोलिसांनी जावेदच्या दिशेने दोरी टाकली, ती दोरी जावेदने पकडली, पण पुन्हा लाट आली आणि दोरी सुटली. त्यामुळे जावेद लाटेसोबत वाहून गेला. या घटनेनंतर कोस्ट गार्ड आणि अग्निशमन दलाने तातडीने शोधकार्य सुरू केले. कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्यांना कुठेही हे दोन्ही तरुण आढळले नाहीत. जावेद हा पट्टीचा पोहणारा आहे, पण तरीही त्याला मोठ्या लाटेने ओढून नेले. वेगवेगळ्या यंत्रणा सध्या शोधमोहीम करत आहेत, पण चार तासानंतरही त्यांना यश आले नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश

0

मुंबई, दि. ६ : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४- बी या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे विधेयक सन 2019 च्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

श्री.देशमुख म्हणाले, राज्यात एक लाखापेक्षा अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. नागरी  भागातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील सर्वसाधारण संस्थांना लागू असलेल्या तरतूदी या सहकारी गृहनिर्माण संस्थांना देखील लागू असल्याने या संस्थांचे प्रश्न निकाली निघण्यास अडचणी निर्माण होत होत्या आणि तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या अशा तक्रारींचे निवारण लवकर व्हावे, तसेच त्याच्या कामकाजात अधिक सुलभता यावी यासाठी या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुकीला पात्र होतात, अशा सहकारी संस्था त्यांची निवडणूक घेण्यासाठी संबधित निबंधकाकडे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करतात. सदर मागणीच्या अनुषंगाने सबंधित निबंधक सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीच्या  मागणीचा अहवाल सादर करतात.   निवडणुकीसाठी तयार केलेल्या नामतालिकेमधून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवड करुन  संबधित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत  सबंधित  निबंधकांना कळविण्यात येते. त्यानुसार निवडणुका घेण्यात येतात. या सर्व पत्रव्यवहारात निवडणूक घेण्यासाठी बऱ्याच  मोठा कालावधीचा लागतो. परिणामी  सहकारी गृहनिर्माण संस्थावर कार्यरत असलेली समिती पाच वर्षाच्या कालावधीनंतर देखील कायम राहाण्याची परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी २५० सदस्य संख्या  असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना समितीची निवडणूक घेण्याचे अधिकार संबंधित संस्थेला देण्यात आले आहेत. याबाबतची विहित पद्धत निश्चित करुन त्याबाबत स्वतंत्रपणे निवडणूक नियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

याशिवाय, विधेयकात प्रामुख्याने पुढीलप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत :-

  • संबंधित गृहनिर्माण सहकारी सदस्यांना संस्थांबाबतचे दस्तऐवजमिळविण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.
  • सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती देण्यास संबंधित संस्थेच्या समितीच्या कोणत्याही अधिकारी / सदस्याने किंवा भूतपूर्व अधिकारी किंवा सदस्याने टाळाटाळ केल्यास पंचेचाळीस दिवसानंतर प्रती दिन रुपये शंभर परंतू पाच हजार रुपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • तसेच सहयोगी/सह सदस्य/तात्पुरता सदस्य यांच्या व्याख्येत अधिक सुस्पष्टता आणण्यात आली आहे. पाच सदस्यांचीगृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करणे, पाच गृहनिर्माण संस्थांचा संघीय संस्था व दोन गृहनिर्माण संस्थांचा संघ स्थापन करण्याची  तरतूद.
  • गृहनिर्माण संस्थामध्ये जितक्या सदनिका / भूखंड असतील तेवढेच सदस्य संस्थेचे सभासद होण्यास मर्यादानिश्चित.

सहयोगी व तात्पुरत्या सदस्यास मतदानाचा हक्क.

