प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने जाधवर करंडक स्पर्धा
पुणे : न-हे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय हे जाधवर करंडक २०२३ चे मानकरी ठरले. यामध्ये वत्कृत्व, निबंध, भारुड आणि वादविवाद अशी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते.
पथनाटय स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिंहगड कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, तृतीय क्रमांक कलावती महाविद्यालय पुणे व उत्तेजनार्थ क्रमांक स.प.महाविद्यालय पुणे यांनी पारितोषिक पटकाविली. वादविवाद स्पर्धेत अमृता वाघमारे, प्रतिक्षा ओंजळे यांनी प्रथम, तेजस पाटील व चैतन्य बनकर यांनी द्वितीय, संकेत पाटील व चारुदत्त माळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर, ओमहरी जाधव व रोहन चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
वत्कृत्व स्पर्धेत संकेत पाटील याने प्रथम, तेजस पाटील द्वितीय, रोहन कवडे हिने तृतीत क्रमांक आणि साक्षी बागुल हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. भारुड, पोवाडा, भजन स्पर्धेत श्रेयस साळवी, स्वामिनी खैरे, प्रगती शेवाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. तर, ॠषिराज उपाध्ये याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, युवा शक्तीला योग्य गती व दिशा देण्यासोबतच त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व, भारुड, वादविवाद, पथनाटय या प्रकारांत ही दोन दिवसीय स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला रोख पारितोषिके व चषक प्रदान करण्यात आला.
श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकाविला जाधवर करंडक
वीजयंत्रणा धोकादायक असल्याचे कळविण्यासाठी सातारा, सोलापूरच्या व्हॉटस् अॅप क्रमांकात बदल
पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२३: पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामध्ये सोलापूर व सातारा जिल्ह्यासाठी पूर्वीच्या व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांकात बदल झाला आहे. धोकादायक वीजयंत्रणेची माहिती देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी ९०२९१४०४५५ हा तर सातारा जिल्ह्यासाठी ९०२९१६८५५४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
२८वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ पासून
पुणे, दि.२२ नोव्हेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर ते गुरूवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २८वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी बंगलूर येथील पब्लिक युनिव्हर्सिटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा.गोविंदन रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती व जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित असतील.
गुरूवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. व्याख्यानमालेचा समारोप समारंभ होईल. केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच पद्मभूषण प्रा.डॉ. दीपक धर व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दुपारी ४.०० वाजता होणार्या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा.डॉ. रामचरण (विश्व शांतीसाठी नेतृत्व) व डॉ. डी.के. हरी व डॉ. हेमा हरी (ज्ञान आणि जल, शांततेसाठी उत्प्रेरक), प्रसिद्ध चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री (दी रियल स्टोरी ऑफ इंडिया, इंडडिपेंडन्ट अॅण्ड वर्ल्ड पीस), युनेस्को चेअर फॉर पीसचे डॉ. प्रियंकर उपाध्याय (जागतिक परिवर्तनासाठी शांतीचे शिक्षण), हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ ह्यमून एक्सलन्सचे संचालक स्वामी बोधमायानंद (भारतीय ज्ञान प्रणाली) आणि सुरभी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ काक (सुरभी द्वारे भारताची कल्पना) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, योगाचार्य डॉ ज्ञानेश्वर विद्याअलंकार, दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरचे विश्वस्त महेश सुर्यवंशी, इन्स्टीट्यूट ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजेन्टचे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ.मुकेश शर्मा, महाभारतातील युधिष्ठिराची भूमिका साकारणारे डॉ. गजेन्द्र चौहान, डॉ. मुकुंद गोखले, डॉ. महेश थोरवे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. धनंजय गोखले, डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. रोहिणीताई पटवर्धन, विद्यावाचस्पती ह.भ.प. प्रा.डॉ. यशोधन महाराज साखरे, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, सर्फराज अहमद आणि नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन स्कूल ऑफ योग अँड मेडिटेशन चे विभाग प्रमुख प्रा. निरंजन खैरे व क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, २८ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे प्रमुख समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे आणि डॉ. महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
ही व्याख्यानमाला माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.
शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूर हीच बॉलिवुड पदार्पण
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्युरी प्रमुख शेखर कपूर यांनी महोत्सवाच्या सुरुवातीच्या रेड कार्पेट वर स्वतःची वेगळीच छाप निर्माण केली आहे. या रेड कार्पेट वर शेखर कपूर यांच्या सोबत त्यांची मुलगी कावेरी देखील दिसली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. या दोघांच्या एकत्रित दिसण्याने ती आता बॉलिवुड मध्ये प्रवेश करणार का ? असा प्रश्न पडला आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि गायिका/अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्थ यांची प्रतिभावान कन्या कावेरी कपूर हिच्या बहुप्रतीक्षित पदार्पणाच्या बॉलीवूड मध्ये अफवा होत आहेत. अभिनय आणि गायन या दोन्ही गोष्टींमध्ये काटेकोरपणे प्रशिक्षण घेतलेली कावेरी ही इंडस्ट्रीतील लोकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. ती आगामी बॉलीवूड प्रॉडक्शनमध्ये प्रमुख भूमिका करणार का ? अश्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
जवळच्या स्त्रोतांनी सूचित केले की महत्वाकांक्षी कलाकार तिच्या वडिलांचा आदरणीय वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहे. गायक-गीतकार आणि आघाडीच्या जागतिक निर्मात्यांसह एक सहयोगी म्हणून निपुण ती सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये तिचे संगीत कौशल्य वाढवत आहे. जगभरातील प्रशंसित निर्मात्यांसोबत सातत्यपूर्ण सहकार्याने तिचे उद्योगक्षेत्रातील स्थान अधोरेखित झाले आहे. लवकरच ती बॉलिवुड मध्ये ती प्रवेश करणार असल्याचं कळतंय.कावेरी कपूरने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. इंडस्ट्रीच्या एका स्रोताने खुलासा केला, “ती हिंदी चित्रपटसृष्टीच्या तीव्र स्पर्धात्मक क्षेत्रात तिच्या लॉन्चपॅड म्हणून काम करू शकणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी चर्चेत आहे. कावेरी वर्कशॉप्समध्ये भाग घेत आहे आणि तिच्या पात्रासाठी जोरदार तयारी करतआहे. एका मोठ्या चित्रपटाची घोषणा सुरू आहे ” चाहते आतुरतेने ही बातमी अधिकृत होण्याची वाट बघत आहेत. या रोमांचक घडामोडीबाबत अधिक तपशीलांची वाट पाहत असल्याने कावेरी कपूरच्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाची चर्चा सुरू आहे.
साधू वासवानी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस
– पुण्यात ३ दिवस विविध कार्यक्रम आणि जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन.
– दि. २३ नोव्हेंबर, साधू वासवानी मिशनतर्फे ५७ व्या वार्षिक रथयात्रेचे आयोजन.
– दि. २४ नोव्हेंबर, सेंट मीरा कॉलेजतर्फे ‘साहिब मेरा एक है’ नाट्य सादरीकरण
– दि. २५ नोव्हेंबर, साधू वासवानी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जाणार
पुणे-आध्यात्मिक मार्गदर्शक, साधू टी. एल. वासवानी यांच्या १४४ व्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ तीन दिवसीय उत्सव दि. २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. हे उत्सव पुणे, भारतासह जगभरात साजरे होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वार्षिक रथयात्रा, उत्सवपूर्ण सत्संग आणि आध्यात्मिक मार्गदर्शन सत्र आणि साधू वासवानी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस म्हणून साजरा करणे या आणि अन्य उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साधू वासवानी मिशन येथून रथयात्रा मिरवणूक सायंकाळी ५.०० वाजता सुरू होईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गस्थ होऊन ही साधू वासवानी यांच्या पवित्र समाधीस्थळी विसर्जित होईल. सन १९६६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या वार्षिक तीर्थयात्रेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग असतो. त्यामध्ये प्राण्यांबद्दल करुणा निर्माण करणे आणि दयाभावाबद्दल जागृती करण्यात येते.
दि. २५ नोव्हेंबर २०२३ – साधू वासवानी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिन म्हणून जगभरात पाळला जातो. हा दिवस सत्संग, सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि लंगरने साजरा केला जाईल.
या उत्सवातील मुख्य कार्यक्रम साधू वासवानी मिशनच्या अधिकृत युट्यूब चॅनल @sadhuvaswanimission वर थेट प्रक्षेपित केले जातील.
या उत्सव काळात साधू वासवानी मिशनशी संलग्न आरोग्यसेवा संस्थांमार्फत सवलतीच्या दरात उपचार देत आहेत. साधू वासवानी यांच्या करुणा आणि मानवतेच्या सेवेच्या शिकवणींना मूर्त स्वरूप देणाऱ्या स्थानिक समुदायांमध्ये व्यापक सेवा उपक्रम आखले जातात.
वाचाहीन प्राण्यांचा आवाज साधू वासवानी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा जन्मदिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस आणि प्राणी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, साधू वासवानी यांनी प्राण्यांसाठी केलेल्या पुरस्काराप्रती आदर म्हणून हिंसक प्रकारच्या अन्नापासून दूर राहण्याची शपथ जगभरातील व्यक्ती घेतात. यातून ते साधू वासवानी यांना श्रद्धांजली अर्पण करतात.
http://sak.org.in/pledge/ या संकेतस्थळावर नोंदणी करून इच्छुकांना आंतरराष्ट्रीय शाकाहार दिनानिमित्त ‘शाकाहारी जगण्याची शपथ’ घेता येईल.
