इंडियन ऑइल ठरली एव्हीगॅस 100 एलएलचे उत्पादन आणि विपणन करणारी देशातील पहिली तेल विपणन कंपनी
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2022
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नागरी विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पिस्टन इंजिनची विमाने आणि मानवरहित विमानांसाठी बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएल (AVGAS 100 LL) या हवाई इंधनाच्या वापराचा प्रारंभ केला. भारतात सध्या या इंधनाची युरोपियन देशांमधून आयात होते. इंडियन ऑइलने भारतीय वायुसेनेच्या हिंडन हवाई तळावर आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, एमओपीएनजी (MoPNG) आणि एमओसीए (MoCA) चे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) अधिकारी सहभागी झाले होते.
स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएलचा वापर सुरू होण्याचे महत्व सांगताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की एव्हीगॅस 100 एलएल हे भविष्यात विमानतळांवरील वाढती गर्दी तसेच वैमानिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी विमानांसह वैमानिक प्रशिक्षण संस्थांची वाढती संख्या यासह भरभराटीला येत असलेल्या विमान वाहतूक उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहे. भारतातील विमान प्रवासाची मागणी भविष्यात अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशिक्षित वैमानिकांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. आणि यासाठी, एफटीओ (FTOs) संख्येतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, ते म्हणाले.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल:
सध्या एव्हीगॅस 100 एलएल हे इंधन पूर्णपणे आयात केले जाणारे उत्पादन आहे. इंडियन ऑइलने गुजरात येथील तेल शुद्धीकरण केंद्रात उत्पादित केलेल्या एव्हीगॅस 100 एलएल चे देशांतर्गत उत्पादन भारतात विमान उड्डाणाचे प्रशिक्षण अधिक परवडणारे बनवेल. एफटीओ आणि संरक्षण दलांद्वारे चालवल्या जाणार्या विमानांना इंधन पुरवणारे हे उत्पादन भारत अनेक दशकांपासून आयात करत आहे. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास (R&D), तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विपणन संघांनी स्वदेशी उत्पादनाची ही यशस्वी कामगिरी केली आहे आणि उद्योग क्षेत्राला कमी किमतीचा फायदा दिला आहे.
मुंबई, दि. 26 : नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवारा, अन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या नाना पालकर स्मृती समितीसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या व त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे ‘डे केअर किमोथेरपी’ केंद्र सुरू करण्यासंदर्भात नाना पालकर स्मृती समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वेचले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले नाना पालकर रुग्ण सेवा सदन केवळ कर्करुग्णांनाच नाही तर इतर अनेक रुग्णांना तसेच त्यांच्या आप्तेष्टांना मदत करीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात वाराणसी येथेदेखील कर्करुग्णांच्या उपचाराची सोय आहे. परंतु ‘टाटा’ या नावातच काही जादू आहे, की ज्यामुळे लोक देशभरातून टाटा स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी येतात, असे राज्यपालांनी सांगितले. विज्ञानातील संशोधनामुळे एक दिवस प्रत्येक कर्करुग्ण बरा होईल असा आपणास विश्वास वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.
कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक : डॉ. राहुल बाणावली
देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे, तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून सन २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल, असे सांगताना कर्करुग्णांच्या उपचाराचा वाढत असलेला खर्च आणि रोगनिदान होईपर्यंत होणारा खर्च चिंताजनक असल्याचे टाटा स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल बाणावली यांनी सांगितले.
टाटा रुणालयात आजही उपचार परवडणाऱ्या किंमतीत होत असल्यामुळे देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी मुंबईत निवाऱ्याची सोय होणे महत्त्वाचे असते, असे सांगून नाना पालकर संस्थेसारख्या किमान दहा सेवाभावी संस्थांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बोरिवली येथे २ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या केमोथेरपी केंद्रामुळे लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळेल तसेच त्यामुळे पश्चिम उपनगरे, विरार, डहाणू, पालघर येथील रुग्णांची सोय होईल असे नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव सुमेधा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.
