Home Blog Page 133

जम्मूत सैन्याची गाडी 400 फूट खोल दरीत कोसळली:10 जवानांचा मृत्यू, 21 जण प्रवास करत होते; 11 जखमींना एअरलिफ्ट केले

श्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी लष्कराचे वाहन 400 फूट खोल दरीत कोसळले. यात 10 जवान शहीद झाले, तर 11 जणांना एअरलिफ्ट करून उधमपूर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनात 21 जवान होते. सर्वजण डोडा येथून वरच्या चौकीकडे जात होते. भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय रस्त्यावर खन्नी टॉपजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, या अपघातामुळे मी दुःखी आहे. या कठीण प्रसंगी, संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने आणि समर्थनाने उभा आहे.

जखमी सैनिकांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना हार्दिक संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. अब्दुल्ला यांनी त्वरित बचाव आणि स्थलांतर प्रयत्नांचेही कौतुक केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दुःखी कुटुंबांप्रती माझ्या सखोल संवेदना आहेत. जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा मिळत आहे आणि सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की, डोडा येथून आलेल्या दुःखद बातमीने खूप दुःख झाले. माझ्या सखोल संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अपघातावर बोलताना सांगितले की, आर्मीच्या गाडीच्या अपघाताबद्दल जाणून खूप दुःख झाले. सर्वतोपरी वैद्यकीय मदत दिली जात आहे. आमच्या शूर जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत.
तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या शोधादरम्यान 18 जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी 8 जवान जखमी झाले होते. त्यापैकी एका जवानाचा 19 जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहीद जवानाची ओळख हवालदार गजेंद्र सिंह अशी झाली होती.

सारसबाग सिद्धिविनायकाला मानाची पेशवाई पगडी

श्री देवदेवेश्वर संस्थानअंतर्गत सारसबाग सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा
पुणे : माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत असलेल्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. माघी गणेश जयंती निमित्त श्री सिद्धिविनायक गणपतीला मानाची पेशवाई पगडी परिधान करण्यात आली यासोबतच श्री गणेशाला भरजरी वस्त्र, सोन्याचे दागिने देखील  परिधान करण्यात आले होते. मंदिरात करण्यात आलेली रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. सकाळपासूनच सिद्धिविनायक देवतेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, तसेच विश्वस्त सुधीर पंडित, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

माघी गणेश जयंतीनिमित्त संस्थान अंतर्गत असलेल्या लक्ष्मीनगर येथील श्री रमणा गणपती मंदिर तसेच पौड फाटा येथील श्री दशभूजा गणपती मंदिर येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांच्या हस्ते सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महापूजा व याग संपन्न झाला. तर श्री दशभूजा गणपती मंदिरात विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या हस्ते आणि श्री रमणा गणपती मंदिरात पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते महापूजा व याग विधी पार पडले.

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात गणेश जन्म ‘महाआरती’ 

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; माघ गणेश जन्मोत्सवात विविध कार्यक्रम 

पुणे : मोरया, मोरया…. श्री जयति गजानन, कसबा गणपती बाप्पा मोरया… च्या नामघोषाने ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान चा परिसर भक्तीमय झाला. ट्रस्टच्या वतीने मंदिरात माघ गणेश जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्री गणेशजन्म आरती सोहळा थाटात पार पडला. तब्बल सव्वा तास मोरया गोसावी यांनी रचलेल्या विविध आरत्या आणि पदे मंदिरात म्हणण्यात आली. 

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांसह खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार हे विश्वस्त मंडळ व सर्व ठकार पुजारी यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. पुजारी आल्हाद ठकार, ओंकार ठकार, पल्लवी ठकार, आरती ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, मधुरा ठकार यांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. त्यानंतर हा जन्मोत्सव मंदिरात होत असल्याने याला विशेष महत्व आहे.

गणेश जयंतीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठ्ण व शंखनाद गजर, दुपारी १२.१५ ते १.३० यावेळेत श्री गणेशजन्म आरती सोहळा पार पडला. तर, रात्री ९.३० वाजता शेजारती व छबिना झाला.  महिनाभर सुरु असलेल्या गणेशपुराण प्रवचनाची सांगता देखील गणेशजयंतीच्या दिवशी झाली. 

दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये दररोज सकाळी ७ वाजता डॉ.पं.प्रमोद गायकवाड आणि शिष्य यांचे सनई चौघडा वादन, सकाळी ९.३० वाजता श्रीं ना अभिषेक, दुपारी ४.३० वाजता महाडकर गुरुजी यांचे गणेशपुराण दररोज पार पडले. पं.शैलेश भागवत यांचे शहनाईवादन, स्वरसंजीवन म्युझिकल प्रस्तुत भावभक्तीरंग हा कार्यक्रम, भज-मन हा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार

मुंबई, दि. २२ जानेवारी २०२६: शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ या राष्ट्रीय परिषदेत बुधवारी (दि. २१) पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय ऊर्जामंत्री ना. श्री. मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशातील वीज वितरण क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्ली येथे दि. २१ व २२ ला आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री ना. श्री. मनोहर लाल यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र, सरचिटणीस डॉ. आशिष कुमार गोयल, महासंचालक श्री. आलोक कुमार यांची उपस्थिती होती. या परिषदेत देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे पदाधिकारी व ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते.

आशियातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० चा ‘एडिकॉन-२०२६’ परिषदेत गौरव करण्यात आला. या योजनेत आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

हवामान-तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीसाठी २५०० कोटींचा सामंजस्य करार

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दावोसमध्ये महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स ग्रुप व न्यूट्रीफ्रेश फार्म टेक यांच्यात शेतीविषयक भागीदारी

दावोस/मुंबई/पुणे : दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया यांच्यात सुमारे २,५०० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात आधुनिक, हवामान-संवेदनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीला चालना मिळणार आहे.

रूरल एन्हान्सर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयदे आणि ‘न्यूट्रीफ्रेश’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव एन. बालागन, ‘एमआयडीसी’चे व्यवस्थापकीय सहसंचालक वेलारासू, रुरल एन्हान्सर्सचे प्रधान सल्लागार जयंत येरवडेकर आदी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यात हवामानाधारित स्मार्ट आणि तंत्रज्ञानाभिमुख शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असून, हा प्रकल्प एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित होणार आहे. देशातील आघाडीची कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट ऍग्रीकल्चर (सीईए) कंपनी असलेल्या न्यूट्रीफ्रेशचे तांत्रिक कौशल्य यामध्ये वापरण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे कृषी उत्पादन देण्यासाठी न्यूट्रीफ्रेश ओळखली जाते.

गणेश निकम आणि संकेत मेहता यांनी २०१९ मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया कंपनीने २०२८ पर्यंत २,००० एकर क्षेत्रात विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वार्षिक २५० दशलक्ष डॉलर महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीकडे ५० हून अधिक उत्पादने असून, भारतातील १५ पेक्षा अधिक राज्यांत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कंपनी कार्यरत आहे.

रूरल एन्हान्सर्स ही संस्था फंडिंग एजन्सी व प्रोजेक्ट इंटिग्रेटर म्हणून काम पाहणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून धोरणात्मक, संस्थात्मक आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे. या गुंतवणुकीसाठी यूएई-आधारित वित्तीय संस्था, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विकास वित्त संस्था आणि विदेशी बँकांच्या माध्यमातून वित्तपुरवठा होणार आहे. 

अंबर आयदे म्हणाले, “या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती, हवामान-संवेदनशील कृषी पद्धतींचा प्रसार, कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रचनात्मक कार्यक्रम आणि निश्चित बाजारपेठेच्या जोडणीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन सकारात्मक बदल साधला जाणार आहे. रूरल एन्हान्सर्स आरोग्य, अन्न व कृषी, बंदरे व सागरी पायाभूत सुविधा, आयटी आणि शिक्षण आदी क्षेत्रांत कार्यरत आहे.”

मुंबईत सरकारने ST प्रवर्गाला डावलल्याचा दावा:पेडणेकरांचा सरकारवर गंभीर आरोप; महापौर आरक्षणावर ठाकरे गट आक्रमक

मुंबई-राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं, तरी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. ही सोडत ठरावीक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा मुद्दा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाबाबत उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेत ST प्रवर्गातून दोन नगरसेवक निवडून आले असताना, महापौरपदाच्या आरक्षणासाठी चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग वगळण्यात का आला, असा थेट सवाल त्यांनी केला. जर ST प्रवर्गाचे नगरसेवक महापालिकेत आहेत, तर मग त्या प्रवर्गासाठी आरक्षण का ठेवण्यात आलं नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. महायुतीकडे ST प्रवर्गातील नगरसेवक नसल्यामुळेच हा प्रवर्ग जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आला का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