याशिवाय, साधू वासवानी मिशनने आठवडाभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये रेड-लाइट परिसरातील महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना कपडे वाटप, दृष्टिहीनांना मदत, बांधकाम मजुरांच्या मुलांना कपडे-फळांचे वाटप अशा उपक्रमांचा यात समावेश आहे. गरजू रुग्णांना, मुलांना आनंदाचे पाकिट आणि गरजू कुटुंबांना धान्य किटदेखील पुरवली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी, इच्छुकांनी जनसंपर्क कार्यालयाशी 020-26055640 या क्रमांकावर संपर्क साधावा.
वीज कर्मचार्यांच्या वैद्यकीय विम्याचे दावे तात्काळ निकाली काढा – मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार
पुणे, दि. २२ नोव्हेंबर २०२३: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात सेवा देणाऱ्या महावितरणचे कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानसिक तणाव येतो. त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना व अवलंबितांना वैद्यकीय उपचारासाठी विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे प्रकरणे विमा कंपनीने ताबडतोब निकाली काढावेत असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
पुणे परिमंडल अंतर्गत वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे दावे व इतर मुद्द्यांच्या तक्रार निवारणासाठी रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात नुकतीच बैठक झाली. तीत मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ विभागीय अधिकारी सुनीता भुरेवार, मेडिक्लेम टीपीए मेडिअसिस्ट कंपनीचे महाव्यवस्थापक अमित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे परिमंडल अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी या बैठकीत विम्याचे प्रलंबित दावे आणि इतर तक्रारींच्या निराकरणाचा आढावा घेतला. दाव्यांच्या पडताळणीसाठी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रसंगी जादा कर्मचारी नेमून विम्याच्या दाव्यांची प्रकरणे ताबडतोब निकाली काढावेत. तसेच कर्मचारी किंवा अवलंबित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आणि उपचार घेताना कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची पॉलिसीप्रमाणे विमा कंपनीने काळजी घ्यावी असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय खर्चाच्या बिलांबाबत व इतर अडचणींबाबत माहिती दिली. त्याचे निराकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल असे विमा कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
‘मीराबाई जन्मोत्सवा’त सहभागी होण्यासाठी पंतप्रधान 23 नोव्हेंबर रोजी मथुरेला जाणार
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023
संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात मथुरा येथे आयोजित ‘मीराबाई जन्मोत्सवा’मध्ये सहभागी होण्यासाठी येत्या 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेला भेट देणार आहेत. संत मीराबाई यांच्या सन्मानार्थ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक टपाल तिकीट तसेच नाणे देखील जारी करण्यात येईल. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ पुढील वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सुरुवात देखील सदर कार्यक्रमाने होईल.
संत मीराबाई भगवान कृष्णांच्या प्रती असलेल्या समर्पणभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकानेक भजने आणि ओव्या रचल्या ज्या आजही लोकप्रिय आहेत.
4 इंचाच्या समर्पित कॉम्प्रेसर पाईपलाईन मधून अडकलेल्या कामगारांना अन्न,पाणी,औषधपुरवठा
सिलक्यारा बोगदा कोसळलेल्या ठिकाणी बचावकार्याने घेतला वेग
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023
मानवी जीव वाचवण्याप्रती अढळ कटिबद्धता दर्शवत केंद्र सरकारने उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगदा कोसळून 41 कामगार अडकलेल्या ठिकाणचे बचावकार्य अधिक वेगवान केले आहे.
बचावकार्य करणाऱ्यांनी सदर बोगद्याचे काँक्रीट काम पूर्ण झालेल्या आणि अडकलेल्या कामगार सुखरूप राहतील, याची खात्री देणाऱ्या 2 किलोमीटरच्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. बोगद्याच्या या सुरक्षित भागात वीज तसेच पाणी यांचा पुरवठा सुरु असून 4 इंचाच्या समर्पित कॉम्प्रेसर पाईपलाईन मधून या कामगारांना अन्न तसेच औषधपुरवठा करण्यात येत आहे.
विविध सरकारी संस्थांना या ठिकाणी सुरु असलेल्या कार्यासाठी जागरुक करण्यात आले असून कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्याच्या उद्देशाने या संस्थांना विशिष्ट कार्ये नेमून देण्यात आली आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सरकार त्यांच्याशी सतत संपर्क करत आहे.
बचावकार्याबाबतची महत्त्वाची ताजी माहिती:
1.एनएचआयडीसीएल लाइफलाईनतर्फे केले जाणारे प्रयत्न:
- या बचावकार्यात कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला कारण कालच्या दिवशी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने एनएचआयडीसीएलने बोगद्याच्या ठिकाणी 6 इंच व्यासाची एक अतिरिक्त जीवनवाहिनी खोदली. अन्न पुरवठा करणारी दुसरी जीवनवाहिनी संपूर्ण क्षमतेने काम करत असून अडकलेल्या कामगारांना भरपूर अन्नपुरवठा होईल हे सुनिश्चित करत आहे.