  • सहयोगी सदस्यांस मूळ सदस्याच्या लेखी पूर्व परवानगीने निवडणूक लढवण्याचा हक्क.
  • संस्थेमध्ये राखीव प्रवर्गातील सदस्य उपलब्ध नसल्यास राखीव जागा समितीच्या गणपूर्तीकरीताविचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • संस्थेला निधी उभारणे,निधी विहित करुन आकार बसविणे, निधींची गुंतवणूक करणे, निधीचा वापर करणे इत्यादी अधिकार देण्यात आले आहेत.

या  सर्व तरतुदींमुळे राज्यातील गृहनिर्माण सहकार संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत व त्यांच्या अधिकाराबाबत अधिक स्पष्टता आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे  कामकाज अधिक सुलभ होणार आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

‘त्या’ अभियंत्याच्या कुटुंबियांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट व दिलासा

0

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केलेल्या त्या उप अभियंत्याची सार्व. बांध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन दिसला दिला आहे. शेडेकर यांच्यावर गुरुवारी कणकवली येथे आमदार नितेश राणे व त्यांच्या समर्थकांनी चिखलफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा सार्व. बांध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उप अभियंत्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली ही भेट अधिकारी व प्रशासनाचे मनोधैर्य उंचावणारी असल्याचे बोलले जात आहे.

“आमच्या मुलाचा काय दोष साहेब..! आमच्या मुलाच्या प्रामाणिकपणाची हीच शिक्षा आहे का ?” अशा शब्दांत सार्व. बांध. विभागातील अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्या आईने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या भावनांना वाट करून दिली. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले असून, आता महाराष्ट्र शासन मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग देखील या उप अभियंत्याच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार आणि सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेडेकर यांना पोलिस संरक्षण दिले असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच उप अभियंत्यांची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची कळत आहे. ही घटना माध्यमातून आणि इतर सोशल मीडियातून समोर आल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदनामी झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यावर नक्कीच मानसिक ताण निर्माण झाला असेल, त्यामुळे सध्या त्या अधिकाऱ्याच्या पाठिशी उभे राहून त्यांना धीर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहेत. तसेच पाटील यांनी या घटनेनंतर स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली तसेच यावेळी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देखील दिला. असल्याची सूत्रांकडून कळत आहे.

@ काय आहे प्रकरण –
गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी महामार्गाची पाहणी करताना रस्ते अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली. एवढंच नाही तर राणे यांनी अभियंत्याला गडनदी पुलाला बांधून ठेवत, महामार्ग सेवा रोड तुझा बाप बांधणार का ?, असा सवाल केला होता. त्यानंतर हे वातावरण अधिकच चिघळले असून, या प्रकरणी नितेश राणे यांना अटक देखील करण्यात आली आहे.

उस तोडणी यंत्रांची संख्या वाढणे गरजेचे -सहकारमंत्री

पुणे— ऊस तोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांसाठी अनुदान दिलेच पाहिजे कारण दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुराची संख्या कमी होत आहे. परिणामी ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढणे गरजेचे आहे असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले. याबरोबरच साखर कारखान्याच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील त्याचे कारण कारखानदारी टिकली तरच ऊस उत्पादक टिकणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ” साखर परिषद २०-२० ” उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागांवकर , साखर आयुक्त डॉ शेखर गायकवाड , राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. साखर परिषदेला राज्याच्या विविध भागातून साखर कारखान्यांचे पदाधिकारी ,संचालक उपस्थित आहेत.

