Home Blog Page 1453

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

पुणे दि. २०: पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’, अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित ‘मैं भारत हॅुं’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली.  राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले. 

चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख

पुणे-आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी सदैव खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष महेश लांडगे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते शंकर जगताप, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, आ. उमाताई खापरे, माजी महापौर माई ढोरे यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, “लक्ष्मण जगताप हे जनमानसात अतिशय लोकप्रिय होते. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र तरीही गाफिल न राहता, पक्षाने ‘थिंक इन अँडव्हान्स थिंक इन डिटेल’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने काम सुरू केले आहे.”

पाटील पुढे म्हणाले की, “चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समिती स्थापन केल्या असून, त्यात संघटनात्मक कामांसाठी ‌पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या नेतृत्वात एक समिती काम करेल. तसेच पोटनिवडणुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक प्रमुख म्हणून बापू काटे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नामदेव ढाके हे त्यांना साहाय्यक म्हणून काम करतील. त्यासोबतच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक राजकीय समिती स्थापन केली असून, महेशदादांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील.

ते पुढे म्हणाले की, लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर ही भाऊंच्या कुटुंबावर सर्वांचे प्रेम कायम आहे. शंकरभाऊ आणि वहिनीं यांनीही इथल्या जनतेसोबतचं आपलं नातं अतुट ठेवलं आहे. भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी खंबीर उभा आहे‌. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाची कार्यसमिती निश्चित करते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळामार्फत  वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे.  या योजनेची कर्ज मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत प्रसिद्धीद्वारे देण्यात आली आहे.

मराठा प्रवर्ग व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे  उभारण्याकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR-I) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता वयोमर्यादा कमाल ६० वर्षे आहे.  या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५  लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा व व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी  उद्योगाच्या दृष्टीने बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे.

तसेच, गट कर्ज व्याज परतावा (R-II) योजने अंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटास कर्ज देण्यात येते. दोन व्यक्तीसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, किंवा तीन व्यक्तीसाठी रु. ३५ लाखाच्या,  चार व्यक्तीसाठी रु. ४५ लाखाच्या किंवा पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत १२ टक्के व्याज किंवा रु १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

या योजनेमध्ये FPO गटांनी त्याच्या  शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.

महामंडळाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा हे महामंडळ नियमानुसार करीत आहे. सदर योजनांची अंमलबजावणी २ फेब्रुवारी, २०१८ पासून सुरु करण्यात आली असून, सद्यस्थितीत कालानुरूप व लाभार्थीभिमुख अनेक बदल योजनामध्ये केलेले आहेत.

‘पठाण’ : 25 सिंगल स्क्रीन पुन्हा सुरू,कोविड पासून होते बंद …

शाहरुख म्हणाला – तुम्हा सर्वांना आणि मला यश मिळो

पठाण चित्रपटासोबतच 25 सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलही पुन्हा सुरू झाले आहेत, जे कोविडच्या काळात काही कारणास्तव बंद पडले होते. यावर आनंद व्यक्त करत शाहरुखने सोशल मीडियावर ट्विट करत त्या सर्व सिंगल स्क्रीन्सना शुभेच्छा दिल्या आहेत.सोबत त्याने २५ सिंगल स्क्रीन ची नावे दिली आहेत . शाहरुखने लिहिले, ‘लहानपणी मी सर्व सिनेमे सिंगल स्क्रीनवर पाहिले आहेत. त्यांची स्वतःची मजा आहे. तुम्हा सर्वांना आणि मला यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. रिओपनिंगबद्दल अभिनंदन.

‘पठाण’ सिनेमागृहातील गर्दीचा व्हिडीओ शेअर करून जीतेंद्र आव्हाडांनी केला सवाल ….

मुंबई- शाहरुख खानच्या ‘पठाण ‘ या सिनेमाची अलीकडच्या काळात खूपच चर्चा झाली आणि त्यामुळे प्रसिद्धीही झाली , अनेक ठिकाणी या चित्रपटाला सातत्याने विविध स्तरावरून विरोधाच्या चर्चा झडल्या . आज हा सिनेमा प्रदाशित झाला आणि या चित्रपटाचे दर्शक सिनेमागृहात दाखविणारा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट र वर शेअर करत सवाल केला आहे.

पठाण” पाहणारे कुठल्या जाती धर्माचे आहेत हे कळतय का? हा माझा “भारत”आहे…. प्रेमाच्या धाग्यानी विणलेला द्वेशाची तलवार चालवली तरी वीण सैल ही होत नाही तुटणे तर लांबचे … मी भारतीय आहे कृपया सर्टिफिकेट विचारू नका.. असे या ट्वीट मध्ये आवदांनी म्हटले आहे .

या मध्ये त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ आणि त्यात सिनेमागृहात दिसणारी गर्दी लक्षणीय तर आहेच पण अचंबित करणारी देखील आहे.

पठाण :’KGF-2’चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडत दाखल

शाहरुखवर वरचढ जॉन अब्राहमची अ‍ॅक्शन

बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठान’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही ‘पठाण’ने ‘KGF-2’चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडित काढला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाला अनेक ठिकाणी निषेधही होतोय.

  • चित्रपट – पठाण
  • वेळ – 146 मिनिटे
  • दिग्दर्शक– सिद्धार्थ आनंद
  • कलाकार– शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा

चित्रपटाची कथा:
चित्रपटाची कथा आहे एका माजी भारतीय एजंटची, ज्याचे नाव आहे जिम. त्याच्या कुटुंबाला त्याच्या डोळ्यांदेखत मारण्यात येते. कारण भारत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही. जिम मारला गेला, असे गृहीत धरून भारत सरकार त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करते. पण जिम जिवंत असतो. काही काळानंतर, आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जिम पाकिस्तानशी हातमिळवणी करतो आणि भारताविरोधात लढण्यासाठी बायोलॉजिकल शस्त्र तयार करतो.

भारताकडून जिमला रोखण्यासाठी पठाण आणि त्याची टीम सज्ज असते. मिशनदरम्यान पठाण डॉ. रुबिना खानला भेटतो, ज्यामुळे पठाणचे मिशन अधिक कठीण होते. आता पठाण बलाढ्य जिमला कसे अडवणार? तो त्याला रोखू शकणार की नाही? हीच या चित्रपटाची कथा आहे.

स्टार्सचा अभिनय :
पठाणच्या भूमिकेत शाहरुख खान शोभून दिसतोय. त्याला अभिनयाला तोड नाही. शाहरुखने आपल्या अ‍ॅक्शन सीनने सर्वांना इम्प्रेस केले आहे. दीपिका पदुकोणचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, पण तिच्या वाट्याला दमदार संवाद आलेले नाहीत. तिला पाकिस्तानी डॉक्टर ते आयएसआय एजंटची भूमिका देण्यात आली आहे. पण तिच्या भूमिकेला पाकिस्तानी टच दिसत नाही. शिवाय तिच्या पाकिस्तानी एक्सेंटकडेही लक्ष देण्यात आलेले नाही.

डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेला चोख न्याय दिला आहे. इथे उत्तम भूमिका जॉन अब्राहमची आहे. इंटेंस लूक आणि दमदार संवाद जॉनच्या पात्राला देण्यात आले आहेत. जॉनचे पात्र जेव्हा-जेव्हा आले, तेव्हा ते शाहरुखवर भारी पडलेले दिसले. त्याची अॅक्शन शाहरुखवर वरचढ ठरलेली दिसते. चित्रपटातील जॉनची डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम आहे.

दिग्दर्शन, पटकथा
दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. सगळी दृश्ये छान मांडली आहेत. पटकथेच्या बाबतीत हा चित्रपट उत्कृष्ट बनवला गेला आहे, त्यात उणीवा शोधणे कठीण आहे.