- अडकलेल्या कामगार पथकाशी व्हिडीओ संपर्क स्थापन करण्यात आला असून कॉम्प्रेस्ड हवा आणि पाण्याच्या दबावाचा वापर करून पाईपलाईनमधील मलबा स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
2.एनएचआयडीसीएलतर्फे करण्यात आलेले क्षितीजसमांतर खोदकाम:
- कामगारांची सुटका करण्यासाठी एनएचआयडीसीएलने ऑगर बोरींग मशिनच्या मदतीने सिलक्याराच्या बाजूकडून क्षितीजसमांतर खोदकामाची सुरुवात केली आहे.
- बोरींगचा व्यास वाढवण्यासाठी तसेच पाईपलाईनच्या वेल्डिंगसाठी ड्रिलिंग मशीनसाठी संरक्षक छताच्या उभारणीचे काम सुरु आहे.
3.कामगारांच्या सुटकेसाठी एसजेव्हीएनएलतर्फे उभ्या पद्धतीचे ड्रिलिंग:
- उभ्या पद्धतीचे ड्रिलिंग करण्यासाठी एसजेव्हीएनएलचे मशीन अपघातस्थळी आले असून या मशीनची उभारणी सुरु आहे.या कारणासाठी गुजरात तसेच ओदिशा येथून ड्रिलिंग मशीन्स मागवण्यात आली आहेत.
4. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉरपोरेशन द्वारे(THDCL) बारकोटच्या बाजूला आडव्या रितीने ड्रिलिंग:
- THDC ने बारकोट टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, त्यासाठी दोनवेळा आधीच स्फोट घडवून आणले आहेत, परिणामी तो आता 6.4-मीटर इतका रूंद झाला आहे. दिवसाला तीन स्फोट करून हे काम पूर्ण करण्याची योजना आखली आहे.
5. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे काटकोनी-आडव्या रीतीने ड्रिलिंग:
- आरव्हीएनएल (RVNL) मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या दिशेने ड्रिलिंग करून लहान बोगदा तयार करण्यासाठी यंत्रसामग्रीची वाहतूक करत आहे. यासाठी ओडिशातून अतिरिक्त बॅकअप मशीन्स आणल्या जात आहेत.
6.तेल आणि नैसर्गिक वायु मंडळाद्वारे(ओएनजीसी) बारकोटच्या दिशेने उभ्या रीतीने ड्रिलिंग:
- तेल नैसर्गिक वायु मंडळ (ओएनजीसी) उभ्या रीतीने ड्रिलिंग करण्यासाठी यूएसए, मुंबई आणि गाझियाबाद येथून यंत्रसामग्री मागवून घेत आहे.
7.टीएचडीएल (THDCL)/आर्मी/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल (NHIDCL) यांच्याकडून संयुक्तपणे प्रत्यक्ष हाताने-अर्ध यांत्रिक पद्धतीने (मॅन्युअल -सेमी मेकनाईझ्ड) ड्रिफ्ट टनेल बनविणे:
- 180 मीटर ते 150 मीटरपर्यंत सुरक्षित चॅनेल स्थापित करून बोगद्याच्या आत एक प्रवाह निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी लष्कराकडून बॉक्स कल्व्हर्ट्स मागवून आणले जात आहे.
8.सीमा सुरक्षा दलाद्वारे (BRO) रस्ता कापणे आणि सहाय्यक कामे:
- सीमा सुरक्षा दलाने 48 तासांच्या आत एसजीव्हीएनएल (SJVNL) द्वारे उभ्या ड्रिलिंगसाठी आत जाण्यासाठी योग्य एक मार्ग बनवला आहे. ओएनजीसी कडून भूगर्भीय सर्वेक्षण करून योग्य मार्ग बनवण्याचे काम ओएनजीसी करत आहे.
पार्श्वभूमी:
- दि. 12.11.2023 रोजी, सिल्क्यारा ते बारकोटपर्यंत बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये सिल्क्याराच्या बाजूला 60 मीटरचा भाग कोसळला. या घटनेनंतर, राज्य आणि केंद्र सरकारने या अपघातामध्ये अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि आवश्यक ती सामुग्री जमा केली.
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा सर्वोत्तम आणि जलद शक्य उपाय तोडगा काढण्यात आला. त्यानुसार कोसळलेल्या भागाच्या राडा –रोडा, चिखल, यातून 900 मिमी व्यासाची नळी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
- तथापि, 17.11.2023 रोजी, जमिनीअंतर्गत होणा-या हालचालीमुळे संरचना सुरक्षित केल्याशिवाय हा पर्याय वापरणे असुरक्षित झाले. आतमध्ये अडकलेल्या माणसांचा विचार करून, त्या कामगारांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व शक्य आघाड्यांवर एकत्रितपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- यासाठी पाच पर्याय निश्चित करण्यात आले आणि या पर्यायांवर काम करण्यासाठी पाच वेगवेगळ्या एजन्सींवर जबाबदारी सोपवण्यात आली.
