Home Blog Page 1478

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर, 1000 वर्षे जुन्या शिया मशिदीला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर रवाना झाले आहेत. चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरून मोदी थेट इजिप्तची राजधानी कैरो गाठतील. द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

इजिप्तचे राष्ट्रपती, अब्देल फतेह एल सिसी, या वर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये 6 महिन्यांतील ही दुसरी बैठक असेल. मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 1000 वर्षे जुन्या शिया मस्जिद अल-हकीमलाही भेट देणार आहेत.

26 वर्षांनंतरचा महत्त्वाचा दौरा

  • इजिप्तचे भौगोलिक आणि सामरिक स्थान केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अनेक अर्थांनी खूप महत्त्वाचे आहे. 1997 नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान इजिप्तला भेट देत आहेत.
  • सौदी अरेबियाच्या वृत्तपत्र ‘द नॅशनल’शी बोलताना माजी राजनयिक अनिल त्रिगुनायत म्हणाले – मोदींच्या दौऱ्यातून भारत आणि इजिप्तमधील घनिष्ठ संबंध दिसून येतात. आतापर्यंत इजिप्तचे जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर गेले आहेत. अनिल लिबिया आणि जॉर्डनमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत.
  • अनिल म्हणतात- इजिप्त भारताला खूप महत्त्व देत आहे. हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इजिप्त भारतासाठीही महत्त्वाचा आहे. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही देशातील लोकांमध्ये खूप जवळचे नाते निर्माण झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून दोन्ही देश एका ना कोणत्या मार्गाने एकमेकांशी जोडले गेले आहेत. इजिप्त भारतासोबत संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापारावर भर देत आहे.
  • इजिप्त व्यतिरिक्त भारताने ओमान आणि यूएईला सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यावरून भारत या प्रदेशात किती वेगाने आपला प्रभाव वाढवत आहे हे कळते.

बायडेन यांनी मोदींना AI लिहिलेला टी-शर्ट गिफ्ट दिला

वॉशिंग्टन:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना AI लिहिलेला टी-शर्ट भेट दिला. त्यावर लिहिले आहे – The Future is AI म्हणजेच AI हे भविष्य आहे. यासोबतच त्याखाली अमेरिका आणि भारत असे इंग्रजीत लिहिले आहे.एक दिवसापूर्वी अमेरिकन संसदेत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, AI म्हणजे अमेरिका आणि भारत. म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी वाढवण्याची आमची वचनबद्धता आहे. गेल्या काही वर्षांत AI- आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बरीच प्रगती झाली आहे. तसेच, इतर एआय- यूएस आणि भारतात अधिक लक्षणीय घडामोडी घडल्या आहेत.बायडेन यांची ही भेट त्यांच्या भाषणाशी जोडली जात आहे. राष्ट्रपती बायडेन यांनी मोदींना हा टी-शर्ट भेट दिला तेव्हा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. या सर्वांनी शुक्रवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत हाय-टेक हँडशेक कार्यक्रमाला हजेरी लावली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन

पुणे:मान्सून सक्रिय झाला असून आज पुण्यात ,मुंबईत देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.पुण्यात पालखीचे आगमन समयी पावसाने अगदी अत्यल्प मिनिट अलगदच छिडकावा केला होता, त्यानंतर आज सकाळी पावसाने 10 ते 15 मिनिटे हलकासा वर्षाव केला.त्यानंतर दिवसभर अधून मधून पुण्यात पावसाच्या हलक्या सारी कोसळत होत्या .

दीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे आगमन झालं आहे. या पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती.बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी सुखावला आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळं आता कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली या भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे.

पुढच्या आठवड्यात आषाढी वारीचा सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. तसेच ठाणे,नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली.

‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!


सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास “ढ लेकाचा” या चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर येणार आहे.

आज या सिनेमाचं पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेलं हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डे त्याच्या चेहर्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना “ढ लेकाचा” चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. आषाडीच्या अगदी दोन दिवस अगोदर ‘ढ लेकाचा’ हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायासोबतच महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या प्रिय विठूयायचा हा प्रसादच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे दिग्दर्शित ‘ढ लेकाचा’ या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते, भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात बाल कलाकार आयुष उलागड्डे सोबतच अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

“ढ लेकाचा” चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वनी यातून पाहायला मिळणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ फिल्म फेस्टिवल’ने या चित्रपटामधील बालकलाकार आयुष उलागड्डेच्या उत्तम अभिनय कामगिरीची ओळख प्रेक्षकांना पुरस्कारामार्फत करून दिली आहे. दर्जेदार आणि उत्तम कथा यासारख्या वेगवेगळ्या पठडीतले आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ मार्फत “ढ लेकाचा” सारख्या दर्जेदार मराठी चित्रपटाची जादू प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येतील.