श्री देशमुख म्हणाले कि, उस तोडणी साठीच्या यंत्रासाठी अनुदान देणे गरजेचे आहे, गेले काही महिने अनुदानाचा प्रश्न चर्चेत आहे. आज एकीकडे मजुराची संख्या कमी होत आहे त्याचा उस तोडणीiवर परिणाम होत आहे. म्हणूनच यंत्राची संख्या वाढणे गरजेचे आहे. कारखानदारी समोरील विविध प्रश्नाबाबत कारखानदारांनी चितन करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात शासनाचे काय चुकले याची चर्चा होताना दिसते . खरे तर त्याआधीपासून कोणती धोरणे चुकली याचा विचार करायला हवा. कारण अनेक कारखाने गेली काही वर्षांपासून बंद आहेत. त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आज कारखाने चालवणे अवघड झाले आहे म्ह्णूनच कायम स्वरूपी उपाययोजना कार्याला हवी. साखर वाहतुकीच्या बाबत प्रस्ताव देण्यात यावा, तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत विचार करण्यात यावा, याबाबत नेमके धोरण ठरणे गरजेचे आहे. कारखान्याच्या १५ कि. मी च्या परिसरात ८० टक्के ऊस असेल तर विस्ताराला परवानगी दिली जावी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

या सत्रात रेणुका शुगर्स चे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी राज्यातील साखर उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन केले.

परिषदेच्या सकाळच्या सत्रात परवाना धोरण , सद्यस्थिती आणि अपेक्षा यावर चर्चासत्र झाले. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी सूत्रसंचालन केले. यामध्ये बोलता डॉ गायकवाड म्हणाले कारखान्यांनी आता रिटेलिंगकडे वळण्याची वेळ आली असून बँकावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे . अनेक कारखाने ५० वर्षापेक्षा अधिक काळ सुरु असले तरी त्यांना एफआरपी चा प्रश्न भेडसावत आहे हे चांगले चित्र नाही. यावर्षीच्या हंगामात उसाचे क्षेत्र घटले असून त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे तसेच टनेज कमी होणार असून साखर उतारा कमी मिळणार आहे परिणामी साखर उद्योगाला काही कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे . त्याचबरोबर साखर उद्योगाबाबत दीर्घकालीन धोरण ठरवणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

या चर्चासत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर वास्तव, वैध मापन शास्त्र विभागाच्या उपनियंत्रक सीमा बैस ,औद्यीगिक सुरक्षा आणि आरोग्य सहसंचालक श्री गिरी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे हे सहभागी झाले श्री अनास्कर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली

भाजप सभासद नोंदणी अभियान

पुणे-आगामी विधानसभा शिवसेनेसोबत एकत्र लढत असलो, तरी प्रत्येक नागरिकाला पक्षासोबत जोडायचे आहे. विधानसभेत २२० पेक्षा अधिक जिंकण्याचे लक्ष पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ श्री. दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘कॉंग्रेसने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले होते. आपल्याला पर्यायच नाही असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु सध्याची कॉंग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाने रणांगण सोडल्यासारखी स्थिती आहे. त्यांच्याकडे कोणी अध्यक्ष राहीला नाही. अध्यक्षपद घ्यायला कोणी तयार होत नाही.’ अशी टीका ही श्री. दानवे यांनी केली.

श्री. गोगावले यांनी प्रास्ताविक केले. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. मुरली मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.

देशाच्या सार्वभौम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प :-खासदार गिरीश बापट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाच्या सार्वभौम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असेच या अर्थ संकल्पाचे वर्णन करावे लागेल. देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांचा विकास झाला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. मोदीजींचे हेच स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. ग्रामीणभाग तसेच मध्यमवर्गीय भागाच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करू असे वचन मोदीजींनी दिले होते. छोट्या व्यापाऱ्यांना मदतीचा हात दिल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल या विचाराने साठ वर्ष पूर्ण करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.  त्याच प्रमाणे लघु व मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकार 350 कोटी रुपये देणार  आहे. छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच सरकार ई पोर्टल निर्माण करणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापारी या निर्णयाचे स्वागत करतील याचा मला विश्वास आहे.  मागील अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात ही पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मध्यमवर्गाला आता घर घेणं सोप होणार आहे. कारण 45 लाख किंमतीचे घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच आता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट 2 लाखावरून 3.5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल.