- यासाठी , ‘एनएचआयडीसीएल’ च्या वतीने अन्नासाठी आणखी 6 इंची पाइपलाइन तयार करत आहे. तसेच 60 मीटरपैकी 39 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. हा बोगदा तयार झाल्यावर त्यातून अधिक खाद्यपदार्थ पोहोचवणे सुलभ होईल.
- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने अवघ्या एका दिवसात जोड मार्ग बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर, आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ‘आरव्हीएनएल’ च्या वतीने दुसर्या एका पाइपलाइनवर काम करत आहे.
- ‘एनएचआयडीसीएल’ काम करीत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेनंतर सिल्क्यारा च्या बाजूने ड्रिल करणे सुरू ठेवणार आहे.
- सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (एसजेव्हीएनएल) अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी उभ्या पद्धतीने ड्रिलिंगचे काम करीत आहे.
- ओएनजीसीला खोल ड्रिलिंगमध्ये प्राविण्य आहे, त्यामुळे बारकोटच्या टोकापासून उभ्या ड्रिलिंगसाठी सुरुवातीचे कामही सुरू केले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसद्वारे युवक-युवतींना संधी देण्यास सुरुवात केलेली आहे. क्लार्क तथा ज्युनियर असोसिएट भरती परीक्षेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, एकूण ८२८३ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी पदवीधर किंवा ३१ डिसेंबर २०२३ अखेर पदवी परीक्षेचा अंतिम निकाल लागणार आहे, असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
वयोमर्यादा
- १ एप्रिल २०२३ रोजी किमान २० वर्षे व कमाल २८ वर्षे ही वयोमर्यादा आहे. तथापि अनुसूचित जाती व जमातीमधील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे, इतर मागास प्रवर्गाकरिता ३१ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांकरिता १० ते १३ वर्षे वयोमर्यादेत शिथिलता दिलेली आहे.
- सर्वसाधारण माजी सैनिकांसाठी ही वयोमर्यादा त्यांनी प्रत्यक्ष केलेली सेवा अधिक ३ वर्षे अशी निश्चित करण्यात आलेली आहे. दिव्यांग माजी सैनिकांसाठी ही मर्यादा जादा ८ वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेचा पदवीधर
- किमान १५ वर्षे सेवा झालेल्या सेवानिवृत्त म्हणजेच माजी सैनिकांकडे आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – ७ डिसेंबर २०२३
पूर्वपरीक्षा (१०० गुण) – जानेवारी २०२४
मुख्य परीक्षा (२०० गुण) – फेब्रुवारी २०२४
भरती प्रक्रियेचे स्वरूप
- परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
- परीक्षेकरिता इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी माध्यम उपलब्ध.
- पूर्वपरीक्षेचे स्वरूप – ही एकूण १०० गुणांची असून, त्यासाठी इंग्रजी भाषा, न्यूमॅरिकल एबिलिटी व रिझनिंग अॅबिलिटी असतील.
- मुख्य परीक्षेस पात्र होण्याकरिता पूर्वपरीक्षेमधील तिन्ही विषयांत किमान आवश्यक गुण प्राप्त करणे बंधनकारक राहील.
- मुख्य परीक्षेचे स्वरूप – एकूण ४ सेक्शन असून, ही परीक्षा २०० गुणांची आहे. त्यासाठी २ तास ४० मिनिटे इतका कालावधी असतो. ही परीक्षा बहुपर्यायी व ऑनलाइन असते.
- अंतिम निवड – मुख्य परीक्षेसाठीच्या २०० गुणांमधील प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. ज्या उमेदवारांनी ३१ ऑक्टोबर २०२३ अखेर स्टेट बँकेत शिकाऊ उमेदवार म्हणून सेवा पूर्ण केलेली आहे, त्यांना मुख्य परीक्षेसाठी एकूण ५ गुण बोनस म्हणून दिले जाणार आहेत.
ऑनलाइन अर्जाची पद्धती
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर आणि योग्य आकारातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.
- ऑनलाइन परीक्षेकरिता सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागास वर्ग व आर्थिक मागास प्रवर्गासाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती व जमाती, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारासाठी कोणतेही शुल्क नाही.
- परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings या संकेतस्थळावर भेट द्यावी.
(विशेष सूचना : इच्छुकांनी योग्य माहिती घेऊन स्व जबाबदारीवर योग्य वाटेल अशीच कार्यवाही करावी .)