पेडणेकर यांनी पुढे आरोप केला की, आदिवासी प्रवर्गाला डावलण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले. यापूर्वी अशी कोणतीही अट नसताना, अचानक आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागा असाव्यात असा निकष लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हा नियम केवळ मुंबईपुरताच का लावण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियम बदलताना कोणतीही स्पष्ट माहिती, लेखी निर्णय किंवा पूर्वसूचना देण्यात आली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरक्षणाची सोडत ही लोकशाही मूल्यांनुसार आणि पूर्ण पारदर्शकतेने होणं अपेक्षित असतं. मात्र, मुंबई महापालिकेच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. सत्ताधारी पक्षांकडे ज्या प्रवर्गातील जागा आहेत, त्याच प्रवर्गाच्या आधारे आरक्षण ठरवण्यात आलं, असा गंभीर दावा त्यांनी केला. यामुळे महापौरपदाचा निर्णय आधीच ठरवून ठेवला गेला असल्याचा संशय अधिक बळावतो, असंही त्या म्हणाल्या.

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून पुढील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून या आरक्षण सोडतीविरोधात पुढील पावले उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी प्रवर्गाला न्याय न मिळाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. मुंबईसारख्या महापालिकेत आरक्षण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडणं हे गंभीर असून, यावर सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुण्यात २ बड्या नेत्यांना धक्का :महापौर पद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित

मुंबई- महापौरपदाची आरक्षण सोडत आज (गुरुवारी) जाहीर झाली असून, यामध्ये पुणे आणि मुंबई महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे.यामुळे महापौर पदाचे दावेदार असलेल्या २ बड्या नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. मात्र, आरक्षण निश्चित न झाल्याने महापौरपदासाठीचे नाव जाहीर होण्यास विलंब होत होता. अखेर आज मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.

पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत एससी महिला आणि ओबीसी पुरुष आरक्षण न निघाल्याने त्या वर्गातील इच्छुकांमध्ये नाराजी होती. मात्र, यंदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून अधिकृत महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

महापालिकानिहाय आरक्षणाचा प्रवर्ग
SC – 3, ST – 1, OBC – 8, Open – 17

महापौर पदासाठी आरक्षण
अनुसूचित जमातीसाठी राखीव महापालिका – कल्याण-डोंबिवली
अनुसचित जातीसाठी राखीव महापालिका – ठाणे (सर्वसाधारण), जालना (महिला), लातूर (महिला).
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण) – जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर,
सर्वसाधारण महिला आरक्षण – पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर, नाशिक.
सर्वसाधारण प्रवर्ग – छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर.

डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गोवा सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सामंजस्य करार

पणजी, : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आज राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (MoU) केला.

हा सामंजस्य करार आल्तिन्हो येथील मुख्यमंत्री निवासस्थानी करण्यात आला. गेल्या महिन्यात स्टारलिंकच्या अधिकाऱ्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासाठी हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. चर्चेपासून करारापर्यंतची ही जलद प्रगती, विशेषतः दुर्गम भागांमधील कनेक्टिव्हिटीची दरी कमी करण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दर्शवते.

दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार:- मुख्यमंत्री
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे दुर्गम भागात विश्वसनीय हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध करून गोव्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. यामुळे शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये चांगल्या सेवांना पाठिंबा मिळेल आणि आपत्कालीन प्रतिसादाला बळकटी मिळेल.”

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, स्टारलिंकचे प्रतिनिधी प्रभाकर जयकुमार, कंट्री हेड, स्टारलिंक इंडिया, पर्णिल उर्ध्वरेशे, संचालक, स्टारलिंक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय

▪️ आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

पुणे, दि. २१ : पुण्यात आयोजित ऐतिहासिक ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने दुसऱ्या दिवशी अधिकच थरारक वळण घेतले. ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा सायकलपटू ल्यूक मडग्वे याने सलग दुसरा विजय मिळवत ‘यलो जर्सी’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या वेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सायकलपटूंचा गौरव करण्यात आला.

आजचा दुसरा टप्पा ‘मराठा हेरिटेज सर्किट’ अंतर्गत १०५.३ किलोमीटरचा होता. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता शर्यतीला प्रारंभ झाला, तर सिंहगड रोडवरील नांदेड सिटी येथे समारोप झाला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला.