देशाच्या उन्नतीसाठी शेती उत्पादन वाढले पाहिजे यासाठी सरकारने विविध उपाय योजना केल्या आहेत. या अर्थसंकल्पात  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. शेती उत्पन्नात वाढ झाल्याने बळीराजा सुखावेल. 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा विचार ही या अर्थसंकल्पामधून केला आहे. यामुळे देशातील दुष्काळी स्थिती नियंत्रणात येईल.आजवर देशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात होते. आता ‘स्टडी इन इंडिया’ या योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेर घर समजले जाते या निर्णयाचा पुण्याला नक्की फायदा होईल. अशा प्रकारे शेती, लघुउद्योग, व्यापारी, गृहिणी, युवा, मध्यमवर्गीय, विद्यार्थी या सर्वांच्या विकासाचा निश्चय करणारा हा अर्थसंकल्प आहे असे म्हणता येईल.

-खासदार गिरीश बापट

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल,राजीव पारीख यांनी केले नव्या अर्थसंकल्पाचे कौतुक ..

अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि. 
आर्थिक विकासासाठी सरकारने बांधकाम क्षेत्राचा प्रकर्षाने विचार करून या क्षेत्रास आगामी पाच वर्षात अधिकाधिक सुधारणा आणण्याचे वचन या अर्थसंकल्पातून दिले आहे. ४५ लाख किमतीचं घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आल्यामुळे घरांची चिंता भेडसावणाऱ्या मध्यमवर्गाला मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे. तसेच परवडणाऱ्या गृहनिर्माणाला   प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना २०२२ पर्यंत हक्काची घरे मिळणार आहेत. सरकारचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे.  बांधकाम क्षेत्रच नव्हे तर उद्योग, अर्थ, कृषी, पायाभूत क्षेत्र या सर्वच क्षेत्रा ला समतोल न्याय देण्याचा स्वागतार्ह  प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
राजीव परीख अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र
अर्थमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात ‘न्यू इंडिया’साठी  सर्व संसाधनांची जुळवाजुळव करून पॉप्युलिझम टाळण्यासाठी अत्यंत शिस्तीचे पालन केले आहे. 
राष्ट्राच्या उभारणीत खासगी क्षेत्रातील योगदान आणि करदात्यांचे योगदान मान्य केल्याबद्दल मी वैयक्तिकरीत्या आनंदी आहे.  
आर्थिक पाहणी अहवालातील वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. मात्र अर्थसंकल्पात या  रणनीतीचे थेट संकेत मिळत नाहीत. 
गेल्या पाच वर्षांतील, 2014-19 दरम्यान, तीन सर्वात मोठ्या धोरण उपक्रमांपैकी रिअल इस्टेट सुधारणा असल्याचा दावा सरकार करते, याचा आम्हाला आनंद आहे.
पुरातन भाडे कायद्यात सुधारणा करून सरकारी जमिनींवरील सार्वजनिक गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्याच्या क्रेडाईच्या  दीर्घकालीन प्रस्तावांना अर्थमंत्र्यांच्या तत्काळ धोरण अजेंड्यात जागा मिळाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.   
 
आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना  करण्यात आल्या आहेत. 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पुरवणे, कॉर्पोरेट बाँड्समधील सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. 
सुस्थितीतील एनबीएफसीच्या उच्च मूल्याच्या एकत्रित मालमत्ता विकत घेण्यासाठी  सरकारकडून बँकांना रु. 1 लाख कोटींची हमी ही तरलतेचे संकट कमी करण्यास मदत करू शकते.  
गृहनिर्माण वित्त कंपन्यांचे नियमन एनएचबीकडून आरबीआयकडे परत येत आहे. जमिनीसाठी वित्तपुरवठा, गृहनिर्माण वित्त पुरवठ्याला प्राथमिकता देणे आणि निधी पुरवठ्यासाठी कमी खर्च अशा रिअल इस्टेट सेक्टरमध्ये अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आरबीआय आणेल, अशी आम्हाला आशा आहे.
 