वाईन्स शॉपवर दरोडा:२४ तासात ४ अल्पवयीन मुलांसह एकूण ५ जणांना पकडले, एक फरार
गावठी पिस्टल, तलवारी, रोख रक्कम, मोटारसायकली जप्त.
पुणे- उत्तमनगर येथील वाईन शॉप वर दरोडा घालून ३ लाख ९ हजाराची रोकड आणि ३२ हजाराची दारू लुटून नेणाऱ्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी २४ तासाच्या आत पकडले आहे .या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १९/११/२०२३ रोजी रात्रौ २१/२५ वा.चे. सुमारास शिवणे उत्तमनगर येथील आर. आर. वाईन्स शॉप वर ६ जणांनी गावठी पिस्टल, कोयता, तलवारीसह दरोडा टाकुन ३,०९,०००/-रुपये रोख व ३२००/-रु. किंमतीच्या दारुच्या बाटल्याची लुट केली होती. दरोडयाचा थरार दुकानाचे सीसीटीव्हीत चित्रीत झाला होता. आर. आर. वाईन्स शॉपचे कामगार मनोज मोरे यांनी याबाबत उत्तमनगर पोलीस ठाणेत तक्रार दिली होती.
उत्तमनगर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन २ स्वतंत्र तपासपथके तयार केली व आरोपीच्या शोधकामी रवाना केली होती. आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत पाहुन रेकॉडवरील गुन्हेगारांनी हा दरोडा टाकला असावा असा पोलीसाचा अदांज होता. उत्तमनगर पोलीस ठाणे व सिहंगड रोड पोलीस ठाणेचे सयुंक्त तपासपथकाने दिनांक २१/११/२०२३ रोजी धायरी, माणिकबाग, सिहंगड रोड भागातुन ५ जणांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करुन त्यांनी गुन्हा करताना वापरलेला गावठी कट्टा, लोखडी हत्यार, तलवार, सत्तुर व चोरीस गेलेले एकुण ०३ लाख ९० हजार रुपये पैकी ३२,८००/- रुपये रोख रक्कम जप्त करणेत आली आहे. ताब्यात घेतलेले ५ पैकी ४ जण हे अल्पयीन निष्पन्न झाल्याने त्यांना बाल न्यायमंडळ येरवडा येथे हजर करणेत आले असुन तेजस राहुल पिंपळगावकर वय १९ वर्षे रा. पंचशिल अपार्टमेंन्ट, प्लॅट नं.४३, मल्हार हॉटेलजवळ, सिंहगड रोड, माणिकबाग पुणे यास प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी कोर्ट नंबर ०३ पुणे येथे हजर केले असता दिनांक २५/११/२०२३ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडी रिंमाड दिलेला आहे.
वरील कामगीरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार,सह. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परी ०३ सुहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालवडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, उमेश रोकडे, पोलीस अंमलदार समीर पवार, तुषार किंन्द्रे, ज्ञानेश्वर तोडकर, दत्तात्रय मालुसरे, प्रमोद कुमदकर यांनी केली आहे.
‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्याला पोलिसांनी केला १० हजार रुपयांचा दंड
मुंबई : ऐतिहासिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे टॅक्सीने येवून समुद्रात कचरा टाकल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. याबाबत त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशही प्राप्त झाले होते. कुलाबा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर पोलीसांनी कारवाई करीत दंड ठोठाविला.
गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात कचरा टाकण्याविषयी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे वृत्त प्रसारीत झाले होते. याबाबत पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची टॅक्सी क्रमांक एम एच 01 एटी 6720 सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधून काढली. टॅक्सीचा चालक मोहम्मद याकुब अहमद दुधवाला (वय 62) रा. राठी पिर इनायत शहा दर्गा, डोंगरी, मुंबई याला कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सदर इसमावर महानगरपालिकेच्या अधिनियमांनुसार 10 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. कुलाबा पोलीस ठाणे येथे सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली, असे गृह विभागाने कळविले आहे. अशा प्रकारे समुद्रात कचरा टाकणे एक दंडनीय गुन्हा असल्याने समुद्रात कुणीही कचरा टाकू नये, असे आवाहनही गृह विभागाने केले आहे.
