श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराजांनी केलेल्या न्यायनिवाडयाची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. न्यायालयासमोर सत्य सांगणे आणि मांडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते कर्तव्य पार पाडत, वकिलीचा अभ्यास व वकिली व्यवसाय करणा-या प्रत्येकाने प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. वकिली ही उत्तम निरीक्षणातून विकसित होणारी वेगळी कला आहे, असे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे’ आयोजन शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. स्पर्धेचे उद््घाटन अभय ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे सह धमार्दाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, प्राचार्य विश्वनाथ पाटील,संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार व नियामक व कारभारी मंडळ सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे.
अभय ओक म्हणाले, न्यायालयात बाजू मांडत असताना मानवी वर्तनाचा प्रत्येक वकिलाचा अभ्यास असायला हवा. समोरच्या व्यक्तीचे मन जाणून घेतल्यास त्याच्याकडून आवश्यक माहिती समजून घेणे वकिलांना सोपे जाते. त्यामुळे लक्षपूर्वक निरीक्षण व त्याद्वारे अभ्यास केल्यास उत्तम वकिल होता येईल. भारतामध्ये महिला वकिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामिण भागातून या क्षेत्रात येणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीरकुमार बुक्के म्हणाले, वकिली व्यवसायात, न्यायालयीने पद्धतीमध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. या बदललेल्या गोष्टी स्विकारुन आपण पुढे जायला हवे. प्रामाणिकपणा हा गुण वकिली व्यवसायात असणे गरजेचे आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत प्रत्येक गोष्ट ही कायद्याने बांधलेली आहे. त्यामुळे मानवी आयुष्यात प्रत्येक वेळी वकिली आणि न्यायालयीन प्रक्रियेचा समावेश असल्याचे दिसून येते.
अण्णा थोरात म्हणाले, न्यायालयीन कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रत्यक्ष न्यायालयात आपली बाजू मांडताना करावा लागणारा युक्तिवाद आणि चांगला वकील होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याची प्रत्यक्ष माहिती अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. सिद्धकला भावसार यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोकेफोडे यांनी आभार मानले.
न्यायालयातील निरीक्षणातून विकसित होणारी वकिली ही कला- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक
आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात ‘भारती विद्यापीठाने’ केली पदकांची लयलूट
बंगलोरमधील जैन युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरविद्यापीठ युवा महोत्सव
पुणे : भारतीय विद्यापीठांची संघटना आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालयतर्फे बंगलोरमधील जैन युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करित भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली. शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धेत धवल जोशी याने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय संगीत प्रकारात नंदिनी गायकवाड रौप्य पदक, शास्त्रिय नृत्यात कीर्ती कुरंडे हिने कांस्यपदक पटकाविले. लोक वाद्यवृंदासाठी देखील महाविद्यालयाने कांस्यपदकाची कामगिरी केली.
बंगलोर येथे झालेल्या ३६ व्या युवा महोत्सवात भारतातील १०६ विद्यापीठे, २ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आपापल्या राज्यातील कला विद्यार्थ्यांनी महोत्सवात सादर केल्या.
स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक प्रविण कासलीकर आणि डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, युवा महोत्सवात भारतातील विविध भागातील विद्यापीठे सहभागी झाली होती. त्यामुळे भारताच्या विविध भागातील संस्कृती, तेथील लोकनृत्य, संगीत, वेशभूषा आणि उत्तोमत्तम कलाप्रकार पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील युवा महोत्सवात आपले कौशल्य दाखविले.