ल्यूक मडग्वे याने ०२:३१:४९ या वेळेत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. थायलंडच्या ‘रुजाई इन्शुरन्स’ संघाचा अ‍ॅलन कार्टर बेटल्स दुसऱ्या, तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

दुसऱ्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील जर्सी विजेते पुढीलप्रमाणे ठरले आहेत: यलो जर्सी (एकूण आघाडी) : ल्यूक मडग्वे (चीन), पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) : स्टीफन बेनेटन (गुआम), ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू) : जंबालजाम्ट्स सेनबायर (मंगोलिया/स्पेन), व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलपटू) : तिजसेन विगो (नेदरलँड्स), तर ब्ल्यू जर्सी (भारताचा सर्वोत्तम सायकलपटू) : मनव सरदा (इंडियन डेव्हलपमेंट टीम).

ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरत असून UCI 2.2 श्रेणीतील ही देशातील पहिली पाच दिवसांची मल्टि-स्टेज ‘कॉन्टिनेंटल सायकल रेस’ आहे. पाच खंडांतील ३५ देशांचे १७१ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एकूण ४३७ किलोमीटरचा मार्ग पुणे जिल्ह्यातील ९ तालुके आणि १५० गावांतून जात असून, अवघ्या ७५ दिवसांत जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी रस्ते व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.

विजयानंतर बोलताना ल्यूक मडग्वे म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत उष्ण होता आणि चढाव खूप आव्हानात्मक होते; मात्र संघातील सहकाऱ्यांच्या उत्तम साथीतून हा विजय मिळवता आला.”

स्पर्धेचा तिसरा टप्पा उद्या, २२ जानेवारी २०२६ रोजी ‘वेस्टर्न घाट गेटवे’ अंतर्गत पुरंदर ते बारामती (१३४ किमी) दरम्यान पार पडणार असून, या टप्प्यात पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सायकलपटूंच्या वेगवान आणि थरारक कामगिरीचा अनुभव घेता येणार आहे.

मोदी:योगी सरकारने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार शुक्रवारी

मुंबई, दि. २१ जानेवारी २०२६ :
मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे.या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.

मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे.

हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन

पुणे-पुणे महानगरपालिका व ICLEI Local Governments for Sustainability, South Asia यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी दिली.

पुणे शहराची आजमितीस लोकसंख्या सुमारे ७० ते ८० लक्ष असून पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र सुमारे ५१६ चौ.मी. आहे. शहरामध्ये माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यातून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे (E-Waste) प्रमाण सातत्याने वाढत आहे. ज्यामध्ये Laptop, Washing machines, / Televisions, Mobile Phone इ. चा समावेश होतो. ई-कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर व पर्यावरणपूरक विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणीय व आरोग्यविषयक धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत ई-कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत व परिणामकारक करण्याची आवश्यकता आहे.
Local Governments for Sustainability, South Asia ही संस्था शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण व शहरी घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेली नामांकित आंतरराष्ट्रीय संस्था असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन, क्षमता वृद्धी व धोरणात्मक सहाय्य पुरविते.
पुणे महानगरपालिका व ICLEI – Local Governments for Sustainability, South Asia यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ई-कचरा ( E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte ” प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका व संबंधीत ICLEI – Local Governments for Sustainability, South Asia संस्था यांचे दरम्यान कामाचा करारनामा देखील करण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अविनाश सकपाळ, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, प्रज्ञा पोतदार पवार, सहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन तसेच ICLEI दक्षिण आशिया संस्थेकडील प्रतिनिधी इमानी कुमार, कार्यकारी संचालक आणि सौम्या चतुर्वेदुला, संचालक यांचा समावेश आहे.

ग्रीन बाइट पुणे उपक्रम हा ई-कचरा प्रशासनातील विद्यमान तफावत दूर करण्यासाठी आणि कार्यक्षम ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यासाठी राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने औपचारिकीकरण, डेटा पारदर्शकता आणि बहु- भागधारक दृष्टिकोनाद्वारे शहराच्या ई-कचरा व्यवस्थापन परिसंस्थेला बळकटी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

याव्यतिरिक्त, पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी ICLEI दक्षिण आशिया संस्थेमार्फत सल्लागार म्हणून सहाय्य देखील करण्यात येणार आहे.

अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त

पुणे- पुणे महापालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी र.रु.२५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी विमा कंपनीस विनंती केली होती. त्यास अनुसरून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या शासकीय विमा कंपनीने र.रु.२७०/- एवढ्या अत्यल्प रकमेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी १० लाखाचा वैयक्तिक अपघाती विमा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आहे.
नुकतेच मे.सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै.निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होवून निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे सुरक्षा कवच असल्याने पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने त्यांचे पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य करून घेण्यात आला. या दिवंगत कामगाराच्या वारसास र.रु.१० लक्ष विम्याचा धनादेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) पवनीत कौर यांचे हस्ते दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे यांना दि.२१/०१/२०२६ रोजी देण्यात आला. यावेळी मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर श्री.दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे व वडील उपस्थित होते.

‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या टप्प्याचा दिमाखदार प्रारंभ

मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती

पुणे शहर, पुरंदर, राजगड व हवेली तालुक्यांत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. २१ : पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्न वारशाचे जागतिक पातळीवर दर्शन घडवणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज मोठ्या उत्साहात दिमाखदार प्रारंभ झाला. कॅम्प येथील लेडीज क्लब परिसरातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या टप्प्याला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, “या स्पर्धेचे आयोजन करताना ते एक स्वप्न वाटत होते. मात्र उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे हे भव्य आयोजन यशस्वी झाले आहे. या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जगभर पोहोचले असून सायकलिंगच्या इतिहासात पुण्याची ठळक नोंद झाली आहे. ज्या प्रकारे पुणे पुस्तक महोत्सवाने विविध विश्वविक्रम प्रस्थापित केले, त्याचप्रमाणे या स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे पुण्याचा लौकीक वाढेलच, शिवाय जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेलाही चालना मिळेल.

जगभरातील नागरिकांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले असून विविध देशांतील खेळाडू आणि पर्यटक पुण्यात दाखल होत असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे औद्योगिक तसेच सांस्कृतिक शहर आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक भक्कम होणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेलच, तसेच नव्या पिढीतील सायकलपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळेल.

ग्रामीण आणि डोंगराळ भागातूनही स्पर्धेला प्रतिसाद
दुपारी १.३० वाजता सुरू झालेला हा दुसरा टप्पा एकूण १०९.१५ किलोमीटर अंतराचा होता. पुणे शहर, पुरंदर, राजगड आणि हवेली या चार तालुक्यांतील ऐतिहासिक, ग्रामीण आणि डोंगराळ भागांतून जाणारा हा आव्हानात्मक मार्ग असल्याने देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंनी या मार्गावर आपली ताकद, तंत्र आणि सहनशक्तीचे दर्शन घडवले.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यापासून पुढे वेल्हे व भोर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीतून सायकलपटूंनी दमदार रपेट करत सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात हा थरारक टप्पा संपविला. चढ-उतार, घाटवाटा आणि लांब पल्ल्यामुळे हा टप्पा सायकलपटूंसाठी शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा ठरला.

असा होता मार्ग :
लेडीज क्लब (कॅम्प), गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर. या मार्गावरील पुरंदर किल्ला, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी आणि खडकवासला धरणाचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले.

 या टप्प्यादरम्यान कॅम्प, कोंढवा, येवलेवाडी, ग्रामीण भाग तसेच घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत सायकलपटूंना जल्लोषात प्रोत्साहन दिले. युवकांचा सळसळता उत्साह, ‘भारत माता की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषणांनी संपूर्ण मार्ग भारावून गेला. काही ठिकाणी हलगी, ढोल-ताशा आणि लेझिम पथकांच्या गजरामुळे या स्पर्धेला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

स्थानिक महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुष्पवृष्टी करून सायकलपटूंचे स्वागत केले, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी सेल्फी घेण्यासाठी तरुणांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. पुणेकरांच्या आपुलकीने आणि आदरातिथ्याने अनेक परदेशी सायकलपटू भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस दल, वाहतूक शाखा आणि शेकडो स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे रस्त्यावरील मोठी गर्दी असूनही हा १०९.१५ किलोमीटरचा टप्पा अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