कपील देव – महेंद्रसिंह धोनींना, अंतिम ‘विश्वचषक स्पर्धे’ पासुन दुर ठेवणे खेदजनक…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे दि २१ -अहमदाबाद (गुजरात) मधील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम’चे नामकरण झालेल्या “नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये”, नुकत्याच झालेल्या ‘भारत विरुध्द ॲास्ट्रेलीया वर्ल्ड कप क्रिकेट’च्या सामन्यास’, भारतीय क्रीकेट ला जगात सर्वोच्च स्थानी नेणाऱ्या ‘भारतीय संधाचे माजी कप्तान कपील देव, महेंद्रसिंग धोनी इ.सह जगज्जेतेपद मिळवणाऱ्या ‘भारताच्या गौरवशाली क्रीकेट पटुंना निमंत्रित न करणे’ हा एकप्रकारे त्यांचा अवमान असुन, भारताचा जागतिक लौकीक वाढवणाऱ्या क्रिकेटपटुं विषयी कृतघ्नता व्यक्त करण्याजोगा निंदनीय प्रकार आहे.असे कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले ,’ मोदी सरकार भारतीय क्रीकेट मध्ये अनावश्यक हस्तक्षेप करत असल्याचा हा पुरावाच असुन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे या निंदनीय कृती बद्दल मोदी सरकारचा निषेध करत आहे.तसेच वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या व विजेत्या ‘भारतिय व ॲास्ट्रेलीयन संघांचे देखील अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रीकेटच्या गौरवशाली, अनुभवी व जुन्या जाणत्या खेळाडुंना निमंत्रीत करणे हे भारतीय संघातील खेळाडुंसमोर प्रेरणादायी ठरत असते. ‘सांगेन गोष्टी ४ युक्तीच्या’ म्हणी प्रमाणे कदाचित या जेष्ठ व जगजेत्या खेळाडूंकडुन भारतीय संघास काही मार्गदर्शन ही झाले असते.परंतु श्रेयजीवी पंतप्रधान मोदींना अंतिम सामन्याचे श्रेय‘इतर कोणाच्याही उपस्थितीच्या प्रभावामुळे’ विचलीत होऊ द्यायचे नव्हते काय (?)वा, प्रसिध्दी फोकस फक्त मोदींना स्वतःकडे ठेवायचा होता..?असा उपहासात्मक सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
१९८३ चा वर्ल्डकप जेता कपील देव तसेच २००७ (T-२०) व २०११ वर्ल्डकप जेता, महेंद्रसिंह धोनी यांनी कदाचित ‘भाजप प्रचार कार्यात’ भाग न घेतल्यामुळे भाजप नेतृत्वास आकस असावा असेही त्यांनी म्हटले.
जगजेता कप्तान कपील देव यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलन व महीला कुस्तीगीर पटुंच्या आंदोलना बाबत एक खेळाडु नात्याने संवेदना प्रकट केल्या असल्या कारणानेच भारतास जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या महान खेळाडूस बीसीसीआय ने निमंत्रीत केले नाही हे स्पष्ट होते,असा आरोप ही तिवारी यांनी केला.
“महापालिकेतील 7000 कामगार हे आमचे कामगारच नाही” महापालिकेची कायदेशीर चालाखी,कामगारांच्या भावनांशी खेळ खेळून शोषण करण्याचा प्रकार उघड
पुणे- कोर्टात लढावे अशा पद्धतीने कायदेशीर चालाखी करत महापालिका प्रशासनाने ७००० कामगारांच्या भावनांशी खेळ चालविला असून त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे राष्ट्रवादीचे पर्वती विभागातील नेते नितीन कदम यांनी सांगितले, त्यांनी खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसच्या विषयावर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची भेट घेतली तेव्हा केंजळे यांनी ‘हे आमचे कामगारच नाहीत; अशी भूमिका घेतल्याने दिवाळी बोनस आणि कामगारांच्या हक्कांना तिलांजली देण्याचा प्रकार उघड झाल्याचे स्पष्ट झाले.
ठेकेदारी पद्धतीने कामगारांची पिळवणूक कशी केली जाते हे महापालिकेने देखील आपल्या वर्तनातून देखील सिद्ध करून महापालिका अशा कायदेशीर पळवाटा काढून चलाखीने कामगारांच्या भावनांशी खेळ खेळत आहेत .पुणे महापालिकेत 7000 कंत्राटी कामगार आहेत. बोनस, सानुग्रह अनुदान इत्यादी विषयासाठी दिवाळी पूर्व हे सर्व विविध राजकीय आधाराखाली आणि नेत्यांच्या आधाराखाली उपोषणाला बसले होते. अशा बोलघेवड्या फसव्या स्वार्थी आणि प्रसिद्धी लोलुप नेत्यांची नाटकी मर्जी राखण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पुढार्यांनाही लाजवतील असे एकापेक्षा एक आश्वासन दिली. वृत्तपत्रांमध्ये कामगारांची दिवाळी गोड होणार अशा बातम्या झळकल्या. परंतु हि केवळ फसवी प्रसिद्धी ठरली प्रत्यक्षात कामगारांच्या पदरी निराशाच पडली..कोणताही बोनस त्यांना मिळाला नाही.बिचाऱ्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना खोटी आशा दाखवून त्यांची फसवणूकच केली गेली.त्यांच्या भावनांशी क्रूर खेळ खेळला गेला.