मेटावर्स तंत्रज्ञानामुळे वास्तव आणि आभासी जग यांच्यातील दरी कमी होईल… धैर्यशील वंडेकर
पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने मेटाव्हर्स : इंट्रोडक्शन अँड इंटरडीसिप्लीनरी ॲप्लीकेशन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे, खजिनदार विजयसिंह जेधे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य धैर्यशील वंडेकर, अक्षय पासलकर फाऊडर स्प्रे डिजिटल, सुभाष बाल, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे यांचे उपस्थितीत झाले.या प्रसंगी बोलताना धैर्यशील वंडेकर यांनी गेमिंग, मनोरंजन (एंटरटेनमेंट), प्रॉडक्शन, शॉपिंग, शिक्षण (एज्युकेशन), वैद्यकीय क्षेत्र (मेडिकल सेक्टर), संरक्षण क्षेत्र, सायबर विश्व अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मेटावर्सचा वापर कसा करावा या दृष्टीने सुरु असलेल्या संशोधनाची माहिती दिली. भविष्यात माणूस एका सुरक्षित ठिकाणी बसून मेटावर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची कामं सहजरित्या करू शकेल. हे करताना त्याला संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव तंत्रज्ञानाच्या मदतीने घेता येईल. मेटावर्स तंत्रज्ञानामुळे वास्तव आणि आभासी जग यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी या बदलत्या तांत्रिक प्रवाहाबरोबर आपण स्वतःला देखील नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःला अपडेट केले पाहिजे असे आवाहन या प्रसंगी केले. अक्षय पासलकर यांनी मेटाव्हर्स च्या माध्यमातून केवळ संप्रेषण नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. त्यामध्ये वस्तुंची खरेदी विक्री, आपल्या मित्रांना भेटण्याची संधी, व्ही आर अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटी सारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. यासगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून त्याला आर्टिफिशयल इंटेलिजिन्सची जोडही देण्यात आली आहे असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी ॲड. भगवानराव साळुंखे, विजयसिंह जेधे, धैर्यशील वंडेकर, अक्षय पासलकर प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.रमा गायकवाड, कार्यशाळेचे समन्वयक प्रा.प्रांजल मोरे, प्रा.जितेंद्र मुसळे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन प्रा.रमा गायकवाड यांनी प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली केले. सूत्रसंचालन प्रा.प्रांजल मोरे यांनी केले तर प्रा.अनिल लोहार यांनी आभार मानले. महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या सोडतीला हजर राहण्याचे आवाहन
पुणे, दि. ३: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र प्रस्तावातून १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे सोडत काढण्यात येणार असून अर्जदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत नव्याने थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी १ लाख रुपये प्रमाणे ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेअंतर्गत २० डिसेंबर २०२२ अखेर ३६१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३२८ प्रस्ताव सोडतीसाठी पात्र ठरले असून ३३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.
पात्र ठरविण्यात आलेल्या अर्जाची सोडत १० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे येथे काढण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांची यादी जिल्हा कार्यालयात लावण्यात आलेली असून त्यांनी सोडतीदिवशी हजर राहण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शि. लि. मांजरे यांनी केले आहे.
०००
शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित
पुणे, दि. ३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने निर्गमित केले आहेत.
यापूर्वी मागविण्यात आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करुन शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत केदारनाथ मंदीराच्या संरक्षणभिंतीच्या उत्तरेकडील दरवाजा येथे ५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे अंतिम आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद खरे चौक ते रमणबाग चौक दरम्यान पी-०१, पी-०२ पार्किंग तसेच भिडे पूल ते झेड पूल जंक्शन दरम्यान नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोगटे प्रशाला चौक ते सत्यभामा सोसायटी लगतच्या रोडला १५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे १५ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असेही कळवण्यात आले आहे.
000
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा!: बाळासाहेब थोरात
*मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा. *
मुंबई, दि. ३ मार्च २०२३-
अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम केले. पण त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने तात्काळ त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना थोरात म्हणाले की, राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस गावात, वाडी-वस्तीवर, दुर्गम भागातील तळागळात आरोग्याबाबत चांगले काम करीत आहेत. कोरोना सारख्या भयावह परिस्थितीतही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाप्रती आपला समर्पण भाव दाखविला आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे.
सरकारकडे सातत्याने अनेक नोकरदारांचे प्रश्न येत असतात मात्र त्यातील अंगणवाडी सेविकांचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत व महत्वाचा आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांचे प्रश्न सुटावेत ही राज्यातील जनतेचीही सातत्याने मागणी आहे. सभागृहाचीही याबाबत सकारात्मक व अनुकुल अशी भूमिका आहे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी सेविकांबाबतची भूमिका योग्य नसून सरकारने याबाबत तातडीने निर्णय जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. गंभीर स्वरुपाच्या प्रश्नांनबाबत उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यायला हवा.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मागील आठवड्यात पुरोगामी संघटनांचा कॉ. मिलींद रानडे यांच्या नेतृत्वात महामोर्चा झाला, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अडचणी आहेत त्या सोडवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. गावात व दुर्गम भागात अंगणवाडी सेविकांचे चांगले काम व अत्यावश्यक सेवा असून त्यांच्या या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही ही शोकांतिका आहे. सरकारने तात्काळ अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतणीस यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे. मुख्यमंत्री व सरकारने संवेदनशीलतेची भूमिका घेवून तात्काळ योग्य निर्णय जाहीर केला पाहिजे.
मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा.