मुंबई, दि. 26 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेना, प्रधान सचिव (अपील आणि सुरक्षा) श्याम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन, राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अपराध सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव तातडीने 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. राज्यात नवीन पोलीस स्टेशन निर्मिती करण्यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा तसेच हा आराखडा तयार करताना लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे आधारभूत मानण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी पोलीस स्पोर्टस् अकादमीचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करावा. तसेच पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा टप्पा 1 पूर्ण झाला असून टप्पा 2 ची कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबरोबरच नवीन बोटी खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच सागरी सुरक्षेकरिता जुन्या बोटींची दुरुस्ती आणि तांत्रिक पदे भरती करण्यासाठीचाही प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीचा प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी. नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन देण्यात येतात. सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा. सध्या असलेल्या अंमली पदार्थ विरोधी (नार्कोटिक) कायद्यात राज्य सरकारच्या सुधारणा प्रस्तावित करण्यासंदर्भात विभागाने अभ्यास करावा. मुंबईमध्ये प्रस्तावित डिटेंशन सेंटरचा प्रस्ताव तातडीने सादर करुन त्यास मंजुरी घ्यावी. तसेच राज्यामध्ये प्रशिक्षित असे श्वान पथक तयार करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शक्ती कायदा, निर्भया पथक या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राजकीय, सामाजिक आंदोलनातील, कोरोना काळातील, गणपती व दहीहंडी उत्सव काळातील खटले मागे घेण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबतचे खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यामध्ये नवीन कारागृह निर्मिती करण्याबरोबरच कारागृह विभागात सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या 1 हजार 641 बंदींना जामीन मंजूर असून त्यांना कारागृहातून सोडण्याची योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी शासनाने सर्व कायदेशीर सहकार्य करावे तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.
या बैठकीत महिला सुरक्षा, पोलीस स्टेशन बांधकाम, पोलिसांसाठी घरे, पोलीस गृह कर्ज योजना, पोलिसांच्या आस्थापना विषयक बाबी, पोलिसांसाठी अद्ययावत वाहने, राज्य राखीव पोलीस दल, डायल 112, अम्बीस प्रणाली, सिसिटीएन्स प्रणाली टप्पा 2, तुरुंग सेवा यांसह विविध विषयांचा आढावा उपमुख्यमंत्री यांनी घेतला. यावेळी सर्व पोलीस घटकांनी समन्वयाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस भरतीला प्राधान्य
राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 10 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
गृह विभागाचे सादरीकरण अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांनी केले. तर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी सादरीकरण केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन
पुणे दि.२६ – गुणवत्तेचे शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी ते उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, प्रा. शामकांत देशमुख, प्रा.सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष दिल्यास देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळे स्वस्त आणि उत्तम शिक्षण सुविधा सर्वांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यावर्षी काही महाविद्यालयांना भेट देऊन एफआरएने निश्चित केलेल्या शुल्काची तपासणी केली जाईल.
जीवनाला दिशा देणारे शिक्षण गरजेचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा जागृत करणारे , गतवैभवाची जाणीव करून देणारे आणि भविष्यातील उन्नत ज्ञानाचा आग्रह धरणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील असावे, त्या प्रयोगांना मान्यता मिळवावी आणि त्याच्या साहाय्याने समृद्धी प्राप्त करावी अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून जीवनाला दिशा देणारे आणि स्वावलंबी करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
बहुशाखीय पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन नवीन शोध लावणे आणि त्याला बाजारात आणण्याचे हे जग आहे. त्यामुळे नवे शोध लावणाऱ्या तरुणाईमुळे देश आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होईल. त्याचा पाया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. बहुशाखीय अभ्यासक्रम शिकून पदवी मिळविल्यास यशस्वी विद्यार्थी तयार करता येतील. मॉडर्न महाविद्यालयाने असे अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात असे अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येईल.
शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार श्री.शिरोळे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये नावीन्यतेला प्रोत्साहन देत आहेत. कोरोनानंतरच्या काळात या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
डॉ. एकबोटे म्हणाले, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या देशांचा विकास वेगाने झाला आहे. आपल्या देशाची ओळख विकसीत राष्ट्र अशी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वेगाने राबवावे लागेल.
संस्थेचे कार्यवाह श्री.देशमुख यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटर, विद्यार्थ्यांच्या न्यूट्रिडिश स्टार्टअप ॲपचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. मॉडर्न विधी महाविद्यालयाने तयार केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ महत्वाच्या निर्णयांवर आधारित ‘७५ माईलस्टोन्स’ या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विधी महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेशिया आयपीआर सेल’, तसेच ‘आयमॉडर्ना’ आभासी संवादीका, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या आभासी प्रयोगशाळा उपकरणाचे उद्घाटनदेखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एंजल प्लेयर’ या उपकरणांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
मुंबई- भाजप नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी नारायण राणे यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच, बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे.एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे हे आदेश कायम ठेवले आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊनही बसायचा तो दणका त्यांना बसला आहे.
अधीश बंगल्यातील अवैध बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, दोन आठवड्यांत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच, अधीश बंगल्यावरील कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेशही कायम ठेवले आहेत.