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांची एवढी फसवणूक कधीच झाली नव्हती.. हेच ते नितीन केंजळे मुख्य कामगार अधिकारी आणि सोबत दिवाळीच्या वेळेस त्यांनी काढलेले कार्यालयीन पत्रक असे नितीन कदम म्हणाले.खासदार वंदना चव्हाण यांच्या सूचनेनुसार मी या संदर्भात मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची भेट घेऊन जाब विचारला.. या महाशयांनी तर “हे आमचे कामगाराच नाही”अशी भूमिका घेत हात वर केले..अतिरिक्त आयुक्त व आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.खासदार वंदनाताई चव्हाण सदर कंत्राटी कामगारांचा प्रश्नासाठी लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहेत. असेही कदम यांनी सांगितले आहे.

लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते होण्यासाठी डॉ.गोऱ्हे यांनी तरुणांना केले प्रोत्साहित
- नेहरू युवा केंद्रातील एकूण ७८ युवकांनी साजरा केला “जागतिक बाल दिन”
मुंबई, २१ नोव्हेंबर, २०२३: जागतिक बालदिनानिमित्त स्त्री-पुरुष समानता साजरी करताना, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी, केंद्र शासनाच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नेहरू युवा केंद्रातील युवकांना लिंग समानतेचे पुरस्कर्ते बनून समाजातील उपेक्षित लोकांसाठी काम करण्याचे आवाहन केले. सोमवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण ७८ युवकांनी राजभवन आणि विधानभवन येथे भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले आणि पिठासीन अधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी तरुणांच्या समुहाला मार्गदर्शन करताना डॉ. गोर्हे म्हणाल्या, ” जीवनातील प्रत्येक संधीचे सोने करा. मला तरुणांशी संवाद साधायला आवडते,कारण ते मोठ्या उत्साहाने कामे करतात. त्यांच्याकडे नवीन संकल्पना आहेत, समाजासाठीचे त्यांचे योगदान निर्विवाद आहे. मला आनंद आहे की विधानभवनाने त्यांना सर्व गोष्टींची चांगली माहिती करून दिली आहे. विधान भवनाची ही वास्तू महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देते आणि या युवकांमधून मी भविष्यातील नेते पाहत आहे.”
नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्य संचालक,प्रकाश मानुरे यांनी तरुणांना सामाजिक प्रश्नांसाठी खुले राहण्यास प्रोत्साहित केले. “सामाजिक प्रश्नांसाठी काम करणे आणि समाजात सूयोग्य बदल घडवून आणणे ही तरुणांची जबाबदारी आहे,”असे ते म्हणाले.
स्वाती महापात्रा, कम्युनिकेशन स्पेशालिस्ट, युनिसेफ यांनी तरुणांना समाजासाठी चिंतेचे विषय असलेल्या सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले.
निलेश मदाने, वि.स.पागे संसदीय शिक्षण केंद्राचे संचालक यांनी लोकशाही प्रक्रियेतील विधानसभा व परिषदेचे महत्त्व विशद केले. ममहाराष्ट्र अनेक कायदे पारित करण्यात अग्रेसर आहे. अनेक महाराष्ट्राचे कायदे सर्व राज्यांनी आणि केंद्रानेही स्वीकार केला असल्याबाबत श्री मदाने यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्राच्या गटाने राजभवनालाही भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील राज्यपाल कार्यालयाच्या भूमिकेवर चर्चा केली.
नेहरू युवा केंद्रांतर्गत , या महिन्यात एक राज्यस्तरीय निवडणूक घेण्यात आली. त्यात ३००० हून अधिक मतदाते सहभागी झाले आणि २० सदस्य हे मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सभापती म्हणून निवडले गेले. मुंबईत आलेले एकूण ७८ तरुण यापैकी एक मुलगी आणि एक मुलगा यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
रविवारी,मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये युनिसेफ आणि नेहरू युवा केंद्रातर्फे मॉक संसदेचे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध समस्या व जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
बुलढाणा येथील सुमित वाकोडे, याने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. त्यांनी सांगितले की, “संसदेच्या कामकाजात खूप काही शिकण्यासारखे होते आज राजभवन आणि विधानभवनाला भेट देणे हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता,” असे तो म्हणाला.
दरम्यान, जागतिक बालदिनानिमित्त मुंबईतील बीएमसी इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्टेशन,छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आणि राजभवन या इमारतींवर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली.
पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक आता नाशिकचे पोलीस आयुक्त
पुणे-राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि. 21) बदल्या केल्या. त्यामध्ये पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिक येथे पोलीस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
माजी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या जागी संदीप कर्णिक एप्रिल 2022 मध्ये पुणे येथे सह पोलीस आयुक्त म्हणून आले होते. संदीप कर्णिक यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून पूर्वी काम केले होते. दोन वर्षांची टर्म संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.
नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभाग व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची वर्णी लागली आहे. अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती.अंकुश शिंदे यांची यांची देखील नाशिक येथील कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली. पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त असताना देखील कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली होती.