संगीत :
पठाणचे पार्श्वसंगीत अगदी फ्रेश आहे. संगीताचा अतिवापर केलेला नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. पठाणचे अँथम काही ठिकाणीच वापरले गेले आहे. प्रत्येक दृश्यासाठी नवीन संगीत, प्रत्येक सीन फ्रेश बनवते.

VFX आणि स्पेशल इफेक्ट्स
अ‍ॅक्शन सीन्समधील उच्च दर्जाचे VFX तुम्हाला तुमच्या जागेवर खिळवून ठेवतात. सीन्स खोटे आहेत, असे तुम्हाला कुठेही वाटणार नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. अ‍ॅक्शन सीन्स लक्ष वेधून घेणारे आहेत.

सलमान येथे काही मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसतो, जो संथ चित्रपटाचा वेग वाढवतो. इथे सलमान टायगर बनून मित्र पठाणला मदत करतो. इथे आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही कथा मिशनपासून सुरू झाली आणि मिशनवरच संपते. संपूर्ण चित्रपटात एकच गाणे आहे आणि ते म्हणजे बेशरम रंग. याशिवाय चित्रपट संपल्यानंतर दुसरे गाणे पाहायला मिळते.

कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख अचानक बदलली:आता 26 फेब्रुवारीला होणार मतदान; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे-

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात पुण्यात होत असलेल्या निवडणूका केंद्रस्थानी आहेत. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. तेव्हापासून या दोन्ही निवडणूका बिनविरोध व्हाव्या यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाविकास आघाडीतही जोरदार खलबत सुरु आहेत.

26 फेब्रुवारीला मतदान होईल

निवडणूक आयोगाने याआधी 27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 2 मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित केली होती. मात्र बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे 2 मार्च रोजीच जाहीर होईल.

भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि.२५ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे आयोजित एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्राचे उद्धाटन राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे सह संचालक शरद यादव, अधीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात प्रशासन वाक्यप्रयोग, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, वाणिज्य शास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान व तर्कशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, भुगोलशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, भाषा विज्ञान व वाड्मय विद्या, धातुशास्त्र परिभाषा कोश आदी पुस्तके मांडण्यात आली होती.

‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात

मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. पिकोलो या आगामी मराठी चित्रपटाच्या ‘संगीतमय’ चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे पिकोलो चित्रपट.  फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित पिकोलो चित्रपटाची निर्मिती  राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.

पिकोलो संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर  मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे पिकोलो मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव,  रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करीत आहे.

येत्या २६ जानेवारीला पिकोलो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील ‘गणेश जन्म ; सोहळा ..हा असा रंगला ..

सुवर्णपाळण्यात मंगल स्वरांच्या नादघोषात दगडूशेठ मंदिरात गणेशजन्म सोहळा

पुणे : श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा… पाळण्याचा मधोमध याला ग निजवा… अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी  क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे  यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी श्रीं चरणी केली.
यावेळी शारदा गोडसे, मृणालिनी रासने,  ज्योती सूर्यवंशी, तृप्ती चव्हाण, संगीता रासने, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना भालेराव, डॉ. अनघा राजवाडे, प्रेरणा देशपांडे, चित्रा जोशी, रत्ना  नामजोशी, मानसी गिजरे यांसह इतर महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व  गणपतीचा गजर केला. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपाळणा साकारण्यात आला.  सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग, मधोमध विसावला,माझा गणराज ग…असे म्हणत यंदाचा जन्मोत्सव सुवर्णपाळण्यात झाला. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टॅड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.
बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. सकाळी ७ वाजता गणेशयाग, दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तने झाली.
सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बंड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रामेश्वर चौक- टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – नू.म.वि. प्रशाला अप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

‘पटलं तर घ्या विथ जयंती’ मधून होणार आपल्या आवडत्या कलाकारांची पोलखोल !

प्लॅनेट मराठीच्या नव्या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो. वाचतो. मात्र त्यांच्या आयुष्यात असेही काही किस्से असतात, जे अजूनही त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचलेले नसतात. कलाकारांच्या अशाच अनेक गोष्टी, किस्से, रहस्यं प्लॅनेट मराठी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. लवकरच एक नवा शो आपल्या भेटीला येणार असून ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ असं या शोचं नाव आहे. यात सेलिब्रेटींसोबत दिलखुलास गप्पा, काही न ऐकलेले किस्से, मजेशीर खेळ यांसारख्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेक्षकांना ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा शो प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर विनामूल्य पाहता येईल.

या शोचा हा पहिला सिझन असून या सिझनमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’चा पहिला एपिसोड येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून दर शुक्रवारी या शोचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील. पहिल्या एपिसोडमध्ये अभिजीत पानसे आणि तेजस्विनी पंडित आपल्या भेटीस येणार आहेत. तर पुढील एपिसोड्समध्ये अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, ओम राऊत, प्राजक्ता माळी, यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत गप्पा रंगणार आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. चित्रपट, वेबसीरिज सोबतच यावर्षी अनेक फिक्शनल, नॅान फिक्शनल शोज, टॅाक शोज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा त्याचाच एक भाग आहे. या शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळणार आहेत.’’

या शोचे सुत्रसंचालन जयंती वाघधरे करणार असून त्या म्हणतात, “गेल्या १२ वर्षांपासून मी मनोरंजन क्षेत्रात पत्रकार म्हणून काम केलं आहे. अनेक मराठीतील, बॅलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं, की स्वतःच्या नावावर त्याचा एक शो असावा आणि ही संधी मला प्लॅनेट मराठीवरील या शोच्या माध्यमातून मिळाली. दर शुक्रवारी प्लॅनेट मराठीच्या ओटीटी ॲपवर ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या शोमधून मी तुमच्या भेटीस येणार आहे.”

आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ.

या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळणार आहे.

निर्माते आनंद एल. राय म्हणतात, ‘’पुन्हा एक मराठी सिनेमा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच २०२१ मधील बॅाक्स ॲाफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला ज्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि म्हणूनच आम्ही ‘झिम्मा २’ आणण्यास चलचित्र मंडळींना पाठिंबा दिला. क्षिती आणि हेमंत सोबत काम करण्यात आनंद आहे.’’

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’ ‘झिम्मा’वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.’’

महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ; येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

विधान भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा या अभियानाचे मुख्य प्रवर्तक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोविड संकटाच्या काळात अडीच वर्ष राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. राज्याच्या एकूण १३ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याआधारे यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या अभियानांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.

कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे खूनच:4 चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले

पुणे- जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळले होते . संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. 3 चिमुरड्यासह 7 जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या केली व नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ),प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत.

मोहन पवार यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय 20) हा त्यांच्याच समाजातील महिलेसह 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळून गेला होता. त्यानंतर हे भयानक हत्याकांड घडले. त्यामुळे सुरुवातीला पवार कुुटुंबातील 7 जणांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मोहन पवार यांच्या चुलत भावांनीच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.

 तीन वर्षांचा एक मुलगा असलेल्या व पतीपासून विभक्त राहत असलेल्या विवाहितेस पळवून नेल्याने समाजात बदनामी होईल व कुटुंबाची प्रतिष्ठा लयास जाईल म्हणून मोहन पवार यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. चार मृतदेहाचे शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3), यांचे मृतदेह मंगळवारी भीमा नदीत आढळली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते.

गणेश जयंती:दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, पद्मश्री उस्मान खान यांचे  सतारवादन संपन्न

पुणे -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्री चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे तीन वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला.

स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे.

मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार आहे. यंदा सुवर्णपाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. पाळण्याकरीता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर 8.5 किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे.

या स्टँडवर 16 बाय 24 इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, सायंकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे.

मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फेकरण्यात आले आहे .