इ. १० वी व १२ वी परीक्षा कालावधीमध्ये समुपदेशकांची नियुक्ती

पुणे, दि. २१ जानेवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता १० वीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेसंदर्भात काही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अडचणीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत खालील भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ञ समुपदेशक (पुणे)
योगीनी पाटील – ९९६०६४४४११
आशुमती देशपांडे – ७९७२५७३७४२
वृषाली आठवले – ९८३४०८४५९
तज्ञ समुपदेशक (बारामती)
श्रेया दिघे – ९३५९९७८३१५
तज्ञ समुपदेशक (अहिल्यानगर)
सुनील मोरे – ८१६९२०२२१४
सुजित भोसले – ९३७१६६१२५५
विजया कुलकर्णी – ७२०८४२९३८१
तज्ञ समुपदेशक (सोलापूर)
निकिता गडाख – ७७०९१५६०६८
सुजाता शिंदे – ८४२११५०५२८
वरदा रानडे – ९४०४७८३९९६
तसेच परीक्षा काळात मंडळासंबंधी माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असून,
इयत्ता १० वी साठी – ९४२३०४२६२७
इयत्ता १२ वी साठी – ७०३८७५२९७२
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

शिंदे गट म्हणजे MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही:त्यांच्याशी युती करणारेही या विशेषणांना पात्र, राऊतांचा शिंदेंशी युती करणाऱ्या मनसेवर घणाघात

मनसेने स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावीशिंदे गटाला साथ देणारे शिंदे गटासारखेच

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी युती करण्याच्या मुद्यावरून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला खडेबोल सुनावले आहेत. शिंदे गट म्हणजे मराठी माणसांतील एमआयएम, बेईमान व महाराष्ट्रद्रोही आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारेही याच विशेषणांना पात्र ठरतात, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाशी युती करणाऱ्या मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मनसेने महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाशी युती करत शिंदे गटाविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, आमची भूमिका फार वेगळी व कडवट आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरेंशी, मराठी माणसांशी गद्दारी व बेईमानी केली, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय व अन्य संबंध ठेवायचे नाहीत.

महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते व सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही. स्वतः राज ठाकरेही नाहीत. त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. कल्याण डोंबिवलीचा विषय हा समोर आला आहे. तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या मते, हा स्थानिक पातळीवरील निर्णय आहे. असू शकेल. पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचे स्थानिक म्हणवून घेणारे नेतृत्व विपरित भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्याच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर पक्षातून निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी अंबरनाथमध्ये भाजपशी असंग केला. त्यानंतर काँग्रेसने तत्काळ त्यांच्यावर पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रतारणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना पक्षातून काढून टाकले. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवर निर्णय झाला म्हणून हा विषय संपत नाही. शिवसेना व मनसे हे एकत्र आहेत. त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या. अशा वेळी कुणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बेडुकउड्या मारत असतील, तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षाने व नेतृत्वाने त्याच्यावर कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण, राजू पाटील बोलत असताना त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते. हे मी पाहिले. हे लोकांनी माझ्या निदर्शनास आणले.

संजय राऊत पुढे म्हणाले, आत्ता शिंदे गटाचे लोकं म्हणतात, मनसे म्हणजे एमआयएम आहे का? नाही. पण आमच्यासाठी व महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे. मराठी माणसांतील एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळाले नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही वैयक्तिक कारणे असू शकतात. पण ती तेवढ्यापुरतीच ठेवायला हवीत. काही लोकांच्या मागे ईडी किंवा इतर तपास यंत्रणा लागल्या असतील. पण तुम्ही त्यासाठी कुणीही पक्ष वेठीस धरणे व महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणे हे पूर्णतः चुकीचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी कल्याण डोंबिवलीतील घटनाक्रमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशीही चर्चा केली. या चर्चेचा सारांश सांगताना ते म्हणाले, ते पुढे म्हणाले, माझ्यावरही ईडीचे संकट आले. पण मी पक्षाला वेठीस धरले नाही. मी त्या संकटाचा सामना केला. आजही माझी प्रकृती खूप खराब आहे. मी आता ऑपरेशन थिएटरमधून आलो आहे. तर कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभिर्याने घेतला आहे. राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. काही मिळाले नाही तरी मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोकं असतात असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा विषय आहे असे ते म्हणाले. ते खरे आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत.

मला आत्ताच काहीतरी हवे आहे या मानसिकतेतून मग शहराचा, गावाचा, राज्याचा, देशाचा विकास व उद्या जगाचा विकास या नावाखाली उद्या पक्षांतर वाढतील. महाराष्ट्रात अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणे हे न्यायालयाचे काम असले तरी आज देखील सर्वोच्च न्यायालयाने माती खाल्ली आहे. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरली असताना सुनावणी पुढे ढकलली. याला माती खाणे म्हणतात आणि देशाच्या ऱ्हासाला हातभार लावणे म्हणतात. सर्वोच्च न्यायालय ते लावत आहे, असे संजय राऊत म्हणाले.