बाळासाहेब थोरात यांनी मातंग समाजासंदर्भातही लक्षवेधी उपस्थित केली होती, मातंग समाज हा मागासवर्गीय समाजातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या शौर्याची व देशभक्तीची परंपरा सांगणारा हा समाज आहे. या समाजातील घटकांच्या विकासासाठी सरकारने काही महत्वाचे ठोस निर्णय घ्यायला हवेत. अशी माझी व सर्व सभागृह सदस्यांची मागणी आहे. या नेत्यांची स्मारके व्हावीत, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र त्या स्मारकांकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मूलभूत शिक्षण हा प्रत्येक समाजातील बालकाचा महत्वाचा हक्क असून हे मूलभूत शिक्षण सर्व समाजातील घटकांना देणे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. मातंग समाजाबाबतचा जो अहवाल सरकारने सादर केला आहे त्यात, या अहवालावर काय कार्यवाही झाली अथवा झाली नाही याबाबत निष्कर्ष हवेत. किती कालखंडात ही तपासणी सरकार करणार आहे व तपासणीनंतर काय कार्यवाही, कृती करणार आहे हे सांगणारा कालबद्ध कार्यक्रम असायला हवा. सरकारने या सर्व गोष्टींवर आपली प्रमुख भूमिका मांडणे महत्वाचे आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
पीएमपी बस मधून विनातिकीट ३०० नाही आता ५०० दंड
दिनांक १० मार्च २०२३ पासून होणार कार्यवाही– संचालक मंडळाची मान्यता
पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा
१९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल
करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे
गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल
करण्यात येतो.
दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ
नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम
रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजीमान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/- दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास पूर्ववत..
पुणे-
जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९
रोजी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू
देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस
सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद
करण्यात आल्या होत्या.
सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने
महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस
मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी
बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
लाॅजवर छापा:बांगलादेशी तरुणीसह चौघींची सुटका ; दलालाला पकडले
पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकासह दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (२९, रा. आळंदी फाटा, लाेणीकंद, पुणे), प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाघमारेला अटक केली आहे. पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात जय भवानी लाॅज येथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
मुंबईतील ओशियन हाईटस मध्ये फ्लॅट देतो सांगून अडीच कोटीची फसवणूक:कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल
पुणे-मुंबई येथील ओशियन हाईटस या बांधकाम प्रकल्पात अलिशान घर कमी पैशात देताे असे म्हणून विश्वास संपादन करुन पुण्यातील एका कुटुंबाची अडीच काेटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमरजित जितेंद्र शुक्ला (वय-38,रा.जाेगेश्वरी, मुंबई) या आराेपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत काेथरुड पोलिस ठाण्यात मंगल नागनाथ परकाळे (वय-45,रा.काेथरुड,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 13/9/2022 ते 2/3/2023 यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी अमरजित शुक्ला याने तक्रारदार मंगल परकाळे यांना मुंबईतील ओशियन हाईटस नावाचे प्राेजेक्ट मधील फ्लॅट कमी पैशात देताे असे सांगितले हाेते. त्याप्रकारे त्याने विश्वास संपादित करत फ्लॅट मध्ये दाेन काेटी 55 लाख रुपये गुंतविण्यास सांगितले असता तक्रारदार यांनी पैसे गुंतवले. परंतु आराेपीच्या ओशियन हाईटस येथील फ्लॅटवर दुसऱ्या बँकेचे कर्ज असल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी आराेपीस पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, आराेपीने पैसे परत न करता त्याची 40 लाख रुपये किंमतीची रेंन्ज राेवर गाडी (एमएच 02 ईएक्स 0123 ही शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देण्याचे सांगितले. त्याकरिता टी.टी.फाॅर्मवर सहया देवून डिसेंबर 2022 मध्ये पुणे आरटीओ येथे तक्रारदार यांचे नावे रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पती नागनाथ परकाळे यांनी आराेपीस गाडी ताब्यात देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांना आराेपीने ‘गाडी मी तुला देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे सांगुन तक्रारदार यांचे नावे मालकी हक्क रजिस्ट्रेशन झालेली गाडी त्यांना देण्यास नकार न देता फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास काेथरुड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस माळी करत आहे.
पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार –सहकार मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 3 :गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणारी नवीन समिती येत्या १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील पतसंस्थांमध्ये झालेले गैरव्यवहार आणि अन्य कारणांमुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येणाऱ्या अडचणी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेन्वये स्थापन करण्यात आला आहे. या निधीसाठी नियामक मंडळाने ठरविलेल्या दराने व पध्दतीने पतसंस्थांनी अंशदान द्यावयाचे आहे. सद्यस्थितीत हा दर 10 पैसे प्रति 100 रुपये ठेव असा आहे. नियामक मंडळाने 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित केली असून सदर योजनेबाबत राज्यातील सर्व पतसंस्था, फेडरेशनचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी केलेल्या सूचना, हरकती विचारात घेऊन योजनेस अंतिम स्वरुप देण्याबाबत नियामक मंडळाच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार– क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सन 2018 मध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा आढावा घेण्यासाठी शासनामार्फत समिती नेमण्यात आली असून या समितीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल. या अहवालाचा अभ्यास करुन सुधारित क्रीडा धोरणानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या गट अ ते गट ड मधील पदांवर थेट नियुक्तीसाठी क्रीडा अर्हताही निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदांवरील क्रीडा प्राविण्य अर्हता निश्चित करण्यात आली असून या निकषाधारे आतापर्यंत 67 खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे.
याशिवाय गुणवत्ताधारक खेळाडूंच्या सेवा घेऊन गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री.महाजन यांनी स्पष्ट केले.
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांतील कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक– मंत्री संजय राठोड
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य ऋतुराज पाटील, डॉ. राहुल पाटील, हसन मुश्रीफ, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील निराधार, अपंग आदींच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने केलेल्या योजना याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. राठोड म्हणाले की, विशेष सहाय्य योजनेकरिता असलेले निकष, अटी व अर्थसहाय्याची रक्कम याकरिता सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 हजार 558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च 2023 या महिन्यांचे लाभार्थींना अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वरुन 60 करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविणे, तसेच अनुदान वितरित करण्याबाबतचे निकष बदलणे, अर्थसहाय्यात वाढ करणे याबाबी अभ्यासण्यासाठी एक समिती तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
लिक्विड ओरल उत्पादक कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी– विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट
राज्यात लिक्विड ओरल उत्पादन करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिले. औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न व औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही श्री. शिरसाट यांनी यावेळी दिल्या.
विधानसभा सदस्य ॲड.आशिष शेलार, योगेश सागर, अजित पवार, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानिकारक घटकद्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
यावेळी उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील 66 मुलांचा मृत्यू सदोष कफ सिरपमधील घटकद्रव्यांमुळे झाल्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 7 ऑक्टोबर 2022 रोजी परिपत्रक काढून राज्यातील लिक्विड ओरल उत्पादकांची तपासणी केली. यामध्ये राज्यातील एकूण 84 उत्पादकांची तपासणी करण्यात आली असून 17 उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 4 उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 996 ॲलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी 514 उत्पादक निर्यात करतात. राज्यात एकूण 108 कफसिरप उत्पादक असून 84 प्रकरणी विशेष मोहीम राबवून तपासणी केली. यापैकी 17 प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 4 उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रकरणात उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात औषधी पाठ मंजूर होत असल्यामुळे तसेच निर्यातीच्या नोंदणीप्रकरणी सुमारे 1 वर्षाचा कालावधी लागत असल्यामुळे हमीपत्राच्या अधीन राहून निर्यातीसाठी अतिरिक्त औषधी पाठ मंजूर करण्यात आले असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजीत पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेली सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य हिताचे आहेत. समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासराख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी सुमारे १२ हजार कोटी देण्यात आले आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून येत्या आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्त आली. जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासरख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ३ : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील ७ किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे २०२४ पर्यंत
पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खून करून रस्त्यावर टाकला बालिकेचा मृतदेह;पुण्यातला संतापजनक प्रकार
पुणे- गुन्हेगारी जगताने आता गंभीर रूप धरण केलेले असून अवघ्या अडीच ते तीन वर्षाच्या मुलीचा खून करून टाकलेला मृतदेह खडकीत आढळून आला आहे. या मुलीची ओळख अजून पटली नसल्याने पोलीस हैराण झाले आहेत . काल हा मृतदेह खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रस्त्याच्या दक्षिण बाजूस सी ए एफ व्ही डी ग्राउंड च्या उत्तरेस चिकूच्या झाडाखाली मिळून आला . गळा दाबून या बालिकेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अण्णा गुंजाळ नावाच्या फौजदार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार
– सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत
मुंबई-राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, अनिल देशमुख, रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
आरोग्य मंत्री श्री. सावंत म्हणाले, हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा – सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.