औंध कुटी रूग्णालय सुविधायुक्त करणार:आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – महापालिकेचे औंध कुटी रूग्णालय सर्व सोयीसुविधांनी युक्त करण्याचा निर्धार असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पाठपुरावा करेन, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर आढावा अधिकाऱ्यांसमवेत घेतला. या रुग्णालयाचा फायदा औंध परिसरातील गर्भवती महिला भगिनी घेतात. परंतु या रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसुतीची सोय नाही, तसेच रुग्णालयाची इमारत जुनी असून पावसाळ्यामध्ये गळती होते, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे, अशा त्रुटी या भेटीदरम्यान निदर्शनास आल्या, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या समस्यांबाबत लवकरच पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे महापालिका आरोग्य प्रमुखांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच या समस्या सोडवून औंध कुटी रुग्णालय सर्व सोयीसुविधायुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी रूग्णालय भेटीच्या वेळी दिले.

यावेळी बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, सागर मदने, सुप्रीम चोंधे, सुशील लोणकर आदी उपस्थित होते.

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. 23: आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिली.

आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मांडविया बोलत होते.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जनऔषधी केंद्र अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे. जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटीकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे. त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी सांगितले.

राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे. संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल .

ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत. गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्यमान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी ‘प्रोत्साहन निधी ‘ देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.

प्रिया बेर्डे नंतर सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीला रामराम

BRS मध्ये प्रवेश

पुणे: लोकप्रिय नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत BRS पक्षात प्रवेश केला आहे.

सुरेखा पुणेकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता सुरेखा यांनीही पक्ष सोडत थेट हैदराबाद येथील BRS पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी गुरूवारी (ता. २२ जून) पक्षप्रवेश केला

सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेकर या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात किती फरक पडणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार – चंद्रशेखर बावनकुळे

  • चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर टोला
    • पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एक
    • मोदींनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला

पुणे – विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही.एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

पैशापासून सत्ता व सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे.म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत.अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही.आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही,असेही बावनकुळे म्हणाले.

विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीए ४०० हून अधिका जागांवर विजय मिळविणार ऐवढी ताकद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे.भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आजसुद्धा नरेंद्र मोदी अमेरिकेत भारताला मांडत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या तक्रारीची चौकशी व्हावी महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की, तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा महानाट्य ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहे. म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा,अशी मागणी पुढे आली आहे.राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत.त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील

होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी जपानला रवाना

स्पोर्ट्सलँड सुगो (जपान)23 जून २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत केलेल्या कौशल्य प्रदर्शनानंतर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची (एचएमएसआय) इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या वीकेंडला तिसऱ्या फेरीसाठी सज्ज झाली आहे. स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे होणार असलेल्या या फेरीत दिमाखदार कामगिरी करण्यासाठी टीम उत्सुक आहे.

रेसिंगचा सीझन ऐन मध्यावर असून होंडा रेसिंग इंडियाने २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या फेरीच्या अखेरीस (एआरआरसी) एकूण ११ पॉइंट्स मिळवले असून एशिया प्रॉडक्शन २५० सीसीमध्ये (AP250cc) आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी टीम सज्ज आहे.

आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, जपानमध्ये होत असलेल्या एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी आम्ही सज्ज आहोत. मला खात्री आहेकी इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या फेरीत कठोर परिश्रम करत आपले स्थान उंचावेल. स्पोर्ट्ललँड सुगो इंटरनॅशनल सर्किट आमच्या रायडर्ससाठी नवे असलेतरी अविरत प्रयत्न करत टीम नक्की चांगले यश मिळवेल. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या आणि या प्रतिष्ठित चॅम्पियनशीपमध्ये ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रायडर्सना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. या वीकेंडला जपानमध्ये त्यांची दमदार कामगिरी पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