2 आठवड्यांची मुदत होती, 2 महिन्यांपर्यंत वाढली
अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना 2 आठवड्यांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने यात थोडासा दिलासा देत ही मुदत 2 महिन्यांपर्यंत वाढवली. तसेच, 2 महिन्यांत नारायण राणे यांनी अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडले नाही तर, मुंबई महापालिका कारवाई करेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नारायण राणे यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली तर, मुंबई पालिकेकडून तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात अधीश नावाचा बंगला असून, तो समुद्र किनाऱ्यावर आहे. बंगल्याच्या बांधकामात सीआरझेडचे तसेच एफएसआयचे उल्लंघन करण्यात आले, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आठवडाभरापूर्वी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेशदेखील उच्च न्यायालयाे दिले होते. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने नारायण राणे यांना आता या बंगल्यातील अवैध बांधकाम तोडावे लागणार आहे.
संतोष दौंडकर यांनी नारायण राणेंच्या या अधीश बंगल्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणेंना नोटीसदेखील बजावली होती. या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात गेला होता. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्येही चांगलाच वाद निर्माण झाला होता.
नागपूर-मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका करताना तोल सुटला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका त्यांना सहन करावी लागतेय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय.
काय म्हणाले सावंत?
सावंत म्हणाले की, सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.
काय म्हणाले विखे-पाटील?
मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल, तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं जबाबदार लोकांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.
आघाडीमुळे आरक्षण गेले
विखे-पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना एवढे मोर्चे निघाले. मात्र, आपण आरक्षण टिकवले. हे आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले. समाजबांधवांनी संयम पाळावा. आता उपसमिती करण्यात आलीय. ती सर्वांच्या भावनांना अंतर्भुत करेल. सर्वांना न्याय देईल.
सावंतांचा मााफीनामा
वादग्रस्त वक्तव्यावर टीका होताना पाहून अखेर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माफी मागितली आहे. सावंत म्हणाले की, समाजातील पाळण्यातील मुलांपासून आजोबा पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो आहे. केवळ माफी मागून मी स्वस्थ बसणार नाही तर, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी अविरत प्रयत्न करत राहणार आहे.
ओघात बोललो
सावंत म्हणाले की,आमचा समाज मागासलेला आहे. जवळपास तासभर मी त्या कार्यक्रमात बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. ग्रामीण भाषेत ओघवत्या शैलीत मी बोलून गेलो आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.
श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज सकाळी ९ वाजता नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. सकाळी देवीला या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. नारायणराव कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. आज पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वाजाता महाआरती करण्यात येणार आहे. तसेच गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण करण्यात येईल. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जयश्री खाडीलकर, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर यांचीही विशेष उपस्थिती!
मुंबई-मागील ६३ वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे सर्वेसर्वा विजय पाध्ये उर्फ बाबा यांनी लिहिलेल्या ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये जाहिरात, अभिनय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत जयश्री खाडीलकर पांडे, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर आणि विवेक मेहेत्रेही मंचावर हजर होते. त्यासोबतच प्रेक्षागृहात विजय पाध्ये यांचे बंधू श्रीराम , दिलीप , प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, अतुल परचुरे, प्रसाद कांबळी, उदय धुरत, दिलीप जाधव, विजय गोखले, अनुराधा राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर, अनिल हर्डीकर, योगिता प्रभू, चंद्रकांत राऊत, अक्षर शेडगे, मनसेचे नितीन सरदेसाई, जयेंद्र साळगांवकर, रामदास पाध्ये, सत्यजीत पाध्ये अश्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चा प्रकाशन सोहळा हा जाहिरात क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विजय पाध्ये नामक यशस्वी उद्योजकाचा जणू कौतुक सोहळाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजय पाध्ये यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर यांनी मुलाखत घेत विजय पाध्ये यांचे अंतरंग उलगडण्याचा केलेला प्रयत्न उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. यावेळी प्रभावळकर म्हणाले की, जाहिरात क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान होऊनही माणुसकीचा धर्म न विसरलेल्या विजय पाध्ये यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. माझा खूप जुना मित्र असलेल्या विजयचे ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ हे पुस्तक यशस्वी जीवनाचा मंत्र सांगणारे आहे. मितभाषी असलेला विजय हा खरा जगमित्र आणि अजातशत्रू आहे. ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी खास पुण्याहून इथे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले विजयचे अनेक मित्र आहेत. या पुस्तकात त्या सर्वांचे किस्से आहेत. विजयचा जनसंपर्क अफाट असून, त्यातूनच त्याने या पुस्तकाचे लिखाण केले आहे. जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय कशाप्रकारे सचोटीने करायला हवा हे विजय पाध्ये यांनी मराठी माणसाला दाखवून दिले आहे. त्याच जोडीला विविध क्षेत्रांतील माणसे कशी जोडायची हेदेखील विजयने दाखवून दिल्याचे प्रभावळकर म्हणाले. या सोहळ्यात प्रभावळकरांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पाध्ये म्हणाले की, मृदू स्वभाव ही दादांची शिकवण तर आहेच, पण आपला स्वभावच मृदू आहे. माणसे जोडण्यासाठी समोरच्याचे ऐकायला हवे, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. व्यवसायात कित्येकदा तडजोडही करावी लागली. नेहमी समोरच्या व्यक्तीचा विचार करत असल्याने तडजोडीचा कधीच त्रास झाला नाही. समोरच्याचा इगो जपला, तर तो आपल्या प्रेमात पडतो. तांबे आरोग्य भुवनच्या बापू तांबेंनी व्यवसायात संयम शिकवला. दादांकडून खरे बोलायला, मावशीकडून व्यवहार सांभाळायला, मनोहर जोशींकडून वेळ पाळायला आणि विद्यालंकार क्लासेसच्या देशपांडे यांच्याकडून फायलींगसोबतच वेळेचे नियोजन करायला शिकलो. नंदी ब्रँड अगरबत्तीने जेव्हा बीवायपीला एक नवी ओळख मिळवून दिली, तेव्हा अमिन सयानींसारख्या दिग्गजांनीही कौतुक केले होते. या सर्व गोष्टीं सांगताना जाहिरातींमधील काही गिमिक्सही विजय पाध्ये यांनी उघड केली. जीवलग मित्र अभिनेते विनय आपटे यांच्यावर संकट कोसळल्यावर आपल्या संतापाचा विस्फोटही झाल्याचा किस्साही विजय पाध्ये यांनी सांगितला. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये स्विमिंग कधीच केले नसून कधीच भपकेदार कपडे घातले नसल्याचे सांगितले. विजय यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर पांडे म्हणाल्या की, पाध्ये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथच आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांचे वडील दादांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचे यश असल्याचेही खाडीलकर म्हणाल्या. अशोक समोळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, विजय यांनी लिहिलेले पुस्तक जगण्याचा फॅार्म्युला सांगणारे आहे. यासोबतच हे पुस्तक माणुसकीचा धर्म जपणाऱ्या व्यक्तींच्या ऐश्वर्याचे दर्शन घडवणारे असल्याचे अशोक समेळ म्हणाले. अॅडमॅन भरत दाभोळकर यांनी शाब्दिक फटकेबाजी करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ते म्हणाले की, बी. वाय. पाध्ये ही एकत्र कुटुंबावर चालणारी संस्था आहे. या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. हे केवळ पुस्तक नसून एक एनसायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी असल्याचे मतही दाभोळकर यांनी व्यक्त केले. अजित भुरे यांनी दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या आठवणीना उजाळा देताच सभागृहातील वातावरण काहीसे भावूक झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम बागेश्री पाध्ये पंडित यांनी केले.
कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत
लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोनजणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ‘३६ गुण’ चित्रपटभाष्य करतो. आजची पिढी त्यांची विचारधारा याचे अतिशय समर्पक चित्रण हा चित्रपट करतो. संतोष आणि पूर्वा यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फ़िल्म्स’ निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखील रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.
· २.५ लाख कोविड रिफंड्सचा पूर्ण बॅक लॉग यशस्वीपणे पूर्ण
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२२ – जागतिक महामारी व त्यानंतर कामकाज पूर्ववत होण्याच्या काळात कित्येक विमानवाहतूक कंपन्यांसाठी रिफंड्स ही मोठी समस्या झाल्याची दखल घेत एयर इंडियाने आज या बाबतीतील आपली क्षमता व कामगिरी उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
इतर सर्व विमान कंपन्यांप्रमाणे एयर इंडियालाही कोविड- १९ चा मोठा फटका बसला आणि दुर्देवाने कित्येक ग्राहकांच्या प्रवास योजनांवर त्याचा परिणाम झाला. ग्राहकांच्या अपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी उचलण्यात आलेल्या अनेक पावलांपैकी एक आणि खासगीकरणानंतरच्या वारसा समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एयर इंडियाने रिफंड्सची थकबाकी पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले.
प्रक्रिया आणि यंत्रणा सुधारण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून रिफंड केसेसचे वेगाने निराकरण करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात आले. आजमितीला एयर इंडियाच्या संकेतस्थळावरील पात्र रिफंड रिक्वेस्ट कंपनीद्वारे केवळ २-३ दिवसांत पूर्ण केली जाते.
बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीद्वारे या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कंपनीच्या नियंत्रणाखाली नसल्यामुळे ग्राहकाला त्याचा रिफंड मिळण्यासाठी (तिकिटाच्या विक्रीच्या अटीनुसार लागू होणारे शुल्क वजा करून) आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागू शकते. ट्रॅव्हल एजंटतर्फे बुकिंग केलेले असल्यास रिफंड त्यांच्याकडेच जमा होतो व त्याने तो प्रवाशापर्यंत वेळेत पोहोचवणे आवश्यक असते.
या घडामोडीविषयी एयर इंडियाचे प्रमुख ग्राहक अनुभव आणि ग्राउंड सर्व्हिसेस अधिकारी श्री. राजेश डोग्रा म्हणाले, ‘एयर इंडियामध्ये ग्राहकाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असते. प्रक्रिया करण्यात आलेल्या प्रलंबित रिफंड केसेसची विक्रमी संख्या कशाप्रकारे टीम्सनी एकत्र येऊन सर्वसमावेशक आणि प्रभावी पद्धतीने महत्त्वाची समस्या सोडवली याचे उदाहरण म्हणता येईल. कंपनीच्या रुपांतरणाचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या कामकाजात विशिष्ट आराखडा तयार करणार असून तो जगभरातील आघाडीची विमान कंपनी म्हणून उदयास येण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे.’
श्री. डोग्रा पुढे म्हणाले,‘एयर इंडियाकडे रिफंड प्रलंबित आहे अशांनी आमच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर www.airindia.in. ओल्ड पेंडिंग रिफंड लिंकवर क्लिक करावे. जुन्या रिफंड केसेससाठी ही लिंक खास तयार करण्यात आली आहे.’
विजय थोरात यांच्या शुभहस्ते झाली घटस्थापना पुणे : तळजाई माता की जय…जय माता दी… च्या जयघोषाने आणि देवीभक्तांच्या गर्दीने घटस्थापनेच्या दिवशी तळजाई मंदिराचा परिसर फुलून गेला. पुण्यातील ऐतिहासिक ४०० वर्षे जुन्या तळजाई मंदिरात नवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवाची सुरुवात विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना करुन झाली. फुलांची आकर्षक सजावट, रंगीबेरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई आणि देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता सकाळपासून भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. उत्सवकाळात मंदिरासमोर घालण्यात आलेल्या रंगावलीच्या पायघड्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. नऊ दिवस रोज सकाळी ७ वाजता अभिषेक होणार आहे. तर, दुपारी १२ वाजल्यापासून दिवसभर पुणे शहरातीलतसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. पुणे शहरातील विविध भागातील महिला या ठिकाणी श्री सुक्त पठण करणार आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, सन १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.
रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. येथील तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. दृष्टांताप्रमाणे ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पदमावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळ्यापासून आलेली माता म्हणून तिचे तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले.
तळजाईच्या कृपेने वैभवाचा काळ अनुभवलेल्या रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. परंतु कै. अप्पासाहेब थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई,पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आले. नवरात्रीच्या काळात अप्पांचा मुक्काम देवीच्या चरणापशीच असे. या काळात ते फक्त फलाहार घेत असत. मातेच्या सेवेतून प्रेरणा घेऊन अप्पांनी झुणका भाकरकेंद्राची योजना भारतात सर्वात प्रथम राबवली ती गोरगरीबांच्या सेवेच्या दृष्टिकोनातूनच, असेही अण्णा थोरात यांनी सांगितले.
पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचे सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला सपत्नीक अभिषेक देखील केला. तसेच सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्न्नेकरीता श्रीं कडे प्रार्थना केली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सकाळी १०.५० वाजता बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तमहाराजांची आरती केली. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. महावस्त्र, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कोविंद यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी ११.१५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नवरात्रीनिमित्त मंदिरात सुरु असलेल्या तयारीची कोविंद यांनी पाहणी करण्यासोबतच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अमिता अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा उत्सव पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. कमलपुष्प सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत. अॅड. एस.के. जैन यांनी सपत्नीक घटस्थापनेची पूजा मंदिरामध्ये केली. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली देवीच्या गाभा-यात फुलांची व विविध रंगी मखरांनी आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
घटस्थापनेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त कमलपुष्पांची प्रतिकृती मंदिराबाहेर व मंदिरामध्ये साकारण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात कमलपुष्पांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून विविधरंगी दिव्यांनी मंदिर उजळून निघाले आहे. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, महालक्ष्मी मंदिरात यंदा उत्सवांतर्गत धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सणोत्सवांवर बंधने आली होती. मात्र यंदा दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे, सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी केली असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजली आहेत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत.