Home Blog Page 1379

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या प्रसारासाठी मेळाव्याचे आयोजन

पुणे दि.२३-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुणे व सातारा कार्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंतय पोहोचविण्याकरिता मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे मातंग व तत्सम समाजातील समाजबांधवांकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, बार्टी विभाग प्रमुख अनिल कारंडे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे, महामंडळाचे सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक श्री. म्हस्के यांनी केले आहे. कार्यक्रमात बीजभांडवल योजनेंतर्गतऑटोरिक्षांसाठी ७ लाख रुपयांचे वितरण प्रातिनिधीक स्वरुपात तीन लाभार्थ्यांना करण्यात आले.

मेळाव्यात पुणे, सातारा जिल्ह्यातील मातंग समाजातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, व समाजबांधव यांनी योजना राबविण्यातील समस्या मांडल्या. या संदर्भात महामंडळ आणि बार्टीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. २३: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. चित्ररथाची पाहणी करून मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय नलवडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निलेश देशमुख आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातीत सर्व तालुक्यातील १ हजार ८४३ गावात आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात ‘आपला संकल्प विकसित भारत’च्या १२ एलईडी चित्र रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात आंबेगाव आणि बारामती या तालुक्यातून करण्यात येत आहे. ही मोहीम २ महिने सूरू राहणार असून २६ जानेवारी २०२४ रोजी या मोहिमेचा समारोप होईल.

दररोज प्रत्येक तालुक्यातील २ गावी सकाळी आणि संध्याकाळी हे चित्ररथ जाणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती होण्यास मदत होणार आहे.

माझ्यापुढेही सत्तेत जाण्याचा पर्याय होता,पण वडिलांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी आपल्यापुढेही सत्तेत जाण्याचा पर्याय होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यापुढेही सत्तेत जाण्याचा पर्याय होता. पण माझ्या वडिलांनी मोठा संघर्ष केला. त्यामुळे त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असे त्या म्हणाल्या.सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, सुरुवातीला मी राजकारणात शरद पवारांची मुलगी म्हणून आले. तेव्हा माझ्या घरातील सर्वजण माझ्या प्रचाराला येत होते. अजित पवारही यायचे. माझ्यापुढे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज येथे लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. पण मी लहानपणापासूनच लाल दिवा पाहत आहे. माझ्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष केला. त्यांना सोडून सत्ते जाणे मला पटले नाही.

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा केवळ शरद पवारांनी चालवला. सध्या राज्याच्या राजकारणात 2 नवे गट (अजित पवार व शिंदे) झालेत. त्यांच्याशी आमचा लढा आहे. सत्तेत असताना माझी आई आम्हाला वाढत्या महागाईकडे लक्ष देण्याची सूचना करत होती. आज सर्वकाही महाग झाले आहे. याला जबाबदार अदृश्य शक्ती आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना म्हणाल्या.

भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज त्यांच्या ना खाऊंगा, ना खाने दुंगाचे काय झाले? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची माफी मागा. समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्याचे काय झाले? सकाळी 6 वाजता ईडीने त्यांच्यावर छापेमारी केली होती. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची ईमानदारी आहे. मी दिल्लीच्या अदृश्य शक्तीला चित केले नाही तर नाव सांगणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शिवसेना पक्ष त्यांच्या मुलाला दिला होता. तो पक्ष दुसऱ्याच कुणीतरी घेतला. त्याचे पुढे काय होते हे कळेलच. भाजपचे स्वतःचे 105 आमदार होते. आज त्यांच्याकडे काय आहे? प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांना 2004 मध्ये मंत्री केले, असे सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर DCM-1 असे लिहिलेले असते. भाजपचे 105 आमदार आहेत. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले. ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांना त्रास दिला जातोय. दिल्लीतील नेत्यांना ज्यांचे नाव कुणाला माहिती नसते असे मुख्यमंत्री लागतात. योगी आदित्यनाथ सोडून एक नाव सांगा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला कारखाना चालवता आला नसता

सु्प्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरेच झाले. कारण मला तो कारखाना चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केले की गल्लत होते असे आज होताना दिसते.

PM मोदींना पनवती म्हटल्याने निवडणूक आयोग राहुल गांधींवर संतापले ,म्हणाले हा आचारसंहितेचा भंग

जयपूर- निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी पनौती, जेबकतरासारखे वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे लक्षात घेऊन आयोगाने याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

या तिन्ही निवेदनांवर कारवाई करण्यात आली

  • पहिले विधान: राहुल गांधी यांनी 21 नोव्हेंबर रोजी बायटू, बारमेर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले होते- खिसेकापू असतात, जेव्हा दोन चोरांना कुणाचा खिसा कापायचा असतो, तेव्हा ते आधी काय करतात? ते लक्ष विचलित करण्याचे काम करतात. कोणीतरी तुमच्या समोर येऊन तुमच्याशी बोलतो. आपले लक्ष इकडे तिकडे जाते. दुसरा मागून येतो आणि खिसा कापतो. निघून जातो. पण खिसाकापू पहिले लक्ष विचलित करतो. बंधू आणि भगिनींनो, तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि तुमचे खिसे कापण्याचे काम नरेंद्र मोदीजींचे आहे.
  • दुसरे विधान: कधी क्रिकेट सामना पाहण्यासाठी जातात. भारत पराभूत झाला ही वेगळी बाब, पीएम म्हणजे पनौती मोदी.
  • तिसरे विधान: कधीतरी इथे घेऊन जाईल. कधीतरी तिथे घेऊन जाईल. पुढे मागे बरेच. याचा संपूर्ण लाभ चार-पाच उद्योगपतींना मिळणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, गेल्या 9 वर्षांत नरेंद्र मोदीजींनी भारतातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांचे 14,00,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.

खरगे म्हणाले – आम्ही सामना करू
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाच्या नोटीसवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – आमच्याकडे कोणतीही नोटीस आल्यासआम्ही त्याचा सामना करू.

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

0

मुंबईदि. २३ : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.’मुंबई फेस्टिव्हल 2024′ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले की,  मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे. मुंबईतील कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम  नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे महिंद्रा म्हणाले.

पर्यटन संचालक डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईत विविध ठिकाणी मुंबई फेस्टिव्हलचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महा मुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील. राज्य शासनाने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिव्हलचे संकल्पना आणि व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे. मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल. यातील मेगा बक्षिसांमध्ये अनेकांची स्वप्ने सत्यात उतरतील. मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा कला महोत्सव हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत.

मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आले, यानंतर संगीतकार श्री. टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे देखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते. चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी मुंबई फेस्टिव्हलच्या गाण्याला हुक स्टेप्स सादर करून ‘संकल्प गीताने’ सादरीकरण केले.

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह भूमिपुत्र व स्थानिकांच्या विकासासाठी पूरक-मंत्री रविंद्र चव्हाण

0

मुंबई, दि. २३- वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व स्थानिकांनाच मिळेल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले.
वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे, तसेच आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर व आमदार सुनिल भुसारा हे ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जवाहरलाल नेहरु प्राधिकारणाचे अध्यक्ष संजय शेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्राधिकारणाचे अध्यक्ष शेठी यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे सादरीकण केले. या सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचा आराखडा, मूळ उद्देश्य, भविष्यात प्रकल्प उभारणीचे टप्पे, बंदर उभारणीसाठी केलेला अभ्यास आदी सर्व बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपले काही मुद्दे यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासमोर मांडले. वाढवण बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने येत्या २२ डिसेंबर २०२३ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणी पूर्वी आजच्या सादरकीरणाचा अभ्यास करुन एक बैठक आयोजित करण्यात येईल असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही प्रकल्प फक्त राज्याच्या हिताचा नाही तर देशाच्या हिताचा व विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्रांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. स्थानिकांनाही या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. येथील एकही प्रकल्पबाधित विस्थापित होणार नाही व त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले.
आजच्या बैठकीत जवाहरलाल नेहरु प्राधिकारणाच्या माध्यमातून करण्यात आलेले सादरकीरण पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. या सादरकीरणाच्या अनुषंगाने कोणाच्या काही शंका वा काही प्रश्न असतील तर त्याचे योग्यरित्या निराकारण करण्यात येईल. येथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी शासनाच्यावतीने घेण्यात येईल. केवळ विरोधाला विरोध न करता प्रकल्पाच्या विरोधात कोणाचे काही प्रश्न असतील तर ते समजावून घेण्यात येईल व त्यामधून सकारत्मकरित्या मार्ग काढण्यात येईल असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

बाईक रेस केल्याच्या मोठ्या आवाजाने झाली झोपमोड ,भाडेकरूने थेट केली घरमालकाची हत्या

पुणे- घरमालकाने दुचाकीच्या रेसचा मोठा आवाज केल्याचा त्रास झाल्याने भाडेकरूने त्याला बेदम मारहाण केली; तसेच पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते दीडच्या सुमारास उरळी देवाची येथील खंडोबाचा मळा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी भाडेकरूला अटक केली असून, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दादा ज्ञानदेव घुले (वय ५० रा. खंडोबाचा मळा, उरळी देवाची) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली, मूळ रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी प्रथमेश संतोष घुले (वय १९, रा. घुले वस्ती, मांजरी) यांनी फिर्याद दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले यांनी आरोपी संतोष धोत्रे याला त्यांच्या चाळीतील खोली भाडे तत्त्वावर दिली आहे. हे दोघे ही प्लम्बिंगचे काम करीत होते. २० नोव्हेंबरला दुपारी बारा ते दीडच्या सुमारास घुले त्यांच्या घराबाहेर दुचाकी सुरू करून मोठ्या आवाजात रेस करीत होते. या आवाजामुळे संतप्त झालेल्या धोत्रे याने घुले यांना गाडीचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून दोघांत खूप वेळ वाद झाला. या वेळी आरोपी धोत्रे याने घुले यांना बेदम मारहाण करून, घराच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांचा खून केला.संध्याकाळपर्यंत दादा घुले दिसले नसल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्या वेळी पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे समोर आले. या प्रकरणी संतोष धोत्रे याला पोलिसांनी अटक करून, मंगळवारी रात्री लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस. खैरनार पुढील तपास करीत आहेत.

पुण्यात रेल्वेचा २ दिवस ट्रॅफिक ब्लॉक,मुंबई पुणे सेवेवर परिणाम,’या’ गाड्या रद्द, काही उशिरानं सुटणार,यादी समोर

पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे – लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कारणाने शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर आणि रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला काही गाड्या रद्द होतील , पुनर्निधारित वेळेवर आणि काही विलंबाने चालतील.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

१. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर ला सुटणारी गाडी क्रमांक १२१२३ मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि ११००९ मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द राहील.२. रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला पुणे- तळेगाव -लोणावळा -पुणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन सर्व ४६ लोकल सेवा गाड्या रद्द राहतील.
३. रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक १२१२४ पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस,११०१० पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, ११००७/११००८ पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, १२१२७/१२१२८ पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तथा गाडी संख्या ११०२९/११०३० मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द राहील.

पुनर्निर्धारित वेळेवर धावणाऱ्या गाड्या

१. रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक १२९३९ पुणे – जयपूर एक्सप्रेस पुणे येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ १७.३० वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात १९.३० वाजता सुटेल.२. रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक २२१०६ पुणे – मुंबई एक्सप्रेस पुणे येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ १८.३५ वाजता ऐवजी पंचवीस मिनिटे विलंबाने अर्थात १९.०० वाजता सुटेल.
३. रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे येथून निर्धारित प्रस्थान वेळ १८.४५ वाजता ऐवजी एक तास विलंबाने अर्थात १९.४५वाजता सुटेल.
४. रविवार २६ नोव्हेंबरला दौंड येथून सुटणारी गाड़ी क्रमांक २२९४३ दौंड – इंदौर एक्सप्रेस दौंड वरून निर्धारित प्रस्थान वेळ १४.०० वाजता ऐवजी चार तास विलंबाने अर्थात १८.०० वाजता सुटेल.

उशिराने धावणाऱ्या गाड्या

शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला बेंगलुरु येथून सुटणारी गाडी क्रमांक ११३०२ बेंगलुरु – मुंबई उद्यान एक्सप्रेस, बेंगलुरु येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १६५०६ बेंगलुरु – गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला मुंबई येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १११५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्सप्रेस , लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई येथून सुटणारी ११०१९ छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई येथून सुटणारी २२७३२ छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस पुणे विभागावर काही उशिराने धावतील.


५. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला त्रिवेंद्रम येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १६३३२ त्रिवेंद्रम – मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ ०४.२५ वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात अर्थात ०६.२५ वाजता सुटेल.
६. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला ग्वालियर येथून सुटणारी गाडी क्रमांक २२१९४ ग्वालियर – दौंड एक्सप्रेस ग्वालियर येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ १७.१५ वाजता ऐवजी दीड तास विलंबाने अर्थात १८.४५ वाजता सुटेल.

IFFI गोवा 2023 मध्ये अदिती राव हैदरी दुहेरी भूमिकेत ! 

 अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) अत्यंत प्रतिष्ठित पॅनल चर्चेत भाग घेतला असून “फिल्म फॅसिलिटेशन: यूके आणि भारताचा 2023 सह-निर्मिती प्रवास” या थीमचा शोध घेऊन चित्रपट उद्योगात यूके आणि भारत यांच्यातील सहयोगी उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी अदिती एक मुख्य अभिनेत्री ठरली आहे. 

 गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि ब्रिटिश चित्रपट संस्था संयुक्तपणे सादर करत असलेल्या पहिल्या अधिकृत इंडो ब्रिटिश सह-निर्मिती “लायनेस” ची घोषणा केली. अदिती राव हैदरी हे सहकार्य आणि ग्लोबल सिनेमावरील त्याचा परिणाम यावर चर्चा करण्यासाठी पॅनल चर्चेचा भाग होती. 

पॅनेलमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, कजरी बब्बर, निर्माता शहनाब आलम, बीएफआयचे आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख, अॅग्निएस्का मूडी आणि सहसचिव फिल्म्स आणि व्यवस्थापकीय संचालक, NFDC श्री प्रितुल कुमार यांचा समावेश होता. व्हरायटीचे ज्येष्ठ पत्रकार नमन रामचंद्रन यांनी पॅनेलचे सूत्रसंचालन केले. यावेळी सिंहीण चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरणही करण्यात आले आणि एका अतिशय अनोख्या मार्केटिंग मूव्हमध्ये, अतिशय वेधक पोस्टरची डिजिटल आवृत्ती NFT म्हणून उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, खतिजा रहमान, संगीतकार ए.आर. रहमानची प्रतिभावान मुलगी, तिने सिंहासह आंतरराष्ट्रीय चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण केले आणि या प्रकल्पात कलात्मक तेजाचा आणखी एक स्तर जोडला. बहुप्रतिक्षित मूक चित्रपट ‘गांधी टॉक्स’, #IFFI मध्ये प्रदर्शित करण्यात आला, ज्यासाठी संपूर्ण टीम एकत्र आली आणि विजय सेतुपती, आदिती राव हैदरी, दिग्गज संगीतकार ए आर रहमान, सिद्धार्थ जाधव यांच्यासह रेड कार्पेटवर शोभा वाढवली.

पिस्तुल घेऊन फिरणारा पुण्यात आणखी एक पकडला

कोम्बींग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडुन अग्नीशस्त्र जप्त

पुणे- गावठी कट्टे , पिस्तुल घेऊन फिरणारे वारंवार पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पकडत आहेत आज आणखी एकाला पकडण्यात आले. सोन्या कदम असे त्याचे नाव असून तो अवघ्या २४ वर्षाचा आणि रेकोर्ड वरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खडक पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी व पाहिजे/फरारी आरोपी चेक करीत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, त्रिकोणी गार्डन जवळ, भवानी पेठ पुणे या ठिकाणी एक इसम उभा असून त्यांचेकडे पिस्टल हे शस्त्र असून तो कोणता तरी गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना कळवले असता त्यांनी लागलीच सदर ठिकाणी स्टाफसह जावुन मिळालेल्या बातमी बाबत योग्य ती काळजी घेवुन बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सुचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, पंच व बातमीदार असे हे सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पाहणी करता बातमीदाराने लांबुनच एका इसमास दाखविले. तो त्रिकोणी गार्डन जवळ, फुटपाथवर, भवानी पेठ पुणे संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसला. तो सतत इकडे तिकडे पाहत होता. या बाबत आमची व पंचाची खात्री होताच त्यास स्टाफच्या मदतीने त्यास पोलीस असले बाबतची चाहुल लागु न देता व त्यास पळण्याची संधी न देता छापा टाकुन आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास सपोनि आशिष कवठेकर यांनी पंचासमक्ष नांव पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रथमेश उर्फ सोन्या दिपक कदम, वय २४ वर्षे, रा. चव्हाण शाळे समोर, महादेव मंदिरा शेजारी, दुष्काळ वस्ती, धायरी गाव, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यास या ठिकाणी येण्याचे कारण विचारता तो योग्य कारण सांगण्यास असमर्थ ठरला व तो कावरा बावरा झालेचे दिसुन आले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता झडती मध्ये त्याचे नेसते पॅन्टमध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुन आले. ते पंचासमक्ष ताब्यात घेवुन सपोनि आशिष कवठेकर यांनी त्याचे मॅगझीन खोलून पाहता त्यामध्ये ०१ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्याकडुन ६०,०००/- रु किंचे एक गावठी पिस्टल व १०००/- रु किंचे ०१ काडतुस असे एकुण ६१,०००/- रु किंचा माल जप्त करुन त्यांच्या विरुध्द खडक पो.स्टे. गु.र.नं.४००/२०२३ आर्म अॅक्ट ३/२५, महा, पो. अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्रषक मेश तापकीर युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.
सदर आरोपी विरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिहंगड रोड पोलीस ठाणे येथे दाखल आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक ,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे मा.पोलीस उप- आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, आण्णा माने, निलेश साबळे, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, शुभम देसाई, अभिनव लडकत, शंकर कुंभार यांनी केली आहे.

 राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे

0

पंढरपूरदि. 23:- बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. कितीही आक्रमणे झाली, संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली.  महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.

मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चंद्रभागा नदी अविरत पणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यात्रा कालावधीत जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा बद्दल त्यांनी कौतुक केले.

नाशिक जिल्ह्यातील श्री. बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे ठरले मानाचे वारकरी

कार्तिकी एकादशी यात्रा 2023 निमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर  2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी श्री. बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रा निमित्त शासन व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा बाबत आभार मानले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मंदिर समितीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

पुणे, दि. 23: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर समितीचे  विश्वस्त मंडळ, मंदिराचे मुख्य पुजारी विलास रामचंद्र दंडवते, पुजारी मंडळाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष श्रीकांत दंडवते, प्रसाद दंडवते, कमलेश डिंगरी तसेच ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूरचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कुलदैवत असल्यामुळे श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी वारंवार येत असतो. मध्यंतरी बराच कालावधी गेल्यामुळे दर्शनाची ओढ होती. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठूरायाच्या चरणी पूजेचा योग आला आणि इथेही श्री लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनाचा योग आला. त्यामुळे येथे दर्शन घेऊन आनंद झाला, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस  यावेळी म्हणाले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने पुजारी आणि विश्वस्तांनी पुणेरी पगडी घालून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या तिसऱ्या दिवशी दोन ठिकाणी सात खेळांचा थरार

●    एकाच दिवशी २००० खेळाडूंमध्ये स्पर्धा, बॅटमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल, कराटे आणि स्केटिंगमध्ये खेळाडूंची अभूतपूर्व कामगिरी

●     बास्केटबॉल आणि फुटबॉलमध्ये अंदाजे ८०० खेळाडू सहभागी

पुणे, २३ नोव्हेंबर २०२३ – पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या तिसऱ्या दिवशी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर तरुण खेळाडूंनी बॅटमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, कराटे आणि टेनिसासारख्या विविध क्रीडास्पर्धांचा आनंद घेतला. त्यांचा सळसळता उत्साह आणि खेळाप्रती बांधिलकीनं वातावरण भारावून गेलं होते. चॅम्पियनशीपच्या मैदानात २००० पेक्षा जास्त खेळाडूंनी गुरुवारी त्यांच्या कौशल्याचे असामान्य प्रदर्शन घडवले.

अंडर- ७ क्वाड विभागात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या इरा शाहजीहानने स्केटर म्हणून केलेला प्रेरणादायी प्रवास अथक जिद्द दर्शवणारा होता. तिने एसएफए चॅम्पियनशीप्सच्या तीन रेसेसमध्ये भाग घेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. ऑक्टोबर २०२३ मध्येही इराने सीबीएसई स्टेट साउथ झोन चॅम्पियनशीप्समध्ये आपले कौशल्य दाखवत दोन ब्राँझ पदके मिळवली होती. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी तिने आरएसएफआय राज्य कार्यक्रमात पुण्याचे प्रतिनिधीत्व करत आणखी दोन ब्राँझ पदके मिळवली. इराच्या संग्रहातील प्रत्येक पदक तिचे समर्पण, चिकाटी आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी लागणाऱ्या अजिंक्य वृत्तीची गोष्ट सांगणारे आहे.

एसएफए चॅम्पियनशीप देशातील तरुण खेळाडूंमध्ये खेळाची आवड तयार करण्यासाठी बांधील असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन उद्याचे कुशल खेळाडू घडवण्याचे ध्येय आहे.

तिसऱ्या दिवशीची सांगता आगामी क्रीडास्पर्धांच्या आतुरतेसह झाली. चौथ्या दिवशी अथलेटिक्स आणि बुद्धीबळाने सुरुवात होणार असून आणखी एक दिवस क्रीडास्पर्धांचा आनंद घेता येणार आहे.

दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल

Results of Day 3

Sports and CategoryMedalWinnerSchool
 (U-17 Boys) Archery Recurve    Gold Shlok Rahul Pawar Pioneer Public School, Hadapsar
 Silver Tanish Rohit Navare Symbiosis School, Prabhat Road
 (U-17 Girls) Archery Recurve Gold Dhriti Mayur Dudhedia  Delhi Public School, Pune, Mohammadwadi
 Silver Urvi Jagdish Rane St. Annes
(U-14 Boys) Archery Recurve GoldOm Sohan NarkhedeElpro International School, Chinchwad
 SilverViraj Shrikrishna GawasCity International School, Wanowrie
 Bronze Sahyog Laddha Elpro International School, Chinchwad
(U-14 Girls) Archery RecurveGoldSharanya Minil SonawanePodar International school, kolhapur
 SilverSamaa Samir PatilWalnut School, Fursungi
 BronzeKavya PrakashThe Bishop’s School, Kalyani Nagar
(U-17 Boys) Archery CompoundGoldPratik Prasad KapseSun Bright Jr College, Ambegaon Bk, Pune 46
 SilverAmey Sandeep PawarDr. D.Y. Patil Public School, Pune
 BronzeVedang Vidyanand ShimpukadeElpro International School, Chinchwad
(U-17 Girls) Archery CompoundGoldOvi Ritesh DhoreAditya English Medium School, Baner
 SilverAsmi TandonElpro International School, Chinchwad
 BronzeSarakshee Maruti SalunkheKendriya Vidyalaya Southern Command, Camp
(U-14 Boys) Archery CompoundGoldKrishna AgrawalKalpa Vriksha Academy Wagholi
 SilverDhairyashil Dhananjay DabhadeThe Orchids International School, Manjri
 BronzeRudra Narendra SatputeRMD Sinhgad Spring Dale School, Warje
(U-14 Girls) Archery CompoundGoldRaeansha Ranjit WableThe Bishops Co-Ed School, Undri
 SilverRAJNANDINI TUSHAR BHOSALESundarbai Marathe School, Kharadi, Pune
 BronzeMehal Sandip ChavanKendriya Vidyalaya Army Area, Pune, Lulla Nagar
(U-14 Female) 500m QuadsGoldShreya MahajanVidya Pratishthan’s Nanded City Public School, Nanded
 SilverPranavi DoiphodeVidya Pratishthan’s Nanded City Public School, Nanded
 BronzeRajnandini SadarkhedHomeschooling, Pune
(U-14 Male) 500m QuadsGoldPratik ShindeHomeschooling, Pune
 SilverVedang AsnikarDES School, Tilak Road
 BronzeRishiv MalakarVidya Bhavan High School & Junior College, Shivajinagar
(U-14 Female) 1000m QuadsGoldShreya MahajanVidya Pratishthan’s Nanded City Public School, Nanded
 SilverPranavi DoiphodeVidya Pratishthan’s Nanded City Public School, Nanded
 BronzeRajnandini SadarkhedHomeschooling, Pune
(U-14 Male) 1000m QuadsGoldPratik ShindeHomeschooling, Pune
 SilverVedang AsnikarDES School, Tilak Road
 BronzeShivam WaghamodeHomeschooling, Pune

बाणेर:चालू बांधकामावरून सळई डोक्यात पडून ९ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यु

पुणे -बाणेर परिसरात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना,आईसोबत शाळेतून घरी पायी जात असलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा डोक्यात अचानक बांधकाम मजल्यावरून लोखंडी सळई पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबधित बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.‘बाणेर सर्व्हे नंबर 84/1+2+3, प्लॉट नं. ओ बी, विकसक औम हाऊसिंग तर्फे अजित कर्नावट व यशदा ब्रदर्स तर्फे श्री. वसंत काटे, ला. आर्किटेक्ट श्री. मंगेश भांडेकर यांच्यामार्फत इमारत विकसनाचे काम सुरु आहे.या ठिकाणी हि दुर्घटना घडली

रुद्र केतन राऊत (वय -9, रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर,पुणे) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई पूजा केतन राऊत (वय -30) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाणेर येथे ‘ला कमर्शिअल’ या गृहप्रकल्पाचे संचालक बांधकाम व्यावसायिक, तसेच अभियंत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पूजा राऊत आणि त्यांचा मुलगा रुद्र 22 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीनच् वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी पायी जात होते. वीरभद्रनगर परिसरात ला कर्मिशअल गृहप्रकल्पाचे बांधकाम काम सुरू आहे. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मजल्यावरून अचानक एक लोखंडी सळईचा तुकडा रुद्र याच्या डोक्यात जोरात पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि जागेवरच कोसळला.सुदैवाने या घटनेत रुद्रची आई पूजा वाचल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. रुद्र याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच ,चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या सदर इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात सुरक्षा जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करत आहेत.

महापालिकेने केली तातडीने कारवाई

या संदर्भात महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहेकी,’बाणेर सर्व्हे नंबर 84/1+2+3, प्लॉट नं. ओ बी, विकसक औम हाऊसिंग तर्फे अजित कर्नावट व यशदा ब्रदर्स तर्फे श्री. वसंत काटे, ला. आर्किटेक्ट श्री. मंगेश भांडेकर यांच्यामार्फत इमारत विकसनाचे काम सुरु आहे. सदर बांधकामाच्या ठिकाणी दि. 22/11/2023 रोजी साडेचार वाजता इमारतीच्या वरील मजल्यावरून लहान मुलाच्या डोक्यावर पडल्याची माहिती दिली व सदर अपघातामध्ये मुलाला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्याची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर माहिती सायंकाळी 5.30 वाजता मिळाली. सदर माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जागेवर जावून पाहणी करण्यात आली.
जागेवर विकसकामार्फत दोन बेसमेंट + तळमजला + मेॉनाईन + 13 मजल्यांचे आरसीसी काम पूर्ण झाले आहे. इमारतीचे काम करताना इमारतीचे वरच्या मजल्यावरून अंदाजे 1 ते 1.50 फूट लांबीचा स्टील बारचा बंडल सेफ्टी नेट तोडून पदपथावरून जाणाऱ्या लहान मुलाच्या डोक्यावर पडला असल्याचे समजले. जागा पाहणी दरम्यान बांधकाम व्यावसायिक यांनी सुरक्षिततेचे उपाययोजना केलेली आढळून आली नाही व बांधकाम अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
तद्नंतर तातडीने पुणे महानगरपालिकेमार्फत संबंधित विकसक व ला. आर्किटेक्ट यांना इकडील जा.क्र. बीपी3/4766/2023 दि. 22/11/2023 अन्वये काम थांबविण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच जागेवरील कामगारांना सदर इमारतीचे कोणतेही काम करु नये याबाबत सूचना देण्यात आल्या. दि. 23/11/2023 रोजी उपचार सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास सदर मुलाचे दुर्देवी निधन झाल्याचे स्थानिकांकडून समजले. सदर घटनेमुळे सर्व बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षिततेचे उपाययोजनेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

‘एआय’, ऑटोमेशन तंत्रज्ञानाधारित कौशल्य आत्मसात करावीत-डॉ. जे. ए. चौधरी यांचा सल्ला


पुणे : “कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय), ऑटोमेशन, डेटा सायन्स, चॅट जीपीटी, मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक रोजगारांवर परिणाम होत असला, तरी नवतंत्रज्ञानाशी संबंधित रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. रोजगाराच्या या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी, कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञानाधारित नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःला अद्ययावत ठेवावे,” असा सल्ला माजी विशेष मुख्य सचिव व आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. जे. ए. चौधरी यांनी दिला.
माय ॲनाटॉमी, बंगळुरू व बीडब्ल्यू पीपल यांच्यातर्फे पुण्यातील हॉटेल हयात रिजन्सी येथे आयोजित ‘इंडिया टेक टॅलेंट लीग २०२३’ या एक दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चौधरी बोलत होते. प्रसंगी बिटवाईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्वनित मलानी यांचे ‘डिस्ट्रप्शन टू इनोव्हेशन’ यावर व्याख्यान झाले. माय ॲनाटॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय कुमार दास आदी उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत चर्चासत्र, प्रश्नमंजुषा स्पर्धा, राउंड टेबल कॉन्फरन्स, पुरस्कार व सन्मान करण्यात आले.

डॉ. जे. ए. चौधरी म्हणाले, “भारतामध्ये स्टार्टअप संस्कृती वाढत आहे. नवीन प्रगत तंत्रज्ञान उदयास येत आहे. या सर्वात पुण्याचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. भारतीय स्टार्टअप्सने एआय व इतर नवतंत्रज्ञानाची भीती बाळगू नये. उलट या संधीचा उपयोग करून घेत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. ‘एआय’मुळे काही प्रमाणात रोजगार जाणार असले, तरी या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कौशल्य आत्मसात केली, तर मोठ्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत नाविन्यपूर्ण, कौशल्याभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे.”
ध्वनित मलानी म्हणाले, “नव्या शक्तिशाली तंत्रज्ञानामुळे सगळ्याच क्षेत्रात बदल होत आहेत. ‘एआय’चा सुयोग्य वापर करून त्याला अर्थपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तांत्रिक युगात अनेकांना विविध प्रश्न पडलेले आहेत. आपल्याला असलेली माहिती आणि गुगल देणारी माहिती यातील तफावतीमुळे ‘एआय’चा स्वीकार आपल्यासाठी कठीण वाटत आहे. परंतु, हेच तंत्रज्ञान विकास आणि व्यवसाय वृद्धीसाठी कसे महत्वपूर्ण आहे, हे समजून घ्यावे. विद्यापीठांनी अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय यांसारख्या नवतंत्रज्ञानाचा समावेश करावा.”
‘एआय’ व ऑटोमेशनमुळे होणारे बदल आणि शिक्षणातील पुनर्रचना या विषयावर झालेल्या चर्चासत्रात सॉफ्टडेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख, युएसटीचे संचालक अश्विनी सिंग, टेक महिंद्राचे सीटीओ हसीत त्रिवेदी, सिंक्रोचे उपाध्यक्ष रवी मोटवानी, जेड ग्लोबलचे चीफ डिलिव्हरी ऑफिसर अरुण मेनन, फ्लेक्ससीचे संस्थापक गिरीश कुकरेजा, सिक्लोरचे वरिष्ठ संचालक निलेश भोजानी यांनी भाग घेतला. माय अनाटॉमीचे संचालक हरेश पटेल यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
‘एआय व ऑटोमेशन काळातील रोजगार आणि भविष्यातील शिक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात जेड ग्लोबलचे उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, क्लाऊडमोयोच्या उपाध्यक्षा मंजिरी पटेल शिंदे, सिमेन्सचे टॅलेंट हेड अजय कृष्णकुट्टी, सीडीके ग्लोबलचे वरिष्ठ संचालक जॉय जॉर्ज बीएनवाय मेलनचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, सॉफ्टडेलच्या संचालक (एचआर) पल्लवी शहा, सकाळ मीडिया ग्रुपच्या एचआर हेड तुलसी दौलतानी यांनी आपले विचार मांडले. जीएस लॅब्सचे संचालक (एचआर) प्रताप पवार यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
यावेळी डॉ. चौधरी यांच्या हस्ते ‘ध्रुवतारा’ पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. अशा प्रकारच्या विचारमंथनातून उद्योग, शिक्षण संस्था यांच्यातील संवाद व समन्वय अधिक वाढून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शिक्षण, कौशल्य तरुणांना देणे शक्य होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. ‘टॅलेंट, टेक्नॉलॉजी, ट्रान्सफॉर्मेशन’ ही त्रिसूत्री घेऊन इंडिया टेक टॅलेंट लीग २०२३ देशातील विविध शहरात होत आहे. याआधी हैदराबाद व बंगळुरू येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे चिन्मय कुमार दास यांनी नमूद केले.