एशिया प्रॉडक्शन (AP250) क्लासमध्ये एआरआरसी चार्जचे नेतृत्व आणि रेसिंग कौशल्याचे जबरदस्त प्रदर्शन अशी दुहेरी जबाबदारी कविन समर क्विंतल यांनी निभावली. २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत AP250cc मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ते भारतीय टीममधले एकमेव रायडर आहेत. दुसऱ्या रेसमध्येही प्रगती करण्यासाठी कविन सज्ज होते, मात्र दुसऱ्या लॅपमध्ये बाइकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. असे असूनही सेपांग इंटरनॅशनल सर्किटच्या दुसऱ्या फेरीत त्यांनी २ पॉइंट्स मिळवत संपूर्ण चॅम्पियनशीपच्या पहिल्या १५ मध्ये आपले स्थान राखले.

चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीविषयी उत्सुकता दाखवत कविन समार क्विंतल म्हणाले, ‘एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी मी खूप उत्सुक आहे. स्पर्धा आणखी तीव्र असून प्रसिद्ध स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग आव्हानाला तोंड देण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम केले असून कौशल्य उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यापूर्वी केलेल्या चुका टाळण्यावर माझा भर असेल. या वीकेंडला सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.’

दर्देवाने देशांतर्गत होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मोहसिन परांम्बेन जपानमधील फेरीत सहभागी होणार नाहीत. ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.

२०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपविषयी (एआरआरसी)

एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनीपची २६ वी आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून तिचे आयोजन केले जात आहे. २०२३ च्या हंगामात एकूण सहा फेऱ्या असून अधिकृत चाचणी आणि २४ मार्च २०२३ रोजी चँग इंटरनॅशनल सर्किट थायलंड येथे सीझन ओपनरचे आयोजन करण्यात आले होते. सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया) येथे दुसरा टप्पा होणार आहे. या वीकेंडला तिसरी फेरी स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे होणार असून चौथी, पाचवी व सहावी फेरी अनुक्रमे ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये इंडोनेशिया, चीन व थायलंडमध्ये होईल.

अमेरिकास्थित शेंदूरे परिवाराकडून विद्यार्थी सहाय्यक समितीला साडेतीन लाख डॉलर्सची देणगी

पुणे, ता. २३ : अमेरिकेतील सौ. रजनी व अशोक शेंदुरे परिवाराने विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पुण्यातील मुलींच्या वसतिगृहासाठी साडेतीन लाख डॉलर्सची (सुमारे २ कोटी ८० लाख रुपये) देणगी नुकतीच जाहीर केली. ग्रामीण भागातील मुलींची पुण्यात उच्च शिक्षणाला येण्यासाठी संख्या वाढते आहे. परवडणारा दर आणि सुरक्षितता यादृष्टीने त्यांचा समितीकडे कल असतो. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रवेशाला अडचणी येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीने शिवाजी हौसिंग सोसायटी जवळील जागेत मुलींसाठी नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरु केले आहे.
या वसतिगृहाच्या एका विंगसाठी ही देणगी देण्यात आली. त्यातून ८४ मुलींच्या निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेंदुरे परिवार मूळचे कोल्हापूरजवळील असून पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहेत. महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव काही महिन्यांपूर्वी पुण्यात आल्यावर समितीचे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी या विधायक कामाला आर्थिक मदत उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. अमेरिकेत गेल्यावर शेंदुरे परिवाराशी समितीच्या कामाबाबत चर्चा करून या देणगीबाबत विनंती केली. त्यांच्या आणि समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांच्या पाठपुराव्यामुळे या मुलींच्या वसतिगृहाच्या कामासाठी मोठा आर्थिक हातभार लाभला आहे.

उलगडली ‘आयकॉनिक ‘ इमारतींची निर्माण कथा !