घर खरेदीसाठी रु. 2 लाखांपासून व्याजावर  रु. 1.50 लाखांची  अतिरिक्त कपात मिळणार आहे. यामुळे एकूण लाभ रु. 3.5 लाखांपर्यंच पोचेल. अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे, की ग्राहकांना रु. 7लाखांचा निव्वळ नफा होईल. यामुळे  गृहनिर्माण मागणीवरील परिणामावरील लक्ष ठेवण्यात येईल आणि पुढील पावले उचलली जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.
 
अनेक प्रकारच्या कामगार कायद्यांत सुधारणा करून आणि त्यांना चार संहितांमध्ये  तर्कसंगत रूप दिल्याबद्दल सरकारला श्रेय दिले पाहिजे. 
क्रेडाईचा एक सशक्त सामाजिक अजेंडा आहे. त्यामुळे स्वच्छ भारतचा विस्तार करून त्यात घनकचरा व्यवस्थापनाचा आणि कौशल विकासाचा समावेश करण्याची घोषणा क्रेडाईतील आम्हा सर्वांना  सुखावणारी आहे.
………………….
 
 
अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि. 
 आर्थिक विकासासाठी सरकारने बांधकाम क्षेत्राचा प्रकर्षाने विचार करून या क्षेत्रास आगामी पाच वर्षात अधिकाधिक सुधारणा आणण्याचे वचन या अर्थसंकल्पातून दिले आहे. ४५ लाख किमतीचं घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आल्यामुळे घरांची चिंता भेडसावणाऱ्या मध्यमवर्गाला मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे. तसेच परवडणाऱ्या गृहनिर्माणाला   प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना २०२२ पर्यंत हक्काची घरे मिळणार आहेत. सरकारचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे.  बांधकाम क्षेत्रच नव्हे तर उद्योग, अर्थ, कृषी, पायाभूत क्षेत्र या सर्वच क्षेत्रा ला समतोल न्याय देण्याचा स्वागतार्ह  प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
 

बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल -कल्याण ज्वेलर्स

0

आम्ही या अर्थसंकल्पाकडे सकारात्मकपणे पाहात आहेत, कारण त्यात जाहीर करण्यात आलेली विविध प्रकारची धोरणे सरकार ग्राहकांना वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या सवलतींच्या मदतीने या क्षेत्राच्या विकासासाठी पाया रचण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्प 2019 मध्ये भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दमदार मार्ग तयार व्हावा यासाठी पाया रचण्यात आला आहे.

आधार आणि पॅन कार्ड या दोन्हींच्या समान वैधतेमुळे ग्राहकांना दागिन्यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना लक्षणीय मदत होणार आहे.

मूलभूत सुविधांसाठी प्रस्तावित 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लक्षात घेता आम्ही पायाभूत सुविधा क्षेत्राचे भविष्य उज्जवल असल्याचे व त्याचा आम्हाला फायदा होणार असल्याचे गृहीत धरत आहोत, कारण त्यामुळे पर्यायाने ग्राहकांकडे खर्चासाठी जास्त रक्कम राहील आणि अशावेळेस मौल्यवान रत्ने व दागिने उद्योग क्षेत्रातील नफ्यासह परताव्यांचा आकर्षक गुंतवणूक पर्याय त्यांच्यापुढे असेल.

त्याशिवाय बजेटमध्ये एनआरआय आणि एफपीआय (परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) यांचे एकत्रीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे भारतातील एनआरआय फंडिंग वाढून अर्थव्यवस्थेत भांडवलाचा नवा ओध सुरू होईल. ही चांगले दिवस येणार असल्याची नांदी आहे.

मात्र, आयात केल्या जाणाऱ्या सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर गेल्यामुळे सोने खरेदीच्या लघुकालीन भावनेवर परिणाम होईल आणि त्यामुळे बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल.

एकंदरीतच अर्थसंकल्पातील धोरणे प्रामुख्याने सरकारच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया आणि भारतात व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करणे यांसारख्या योजनांकडे झुकणारी आहेत.

–          श्री. टी एस कल्याणारामन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स