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धांतील  राष्ट्रीय विजेत्यांचा संवाद
 पुणे :
शहराचे वैभव ठरणाऱ्या ‘ आयकॉनिक ‘ इमारती तयार होताना त्या मागे असणारी वास्तुरेखाकाराची दृष्टी, योगदान, कष्ट याची निर्माण कथा शुक्रवारी उलगडली.. निमित्त होते ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् ‘ संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे .. 
सार्वजनिक उपयोजन असलेल्या महत्वपूर्ण सरकारी इमारतींना सुंदर रुपडे देताना काय करावे लागते, याचा रोचक प्रवास त्यातून उलगडला.. ! या स्पर्धा आर्किटेक्ट टीमला अद्ययावत ठेवते, त्यामुळे सहभाग घेत राहावे, हार -जीत न मानता नव्या गोष्टी शिकत राहावे, असा सूर या चर्चासत्रात उमटला.
‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज’या संस्थेतर्फे ‘आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन्स -पुशिंग द एज इन आर्किटेक्चर प्रोफेशन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.  सुनील पाटील (संचालक सुनील पाटील अँड असोसिएट्स),कल्पक भंडारी( संचालक, विकास स्टुडिओ), विजय साने (पार्टनर, व्ही.के.: यु ,अर्बन) हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले. राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन मधील विजेते असलेल्या या मान्यवरां  त्यांचे अनुभव आणि विचार या चर्चासत्रात मांडले.
२३ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान  सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या  सुमंत मुळगावकर सभागृह येथे हे चर्चासत्र झाले .आर्किटेक्चर चे विद्यार्थी,आर्किटेक्ट व्यावसायिक,तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी झाले. ‘ अनबिल्ट ‘ या पुस्तकाची माहिती चर्चासत्रात देण्यात आली.
अतुल चव्हाण म्हणाले, ‘सामान्य जनतेच्या संबंधित सरकारी इमारती आल्हाददायक , उपयुक्त , पर्यावरणपूरक व्हाव्यात, चांगल्या वास्तू उभारण्यात आर्किटेक्ट समुदायाचे योगदान मिळावे. ‘
सातारा नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याची माहिती कल्पक भंडारी यांनी दिली.  सुनील पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आराखड्याचे सादरीकरण केले.विजय साने यांनी कटरा (जम्मू ) येथील इंटरमोडल स्टेशन इमारतीच्या आराखडयाचे सादरीकरण केले.

द्वैपायन चक्रवर्ति यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास भंडारी,ह्रषिकेश कुलकर्णी , आर्किटेक्ट असोसिएशनचे  पराग लकडे , अमोल उंबरजे,  विजय साने,   विशाल देशमुख, दीपा बोकील आदी उपस्थित होते.

‘सस्टेनॅबिलिटी  इनिशिएटिव्हज’  ही संस्था आर्किटेक्चर क्षेत्रातील व्ही.के. ग्रुप या कंपनीचा  एक उपक्रम आहे. व्ही.के. ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोल्डन डायलॉग ही चर्चासत्रांची मालिका आखण्यात आली असून हे चर्चासत्र या मालिकेतील तिसरे चर्चासत्र होते. 

सुनील पाटील म्हणाले, ‘ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची उभारणी करताना शंभरहून अधिक झाडे वाचविणे हे आव्हान होते. नैसर्गिक उजेड, हवा खेळती राहील, कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना थांबायला जागा मिळेल, वाहनांना चांगली जागा मिळेल याचा विचार केला. सरकारी यंत्रणेला आपण चांगल्या संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितल्या तर त्या स्वीकारल्या जातात, असा अनुभव या प्रकल्पातून आला.  सरकारी काम करताना संयम ठेवावा लागतो. या दरम्यान अधिकारी बदलतात, सरकारे बदलतात, ब्रीफ बदलतात. पण, आपण आपल्या संकल्पनांवर ठाम राहावे लागते. कारण, या इमारती दशकानुदशके समाजाकडून उपयोगात येतात. एक योगदान म्हणून आर्किटेक्ट मंडळींनी याकडे पाहावे. ‘
‘क्लायंट ब्रीफ देतात  तेव्हा त्यातील आशय लक्षात घ्यावा लागतो, दोन ओळींच्या मध्ये न लिहिलेला आशय समजून घेणे आवश्यक असते ‘, असे विजय साने यांनी सांगीतले.
‘कटराला रोज ५० हजार भाविक भेट देतात. त्यांना बस, रेल्वे, हेलिकॉप्टर, कार, रोपवे सहित राहण्याची सुविधा असणारा परिसर उभारायचा होता. २५ एकर जागेत जागतिक दर्जाच्या या सेंटरची उभारणी करण्यात यश आले ‘, असे विजय साने यांनी सांगितले.

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी  आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकूण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोलीनिहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा  1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे  योजनेमध्ये नमूद  आहे.

औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही,  याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमूद  आहेत.

धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतून साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजिटल अनावरण लवकरच होणार आहे.

या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची  प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे,  रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची  महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.

धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमूद  केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमूद  केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.

निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकीय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधितांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येऊन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतूने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतून या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा वाटा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि२३ भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे. मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा,मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर,महाविद्यालयचे प्राचार्य,प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले,
स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातले बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून रहावे लागत नाही. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगार संधी,नवीन संशोधन याचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी,समानता, समावेशकता आणि नाविन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल,कला, सायन्स, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊन शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रील प्रशिक्षण सुद्धा घेता येईल.हे या शैक्षणिक धोरणाचे महत्वपुर्ण वैशिष्टे आहे.
या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

सुशोभीकरण म्हणजे पुण्याचा विकास नव्हे,शिवाजीनगर भागासाठी एकही सुसज्ज इस्पितळ नाही

पुणे- शिवाजीनगर भागामध्ये महानगरपालिका, विद्यापीठ, अभियांत्रिकी कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत. परंतु या सर्व ठिकाणी नुसताच सुशोभीकरणाचा धडाका चालू आहे. सुशोभिकरण म्हणजे विकास नव्हे.उड्डाणपूल पाडले जात आहेत. मेट्रोचे खांब उभे होत आहेत. नदी रुंदी कमी केली जात आहे. परंतु जनसामान्याचा मुख्यत्वे गोखले नगर जनवाडी वैदुवाडी या भागाचा विकास हा थांबलेला आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला. गुरुवार दिनांक 22 रोजी गोखलेनगर भागातील कुसाळकर चौकामध्ये आम आदमी पार्टीतर्फे स्वराज्य संवाद सभा घेण्यात आली, त्यावेळेस ते बोलत होते

प्रभात ७ आणि १४ मधील निम्मे नगरसेवक गायब आहेत आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. गेले दीड वर्ष प्रशासनाचा कारभार असल्यामुळे तिथे बंद पडलेली ई टॉयलेट, अनेक वर्षे बांधकाम चालू असलेले भाभा हॉस्पिटल, सतत वाहतूक कोंडी झालेला फर्ग्युसन रोड आहे. या भागात एकही सुसज्ज इस्पितळ नाही. त्यावर कोणीही बोलत नाही अशी टीका सनी मुरुडकर यांनी केली. या सर्वच पक्षांच्या बेफिकिरी मुळे आणि बेताल कार्यपद्धतीमुळे आता आम आदमी पार्टी हाच एकमेव पर्याय उरला आहे असं अभिमान विटकर यांनी म्हटले.
शंकर थोरात यांनी मेट्रो डी पी प्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप केला.

दिल्ली आणि त्यानंतर पंजाब मध्ये उत्तम मोहल्ला क्लिनिक उभे करून आणि जगमान्य शाळा उभ्या करून आम आदमी पार्टीने एक आदर्श घालून दिला आहे आणि हे मूलभूत मुद्दे प्रथमच राजकीय मुद्दे बनले आहेत असे डॉक्टर अभिजीत मोरे यांनी सांगितले.
निलेश वांजळे यांनी सूत्र संचालन केले.
यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच आपचे अजित फाटके पाटील,सतीश यादव, शंकर थोरात विकास लोंढे, नाज शेख , अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं तुळजाभवानी चरणी साकडं.

तुळजापूर, दि. २३ जून २०२३
राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन काँग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धाराशिव व सोलापूरच्या दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यासमोर सर्वबाजूंनी संकटं उभी आहेत पण भाजपाचे हे सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचतच नाही. शेतकरी विरोधी भाजपाला पावसाळी अधिवेशनात जाब विचारू. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे, तसेच लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. मोठ्या संघर्षानंतर, काँग्रेस विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आज देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान धोक्यात आहे. मणिपूर ५० दिवसांपासून पेटलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिकेत भाषणे देत आहेत. देशावरचे भाजपाचे हे संकट दूर झाले पाहिजे व स्वातंत्र्याचा सूर्य कायम राहिला पाहिजे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा ईडी, सीडी, सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील आजचे राजकीय चित्र अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी भाजपा मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे. परंतु काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेचीच इच्छा असून जनसमर्थन व आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने केंद्रात व राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल.

भाजपच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीचे नाही.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीवर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पोपट काहीही बोलला की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, त्यांचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचेही नाही. ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना जर लोकशाही मान्य असती तर नवीन संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असते असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.